गीता – ज्ञानेश्वरी आणि वर्णव्यवस्था

गीता आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथसंहिता, सामाजिक विषमतेवर आधारलेल्या जन्मजात वर्णव्यवस्थेचा निखालस पुरस्कार करणार्‍या आहेत. या दोन्ही संहितांमध्ये ठायीठायी आढळणारा या संदर्भातला पुरावा स्पष्ट आहे.
गीता आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथसंहितांतील पहिल्याच अध्यायामध्ये अर्जुन या महाभारतकार व्यास यांच्या पात्राने काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांमध्ये कुलक्षयानंतरचा स्त्रियांमधील स्वैराचार या नैतिक प्रश्नाबरोबरच त्यालाच जोडून येणारा पुरातन जातिधर्म, कुळधर्म उत्सन्न होऊन वर्णसंकर होईल हा अत्यंत महत्त्वाचा सामाजिक प्रश्न दोनही ग्रंथसंहितांच्या मुखाध्याया’मध्येच उपस्थित केला आहे. अर्जुन या पात्राच्या मुखाध्यायातील सर्वच प्रश्नांची रीतसर उत्तरे देण्यासाठी पुढील १७ अध्यायांचा प्रपंच आहे. पात्रनिर्मिती व त्यामधील संवादांतून करावयाचे तत्त्वचिंतन ही खास वेधक ‘व्यासशैली आहे. गीतेबरोबरच महाभारतभर या तत्त्वचिंतनपर व्यासशैलीचे दर्शन खूप ठिकाणी घडते. असो.
वर उद्धृत केलेला ‘वर्णसंकरा चा (अर्थात् जन्मजात) प्रश्न व त्याचे गीताज्ञानेश्वरीतील ‘अवतारी श्रीकृष्ण’ या पात्राकरवी व्यासाने देऊ केलेले उत्तर हा या टिपणाचा मर्यादित विषय आहे.
‘कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः।’ त्यामुळे ‘प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः।’आणि त्यातून जायते वर्णसंकरः।’ही अवतरणे गीतासंहितेतील आणि ‘आद्य धर्म जाय।’ ‘अधर्मचि आरोपे कुळामाजी।”वंशजधर्म लोपे’ त्यातून ‘व्यभिचार घडती कुळस्त्रियांसी”उत्तम अधर्मी संचरती। ऐसे वर्णावर्ण मिसळती।’आणि त्यामुळे तेथेच ‘समूळ उपडती जातिधर्म’ ही बोलकी अवतरणे ज्ञानेश्वरी संहितेतील.
या ठिकाणी पुरातन प्रस्थापित दृढमूल जन्मजात वर्णधर्म वंशजधर्म, जातिधर्म-जन्मजात वर्णव्यवस्था टिकावी आणि ‘वर्णसंकरा’ सारखे भयप्रद परिवर्तन घडू नये हा त्यामधील अभिप्राय स्पष्ट आहे. ‘प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः’यातून ‘जायते वर्णसंकरः’ या अनुबंधातून जन्मजात वर्णाच्या संकराचे अर्जुनाचे भय सुस्पष्ट आहे. मी युद्ध केल्याने असा जन्मसंबंधित वर्णसंकर होईल हे अर्जुनाला दिसणारे भयप्रद भविष्यकथन आहे.
अर्जुन या पात्राकरवी उपस्थित केलेला हा जन्मजात वर्णव्यवस्थेचा प्रश्न केवळ उपस्थित करून व्यासमुनीने सोडलेला नाही. जन्मजात हा भाग गाळून केवळ वर्णव्यवस्थेबाबत अर्धवट उत्तर त्याने दिलेले नाही. या दोन्ही ग्रंथसंहितांमध्ये जी तत्त्वज्ञानविषयक भाष्ये येतात त्या ठिकाणी जन्मजात वर्णव्यवस्थेचे स्पष्ट समर्थन व्यासमुनी करीत राहतात. ‘अवतारी श्रीकृष्ण या पात्राकरवी त्या प्रश्नाचा गंभीरतेने स्वीकार करून अगदी गंभीरपणे प्रस्थापित जन्मजात वर्णव्यवस्थेला ईश्वरी असक शिक्कामोर्तब करून व्यासमुनी ती स्थापित करतात.
गीता-ज्ञानेश्वरी-संहितांमध्ये ब्रह्म-परब्रह्म, मोक्ष, पुनर्जन्म, संचित, परलोक, स्वर्ग, नरक या बहुशः अनुभवजन्य नसणार्‍या व पडताळून पाहता न येणार्‍या कल्पना आहेत. त्यांमध्ये लौकिकापेक्षा पारलौकिकाचा अमूर्त विचार प्रकर्षाने आला आहे. असे असूनही कर्मसिद्धांताचे निरूपण करताना त्या पारलौकिक कल्पनांची इहलोकातील वर्णसापेक्ष धर्माशी – वर्णसापेक्ष कर्माशी घातलेली सांगड ही तीमधील विलक्षणता आहे. या दोनही संहितांमधील महत्त्वाचे विचारसूत्र म्हणजे ब्रह्म-परब्रह्म, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म इ. कल्पना-संकल्पना, त्या अनुरोधाने येणारा कर्मसिद्धांत आणि वर्णसापेक्ष धर्मकर्म यांच्या सांगडीमध्येच आहे याचा प्रत्यय अभ्यासकाला या दोन्ही ग्रंथसंहितांमध्ये ठायीठायी येतो. हा दोहोंचा अनुबंध हीच या उभय संहितांतील जन्मजात विषमतेचा पुरस्कार करणारी मेख आहे. ‘चातुवर्यं मया सृष्टम् ….’ या केवळ एका श्लोकांशाशी तिची मर्यादा नाही. हा जन्मजात विषमतेचा पुरस्कार या दोनही संहितांमध्ये ग्रंथभर पसरलेला आहे. किंबहुना उपनिषदांपासून गीता-ज्ञानेश्वरीपर्यंत आणि तदनंतरही वेदान्तदर्शनातील कर्मविपाक सिद्धांत आणि वरील कल्पना यांचा पुरस्कार करणार्‍यांत सर्व ग्रंथांत जन्माधिष्ठितचातुर्वण्र्यव्यवस्थेचा पुरस्कार केला जात असतो. याची तात्त्विक जाणीव होत राहते.
ब्रह्म, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म, संचित आणि वर्णसापेक्ष स्वधर्मकर्म यांच्या अनुबंधाची तार्किक संगती या दोनही ग्रंथसंहितांच्या आधारे पुढीलप्रमाणे लागते.
आपल्याला जो आजचा वर्ण मिळाला आहे. तो आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मसंचिताचे फळ होय. अर्थात हे या जन्मीच्या वर्णाचे फळ अगदी जन्मापासून उभ्या जन्मर मिळणार! तेव्हा आपले या जन्मीचे जन्मजात गुण-कर्मासहितचे स्त्रीशूद्रत्व हा आपल्या पूर्वजन्मीच्या कर्माचा भोग आहे. (‘जन्मजात स्त्रीत्व याला पर्यायच नाही. वावदूकपणाला पळवाट नाही!) आता या जन्मी स्त्रीशूद्रकर्माचा दुःखभोग भोगणे हा आपला स्वधर्म आहे. प्रयत्नाने, बंडाने, विद्रोहाने हे जन्मजात वर्णसापेक्ष दुःखब्रह्म झुगारणे म्हणजे पारलौकिक परब्रह्मरूप मोक्षप्राप्ती तर नाहीच, पण पुढील जन्म याहीपेक्षा आत्यंतिक दुःखब्रह्माचा ठरेल असा या दोनही ग्रंथसंहितांतील जीवन भाष्याचा धाक आहे.
या जन्मजात वर्णसापेक्ष स्वधर्मकर्ममय अशा दुःखभोगाखेरीज निदान पुढील जन्मीच्या उच्चतर फळासाठी या जन्मी या स्त्रीशूद्र वर्णकर्मात राहून काही वेगळे पुण्यकर्म करता येईल काय? याच कर्मसिद्धांताच्या आधारे – याच जीवनभाष्याच्या आधारे या स्त्रीशूद्रांना या जन्मी नाहीच पण पुढील जन्मी तरी पुण्यशील असे जन्मजात ब्रह्मकर्म आणि ऐश्वर्यशील असे जन्मजात क्षात्रकर्म करता येईल काय?त्यांना पुढील जन्मीच्या पुण्यशील, ऐश्वर्यशील संचितासाठी कर्मस्वातंत्र्य – कर्तृत्वस्वातंत्र्य आहे काय?
वरील प्रश्नाचे उत्तर दोनही संहितांमध्ये बहुशः नकारात्मकच मिळते.
तार्किकदृष्ट्या अगोदरच्या म्हणजेच पूर्वजन्मकर्मसंचितानुसार त्यांना स्त्रीशूद्रत्व हे जन्मतःच जन्मभरच्या भोगासाठी लाभले आहे. त्याच पूर्वसंचितानुसार शूद्रांना जन्मजात तामसी गुण मिळणार. या पूर्वजन्मसंचित-आधारित जन्मजात तामसी गुणांनुसार हे शूद्र जन्मभर तामसी आहार घेत राहणार (त्यांच्या उष्ट्याशिळ्या कुजट तामसी आहाराची समाजव्यवस्था उदारपणे व्यवस्था करणार) या तामसी आहारानुसार त्यांचे व्यक्तिमत्त्व आणखीच तामसी होत जाणार आणि त्यामुळे त्यांच्या हातून याही जन्मी तामसीच कर्मे घडत राहणार (तार्किकदृष्ट्या त्यांची पुण्यसंचितासाठी ‘सत्त्वशीलतेशी कधी गाठच पडणार नाही. या शूद्रांची सत्त्वरज यांपासून या जीवनभाष्याने कायमची फारकत करून त्यांची ‘तामसी बरोबर जन्मोजन्मीची गाठ बांधून टाकली आहे.) आणि तार्किक संगतीनुसार या शूद्रांना जन्मोजन्मी जन्मतःच तेच तामसी शूद्रगुण तोच शूद्र वर्ण, तेच शूद्रकर्म आणि इहलोकीचे तेच दुःखब्रह्म अशा रहाटगाडग्यातून अनंत काळपर्यंत फिरत राहावे लागणार असाच निष्कर्ष या दोन्ही ग्रंथसंहितांतील संबंधित जीवनभाष्यांतून निघत असतो, अशी जाण या दोनही संहिता वाचताना येत राहते.
(या दोनही ग्रंथसंहितात एकत्रित संबोधिलेल्या ‘स्त्रीशूद्र’ यांपैकी स्त्रीलाही थोड्याफार फरकाने वरील विवेचन लागू पडते.)
या साऱ्या प्रतिक्रिया या दोनही ग्रंथसंहितांचा काल, आणि तत्कालीन परिस्थिती याबाबतच्या मर्यादा लक्षात घेऊनही द्याव्या लागत आहेत.
गीतारहस्यकारांच्या कालगणनेनुसार गीतासंहितेचा काल इ.स.पूर्व पाचवे शतक असा आहे. (पाश्चात्त्यांच्या मते हा काल इ.स. पहिल्या शतकाच्या आगेमागे आहे.) आणिज्ञानेश्वरीसंहितेचा काल इ.स. १२९० असा स्वीकारण्यात आला आहे. या दोहोंच्या काळापूर्वीही म्हणजे इ.स.पूर्व सहाव्या शतकात ब्रह्म, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म आणि जन्मजात वर्णाश्रित धर्मकर्म याबाबतचे लक्षणीय वैचारिक मंथन होऊन गेले आहे. इ.स.पूर्व सहाव्या शतकाच्या सुमारास ब्रह्म, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म, वर्ण-कर्म याबाबतचे बंडखोर विचार मांडणारी बौद्ध दर्शने आणि प्रत्यक्ष आचारपंथही होऊन गेले आहेत. आजच्या जडवादी वैज्ञानिक दृष्टिकोणाला जवळचे असे ‘लोकायत दर्शन या कालाच्या आसपासचे आहे. ज्ञानेश्वरीसंहितेला समकालीन महानुभावपंथ हा वर्णविचाराबाबत बराचसा उदार आणि सर्वसमावेशक ठरतो. हे सर्व लक्षात घेता त्या दोन्ही ग्रंथसंहितांच्या कालाबद्दलच्या आणि तत्कालीन परिस्थितीबाबतच्या मर्यादांचा मुद्दा विचारात घेण्याचे कारण दिसत नाही. किंबहुना या उभय संहितांच्या आगेमागे वर्णसंबंधित समतासंमुख विचार मांडले जात असता सर्व वर्णसंबंधित समताधिष्ठित आचारपंथही अस्तित्वात असताना या दोन्ही संहितांनी मात्र विषमतेचा पुरस्कार करणार्‍या चातुर्वण्याचा (जन्मजातच) पुरस्कार केला या अनुदारतेचे आश्चर्य वाटते.
आणखी एक मुद्दा असा की ‘मनुस्मृती ही गीता-ज्ञानेश्वरी या दोनही ग्रंथसंहितांच्या बरीचशी अगोदरची आहे. ‘मनुस्मृती’ मधील जन्मजात स्त्रीशूद्रांना दिलेले. पशुतुल्य स्वधर्मकर्म हे गीता-ज्ञानेश्वरी संहितांच्या उभय संहिताकारांना माहीत आहे. या पाश्र्वभूमीवर या उभय संहिताकारांनी मानवी मूल्यांचे अवमूल्यन करणार्‍या तसल्या स्मृतिप्रणीत स्वधर्माचे, जन्मजात वर्णसापेक्ष कर्माचे प्रतिपादन करावे याचे संतापजनक आश्चर्य वाटते.
शिवाय गीता-ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथसंहितांच्या निर्मितिकाळात गुणाधिष्ठित वर्णव्यवस्था नसून जन्माधिष्ठित वर्णव्यवस्था दृढमूल झालेली होती. (गुणांवरच आधारित अशी अशक्यप्राय तथाकथित आदर्श चार्तुवर्यव्यवस्था कधीच नव्हती – असणे शक्यच नाही. आणि गीता ज्ञानेश्वरी काळात तर ती नव्हतीच नव्हती.) म्हणजे हे दोनही संहिताकार स्वधर्म-सूर्याचा जयजयकार करताना तत्कालीन जन्माधिष्ठित वर्णधर्मकर्माचावर्णव्यवस्थेचा पुरस्कार करतात हे कालसापेक्षता लक्षात घेता स्पष्ट होते.
या सर्व गोष्टींना अपवाद आणि उत्तर म्हणून या उभय ग्रंथसंहितांतील नववा अध्याय सांगितला जातो.
‘स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् ।’ अशी गीता स्त्रीशूद्रांना ‘परां गतिम् सांगते आणि ‘भक्ति गा एथ सरे। जाति अप्रमाण ।…. म्हणोनि कुळजाति वर्ण । हे अवघेचि अकारण। असे जातिवर्णाचे श्रेष्ठकनिष्ठत्व नाकारून यापरी पापयोनी ही अर्जुना। वैश्य शुद्र अंगना । मातें भजतां सदना।माझिया येती ।। असे म्हणून ज्ञानेश्वरीसंहिता जाति-वर्ण लक्षात न घेता शूद्रांना व स्त्रियांना भगवंतांच्या घरात प्रवेश देते.
पण हे सारे फक्त पारलौकिक खर्याशखोट्या मोक्षासाठी आणि तेही भक्तिमार्गापुरतेच मर्यादित आहे. बाकी इहलोकीच्या सर्व प्रापंचिक व्यवहारांतजातिवर्णसापेक्ष धर्मानुसारच शूद्राने सेवाकर्म करावयाचे आहे. तेच इहलोकीचे जन्मजात दुःखब्रह्म भोगावयाचे आहे. किंबहुना ती एक आवश्यक अशी अट आहे.
शूद्र हा कितीही मोठा साधुसंत, ज्ञानी, भक्त, जितेंद्रिय, दैवी गुणालंकृत, निष्काम कर्मयोगी, गुणातीत इ. झाला (गीता ज्ञानेश्वरीतील जीवनभाष्याच्या तार्किक संगतीनुसार ते अशक्य असले तरी प्रत्यक्षात कुठल्याही वर्णातील ‘मदायत्तं तु पौरुषम्’ ला ते शक्य आहेच.) तरी, त्याने वरिष्ठांची सेवा करावयाची आहे. त्याचे पुढील जन्माचे संचित या ‘शूद्रकर्माखेरीज या ‘स्वधर्मा खेरीज ठरावयाचे नसते.
या ठिकाणी आणखी एक नोंद महत्त्वाची. ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरीसंहिता ही जाति अप्रमाण, कुळजाति वर्ण अकारण असे म्हणते, त्याच ठिकाणी ही संहिता ‘वैश्य शूद्र – अंगना यांना पापयोनी म्हणते आणि तेथेच ब्राह्मण या जातिवर्णाचा मात्र मोठ्या गौरवाने भरभरून महिमा गाते.अगदी आतील उभाळ्याने आणि केवढ्या उत्फुल्ल, प्रसन्न रूपकात्म काव्यसुंदर शैलीने!
‘ब्राह्मण म्हणजे वर्णामधले छत्रचामर, मंत्रविद्येचे माहेर, पृथ्वीतळीचे देव, यज्ञांचे आश्रयस्थान, मंगलतेचे निधान, तपश्चर्येचे अवतार, तीर्थक्षेत्रांचे सुदैव, महासिद्धीचे प्राप्तव्य, स्वर्ग हीच त्यांची निर्वाहभूमी आणि सामर्थ्याच्या दृष्टीने प्रलयकाळाच्या रुद्रदेवतेचे वसतिस्थान असे पुण्यपूज्य ब्राह्मण!’म्हणजे या ठिकाणी स्थितप्रज्ञ, ज्ञानी योगी भक्त यांच्यातील सर्व गुणधर्माचा अर्क म्हणजे ‘ब्राह्मण असे हे वर्णन.
आणि मग असल्या ब्राह्मण – पुराण’वर्णनकाव्याच्या धबधब्यात आताच म्हटलेले ‘जाति अप्रमाण । जातिवर्ण अकारण’। या समतासूत्राचा परिणाम मुळापासून वाहून जातो – पूर्णपणे पुसून टाकला जातो.
आणखी एक पुढील नोंद म्हणजे ज्ञानेश्वरी संहिता ही स्वधर्मकर्म म्हणजे स्वतःच्या वर्णाचे (तत्कालीन व ग्रंथातील जीवनभाष्याला अभिप्रेत असलेला जन्मजातच) कर्म न करणार्‍यांना स्मृतिकारांप्रमाणेच कडक पाशवी दण्ड सांगते;
म्हणोनि स्वधर्म जो सांडील। तैयारों काळु दंडील।
चोरू म्हणोनि हारील। सर्वस्व तेयाचें ।।
तैसीं त्रिभुवनीचीं दुःखें । आणिक नाना पिसें ।
दैन्यजात जें तुझें । तेथेचि वसे ॥
असा दंड भोगावा लागू नये म्हणून –
तरी स्वाधिकाराचेनि नावें । जे वाटें आलें स्वभावें
ते आचरिजे गौरवें । शृंगारोनि
असा हा वर्णाश्रित (जन्मजातच) स्वधर्मकर्माचा धाकयुक्त पुरस्कार आहे.
गीता – ज्ञानेश्वरी या दोन्ही संहितांमध्ये ब्रह्म, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म, कर्मसिद्धांत आदि कल्पना – संकल्पना आणि त्यांची जन्मजात वर्णसापेक्ष धर्मकर्माशी घातलेली दृढ सांगडस्पष्ट आहे. पण या अनुबंधावर कळस चढविला गेला आहे, चवथ्या अध्यायात ‘चातुर्वर्य मया सृष्टं गुणकर्मविभागशः।’ या व्यासमुनींच्या भगवत्प्रणीत सूत्राने. गीता-ज्ञानेश्वरी संहितेत ‘भगवंताच्या प्रत्यक्ष मुखातील या सूत्राने जन्मजात चातुर्वर्ण्यव्यवस्थेवर ईश्वरी शिक्कामोर्तब केले गेले.
वरील सूत्र ‘धर्मसंस्थापना आणि ‘अवतारकल्पना या नेमक्या मोक्याच्या ठिकाणी येते. वस्तुतः ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् … संभवामि युगे युगे।’ याआठव्या श्लोकातील भगवंताच्या विश्वकल्याणमय सत्कर्मरक्षक अशा समाजधारणाविषयक हेतूचा व कार्याचा मनावर यथायोग्य मूल्याधिष्ठित असा नैतिक संस्कार होतो न होतो तोच ते प्रसिद्ध सूत्र लगोलग तेराव्या श्लोकात अचानकपणे येते आणि तशा अवस्थेतील मानसिकतेवर कोसळते आणि फार मोठा प्रतिकूल आणि विपरीत असाआघात करते. ज्ञानेश्वरीसंहिताही याबाबत फारसे वेगळे बोलत नाही.
‘साधूंचा मानु गिवशी ।दैत्यांची कुळे नाशी ।।’
‘मग पापाचा अचलू फिटे।पुण्याची पहाट फुटे ।’
त्यासाठी ‘अवतरें मी युगयुगीं।।या सत्तावन्नाव्या ओवीतील नैतिक मूल्याधिष्ठित सत्कर्मरक्षक असा संस्कार आपल्या पुलकित मानसिकतेवर होतो. पण अगदी लगोलग ७७/७८ या ओव्या अगदी वेगळेच विपरीत सांगत पुढे येतात. आता याचपरी जाण । चारही आहेत हे वर्ण। सृजिल्या म्यां गुण -। कर्मविभागें ।।’आणि वरील प्रमाणेच तशा मूल्याधिष्ठित अवस्थेतील मानसिकतेवर तेच आशयसूत्र कोसळते आणि तसाच फार मोठा प्रतिकूल आणि विपरीत असा आघात करते.
आणि मग गीता-ज्ञानेश्वरीतील भगवंताचा अवतार कोणत्या स्वरूपाच्या धर्मस्थापनेसाठी आहे याबाबत प्रश्न निर्माण होतो. पण ‘अवतारकल्पना आणि ‘धर्मकल्पना यामधील येथील लगोलगचा अनुबंध संदेहाला फारशी जागा ठेवीत नाही.
धर्मसंस्थापना आणि भगवंताचा अवतार यांचा अनुबंध जोडताना भगवंताचा हा अवतार चातुर्वर्यप्रणीत धर्मस्थापनेसाठीच होत असतो असे स्पष्ट सूचित इतिहासाचार्य राजवाडे यांनी केले आहे. मग ब्राह्मण कोण या लेखाच्या शेवटी हा अनुबंध ते स्पष्ट करतात.
‘तात्पर्य प्राचीन काळी पाच हजार वर्षांपूर्वी सुसंस्कृत जगात सगर राजापर्यंत सर्वत्र चतुर्वर्णात्मक समाजव्यवस्था प्रचलित होती’. तिचा आज पाच हजार वर्षे संकोच होत होत एकट्या हिंदुस्थानात तेवढी ती राहिली आहे. ह्यापुढे ती समूळ नाहीशी होणार किंवा पुनः सर्व जगभर पुढील पाच हजार वर्षांत पसरणार त्याचा निर्णय भविष्यकाल ठरवील.‘धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।’ अशी भगवदुक्तीही आहे.
गीतारहस्यकारांनी ‘धर्म’ या शब्दाचे तीन अर्थ सांगितले (१) पारलौकिक धर्म – मोक्षधर्म, (२) नीतिधर्म, (३)ऐहिक चातुर्वण्र्याचे धर्म. या तीनपैकी ‘नैतिक मूल्यावस्था’ या दुसर्या, अर्थाला त्यांनी महत्त्व दिले आहे. पण ‘चातुर्वर्यव्यवस्था हे ‘धर्मरूप ही तेमहत्त्वपूर्ण मानतात आणि पुढे धर्मस्थापनेशी अनुबंध जोडीतच भगवंत प्रणीत चातुर्वर्ण्य निर्मितिपर श्लोकाचा अर्थ सांगतात.
भारतीय तत्त्वज्ञानकार कॉ. सरदेसाई यांनी तर गीतेतील सर्व उतार्यांंत कर्म व धर्म या शब्दांचा स्पष्ट अर्थ चातुर्वर्ण्यविहित कर्म आणि धर्म असा आहे, असे स्पष्ट म्हटले आहे.
वरील तीन वेचक संदर्भावरून चातुर्वर्ण्यधर्मसंस्थापनेसाठी भगवंत युगायुगातून अवतार घेत असतात या अभिप्रायाला यथार्थ बळकटी लाभते.
मूळ दोन्ही संहितांमध्येही धर्म म्हणजेच वर्णाधारित कर्म या अभिप्रायाला हवा तेवढा पुरावा उपलब्ध आहे.
स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धि लभते नरः।।
श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् ।।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः।।
गीतेतील या वेचक सूत्रांमध्ये धर्ममोक्ष यांचा अनुबंध विषमताधारित वर्णसंबंधित कर्माशीच जोडल्याचे स्पष्ट आहे.
ज्ञानेश्वरीसंहितेतही धर्म-मोक्षाचा संबंध अशाच विषमताधारित वर्णसंबंधित कर्माशीच जोडल्याची उदाहरणे अनेक आहेत :
तुम्हां वर्णविशेषवशें । आम्हीं हा धर्म विहिला असे ।
यातें उपासा मग आपैसे । काम पुरती ।।
देखे अनुक्रम आधार”। स्वधर्म जो आचर।
तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्चित पावे ।।
स्वधर्मे राहाटतां । सकळ काम पूर्तता ।।
स्वधर्मु एक आहे । तो सर्वथा त्याज्य नोहे ।।
स्वधर्म जो बापा । तोचि नित्य यज्ञ जाण पा।
स्वधर्मुचि सुखाडु । पारत्रिकीचा ।।
आता या सूत्रातील संगती विसंगतीबद्दल खास लिहिण्यासारखे. गीता बद्ध आणि ‘ज्ञानेश्वरी’ अनुवादित त्या सूत्राचा अर्थ स्पष्ट आहे. चार वर्ण मी निर्माण केले असे उभय संहितांतील भगवंत सांगतात, पण त्याच ठिकाणी गुण व कर्म यांच्या भेदाप्रमाणे असे तेच भगवंत सुटकाही करून घेताना दिसतात. पण अशी सुटका होणे शक्य नाही. ही एक प्रकारची (निदान अर्थ लावणारांची) बनवाबनवी ठरते. विसंगती नक्कीच.
या ठिकाणी प्रश्न असा की माणसाच्या ठिकाणी हे गुण कोणी दिले? शूद्राच्या ठिकाणी तमोगुण आणि ब्राह्मणाच्या ठिकाणी सत्त्वगुण हे कोणी दिले? सर्व विश्वाचा निर्माता या नात्याने ते गुण या भगवंतांनेच दिले असल्यास तोच संपूर्णपणे जन्माधिष्ठित वर्णव्यवस्थेचा निर्माता आहे. हेच प्रतिपादन येथे सिद्ध होते. आणि हे ‘भगवंत’ तर माणसाच्या ठिकाणचे असे पक्षपाती गुणनिर्माते नसतील, तर माणसाच्या ठिकाणचे हेगुण, उभय संहितांतील कर्मसिद्धांतानुसार मागील जन्मातील कर्मसंचितामुळे येतात हे मान्य करावे लागते आणि मग पूर्वजन्मकर्मानुसार या जन्मीचा गुण व त्यानुसार या जन्मीचा वर्ण म्हणजे जन्मसिद्ध वर्णव्यवस्था भगवंताना मान्य आहे हेच प्रतिपादन येथे सिद्ध होते.
दोन्ही संहितांमधील पूर्वजन्मकर्मफलसिद्धांतानुसार मागील जन्मीचे जे कर्मसंचित, त्यानुसार या जन्मीचा जन्मापासूनचा – जन्मसिद्ध गुणकर्मासहितेचा वर्ण ठरतो आणि विषमताधारित जन्मजात वर्णव्यवस्था जन्माला येते. या ठिकाणी वास्तविक काल्पनिक ‘भगवंताचे साहाय्य घेण्याचे व्यासमुनींना काहीच कारण नव्हते.
येथेही मुद्दा संपत नाही, या कर्माचे रहाटगाडगे अनादि जन्मापर्यंत भिडविले – ज्यापूर्वी जन्म नाही व म्हणून अगोदरच्या जन्माचे कर्मही नाही. त्यामुळे अगोदरच्या जन्माचे पूर्वसंचितही नाही. तर मग या पहिल्या जन्माला गुण कोणी दिले? त्या पहिल्या जन्मात असलेल्या गुणानुसार कर्म घडले असणार. तमो गुणांचे शूद्रकर्म, सत्त्वगुणींचे ब्राह्मणकर्म इत्यादी. आता या पहिल्या वहिल्या जन्मीचे गुण जर त्या विश्वनिर्मात्या ‘भगवंतानेच दिले असतील तर ‘चातुर्वण्र्यं मया सृष्टं हा अहंकार बरोबर. पण मग गुणकर्मविभागशः। या फसव्या अर्थनिर्णयाला वाव देणार्‍या उत्तरार्धाला काही अर्थ उरत नाही. जन्मतःच त्या – त्या वर्णांना गुण व कर्म मीच दिले व त्यानुसार चातुर्वर्ण्य मीच निर्माण केले हाच अर्थ येथे स्पष्ट होतो आणि गीताज्ञानेश्वरी या उभयसंहितांचा जन्माधिष्ठित चार्तुवर्यव्यवस्थेचा पुरस्कार ही स्पष्ट होतो. तोही ‘भगवंता’ च्या नावाने जाहीरनामा काढून.
एकूण निष्कर्ष असाच उभय संहितांतील कर्मविपाकसिद्धांतानुसार पूर्वजन्मसंचितानुसार गीता ज्ञानेश्वरीतील चातुर्वर्यव्यवस्था जन्माधिष्ठितच ठरते आणि ‘गुणकर्मविभागशः ‘ म्हटले असले तरीही त्यातील त्या सिद्धांतानुसार या उभय संहितांमधील चातुर्वर्त्यव्यवस्था जन्मजातच शिवाय ईश्वरनिर्मित ठरते.
‘व्यासं’ रचित गीता ही ‘व्यास’ रचित महाभारताचा एक भाग आहे. हे लक्षात घेऊन ‘गुणकर्मविभागशः’ चातुर्वर्ण्यनिर्मिती या सूत्रासंबंधीचे महाभारतात इतरत्र असलेले चिंतन पाहण्यासारखे आहे हा अनुबंध काही गोष्टी स्पष्ट होण्यास साहाय्यभूत ठरावा.
गुणानुसार कर्म आणिकर्मानुसार वर्ण अशी व्यवस्था महाभारतीय समाजात दिसते का? प्रत्यक्षात तर ती तशी नव्हतीच. ब्राह्मण, क्षत्रिय, सूत, किरात, आभीर, राक्षस, यक्ष, किन्नर हे सारे विविध गुणकर्मी जन्मजातच होते. व्यास, धृतराष्ट्र, पंडु, पंचपांडव, घटोत्कच, विदुर हे वर्ण-संकराचे असूनही त्यांना विशिष्ट वर्ण विशिष्ट योनिसंभवाने जन्मजातच मिळाले. एकलव्याची दुर्दशा त्याच्या जन्मजात वर्णामुळे झाली. कर्णाचा जन्मजात वर्ण समाजज्ञात नसल्याने त्याचीही दुर्दशा झाली.
ही झाली वस्तुस्थिती, तत्त्वचर्चा काय आहे? गुण-कर्म-वर्ण यांच्या परस्पर संबंधाबाबतची महाभारतात इतरत्र तत्त्वचर्चा काय आहे?
व्यासांच्या त्या व्यासशैलीतील-संवादशैलीतील काही संदर्भ एकत्रित करून मांडण्यासारखे आहेत.
(अ) (१) ‘चातुर्वर्यं भगवता पूर्व सृष्टं स्वयंभुवा । (अनुशासन पर्व-अध्याय १३१ उमामहेश्वरसंवाद) असे उमेने म्हटलेले आणि महेश्वराने न खोडलेले वचन आणि असृजब्राह्मणानेव पूर्वं ब्रह्मा प्रजापतिः। ब्राह्मणाः क्षत्रियाः वैश्याः शूद्राश्च द्विजसत्तम। ये चान्ये भूसंघानां संघास्तांश्चापि निर्ममे’ (शांतिपर्व अध्याय १८१ भृगु भरद्वाज संवाद) या दोन्ही उक्ती म्हणजे ‘चातुर्वण्र्यं मया सृष्टं चेच वेगळ्या शब्दांतील ईश्वरी शिक्कामोर्तब असलेले निरूपण.
पण येथे ‘गुणकर्मविभागशः’ अशी पळवाटेला फारसा वाव ठेवलेला नाही बनवाबनवीचा वेगळा अर्थ लावण्यास फारसा अवसर ठेवलेला नाही. उपरोक्त शांतिपर्वातील ‘भृगु उवाच मध्ये ब्रह्म्याने या चार वर्णातील ब्राह्मणांना निर्माण करताना आपल्या तेजाने सुर्य आणि अग्नीसारखे प्रकाशगुण दिले हे स्पष्ट केले आहे. आत्मतेजाभिनिर्वृत्तान्भास्कराग्निसमप्रभान् । असृजदुब्राह्मणानेवे …. असे म्हणून प्रकाशगुणासहित ब्राह्मण वर्ण निर्माण केला असा जन्मजात गुणासहित वर्णाचा ईश्वरी पुरस्कार केला आहे. या ठिकाणी या ब्रह्म्याने या चारही वर्णाना शरीराचे रंगगुण दिल्याचे स्पष्ट झाले आहे.‘निर्ममे। ब्राह्मणानां सितो वर्णः क्षत्रियाणां तु लोहितः।वैश्यानां पीतको वर्णः शूद्राणामसितस्तथा।’ या उक्तीत ते दिसून येते.
म्हणजे चारही वर्णाची जन्मापासूनची गुणरंगवर्णासहितची विषमताधिष्ठित निर्मिती त्या ब्रह्याची आहे, असे हे व्यासमुनीचे महाभारतीय ‘ईश्वरी प्रतिपादन आहे. ”
(अ) (२) पण प्रत्यक्षात काय दिसते याचे भान व्यासमुनींना आहे. त्यांना समोर जन्माधिष्ठित असे चार वर्ण दिसतात. पण त्या वर्णामध्ये गुणांचा तर संकर झालेला आढळतो. जन्मजात वर्षांत गुणसंकराची झालेली वस्तुस्थिती अशी दिसतेः
काम क्रोधो भयं लोभः शोकश्चिताक्षुधाश्रमाः।
सर्वेषां नः प्रभवति ….।। (शांतिपर्व अध्याय १८१ भृगुभरद्वाजसंवाद)
‘सत्यं दानं क्षमाशीलमानृशंस्यं दमोघृणा’ हे गुण ब्राह्मणाचे असूनही तेच शूद्रात ही दिसतात.
शुद्रष्वापि च सत्यं च दानमक्रोध एव च।
आनृशंस्यमहिंसा चे घृणा चैव …॥
त्यामुळे –
जातिरत्र महासर्प मनुष्यत्वे महामते।
संकरात्सर्ववर्णानां दुष्परीक्ष्येति मे मतिः।। (वनपर्व अध्याय १७७ नहुषधर्म-संवाद) असा हा सर्व वर्णात गुणसंकर आहे, त्यामुळे जाती ओळखणे कठीण असे म्हणावे लागलेआहे.
आणि मग आज आपण डॉ. आंबेडकरांना ते जन्माने शूद्र असून ही ब्राह्मण म्हणतो (ते ब्राह्मण असत नाहीत.) तसे व्यासमुनींच्या भारद्वाजांना (शांतिपर्व अध्याय १८२) आणि युधिष्ठिराला (वनपर्व अध्याय १७७) म्हणावे लागले आहे.
शुचैतद्भवेल्लक्ष्यं द्विजे तच्च न विद्यते।
न वै शूद्रो भवेच्छूद्रो ब्राह्मणो न च ब्राह्मणः ।। (शांतिपर्व व वनपर्व)
यत्रैतल्लक्ष्यते सर्पवृतं सब्राह्मणः स्मृतः ।।
यत्रैतन्न भवेत्सर्प तं शूद्रमिति निर्दिशेत् ।। (वनपर्व)
या ठिकाणी व्यासमुनी वेदान्त-स्मृति-पुरस्कृत जन्मजात चातुर्वर्ण्य पुसायला निघाले नाहीत तर वर्णामधील गुणसंकराची वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्यांना म्हणावे लागले आहे की जन्माने ब्राह्मण असूनही जो दुराचारी असेल तो खरा ब्राह्मण नाही आणि जन्माने शुद्र असूनही तो सदाचारी असेल तर तो ब्राह्मणाच्या (योग्यतेचा) आहे. (दोघेही जन्माने व जन्मभर शूद्र आणि ब्राह्मण असेच राहणार.)
पण अशा ब्राह्मणाच्या योग्यतेच्या पण जन्माने शूद्र असलेल्या व्यक्तीला प्रस्तुत जन्मी व्यामुनींच्या स्वधर्मकर्मात ‘शूद्रकर्म टळत नाही. अनुशासनपर्वातील (अध्याय १३१) व्यासमुनींचा महेश्वर उमेला ईश्वरी अधिकारवाणीने शूद्रजन्माचे जन्मभरचे शूद्रकर्म सांगतो आहे.
शूदकर्माणि सर्वाणि यथान्याय यथाविधि।
शुश्रूषां परिचर्यां च ज्येष्ठे वर्णे प्रयत्नतः।
कुर्यादविमनाः शूद्रः सततं सत्पथे स्थितः।
शेषान्नकृतभोजनः ……
असे जर तो शूद्रजन्मा या प्रस्तुत जन्मी करील तर पुढील जन्मी तो शूद्र ‘वैश्यत्वमृच्छति।’ असे येथे व्यासमुनी ग्रेसमार्कदेऊन शूद्राला थोड्या वरच्या अशा वैश्य वर्णात मोठ्या मुष्किलीने ‘प्रमोट करण्याचे (नसलेल्या) पुढील जन्मीचे भविष्यकथन करतात. (आम्ही प्रारंभी विवेचन केलेल्या तार्किक संगतीनुसार हे अशक्यच.)
(ब) ‘कर्मविभागशः चातुर्वर्यं मया सृष्टं।’ असा अर्थ लावीत, व्यक्तीच्या कर्मस्वातंत्र्याला वाव आहे, त्याच्या कर्मानुसार वर्ण ठरतात असे जे प्रतिपादन केले जाते, त्याला विरोधी जाणारे संदर्भ व्यासमुनींच्या महाभारतात इतरत्र दिसतात.
शांतिपर्व अध्याय ६० धर्मभीष्मसंवादामध्ये वर्णाच्या योग्यतेनुसार त्याचे कर्मही जन्माबरोबरच ब्रहम्याने दिलेले असते असे म्हटले आहे असे दिसून येते. धर्मः ‘सृष्टो ब्राह्मणा त्रिषु वर्णेषु दुष्टः।’म्हणजे तीन वर्षांसाठी ब्रह्म्याने त्यांच्या योग्यतेनुसार योग्य ते धर्म (कर्म) पाहून निर्माण केले असा अर्थ स्पष्ट होतो. याच अध्यायातील याच धर्मभीष्मसंवादामधील
‘तस्माद्वर्णा ऋजवो जातिधर्माः संसृज्यन्ते।’ या उक्तीचा याच दिशेने अर्थ लागावा.
जन्माबरोबरच येणारे कर्माचे सूचन खालील उक्तीतून ध्वनित होते.
प्राङ्नाभिवर्धनात्पुंसो जातकर्म विधीयते।। (वनपर्व अध्याय १७९)
जातकर्मादिभिर्यस्तु संस्कारैः संस्कृतः शुचिः। (शांतिपर्व अध्याय १८२)
वरील संदर्भातील ‘जातकर्म हे लक्षणीय स्वरूपाचे आहे. व्यासमुनींच्या महाभारतातील ‘जातकर्म जवळ जवळ महाभारतकालीन (म्हणून त्यांना ज्ञात असणार्याव) आश्वलायन ते द्राह्यायण या दहाही गृह्मसूत्रकारांनी शूद्रवर्णाला दिलेले नाही. जन्मतःच मध, गाईचे तूप आणि पित्याच्या हाताच्या बोटातील सुवर्णागुलीयकाचे उगाळलेले आठ दहा सुवर्ण फेरे जे जन्मभरच्या मेधाजनन बुद्धितत्त्वासाठी आहेत असे जन्मतःच केले जाणारे अपत्याबाबतचे जातकर्म शूद्र अपत्यासाठी नाही. (त्याच्या पित्याजवळ मध, तूप, सुवर्णागुलीयक नाहीच. ते त्याला नाकारलेले!) यावरून जन्माबरोबरचा शूद्राचा मेधाजननावरील बुद्धितत्त्वावरील भविष्यकालीन कर्माधिकार व्यासमुनी त्याला जन्मतःच नाकारून ठेवीत आहेत हेच ध्वनित होते.
महाभारतातील वर्णव्यवस्थेसंबंधित वरील संदर्भ पाहता व्यक्तीच्या गुणानुसार कर्म आणि त्या कर्मानुसार वर्ण अशी संगती राखून चातुर्वण्र्यं मया सृष्टं।। असे दिसत नसून गुणकर्मासहित जन्माधिष्ठित ‘चातुर्वण्र्यं मया सृष्टं।’ असेच हे हे प्रतिपादन आहे हे स्पष्ट व्हावे. आणि या सर्वाचे Essence घ्यावयाचे तर गुणही बाजूला राहतात. आणि जन्माधिष्ठित विषमताधारित वर्ण आणि त्यानुसारच कर्म अशीच व्यवस्था प्रजापतीने, ब्रह्म्याने, कृष्णाने निर्माण केली आहे असेच स्थापितांना पोषक संरक्षक तत्त्वज्ञान व्यासमुनीने गीतेसहित महाभारतभर मांडले आहे असे दिसून येते.
———— ———— —————— —————
भारतीय प्रमुख दर्शनांतून गीता-ज्ञानेश्वरीत आलेली ही तथाकथित आदर्श वर्णव्यवस्था; तिची अशास्त्रीयताही या छोट्या टिपणात जाता जाता उघड होणे आवश्यक आहे. त्यासाठी याबद्दलच्या काही ज्ञात्यांच्या प्रतिक्रिया नोंदविण्यासारख्या :
या सत्त्वरजतम जैगुणाधिष्ठित कृत्रिम अशा चार मानवी समाजगटाबद्दलची डॉ. आंबेडकरांची प्रतिक्रिया आधुनिक मानसशास्त्राच्या कसाला उतरेल अशी आहे. त्यांची प्रतिक्रिया अशी :
‘मानवी समूहाचे असे वेगळे गट करून पृथक्करण करणे हा मानवी शक्तीबद्दलचा उथळ दृष्टिकोण आहे,….प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा असा एक वेगळा वर्ग असतो.. प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक प्रकारच्या मिश्र वृत्ती असतात.
याचे उत्तम उदाहरण गीता-ज्ञानेश्वरीतील श्रीकृष्णाचेच देता येईल. याचा संभव क्षात्रयोनीतला. संस्कार शूद्राघरचे (गवळी). तो लढाया क्वचितच मारतो. डिप्लोमसी (ब्रह्मकर्म की क्षात्रकर्म) हे त्याचे आवडते क्षेत्र! भारतीय युद्धात तो सारथ्य (शूद्रकर्म) करतो. तोंडाने तत्त्वज्ञान (ब्रह्मकर्म) सांगतो. भीष्मावर चालून जाताना सुदर्शनचक्र हाती घेतो (क्षात्रकर्म).त्यानेच ज्याचा आग्रह धरला त्या ‘स्वधर्माचे त्याच्याच बाबतीतकाय झाले? त्याचा स्वधर्म कोणता? त्याचे स्वधर्मकर्म कोणते? त्याचे जन्मजात गुण कोणते? त्याचा वर्ण कोणता?
अलीकडे वसंत पळशीकर यांनी उपस्थित केलेले प्रश्नही निरुत्तरित राहणारे. तेअसे; प्रत्येक व्यक्ती जन्मतः बिनवर्णाची असे. आणि प्रौढपणी तिने स्वतःच्या अंगचे गुण प्रकट केल्यानंतर वा ती करीत असलेली ‘कर्मे विचारात घेऊन तिचा योग्य वर्णात समावेश केला जात असे असा काळ कोणता? व तो समाज कोणता? कोण कोणत्या वर्णाचा हे कोण ठरवीत असे व कसे ठरत असे?
दि. य. देशपांडे यांचे फेब्रुवारी अंकातील ऐतिहासिक निरीक्षण असेच महत्त्वपूर्ण ते असे; चातुर्वर्ण्य कोणीही निर्माण केले नाही ही वस्तुस्थिती आहे ते जर परमेश्वराने निर्माण केलेले असते तर ते फक्त हिंदुस्थानातच आढळले नसते, तर सर्व जगभर दिसले असते. हिंदुस्थानच्या सारखी जन्मजात चातुर्वर्यव्यवस्था हिंदुस्थानाखेरीज कुठेही नव्हतीआणि नाही.
——— ———– ——— ————
वरील सर्व विवेचन लक्षात घेतले तर जन्मजात गुण, कर्म, वर्ण यांची संगती कुठेच लागत नाही असाच निष्कर्ष निघतो. तरीही गुणकर्माचा आधार देतघेत प्रतिपादन केलेली ही चातुर्वर्यव्यवस्था कृत्रिम, अशास्त्रीय, अनैतिहासिक व अन्यायकारक असूनही आदर्श समाजरचना म्हणून तिचा आग्रह धरला गेला आहे. गीता ज्ञानेश्वरी या दोन्ही संहितांमध्ये तिला ‘ईश्वरी पुरस्कार दिला गेला आहे. या दोनही संहितांमधील या विषमतेचा पुरस्कार करणार्‍या व्यवस्थेला ‘ईश्वरी करणी’ असे स्वरूप देण्याच्या प्रयत्नांची नोंद फसवे समर्थन न देता धिक्कारासहितच झाली पाहिजे.
एवढेच नव्हे तर ‘चातुर्वर्यं मया सृष्टं।’ म्हणजे जन्मजात स्थापित उच्चवर्णीयांना शोषणाचे हक्क देणारा आणि जन्मजात शूद्रांना दासत्व देणारा, व्यासमुनीने ईश्वराच्या नावाने काढलेला पक्षपाती, समताविरोधी, पर्यायाने मानवताविरोधी जाहीरनामाच आहे. शूद्रांच्या दृष्टीने तर तो काळा हुकूमनामाच आहे, असेच म्हटले गेले पाहिजे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.