विवेकवाद विकसित करण्यासाठी…

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी भारतीय विवेकवादाचं मुख्य स्वरूप सातत्यानं लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संकुचित भूमिका घेतली म्हणून दुसऱ्या संकुचितांनी त्यांच्यावर हल्ला केला असं अजिबात नाही. त्यांनी व्यापक भूमिका घेतली. ती सहन न झाल्यामुळे जी संकुचित विचारांची मंडळी आहेत, त्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे भारतीय विवेकवादाचं व्यापक स्वरूप लक्षात घेताना याची उभी विभागणी करण्याची जी पद्धत आहे, ती मुळातून तपासली पाहिजे. उभ्या विभागणीत विवेकवादी एकीकडे आणि अविवेवकवादी दुसरीकडे किंवा अमूक एक परंपरा एकीकडे आणि दुसरी परंपरा दुसरीकडे अशी विभागणी केली जाते. त्यातून प्रतिगामी किंवा संकुचित विचार बळकट होण्याला बळ मिळत जातं. भिंत उभारण्याचा कार्यक्रम हा अर्थातच संकुचित मंडळींचा असतो. त्यामुळे आपण भारतीय विवेकवादाचं मुळातलं व्यापक स्वरूप काय आहे, विवेक आणि अविवेक यांच्यात सतत चाललेला संघर्ष व देवघेव याचं स्वरूप काय आहे हे बघायला पाहिजे.
दोन-तीन उदाहरणं पाहू. पहिलं म्हणजे भारतीय विवेकवादाला केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक आयामसुद्धा आहे. अजित केशकंबल किंवा गौतम बुद्ध आपलं तत्त्वज्ञान मांडत होते, त्याच्याआधीपासून ग्रीक आणि भारतीय समाज, चिनी आणि भारतीय समाज, यांच्यात सातत्याने देवघेव होती. ती जशी वस्तूंच्या पातळीवरची होती, तशीच मिथ्यकथा, पुराणकथा, तत्त्वज्ञानं आणि सांस्कृतिक बाबी अशा सर्व प्रकारची देवघेव होती. ग्रीकांकडून भारतीयांनी फलज्योतिष्य आणि मूर्तीकला घेतली. दुसऱ्या बाजूला भारतीय तत्त्वज्ञानातून काही ग्रीकांकडे जाणं आणि ग्रीकांकडून अणुवादासारखं तत्त्वज्ञान भारतात येणं अशा काही गोष्टी घडलेल्या दिसतात. विज्ञानातही पायाभूत तत्त्वंविज्ञान आणि विवेकवाद, विज्ञान आणि संस्कृती, विवेक आणि भावना, या सगळ्यांना एकत्र आणणं आणि त्यांची फारकत करणं, या दोन्ही गोष्टी आधुनिक काळात मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या.
विज्ञान हे मूल्यनिरपेक्ष, त्याला विवेक असेलच असं नाही. ते भावना निरपेक्ष. विवेक हा मूल्यांचा, तत्त्वांचा विचार करणारा भाग मानणं आणि मानवी भावना कला-संस्कृतीचा भाग मानणं. मग म्हणायचं की, भावनेपेक्षा विवेकाला महत्त्व दिलं पाहिजे. विज्ञानाला आपण विवेकाची जोड देऊ या. ही एक मोठी समस्या आहे. याचं कारण आधुनिक काळात युरोपात विज्ञान आलं, त्याच्याशी जोडून विवेकवाद आला, त्याची पहिली लढाई ख्रिश्चन धर्माबरोबर, चर्चबरोबर होती. मुळात विज्ञानाचा पहिला उगम चर्चच्या पोटातून झालेला आहे. त्यामुळे त्यांना नंतर असं सांगावं लागलं की, विज्ञान हे स्वायत्त आहे. ते धर्मनिरपेक्ष आहे असं म्हणणं शक्य नव्हतं. हीच संकल्पना नंतर भांडवली विकासाला पोषक ठरली. भांडवलशाहीला न-नैतिक गोष्टीच हव्या असतात. खरं म्हणजे विज्ञानात असं असू शकत नाही. गेल्या दोनशे-अडीचशे वर्षांत आणि विशेषत: विसाव्या शतकातल्या आधुनिक विज्ञानाचा प्रवास बघितला, तर निसर्गविज्ञानातसुद्धा पायाभूत तत्त्व म्हणून तत्त्वज्ञानात्मक आणि मूल्यांच्या गोष्टी दडलेल्या दिसतात. त्या उकरून बाहेर काढाव्या लागतात. हे लक्षात घेतलं तर विज्ञानाची संकल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोनाची संकल्पना आणि विवेकाची संकल्पना आजच्या युगात रि-डिफाइन करायची गरज निर्माण होते. या तिन्हींच्या पोटात मानवी भावभावना, मूल्य, या समग्र दृष्टिकोनावर आपण भर देण्याची गरज आहे. त्यावर जगभर प्रयत्न सुरू आहेत. भारतीय परंपरेतसुद्धा ही समग्रपणे विचार करण्याची धडपड आपल्याला दिसत आलेली आहे. अर्थात त्यातही विवेकानं, विज्ञानिक दृष्टिकोनातून पाहावं लागतं. कारण त्यात गूढवाद, जातिव्यवस्था, पुरुषप्रधानता या गोष्टी मिसळलेल्या असतात. त्यामुळे समग्रता पकडत असताना विज्ञानाचा विवेकावर आणि विवेकाचा विज्ञानावर आणि संस्कृतीचा विज्ञान-विवेकावर आणि त्यांचा संस्कृतींवर असा सतत दबाव संघर्ष आणि देवघेव होत असते. त्यातून सर्जनशील गोष्ट पुढे येऊ शकते, हे लक्षात घेण्याची गरज आज आहे. नाहीतर आपण कप्प्यांत अडकतो आणि नकारात्मक भूमिका घेतो.
चिंतनाचा आणि कामाचा भागसंस्कृती नावाची जी गोष्ट असते, त्यातल्या बारकाव्यात जाण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. ती वास्तवात आपण करतो आहोत, पण वैचारिक पातळीवरही नीट करायला पाहिजे. भारतीय उत्सवांमध्ये वेगवेगळे पैलू आहेत. एक आहे- माणसांची उत्सवप्रियता, दुसरा- कृषी आणि उत्पादन चक्राशी संबंधित भौतिक भाग, तिसरा- कर्मकांडं व श्रद्धा, चौथा- लोकांना लागणारी सर्जनशील आणि आनंदाची आऊटलेट्स. या गोष्टींमुळे उत्सवांबाबत सरधोपट भूमिका न घेता, त्या उत्सवातला जेवढा गूढवादी, संकुचित, अविवेकी भाग कसा बाजूला होईल किंवा विवेकी पर्याय कसे उभे होतील यातलं काहीतरी आपल्याला करावं लागेल. त्यामुळे तो सगळा भाग हा आपल्या आस्थेचा, चिंतनाचा आणि कामाचा भाग असला पाहिजे. उदा. अंनिसने होळी आणि पोळीच्या संदर्भात किंवा गणपती विसर्जनाबाबत घेतलेली भूमिका. भारत ज्ञान-विज्ञानने २००१मध्ये फटाके नको, पुस्तके हवी अशी भूमिका घेतली होती. उत्सवातला चुकीचा, अनावश्यक, प्रदूषणकारी, अविवेकी भाग बाजूला कसा होईल आणि उरलेला भाग लोक एन्जॉय कसा करू शकतील हे पाहावं लागेल.
थोडक्यात तर-तम करणं, बारकारईने पाहणं आणि खोलात जाणं. विवेक-अविवेकाची जी ढोबळ घोषणावजा विभागणी केली जाते, त्याच्यापलीकडे जाण्याची गरज आहे. धर्माकडे पाहण्याची नवी दृष्टी हवीमहात्मा फुले, न्या. रानडे, महात्मा गांधी, वि.रा.शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, पं. नेहरू, भगतसिंग या सगळ्या मंडळींनी धर्माबाबत जी भूमिका घेतली आहे, तीसुद्धा बारकाईने पाहण्याची गरज आहे. भारतात धर्मांध, अविवेकी धर्मवादी आणि धर्मनिरपेक्ष अशी नुसती उभी फूट करणं हे पुरेसं विवेकी, वैज्ञानिक नाही. सामाजिक-सांस्कृतिक जीवनात व्यापक स्तरावर बघत असताना या दोन्ही विभागण्यांच्या पलीकडे जाण्याची गरज आहे.
धर्माबाबत चार-पाच भाग करता येतील.पहिल्या प्रवाहातली माणसं धार्मिक वा धर्मश्रद्ध आहेत किंवा गांधीजी म्हणतात त्या अर्थाने सनातनी आहेत. (अर्थात सनातन प्रभात छाप नव्हे). ही जुनी, प्राचीन, सनातनी मूल्य मानतात. ही धार्मिक पुनरुज्जीवनवादी आहेत. दुसऱ्या प्रवाहात धर्मसुधारक, नवधर्मप्रणेते आहेत. मग तो महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म असेल वा बाबासाहेबांचा नवबौद्ध धर्म असेल. आज ते भारतात मोठ्या प्रमाणावर नाही, पण उद्या ते भारतात येणारच नाही असं म्हणता येत नाही, ते म्हणजे लिबरेशन थिऑलॉजी. ती लॅटिन-अमेरिकेत आहे. पोप फ्रान्सिस त्या भाषेत थोडे थोडे बोलतात. म्हणजे धर्म आधाराला घेऊन मुक्ती करणं किंवा संघर्ष करणं किंवा समाज बदलणं.तिसऱ्या प्रवाहात, धर्मनिरपेक्ष, निधर्मी, नास्तिक किंवा धर्मातीत मानवतावादी आहेत… जे केवळ नास्तिक होऊन थांबत नाहीत. ते म्हणतात, धर्माने दिलेली जी मूल्ये आहेत त्याला उच्चस्तरावर नेणारे आम्ही मानवतावादी आहोत. चौथा प्रवाह आहे, धर्मांध, धार्मिक दहशतवादी, धर्मवेडे, धार्मिक अतिरेकी यांचा. या प्रवाहातले जे नेतृत्व आणि गड्डे आहेत, त्यांच्याबद्दल अत्यंत परखड स्पष्ट भूमिका घेणं अत्यावश्यक आहे. पण या प्रवाहातली अनेक मंडळी अशी आहेत की, त्यांच्यातला विवेक जागा करण्याची गरज आहे. त्यांच्याशी नातं कसं जोडणार हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. उदा. परवा मुंबईत इसिसकडे जाणाऱ्या चार मुलांना पोलिसांनी पकडलं.
कुठल्याही धर्मातल्या अतिरेकी संघटनांकडे वळणाऱ्या माणसांशी संवाद करणं आणि विवेकातून त्यांना बदलायचा प्रयत्न करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ती केवळ हिंसेला हिंसा वा शस्त्रबळाच्या जोरावर होणारी गोष्ट नाही. एवीतेवी पोलिस गुन्हेगारांना फारसं पकडू शकत नाहीत. पानसरे-दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना तर ते पकडूच शकलेले नाहीत. तेव्हा पोलिसांनी अशा वाट चुकलेल्यांशी विवेकी संवाद करून त्यांना धर्मांध मार्गापासून परावृत्त करावं. मला असं वाटतं की, एका प्रगत समाजात पोलिसांचं काम केवळ लॉ अँड ऑर्डर चं नसून समुपदेशन आणि संवादाचंही असतं. अर्थात हा सामाजिक संघटनांच्या समोरचाही प्रश्न आहे.
सुरुवातीचे जे तिन्ही प्रवाह आहेत, त्यात प्रचंड जागा आहे. कोट्यवधी लोक त्या प्रवाहांच्या कुठल्या ना कुठल्या छटेमध्ये वावरत आहेत. त्यांच्याशी सतत नातं जोडणं आणि त्यांना तर-तम करायला शिकवणं, धर्माच्या पोटातसुद्धा विवेकाकडे जाणाऱ्या जागा कोणत्या आहेत, हे काम करणाऱ्या ज्या सगळ्या चळवळी, संस्था, संघटना असू शकतात ते आपले दोस्त कसे बनतील, ते अधिकाधिक धर्मनिरपेक्षतेकडे आणि विवेकवादाकडे कशी वाटचाल करतील हा आपला सततचा कार्यक्रम असला पाहिजे. आज वाईट परिस्थिती असताना स्वप्नं पाहावीत की नाहीत असा अनेकांना प्रश्न पडतो. प्रत्येकाजवळचं छोटं स्वप्न आणि कष्टकरी वर्गाचं, आम जनतेचं, देशाचं असं मोठं स्वप्न तयार होणं आणि ते वैज्ञानिक, विवेकी दृष्टिकोनाच्या आधारे प्रत्यक्षात आणण्याची धडपड करणं असा एक प्रदीर्घ कालखंड येऊ घातलेला आहे. त्यामध्ये विवेक विकसित होऊ शकेल, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल. आपली संस्कृतीही विकसित होईल… आणि आपली स्वप्नं प्रत्यक्षात येतील.

dattakdesai@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.