थप्पड – पितृसत्ताक व्यवस्थेवर

‘थप्पड’ चित्रपटाचा ट्रेलर बघितला आणि आम्ही सर्व स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी तो बघण्याचा निश्चय केला. संध्याकाळी पाचच्या शोचा ‘थप्पड’ बघण्यासाठी आम्ही सिनेमागृहात प्रवेश केला तेव्हा सिनेमागृहात मोजून ३० ते ४० प्रेक्षक होते. त्यांत महिलांचे प्रमाण अधिक होते. बहुतेक प्रेक्षक हे तरुण व मध्यमवयीन होते तर काही बोटावर मोजण्याइतक्या पन्नाशीपुढच्या महिला होत्या. प्रेक्षकांमधील पाच-सहा तरुण तर चित्रपट सुरू असताना मध्येच उठून गेले. बहुदा त्यांना चित्रपट आवडला नसावा. सदर चित्रपटातील मोलकरणीला तिचा नवरा मारतो हे दृश्य आले तेव्हा बहुतेक तरुण मुली-मुले हसली. परंतु नायिकेला तिच्या नवऱ्याने ‘थप्पड’ मारल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटले हे त्यांच्या स्तब्धतेतून कळाले. चित्रपट संपल्यानंतर सिनेमागृहातून बाहेर पडताना मात्र त्यांच्या प्रतिक्रिया होत्या, “चांगला संसार होता, किती प्रेम करायचा तिच्यावर; एका फटक्याने काय होते!” “एवढा आकांडतांडव करण्याची काय गरज होती?” काही वयस्क स्त्रिया होत्या. त्यांचे म्हणणे होते, “बई, आम्हीतर किती मार खाल्ला. ह्या आताच्या मुली थोडंही सहन करत नाही.” वगैरे…

प्रेक्षकांच्या अशा प्रतिक्रियांमुळे स्त्रीहिंसा ही किती सामान्य बाब आहे हे वास्तव पुढे येते असे मला वाटते. अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘थप्पड’ हा चित्रपट भारतीय कुटुंबातील स्त्रीहिंसा ह्या वास्तवाचे अनेक पदर उलगडण्याचा प्रयत्न करतो. ह्या चित्रपटातून अनुभव सिन्हा ह्यांनी चित्रपटाची नायिका अमृता, तिच्या घरची मोलकरीण, अमृताची आई व सासू, तिच्या भावाची मैत्रीण, तिची शेजारीण व नेत्रा (अमृताची वकील), ह्या सर्व स्त्रियांच्या जीवनपटातून घरगुती हिंसा कशी घडते व स्त्रियांनाच ती सामान्य बाब वाटल्याने समाजमान्य कशी होते, हे दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे.

चित्रपटातील नायकाने नायिकेला थप्पड मारल्यानंतर चित्रपटातील वेगवेगळ्या पात्रांकडून आलेल्या प्रतिक्रिया अशा प्रकारच्या हिंसेच्या सामान्यिकरणाची साक्ष देतात. जसे, नवऱ्याची प्रतिक्रिया – “अमू, घडले… होत असते.. ह्यातून पुढे चल (Move on).” नायिकेची सासू – “थोडा बरदाश्त करणा सिखणा चाहिये बेटियोंको” “थोडी बहुत मारपीट तो होतीही रहती है, यही तो प्यार हैं ना सर?” ऑफिसमधील सहकारी – “थप्पड ही तो मारा है, बस इतनीसी बात है।” नेत्रा (वकील) – “कुटुंबातील काही समस्या आहे? नवऱ्याचे प्रेमसंबंध आहेत? तुमचे प्रेमसंबंध आहेत? मग केवळ थप्पड मारल्यामुळे घर सोडायचे?”

माझ्या नात्यातील कुटुंबात, शेजारील कुटुंबात, चळवळीतील स्त्री कार्यकर्त्यांच्या कुटुंबात जेव्हा मी डोकावते व चाचपडण्याचा प्रयत्न करते तेव्हा नवऱ्याने एकही चापट न मारलेली स्त्री सापडणे अवघड बनते. पण स्त्रीवादी म्हणून मी जेव्हा उलटा विचार करते व स्त्रियांना विचारण्याचा प्रयत्न करते की त्यांनी त्यांचा राग वा टेंशन कधी नवऱ्याला थप्पड मारून काढला आहे का? नवऱ्याच्या प्रेमापोटी कधी त्यांनी त्याला मारले आहे का? अथवा नवऱ्याचे चुकले म्हणून बायकोने नवऱ्याला कधी मारले आहे का? तेव्हा, खूप शोधूनही अशी उदाहरणे फारशी सापडत नाहीत. हिंसेबाबतचे हे जे स्त्री-पुरुष व्यस्त प्रमाण आहे त्याचा अर्थ म्हणजे स्त्रियांवरील हिंसाचार ही सर्वसामान्य बाब असून समाजातून तिला फारसा आक्षेप घेतला जात नाही.

चित्रपटातील वरील संवाद स्त्रीहिंसेसंदर्भात पुढील निकषांपर्यंत पोहचतात. १. स्त्रियांनी त्यांच्यावर होणारी हिंसा सहन केली पाहिजे. त्या कारणाने घर सोडता कामा नये. २. तिच्यावर होणारी हिंसा ही तिच्या स्वाभिमान वा अस्तित्व ह्यावरील हल्ला नसून पतीचे पत्नीवरील प्रेम आहे ३. थप्पड ही तर फारच किरकोळ बाब आहे व ती घर सोडण्याचे प्रभावी कारण असू शकत नाही.

स्त्रियांवरील हिंसा ही सामान्य बाब आहे आणि ती व्यवहारात सर्रास घडत असते. तिला समाजमान्यता कशी मिळते ह्याचे राजकारण समजून घेण्यासाठी समाजातील स्त्री-पुरुष विषमतावादी व्यवस्था म्हणजेच जातपितृसत्ताक समाजव्यवस्था समजून घ्यावी लागेल. भारतीय जातपितृसत्ताक समाजात स्त्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, पितृसत्ताकतेला हिताचा असलेला विवेकवाद जपण्यासाठी अपरिमित अशा हिंसेचा व क्रौर्याचा वापर केला जातो. हिंसा ही दोन प्रकारे केली जाते. १) पाशवी बळाच्या माध्यमातून २) विचारप्रणालीच्या सहाय्याने

स्त्रियांनी पुरुषांचे प्रभुत्व स्विकारावे म्हणून विचारप्रणालीच्या सहाय्याने तिच्यावरील हिंसेला अधिमान्यता मिळवून दिली जाते. म्हणून थप्पड चित्रपटातील नायिकेची सासू, नायिकेची आई, वकील, नायिकेचा पती (विक्रम), विक्रमचा सहकारी मित्र, नायिकेचा भाऊ ह्या सगळ्यांनाच, नायकाने (विक्रम) नायिकेला (अमृता) थप्पड मारल्याने काही चुकले असे वाटत नाही. त्यामुळे अमृता जेव्हा कुटुंब नावाची व्यवस्था नाकारते तेव्हा एकटी पडते. कारण कुणालाच तिच्यावर झालेली हिंसा ही फारशी गंभीर बाब वाटत नाही. हजारो वर्षांपासून स्त्री-पुरुष विषमता ही कुटुंबातील संस्कार, समाजातील रुढी-परंपरा, सण-उत्सव, धर्मग्रंथ आणि आता शाळा-महाविद्यालयातील अभ्यासक्रम, इत्यादिंच्या माध्यमातून पोसली गेली. स्त्रीहिंसा ही कुटुंबातून आई, सासू, सासरा अथवा वरिष्ठ बुजूर्ग, तसेच शाळा महाविद्यालयातील शिक्षक, ह्या सर्वांनी संस्कारीत करून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केली. ही हिंसा केवळ विचारप्रणालीच्या माध्यमातून झाली नाही तर त्यासाठी वेळप्रसंगी पाशवी बळाचादेखील वापर केला गेला. उदा: चित्रपटातील नायिकेच्या गालावर पडलेली थप्पड! चित्रपटातील नायिका अमृता सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत नवऱ्याची व घरची सर्व कामे हसतमुखाने करते. उदा. सकाळी उठल्याबरोबर झाडांना पाणी टाकणे, नास्ता तयार करणे, घरातील सर्व स्वच्छता करणे, सासूची शुगर मोजणे वगैरे!! ही सगळी तिची नित्याची कामे झाली आहेत. विक्रमने मारझोड करून काही सांगण्याची वेळ अमृतावर किंवा तिच्यासारख्याच इतर गृहिणींवर येत नाही. कुटुंबातील रोजच्या संस्कारांतून, पाठ्यपुस्तकांतून, धार्मिक ग्रंथ, करमणुकीची साधने ह्यांतून तिच्यावर ते संस्कार केले जातात. परंतु कोणतीही विषमतावादी व्यवस्था केवळ संस्कारांतून म्हणजेच विचारप्रणालीतून दीर्घकाळ स्वतःचे अस्तित्व टिकवून धरू शकत नाही म्हणून वेळप्रसंगी पाशवी बळाचादेखील वापर केला जातो. उदा. स्वतःच्या कुटुंबातील सर्व पारंपरिक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मोलकरणीला नियंत्रित करण्यासाठी तिचा नवरा तिला रोज रात्री मारझोड करतो. असेच अनेक नवरे छोट्या-छोट्या कारणांवरून आपल्या बायकांना मारताना दिसतात. बहुदा व्यसनी वडील, मुलगा अथवा नवरा त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांवर क्रूर अशा हिंसेचा वापर सर्रास करतात.

सिमॉन दि बोव्हा ह्या स्त्रीवादी अभ्यासिका “द सेंकड सेक्स” ह्या त्यांच्या पुस्तकात असे मत मांडतात की, “स्त्री ही जन्मत नाही तर ती घडविली जाते.” स्त्रीचे स्त्रीत्व व पुरुषाचे पुरुषत्व घडविणारी ही प्रक्रिया विचारप्रणालीच्या माध्यमातून यशस्वीपणे पार पाडली जाते. म्हणून चित्रपटातील नेत्रा, सासू, अमृताची आई, ही सगळी स्त्री पात्रे असली तरी त्यांच्यावरील संस्कार हे स्त्री-पुरुष विषमतेला पोषक राहिलेले आहे. परिणामतः ह्या सर्व स्त्रिया नायिकेने पुन्हा कुटुंबात परतावे ह्यासाठी प्रयत्नरत असलेल्या दिसतात. त्यांच्या तोंडून वदविलेले संवाद हे स्त्रीहिंसेच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष करणारे व घरगुती अत्याचाराचे समर्थन करणारे ठरतात. जशा स्त्रिया घडतात तसेच पुरुषदेखील घडत असतात म्हणून आपल्या बहिणीशी तिच्या नवऱ्याने केलेली हिंसक वर्तणूक भावासाठी गंभीर, बहिणीच्या आत्मसन्मानाची बाब बनत नाही.

कल्पना कन्नबिरन त्यांच्या ‘The Voilence of Normal Times’ ह्या पुस्तकात म्हणतात की, मारझोड करणे, बलात्कार करणे, केवळ ह्या अर्थाने हिंसेकडे न पाहता स्त्रियांप्रती समाजामध्ये असलेला विषम व्यवहार हादेखील हिंसेचाच एक प्रकार आहे असे मानले पाहिजे. हिंसेच्या स्वरुपाकडे व्यापक अर्थाने पाहिले पाहिजे. स्त्रियांना त्यांचे हक्क-अधिकार नाकारणे, त्यांना वारंवार दुय्यमत्वाची जाणीव करून देणे, त्यांना निर्णयप्रक्रियेतून वगळणे, त्यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करणे, त्यांना घालून-पाडून बोलणे हीदेखील न दिसणारी मानसिक अशी हिंसाच आहे. नेत्राच्या नवऱ्याने तिला तिचे कर्तृत्व नाकारून केवळ स्वतः व स्वतःचे वडील यांच्या वर्चस्वाखाली ठेवणे, तिची इच्छा नसताना उपभोग घेणे हीदेखील हिंसाच आहे. कुटुंबासाठी स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना बगल देणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत. चित्रपटातील नायिका तिला आवडणाऱ्या नृत्यकलेत गोल्ड मेडलिस्ट असूनही कुटुंबाला अग्रक्रम दिल्याने त्यात करियर करू शकलेली नाही. तिच्या आईने स्वतःच्या गाण्याच्या आवडीला अशीच मुरड घातली आहे. स्वतःच्या इच्छा-आकांक्षाना कुटुंबासाठी सोडून देणे हीदेखील पितृसत्ताकतेतून सतत घडणारी एकप्रकारची हिंसा आहे, हे अतिशय अचूकपणे हेरण्याचे काम चित्रपटात केले गेले आहे.

समाजव्यवस्था ही स्त्री-पुरुष विषमतावादी, जातिव्यवस्थावादी व भांडवली असल्याने सर्व स्तरांत हिंसा होताना दिसते. ती धर्म, जात, वर्ग, भाषा ह्या सर्व क्षेत्रांत राजकारण, शिक्षण, रोजगार, संस्कृती, प्रशासन ह्या माध्यमातून वावरताना दिसते. फक्त हिंसेची तीव्रता कमी-अधिक राहिलेली दिसते. चित्रपटात दाखविलेली हिंसा ‘मोलकरीण’ ह्या कनिष्ठ वर्गात अधिक आहे तर उच्चमध्यमवर्गीय कुटुंबात तिची तीव्रता तुलनेत कमी राहिलेली दिसते. हा चित्रपट स्त्रीसमस्येचा वेध घेताना जातीचे वास्तव घेण्याचे टाळतो. परंतु भारतीय जातपितृसत्ताक समाजात स्त्रीशोषण हे जातिव्यवस्था व पितृसत्ता यांच्या एकत्रितपणाचा पाक आहे. म्हणून ह्या चित्रपटात दोन्ही स्त्रिया ह्या जातपितृसत्तेच्या बळी राहिलेल्या आहे. दोघींचीही मुक्ती ही जातपितृसत्तेचा वेध घेवून व तिच्या अंताची व्यूहरचना आखूनच केली जाऊ शकते.

“उसने मुझे मारा पहली बार, नही मार सकता. इतनी सी बात है और मेरी पिटीशियन भी इतनी सी है.” हा नायिकेचा संवाद तिच्यावर झालेल्या अन्यायाविरोधाची ठिणगी बनतो. ‘थप्पड’च्या अनुषंगाने पूर्ण चित्रपट स्त्री-हिंसेभोवती फिरतो. चित्रपटाचा शेवट अतिशय चांगला आहे. बहुतेक चित्रपट, कथा, नाटके ही समाजातील स्त्री-पुरुष विषमतेवर उभ्या असणाऱ्या कुटुंबसंस्थेविरोधात भाष्य करतात, परंतु ती नाकारण्याचे धैर्य दाखवत नाही. उदा. प्र.के.अत्रे यांच्या एका नाटकातील नायिका (कमल) कुटुंब नावाची शोषणवादी चौकट ओलांडते; परंतु मुलांसाठी शेवटी पुन्हा कुटुंबात येते. म्हणजेच स्त्री कितीही क्रांतीकारी असली तरीदेखील ती कुटुंबाचे पाश तोडू शकते नाही, असं भ्रामक वास्तव अत्रेंचं नाटक पुढे आणतं. स्त्रीला कुटुंबाशिवाय पर्याय नाही. स्त्रियांच्या मुक्तीचे राजकारणाच्या दिशेने जाणारे नाटक शेवटी स्त्रियांच्या गृहिणीकरणावर येऊन थांबते. ‘थप्पड’ हा चित्रपट जातपितृसत्तेच्या पायावर उभ्या असलेल्या शोषणवादी कुटुंबांच्या विरोधात बंड करतो. चित्रपटातील नायिका अमृता व तिची वकील नेत्रा घर सोडून स्वतःचा स्वाभिमान, आत्मसन्मान व ओळख तयार करण्यासाठी नव्याने मुक्तपणे उभ्या रहातात.

हा चित्रपट स्त्रीहिंसेविरोधात एल्गार पुकारून कुटुंबव्यवस्था नाकारणारा असला तरीदेखील त्यातील एक बाब मला खटकली. ती बाब म्हणजे चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रश्नांवर बनलेल्या बहुतेक चित्रपटात शोषित स्त्रीच्या जाणीवा समजून घेणारा हिरो एखादा ‘पुरुष’च दाखवला जातो. ‘लज्जा’सारख्या हुंडा, स्त्रीहिंसा, स्त्रीचे दुय्यमत्व यांचा वेध घेणाऱ्या चित्रपटात मनिषा कोईरालाचा रक्षणकर्ता म्हणून अजय देवगण नावाचा पुरुष अचानक उपस्थित होतो. ‘थप्पड’ चित्रपटातदेखील अमूवर स्त्री म्हणून झालेल्या हिंसेची जाणीव सदर चित्रपटातील स्त्रियांपेक्षा (ज्या स्त्रिया नवऱ्याने रोज केलेला मानसिक व शारिरीक छळ सहन करतात) एका पुरुषाला, जो अमूच्या वडिलांच्या भूमिकेत आहे त्याला, अधिक असलेली दाखविली आहे. पुरुष दिग्दर्शकांची ही मर्यादा असावी.

ह्या चित्रपटात अमृताच्या भूमिकेतील तापसी पन्नू आणि माया सराओ, नायला ग्रेवाल, दिया मिर्झा, तन्वी आजमी, रत्ना पाठक, गितिका वैद्य ह्या इतर अभिनेत्रींच्या चांगल्या अभिनयामुळे स्त्रीहिंसेचा मुद्दा अधिक प्रभावीपणे व सविस्तरपणे प्रेक्षकांसमोर ठेवता आला.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.