नवे जग नवी तगमगः एक ज्ञानज्योत

कुमार शिराळकर यांनी त्यांच्या चाळीस वर्षांच्या राजकीय वाटचालीत वेळोवेळी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रश्नांबद्दल लिहिलेल्या निवडक लेखांचा संग्रह `मनोविकास प्रकाशना’ने `नवे जग, नवी तगमग’ या शिर्षकाखाली देखण्या स्वरूपात प्रकाशित केला आहे. शिवाय स्वत:बद्दलबढाईखोर सोडाच पण प्रसंगानुरूपसुध्दा न बोलणाऱ्या कुमार शिराळकर यांनी या संग्रहात स्वत:बद्दल दोन लेख लिहिले आहेत. त्यातून त्यांच्या एकंदरच जडण घडणीची कल्पना येते आणि त्यामुळे हा माणूस अधिकओळखीचा आणि आपला होत जातो. धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील जनतेने त्यांना `कुमारभाऊ’ ही दिलेली पदवी अधिकच सार्थ वाटू लागते. त्यातून जनतेशी असणारे त्यांचे जैव नाते प्रकर्षाने पुढे येते.
या लेख संग्रहाला ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांची प्रस्तावना लाभली आहे. या प्रस्तावनेत रावसाहेबांनी देव, धर्म, प्रेम या मार्क्सने प्रतिपादलेल्या संकल्पनांचा आजच्या संदर्भात वेध घेतला आहे. जगभर धर्मवादी राजकारण शिगेला पोहोचण्याच्या का ळात मार्क्सचे हे विचार किती महत्वपूर्ण आणि मार्गदर्शक आहेत हे ठोसपणे मांडले आहे. या प्रस्तावनेत रावसाहेबांनी कुमार शिराळकरांच्या या लेखसंग्रहाबद्दल म्हटले आहे, `कुमार शिराळकरांनी या लेख संग्रहात धर्माबद्दल, जाती अंताबद्दल, जागतिकीकरणाबद्दल, स्त्री-पुरूष समता आणि श्रमिकांच्या चळवळीबद्दल जे लिहिले आहे ते मुळातून वाचले पाहिजे. ही आजच्या भारतीय आणि जागतिक वास्तवाच्या आकलनासाठी लावलेली मराठी भाषेतील ज्ञानज्योत आहे’, ते पुढे म्हणतात, `कार्ल मार्क्स, म.ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या त्यांच्या का ळात पेटवलेल्या प्रकाशमान ज्ञानज्योतीतून आवश्यक तेवढा प्रकाश घेऊन प्रत्येक प्रदेशाच्या मातृभाषेत एक नवी ज्ञानज्योत पेटवावी लागेल आणि ती आजच्या एकविसाव्या शतकात माणसावरील अतूट प्रेमासाठी, त्याला माणुसपण देण्यासाठी व्यवस्थेतील आमुलाग्र परिवर्तनासाठी कामी लावावी लागेल. कुमार शिराळकर यांचा लेख संग्रह हा त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे असे मी मानतो. त्यांच्या प्रखर ध्येयवादाला अणि ते जगलेल्या खडतर जीवनाला सलाम करतो.’
रावसाहेबांनी अतिशय समर्पक शब्दात या लेख संग्रहाचे महत्व वरील ओळीतून व्यक्त केले आहे. खरेतर या नंतर या लेखसंग्रहाच्या संदर्भात काही भाष्य करणे गरजेचे नाही. तरी वाचकांसाठी या लेखसंग्रहात कुठल्या कुठल्या स्वरूपाचे लेख आहेत, त्यांचे आजच्या का ळात आणि ज्ञान क्षेत्रात काय महत्व आहे? हे सांगणे गरजेचे आहे.
`ओळख म्हणून’ या शिर्षकाखाली `मागोवा’ गटाचे संस्थापक आणि आधारस्तंभ, मागोवा, तात्पर्य या नियतकालिकांचे संपादक ज्येष्ठ मार्क्सवादी विचारवंत सुधीर बेडेकर यांनी साठ-सत्तरीच्या दशकात मार्क्सवादी विचारांकडे आकर्षित झालेल्या तरूणांसाठी जागतिक आणि भारतीय पातळीवर काय परिस्थिती होती, याचा उहापोह केला आहे. कुमार शिराळकर यांच्या जडणघडणीत या काळाचे महत्व स्पष्ट होते. कुमार शिराळकरांसारखे उच्च शिक्षित मध्यम वर्गीय तरूण त्या समाजवादाने भारलेल्या काळात नोकऱ्या सोडून आदिवासी जनतेच्या मुक्ती लढयात कसे उतरले याची आपल्याला कल्पना येते.
`उठ वेडया तोड बेडया’ ही 1974साली कुमार शिराळकर यांनी लिहिलेली पुस्तिका त्याका ळी खूप गाजली. ही पुस्तिका जणू कुमार शिराळकरांसह त्या काळातील अशा क्रांतिकारी तरूणांचे स्वगतच म्हणावे लागेल. स्वातंत्र्याच्या का ळातील एका कवितेत म्हटल्याप्रमाणे,
भारत माते पुत्र शहाणे अगणित तुला लाभले,
तुझ्या कुशीला परी जन्मली काही वेडी मुले…
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू सारख्या वेडया मुलांनीच स्वातंत्र्यासाठी बलिदान देऊन स्वातंत्र्य जवळ आणले. ध्येयासक्तीने झपाटलेले असेच जग बदलू शकतात. कुमार शिराळकरांचे हे वेड अजून गेलेले नाही. आजही ते आदिवासी, दलित, श्रमिक जनतेच्या मुक्तिलढयात पाय रोवून उभे आहेत. विचारांनी आणि प्रत्यक्ष कृतीने!
या लेखसंग्रहाचे विषयानुरूप असे पाच भाग केलेले आहेत. पहिला विभाग धर्म, दुसरा विभाग जात, तिसरा विभाग आदिवासी आणि चौथा विभाग अर्थकारण, राजकारण तर पाचवा विभाग व्यक्तिगत स्वरूपांच्या लेखांचा आहे. जवळ जवळ 21 लेखांचा हा संग्रह आहे. विषय आणि त्यांचे स्वरूप पाहाता सर्वच सामजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक प्रश्नांना मार्क्सवादी दृष्टीकोनातून भिडण्याचा प्रयत्न करून त्यातून ठोस निष्कर्ष त्यांनी काढले आहेत. केवळ नव्याने चळवळीत आलेल्या तरूणांसाठीच नव्हे, ते तर आहेच पण मार्क्सवादी विचारातील नैतिकता आणि शुध्दता जपू पाहणाऱ्या आणि तसा व्यवहार करू पाहणाऱ्या प्रत्यक्ष चळवळीत कार्यरत असणाऱ्या सर्वांनाच हा लेख संग्रह मार्गदर्शन करणारा आहे.
`धर्म’ या विभागात कुमार शिराळकरांनी माझी धर्मयात्रा, मार्क्सवादी धर्म चिकित्सा, धार्मिकता आणि धर्मांधता, धर्मांधता आणि दहशतवादी राजकारण, धर्म आणि भारतीय राष्ट्रीयत्वाचे स्वरूप असे पाच लेख लिहिले आहेत. या लेखातून ते स्वत: धर्माच्या प्रभावातून कसे मुक्त होत गेले याचे अनुभव सांगून धर्माचा उदय, त्याची त्या त्या काळातील उपयुक्तता, मार्क्सवादाची धर्मविषयक भूमिका, धर्मचिकित्सेचे महत्व तसेच आजच्या काळाला ग्रासून राहिलेली धर्मांधता, तिचे दहशतवादी राजकारण तसेच हिंदुत्ववाद्यांना सडेतोड उत्तर देणारी भारतीय राष्ट्रीयत्वाची समर्पक मांडणी केली आहे.
`जात’ या विभागात मनुस्मृती, बुध्दाचा धम्म आणि बाबासाहेबांचे कार्य, जातीव्यवस्थेचे बदलते स्वरूप, जाती अंत आणि कम्युनिस्ट चळवळ, जातीय अत्याचार विरोधी लढा, श्रमिक, दलित राजकारणाची दिशा असे पाच लेख आहेत. जाती व्यवस्थेसंदर्भात कुमार शिरा ळकरांची मांडणी हे या लेखसंग्रहाचे वैशिष्ट्ये मांडता येईल. कारण आजवर या प्रश्नांचा इतका चिकित्सक पध्दतीने आणि भावनिक पातळीवर जाऊन कोणी फारसा मागोवा घेतलेला नाही. `कम्युनिस्टांना जातीप्रश्न कळत नाही’ अशी टीका नेहमी होते. या पार्श्वभूमीवर हे लिखाण अत्यंत महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक स्वरूपाचे आहे.
आपल्या देशात दलित जनतेबरोबरच सर्वात शोषित विभाग म्हणजे आदिवासी जनसमूह. या जनसमूहाचे प्रश्न थेट वर्गाय तर आहेतच पण त्याची समृध्द अशी जनसांस्कृतिक परंपरा आहे. ज्या समतावादी न्यायपूर्ण समाज व्यवस्थेकडे आपल्याला जनतेला घेऊन जायचे आहे त्यासाठी आवश्यक ती मूल्ये प्राथमिक स्वरूपात या जनसंस्कृतीत आढळतात. आदिवासी जनतेला मुख्य प्रवाहात आणताना आपल्याला या समृध्द सांस्कृतिक मूल्यांच्या चालीरीतींचा ठेवा जपावा लागेल. त्या दृष्टीने चळवळीची आखणी करणे गरजेचे आहे. कुमार शिरा ळकर यांनी या सर्व बाबींचा उहापोह `भांडवली विकास आणि आदिवासी जनतेचे परीघीकरण’ या लेखात केला आहे. तसेच `महाराष्ट्राच्या इतिहासात स्त्रियांचे योगदान, स्त्री-पुरूष समता आणि कार्यकर्त्यांचा व्यवहार’ या लेखातून स्त्री प्रश्नांची मांडणी पुढे आणली आहे.
`स्त्री-पुरूष समता आणि कार्यकर्त्यांचा व्यवहार’ या लेखात स्वत:ला मार्क्सवादी, पुरोगामी म्हणवणारे कार्यकर्तेही पुरूषी मानसिकतेतून मुक्त झालेले नसतात, त्यामु ळे त्यांचा घरातील व्यवहार पुरूष प्रधानच असतो. त्यामुळे या संदर्भात आपले वर्तन कसे असावे याची परखड मांडणी या लेखात केली आहे.
`अर्थकारण आणि राजकारण’ हा विभाग आजच्या काळातील प्रश्नांचा उहापोह करणारा आहे. `श्रमिक चळवळ: काल, आज आणि उद्या’ या लेखात वास्तववादी दृष्टीने चळवळीचे परिशीलन केले आहे. सोव्हिएत युनियन कोसळल्यांनंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्या पार्श्वभूमीवर चळवळीचा वेध घेतला आहे. आजच्या साम्राज्यवादी राजकारणाचे स्वरूप आणि त्याचे परिणाम मांडतांना `नफ्याचे खासगीकरण आणि तोटयाचे राष्ट्रीयकरण’ या माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी मांडलेल्या संकल्पनेला विशद करून धनवान देश आणि गरीब यामधील दरी कशी वाढत आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे.
नक्षलवाद ही भारतीय कम्युनिस्ट चळवळीसमोरील एक मोठी गंभीर समस्या बनून राहीली आहे. या चळवळीच्या संदर्भात `नक्षलवाद: रोमँटीक आकर्षण आणि वास्तविक दिवा ळखोरी’ या लेखात या चळवळीचा सांगोपांग आढावा घेतलेला आहे. तिची वैचारीक दिवा ळखोरी अंतिमत: कम्युनिस्ट च ळव ळीला कशी मारक ठरते हे त्यांनी दाखवून दिले आहे. तसेच दुष्काळ, भ्रष्टाचार या संदर्भातील दिशा काय असावी या बद्दल ठोस मांडणी केली आहे.
पाचव्या विभागात व्यक्तिगत स्वरूपाचे दोन लेख आहेत. एक, `नानासाहेब’ आणि दुसरा, `सोमनाथ: जंगलातील भटकंती’. या लेखात कुमार शिराळकरांनी त्यांचे आजोबा (आईचे वडील) नारायण हरी आपटे यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. नारायण हरी आपटे हे जुन्या जमान्यातील सुप्रसिध्द कादंबरीकार होते. त्यांच्या जवळ जवळ 35 कादंबऱ्या प्रसिध्द झाल्या आहेत. व्ही. शांताराम यांचा गाजलेला `कुंकू’ नावाचा चित्रपट त्यांच्या कादंबरीवरच बेतलेला आहे. अशा सुप्रसिध्द असलेल्या आजोबांचे त्यांच्या बालमनावर जे जे संस्कार झाले ज्यातून कुमार शिराळकरांची जडण घडण कशी झाली ती समजून येते. उदाहरणार्थ, कुमार शिराळकरांनी आजोबांना वेगळ्या पध्दतीने जीवन जगण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी माझी तयारी आहे. असे सांगितले. आजोबा रागावून काहीतरी उपदेश करतील अशी कुमार शिराळकरांची समजूत होती. पण आजोबांनी अगदी स्पष्टपणे सांगितले, `हात्तिच्या!’ एव्हढेच नां, अरे, राजस्थान, पंजाबकडे भटकताना मी भगतसिंगांना भेटलेलो आहे. इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्रांती करणाऱ्या तरूणांची निष्ठा आणि धडाडी तू समजून घे. क्रांती भावनांनी नव्हे तर दृढ जाणिवांनी घडते. यशापयशाची खंत गोंजारायची नसते. तू अवश्य तुला जगायचे तसे जग. कार्य कर. पण पथ्ये पाळ. अमिषांना बळी पडू नकोस. व्यसनांपासून दूर राहा. रागालोभाला काबूत ठेव. व्यक्तिगत लाभ हानीचा विचार करू नकोस. समाजासाठी, देशासाठी सर्वस्व वेचण्याची उमेद हरवू नकोस’, कुमार शिराळकरांच्या आयुष्याची आजवरची वाटचाल ज्यांना माहित आहे त्यांना त्यांच्या आजोबांनी जो वरील उपदेश केलेला आहे त्याची जणू तंतोतंत अंमलबजावणी असल्याचे दिसून येईल.
`सोमनाथ: जंगलातील भटकंती’ हा या लेखसंग्रहातील अखेरचा लेख आहे. समाजासाठी काहीतरी करायचे या भावनेने सोमनाथ येथील बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या श्रमिक विद्यापीठात प्रवेश घेऊन कुमार शिराळकरांची बाबा आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता बनण्यास सुरूवात झाली. तेथून ते शहाद्याच्या आदिवासी जनतेत कार्य सुरू करण्याच्या कालखंडापर्यंत त्यांनी लिहिले आहे. यात मुख्यत्वे करून बाबा आमटे यांचे व्यक्तिमत्व, सोमनाथच्या जंगलात भटकतांना आलेले रोमांचकारी अनुभव, आदिवासी जीवनाचे जव ळून झालेले दर्शन तसेच नक्षलवादी समजून पोलिसांनी कसे पकडले याची मनोरंजक हकीगत त्यानी सांगितली आहे. लेखाच्या अखेरीस त्यांनी लिहिले आहे, `सोमनाथचे दिवसही लवकर संपले आणि मी दिनानाथ, विजय, शिवराम जानेवारी 1972मध्ये शहाद्याच्या आदिवासींमध्ये कार्य करण्यास गेला. तिथल्या दोस्तांबरोबर दहशतीचा आणि वर्गसंघर्षाचा दाहक आणि मोहक अनुभव घ्यायला.’
कुमार शिराळकर आजही तसा अनुभव घ्यायला आसुसलेले आहेत. अगदी गेल्या वर्षा खडर्याला झालेल्या दलित अत्याचाराविरोधात जेव्हा `पुणे ते खर्डा’ असा जो लाँग मार्च आयोजित केला होता त्यात ते आघाडीवर होते. प्रत्येक मुक्कामात ते कार्यकर्त्यांचे उत्साहाने अभ्यासवर्ग घेत होते…. त्यांचे हे लिखाण म्हणजे `बोले तैसा चाले’ या तुकारामांच्या उक्तीचा प्रत्ययच आहे.
नवे जग, नवी तगमग
कॉ. कुमार शिराळकर,
मनोविकास प्रकाशन,
पानेः 295, किंमतः रु 350

जीवनमार्गच्या सौजन्याने

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.