नेटिझन्स इतक्या उर्मटपणाने का वागतात?

संगणक (यात संगणकाशी संबंधित मोबाइल फोन, इंटरनेट, लॅपटॉप, वाय फाय, नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग व इतर सर्व माहिती तंत्रज्ञान सुविधांचा समावेश आहे.) माणसांना चांगली माणसं बनण्यासाठी मदत करतात, हे संगणक क्षेत्रातील एका तज्ञाचे विधान आहे. परंतु निदान ब्लॉगोस्फेरमधील अनुभवावरून तरी नेटवरील माणसं उदात्त, शहाणे, संवेदनशील झाले आहेत, याबद्दल शंका घ्यावीशी वाटते. आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणक आपल्या आयुष्याला व्यापलेले आहे. संगणक निरक्षरता हद्दपार होत आहे. नेट आता प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत आहे. तरीसुद्धा नेटवर वावरणाऱ्यांसाठी काही नीती – नियम, आचारसंहिता वा स्वनियंत्रण असे काहीही नसल्यासारखे नेटिझन्सचे वर्तन असते.
नेटवरील माहिती संकलन व होत असलेले विनिमय यांचे विश्लेषण केल्यास १६.८ कोटी डीव्हीडी भरतील एवढ्या माहितीचे देवाण घेवाण एका दिवसात होत आहे. प्रती दिवशी २९४०० कोटी ई-मेल्स पाठवल्या जात असतात. रोज २० लाख ब्लॉगपोस्टवर मजकूर चिटकवला जात असतो. या ब्लॉगपोस्टवरील मजकुरांची मुद्रित प्रत काढल्यास ६०-६४ पानाच्या साप्ताहिकाला पुढील ७७० वर्षे पुरेल एवढा मजकूर उपलब्ध होऊ शकेल. १७.२ कोटी नेटिझन्स फेसबुकला भेट देतात. यासाठी ४७० कोटी मिनिटं खर्ची घातल्या जातात. रोज २५ कोटी फोटो अपलोड होतात. या अपलोड झालेल्या फोटोंचे प्रिंट्स काढून एकावर एक ठेवल्यास ८० एफेल टॉवर्स इतकी उंची होईल. नेटवरून रोज २.२ कोटी तास जुने चित्रपट व सिरियल्स बघण्यासाठी खर्ची घातला जातो. रोज ८६४००० तासाचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केल्या जातात. एकट्यानेच रोज, २४ तास, हे सर्व बघायचे ठरविल्यास 98 वर्षाचा काळ सहजपणे निघून जाईल. रोज १.८७ कोटी तास संगीत ऐकले जाते. प्रती दिवशी १२८८ अप्लिकेशन्स अपलोड होतात व ३.५ कोटी अप्लिकेशन्स डाउनलोड होतात.
इतक्या मोठ्या प्रमाणात ब्लॉगोस्फेर व इतर गोष्टी आपल्या जीवनाचा ताबा घेत असल्यामुळे आपण सर्व संगणक, इंटरनेट व इतर माहिती तंत्रज्ञानाच्या सोई – सुविधांची गुलामी करत आहोत की काय असे वाटू लागले आहे. सिटीझन्सचे रूपांतर नेटीझन्समध्ये झपाट्याने होत आहे. यानंतरच्या पुढच्या पिढीच्या दिवसाची विभागणी झोप व ऑनलाइन अशीच करावी लागणार आहे. झोपेतून उठल्या उठल्या मोबाइल कानाशी व लॅपटॉप समोर अशा अवस्थेतून ही पिढी जाणार आहे. गंमत अशी आहे की कुणीही उठावे व लाइक/डिसलाइक वर क्लिक करत रहावे अशी स्थिती आता आहे. विकिपिडियातील पानांचाही यातून सुटका नाही. हातात माउसचे बटन आहे, व नेट कनेक्ट आहे एवढ्याच भांडवलावर या गोष्टी सर्रासपणे होत आहेत. त्याचप्रमाणे सोशल नेटवर्कसुद्धा नेटिझन्सच्या मनमानीपणातून सुटलेले नाही.
ब्लॉग, फोरम, वा फेसबुक वरील प्रतिसाद/प्रतिक्रिया वाचत असताना चर्चेसाठीच्या धाग्याबद्दल (उगीचच्या उगीच) उलट – सुलट, टोकाचे व काही वेळा कुत्सित मत प्रदर्शन करत असल्याचे प्रमाण वाढत आहे. मराठी नेटवर जरी हे काही प्रमाणात कमी वाटत असले तरी इंग्रजीतील – विशेषकरून राजकीय, आर्थिक व सामाजिक विषयावरील – धाग्यांच्या संदर्भात नेटिझन्सचा भावनोद्रेक प्रकर्षाने जाणवतो. आपण केलेली विधाने, आपण लिहिलेले लेख लोकांनी जसेच्या तसे स्वीकारावे, त्याचे संदर्भ, अधिक माहिती विचारू नये असा एक नवा प्रवाह दिसतो. विशेषतः जेथे भावनांना हात घातला जातो. (ज्योतिष, वैद्यक, अस्मिता, इतिहास) तेथे हा प्रवाह अधिक दिसतो. क्षुल्लक विधानावरून तावातावाने भांडत असल्याचे चित्र बघायला मिळते. काही वेळा शिवराळ भाषा वापरली जाते. काहींना साधे लिहितानाही शिव्याची पेरणी करण्याचा सोस असतो. त्यांना साधे लिहिता येत नाही. साधे व सरळ लिहिल्यास आपल्याकडे कोणाचे लक्ष जाणार नाही, असा त्यांचा समज असतो. व अशा ट्रॉल्सच्या (trolls) संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत आहे.
परंतु मानसतज्ञांच्या दृष्टीने नेटिझन्सची ही वर्तणूक सवयीत बदलल्यास सामाजिक व संबंधित व्यक्तीच्या मानसिक आरोग्यास इजा पोचू शकते. म्हणूनच वेळीच जागे होऊन अशा गोष्टीवर अंकुश ठेवण्यासाठी काही निर्बंध घालण्याचे आग्रह ते धरू लागले आहेत.
मुळात अशा नेटिझन्सच्या बहुतेक प्रतिक्रिया केवळ आक्रमक या सदरात मोडतात. त्यातून काहीही अर्थबोध होत नाही. आपले म्हणणे कुणीच ऐकत (वाचत) नाही म्हणून ते वैतागलेले असतात. मानसतज्ञांच्या मते आपल्या प्रतिक्रिया वा प्रतिसाद यात इतकी भावनिक गुंतवणूक करणेसुद्धा हानिकारक ठरणार आहे. गंमत अशी आहे की जेव्हा नेटिझन्स थंड डोक्याने विचार करू लागतात तेव्हा हे सर्व चुकीचे होते हेही त्यांना कळत असते.
तरीसुद्धा ही मंडळी असे का वागतात?
अनेक घटक एकाच ठिकाणी जमत असल्यामुळे उर्मटपणा, उद्धटपणा, आक्रमतकता इत्यादींचा विस्फोट होत असावा असे तज्ञाना वाटत आहे. मुळात प्रतिसाद देणारे व धागाकर्ते बिनचेहऱ्याचे, मुखवटे चढवलेले व एकमेकांना ओळखत नसल्यामुळे चिखलफेक करण्यात कुणालाही संकोच वाटत नाही. संताप व्यक्त करणारे कुठे तरी दूर असण्याची शक्यता असल्यामुळे आपले कुणीही वाकडे करणार नाही, आपल्याला शारीरिक इजा होणार नाही, याची त्यांना खात्री असते. समोरासमोर असल्यास अशा प्रकारची टीका टिप्पणी ते कधीच करणार नाहीत. याशिवाय प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा काही तरी लिहिणे अगदी सोपे असते. मुळात ब्लॉग, फोरम, ई – मेल अकौंट, लॉगइन, पासवर्ड इत्यादीसाठी आर्थिक वा तांत्रिक अशी कुठलिही अडचण नसल्यामुळे जाता जाता पिंक मारणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
प्रतिसाद लिहिणाऱ्यांकडे भरपूर वेळ असणे हेसुद्धा एक कारण असावे. व एका प्रकारे ते त्यांचे स्वगत भाषणच असते. या स्वगत भाषणात कुठलिही टोकाची भूमिका घेतली तरी त्यांना जबाबदार धरता येत नाही. माणसं प्रत्यक्ष संवाद साधत असताना एकमेकांच्या देहबोलीनुसार आक्रमकता कमी जास्त करतात. कुठे थांबावे, कुठे रेटावे, याची कल्पना दोघांनाही असते. राग आला तरी ते व्यक्त करण्यात थोडीशी सुसंकृतता त्यात असते. त्यामुळे रागाच्या भरात दोन शब्द जास्त उच्चारले तरी काही वेळातच राग शांत होऊन संवाद मूळपदावर येऊ शकतो.
याचबरोबर आपण काही तरी भव्य दिव्य करत आहोत अशा पवित्र्याने नेटवरील प्रतिक्रिया लिहिली जात असते. मुळात हा पवित्रा तद्दन खोटा, अविचारी व अविवेकी असतो. दुसरे म्हणजे सुरक्षित ठिकाणी बसून काहीही खरडायला फार मोठे बुद्धीकौशल्यही लागत नाही. उपदेशाचे डोज पाजणे, सल्ला देत राहणे, प्रसंगाची चिरफाड करणे, मूळ मुद्दा सोडून कुठल्यातरी क्षुल्लक गोष्टीवर भाष्य करणे यातच ते स्वत:ला धन्य समजतात. त्यामुळे धाग्यावरील चर्चा भरकटत जाते व हाती काही लागत नाही.
अजून एका तज्ञांच्या मते नेटिझन्सच्या या उर्मटवृत्तीला काही अंशी इलेक्ट्रॉनिक माध्यम जबाबदार आहे. टीव्हीसारख्या माध्यमावरील चर्चेत भाग घेणाऱ्यासांठी आपण कसे बोलावे, कसे वागावे याबद्दल कुठलिही आचारसंहिता नाही. चर्चेपूर्वी कुणी तरी जबाबदार व्यक्ती काही ब्रीफिंग देत असेल की नाही याची कल्पना नाही. चर्चेच्या दरम्यान टोमणे मारणे, एकमेकाचे उखाळे पाखाळे काढणे, नको त्या गोष्टी उकरून काढणे, विषयाशी धरून न बोलणे इत्यादी गोष्टी न्यूज व इतर चॅनेल्सवर बघून सवय झालेले नेटिझन्स जेव्हा संधी मिळते तेव्हा झोडपून काढण्याच्या पावित्र्यात असतात. माध्यमं जर जबाबदारीने, संयमितपणे चर्चेचे संयोजन करत असते तर कदाचित नेटिझन्स एवढे आक्रमक झाले नसते.
एक मात्र खरे की इतर कुठल्याही माध्यमापेक्षा इंटरनेटचा वापर यानंतर मोठ्या प्रमाणात होणार आहे, हे मात्र नक्की. त्यामुळे नेटिझन्सच्या विधानांना गंभीरपणे घेण्याकडे कल वाढत जाणार. अशा वेळी काहीतरी पोरकट विधान करून स्वत:चे हसे करून घेण्यात हशील नाही, हे आता नेटिझन्सना कुणी तरी सांगण्याची गरज आहे. नेटवरील चर्चा सुरळितपणे चालावी ही संयोजकांची जबाबदारी असते. चर्चेतून काही तरी निष्पन्न होणे अपेक्षित असते. काही नवीन माहिती, माहितीत भर, नवीन मुद्दे, यामुळे चर्चा रंगू शकते. येथे मात्र त्याचीच उणीव भासत आहे. दुसऱ्या नेटिझन्सचे काहीही ऐकायचे नाही हाच अजेंडा पुढे ठेऊन सर्व जण आक्रमकपणे चर्चेत भाग घेत असतात. आक्रमकतेने एखादा चांगला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केल्यास वाचकांचे लक्ष मुद्याकडे न जाता आक्रमकतेकडेच जास्त जाते. त्यामुळे जे काही पटवून द्यायचे असते ते बाजूला राहते. व चर्चा भलत्याच ठिकाणी वाहवत जाते.
नेटिझन्सनी टीव्हीसारख्या माध्यमाचा कित्ता गिरवला पाहिजे अशी काही अट नाही. संयमितपणे व विचारपूर्वक केलेले भाष्य चर्चा पुढे नेण्यास मदत करत असते. त्यामुळे ब्लॉग्स व फोरमच्या चालकानी वेळीच दखल घेऊन अशा उर्मट नेटिझन्सना दूर ठेवण्यासाठी काही तंत्रज्ञान विकसित करण्याची वा नियमाची चौकट तयार करण्याची गरज भासत आहे.

pkn.ans@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.