फलज्योतिष हे एक शास्त्र आहे असा अनेक लोकांचा विश्वास असतो. त्याचे उदाहरण म्हणून कधी काळी कोणीतरी सांगितलेले खरे ठरलेले भाकित लोक सांगतात. पण त्यानेच किंवा इतरांनी सांगितलेली शेकडो चुकीची ठरलेली भाकिते ते सोइस्करपणे विसरून जातात. वास्तविक खरेपणा खोटेपणा ठरविण्यासाठी खरी आणि खोटी दोन्ही भाकिते लक्षात घेतली पाहिजेत.
फलज्योतिष सांगण्याच्या अनेक पद्धती आहेत. पाश्चात्य, भारतीय, चिनी इ. त्यांत एकवाक्यता नाही. भारतीय पद्धतीचा विचार केला तरी तिच्यातील सायन-निरयन वाद, दशांचे प्रकार, नक्षत्रपुंज आणि त्यांचे प्रदेश – या व अशा अनेक तपशिलातील विरोधाभास श्री रिसबूड यांनी १९९१ मध्ये लिहिलेल्या फलज्योतिष काय आहे व काय नाही या पुस्तकामध्ये अतिशय सुबोध रीतीने स्पष्ट करून दाखविला आहे.