परमसखा मृत्यूः किती आळवावा…

“तुला अगदी शंभरावर पाच वर्ष आयुष्य!” मैत्रिणींच्या संमेलनात पोचायला मला थोडा उशीर झाला काय अन् सगळ्यांनी हे असे उस्फूर्त स्वागत केले माझे. ऐकले अन् अंगावर सरसरून काटा आला. मनात म्हटले, माणसाची ‘अधिकाची भूक कधी संपणारच नाही आहे का? पूर्वी नाव काढताच हजर होणाऱ्याला ‘शंभर वर्षे’ आयुष्य बहाल केले जायचे, आता ‘शंभरावर पाच’ ! साहजिकच चर्चा या ‘शंभरावर पाच’ आणि त्यावरून अंगावर उठणारा काटा अशीच सुरू राहिली.
नुकतीच कोणीतरी वयाची ११७ वर्षे पूर्ण केलेल्या रांगड्या शेतकयाची बातमी वाचली होती. त्यावरून आपल्या पुराणकथांमधल्या सात चिरंजीवांची आठवण झाली. अमरत्वाची कल्पना खरोखरच एवढी आकर्षक आहे का? असली तर का? या सात चिरंजीवांच्या कल्पनेबाबत दुर्गाबाई भागवतांनी म्हटले आहे, “माणसाला अमर होण्याची नैसर्गिक इच्छा असते. पण चिरंजीव झाल्यावर त्याला नैसर्गिक अंकुर फुटणार नाहीत. ते अमरत्व प्रवाही नसणार. ते अमरत्व कोमेजणार नाही, पण ते फुलणार, फळणारही नाही असाच इशारा (या कल्पनेतून) द्यायचा
असावा.’
मृत्यूविषयी माणसाला जेवढी भीती आहे तेवढेच आकर्षणही आहे. ११७ वर्षांच्या माणसाविषयी बातमी जरी वर्तमानपत्रात छापून येण्याएवढी महत्त्वाची वाटली, तरी बहुतेक वृद्धांशी चर्चा केली तर त्यांची प्रतिक्रिया ‘नकोरे बाबा एवढं लांबलचक आयुष्य!’ अशीच असते.
जगातल्या बहुतेक धर्मांनी आत्महत्या हे पाप मानले आहे. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर माउली, स्वातंत्र्यवीर सावरकर, पू. साने गुरुजी यांसारख्या आपल्याला परिचित उदाहरणांमधील एक प्रकारच्या आत्महत्यांनाच आपल्याकडे उच्चतर दर्जा दिलेला आहे, हा किती मोठा विरोधाभास आहे ? ख्रिश्चनिटीचा पाया असणाऱ्या जेनेसिसनुसार मानवी जगातला पहिला मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नव्हताच. अॅडम आणि ईव्ह यांच्या केन आणि एबल या दोन भावाभावांतील वैरातून केन हा एबलचा द्वेष करतो आणि रागाच्या भरात तो त्याला मारूनच टाकतो. ख्रिश्चेनिटीनुसार हा जगातला पहिला मानवी मृत्यू!
निसर्गात पाहिले तर काय दिसते? जीवितकार्य पूर्ण झाले की मृत्यू. कोण्या कीटकाचा तीन दिवसांत तर एखाद्या केळीचा प्रसवतानाच ! जन्म, वाढ, पुनरुत्पादन आणि विनाश ही खरे तर निसर्गाचीच साखळी आहे. पण मानवाने प्रगतीच्या नशेत या साखळीला खोडा घातला आहे. अर्थात काळाची पावले उलटी कधीच जाऊ शकणार नाहीत. काळाच्या सुरुवातीच्या पावलांत माणसाने जन्म घेण्याच्या नैसर्गिक हक्कात हस्तक्षेप केलेला आहेच पण मृत्यू पावण्याच्या नैसर्गिक हक्कात हस्तक्षेप करण्यास मात्र तो कचरतो आहे, हे काय आहे ?
वास्तविक फक्त भारतीय इतिहासाचा विचार केला तरी समाजाचे कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्यांनी नैसर्गिक मृत्यूवर अवलंबून राहणे नाकारलेलेच दिसते. “अनादि मी, अनंत मी । अवध्य मी भला ।” असे बजावणाऱ्या सावरकरांनी शेवटी वयाच्या ८३ व्या वर्षी निर्धारपूर्वक अन्नत्याग करून मृत्यूला मिठी मारली. अंदमान बेटावर काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना त्यांनी जे मनोबल दाखवले होते, त्याहून हे मनोबल निश्चितच तसूभरही कमी नव्हते. ज्ञानेश्वरांनी तर अगदी लहान वयात कृतार्थ मृत्यू पत्करला तो समाधीच्या मार्गाने. पाश्चात्त्यांमध्येही साँक्रेटीसने विष पिऊन मृत्यू पत्करला तो पलायनवाद नाकारण्यासाठी. हेमलॉक हे विष पिऊन तो अगदी स्थिर बुद्धीने मृत्यूला सामोरा गेला. हा सगळा इतिहास काय सांगतो? अनैसर्गिक मरणाला पूर्वी मानवी समाजात मान्यताच नव्हे, तर प्रतिष्ठाही होती. फक्त कायद्याचे पाठबळ नव्हते आणि ते अजूनही नाही. आणि अशा त-हेच्या स्वयंनिर्णयासाठी फार मोठ्या मानसिक बळाची गरज असते. जे सामान्य माणसाजवळ अभावानेच आढळते; आणि कोणतीही कठीण गोष्ट एकटादुकटा जेव्हा करू शकत नाही तेव्हा एकमेकांच्या सहकार्याने ती पार पाडणे थोडे तरी सुलभ होते, ही गोष्ट सर्वमान्य आहे. त्यामुळेच आज इच्छामरणाच्या कायद्याची जास्त गरज निर्माण झाली आहे. कारण एकमेकांना ज्या गोष्टीत मदत करायला जायचे ती गोष्ट तर आधी कायदेशीर असली पाहिजे. इच्छामरणाबाबत अनेकांनी वैयक्तिक पातळीवर ही गरज मान्य केलेली आहे. यापूर्वी आ.सु.च्या अंकात माझ्या प्रसिद्ध झालेल्या पत्रास पाठिंबा देणारे दूरध्वनी अनेक मान्यवरांनी केलेले आहेत. खाजगी बैठकांमध्ये तर अनेकांनी ‘इच्छामरणाची सोय असायला हवी’ हे मान्यच केलेले आहे. याहीपुढे जाऊन या विषयावर कोणी जनहित-याचिका दाखल करणार असेल तर त्याला मी वैयक्तिकरीत्या आर्थिक मदत (रु.१०,०००/-) करीन असेही कळविले गेले.
याबाबत पुन्हा दुर्गाबाई भागवतांचाच दाखला आहे. एका मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे, “आत्महत्या हे पाप आहे असे अनेक धर्मांनी ठरवलेले आहे खरे, पण मला काही ते पटत नाही. ज्याच्या नशिबाला असह्य शारीरिक वेदना आहेत; ज्याच्या मानसिक भौतिक संवेदनांचा अंतच झालेला आहे, किंवा ज्याचे जगून संपले आहे, त्याला जर सुटका हवी असेल, तर त्याला लोळतघोळत दीनवाणे मरण येण्यापेक्षा, सन्मानाने, विनायातना चटकन मरण येणे हा त्याचा हक्क आहे असे मी मानते. असे मरण सुखाने येईल याची व्यवस्था करायला हवी. आत्महत्या म्हणण्यापेक्षा त्याला ‘इच्छामरण’ हा शब्द अधिक योग्य. सावरकरांचे मरण हे इच्छामरण होते. अशा मरणासाठी एक चळवळ चालविण्याची गरज आहे. म्हणजे अन्नत्याग करून मरण्याची वेळ लोकांवर येणार नाही.”
अर्थात आक्षेप घेणाऱ्यांजवळ पुष्कळ मुद्दे आहेत. भारतासारख्या देशात, जिथे एका सिग्रेटसाठी आजीचा जीव घेणारे नातू आहेत, तिथे इच्छामरणाचा कायदा झाला तर लोकांना मोकळे रानच मिळेल. कायद्याचाच आधार घेऊन घरातील वृद्धांचे सरसहा खून पडू लागतील. वैद्यकीय पेशात भ्रष्टाचार माजेल इ. इ. शिवाय ज्याला खरोखरच मरायचे आहे त्याला कायद्याची काय गरज? हा तर विरोधकांचा फार मोठा मुद्दा आहे. पण कायदा एवढ्यासाठी हवा आहे की आयुष्यभर आम्ही कायदेशीरपणे जगतो, संपत्ती मिळवतो, तिचा उपभोग घेतो, तिचे दान करतो, मग अशा या प्रतिष्ठित आयुष्याच्या शेवटीच आम्ही आत्महत्या करून बेकायदा कृत्य का करावे?
कायद्याच्या आवश्यकतेबाबत तांत्रिक मुद्दे तर अनेक आहेत. वैद्यकीय तज्ज्ञ मंडळी हे मुद्दे नक्कीच अधिक विस्ताराने मांडू शकतील. पण समजा अगदी माझ्यासारख्या ४०-४२ वयाच्या बाईने तिच्या वृद्धापकाळासाठी असा इच्छामरणाचा निर्णय घेऊन ठेवला असला तरी तेव्हा तो अंमलात आणण्यासाठी माझी शारीरिक स्थिती असेलच याची काय शाश्वती ? वृद्धापकाळात साध्या दैनंदिन कृतींसाठीसुद्धा दुसऱ्याची मदत घ्यावी लागते हे आपण हरघडी पाहतोच आहोत ना? मग इच्छामरणासारखा निर्णय अंमलात आणण्याजोगी माझी शारीरिक स्थिती राहील असे मानणे हा केवढा मूर्खपणा! म्हणूनच येथे मदतीची गरज आहे. ती जास्ती जास्त सुरक्षित कशी असेल याचा विचार नंतर करता येईल.
ही सर्व कहाणी अत्यंत स्वाभाविकपणे जोडली जाते ती नियोजनाशी! जर भविष्यात मी कायम स्वावलंबीच राहणार आहे तर मला ‘म्हातारपणाची काठी’ लागणारच नाही. मग माझे मूल मी जास्त निरपेक्षपणे, जबाबदारीचे ओझे त्याच्यावर न लादता वाढवू शकेन. त्याचा विकास अधिक खुलेपणाने होऊ शकेल. बालवयातल्या माझ्या परावलंबित्वाकडून, स्वावलंबित्वाकडे झालेला माझा प्रवास तिथेच पूर्णविराम पावेल. त्याला पुन्हा परावलंबित्वाची भीती उरणारच नाही. या ठिकाणी अर्थातच माझ्या आर्थिक, मानसिक, शारीरिक जगण्याचा विकास उर्ध्वगामीच राहील. शिवाय या त-हेने वृद्धांची संख्या आपोआप नियंत्रित राहू लागली तर जागतिक अर्थकारणावर काय परिणाम होतील हे अर्थतज्ज्ञांनी जरूर सांगावे.
एका अर्थाने, आपण माणूस म्हणून जन्मलो हे आपले भाग्यच म्हटले पाहिजे. “रिटायर्ड लाईफ’ ही संकल्पना फक्त मानवजातीतच आहे. अवतीभवती जरा बघितले तर काय दिसते? ज्यावेळी प्राणी अन्न मिळवण्याची धडपड थांबवतो तेव्हाच त्याचा मृत्यू नक्की होतो. जेव्हा वनस्पतीची मुळे पाणी शोषणे थांबवतात तेव्हा तिला नष्ट व्हावेच लागते. शत्रूपासून पळण्याची प्रेरणा आणि शक्ती संपली की जीवाचा नाश अटळ राहतो. म्हणजेच अन्न आणि संरक्षण या दोन मूलभूत गोष्टींसाठी संघर्ष करण्याची ताकद संपली की निसर्गतःच त्या जीवाचा अंत होतो. यात कुठे ‘रिटायर्ड लाईफ’ आहे ? पण प्रगत मानवी समाजात काय आहे पस्तीस वर्षे नोकरी करा आणि पंचेचाळीस वर्षे पेन्शन खा! हे लिहिणे कदाचित काही लोकांना फार क्रूरपणाचे वाटेल पण ते सत्य आहे. उमेदीची निम्मी वर्षे माणूस म्हातारपणाची तरतूद करण्यात घालवतो. आणि निम्मी वर्षे सेटल होण्यात. अर्थात हे थोडे विषयांतर झाले. पण मथितार्थ एवढाच की जेव्हा ‘जननात’ माणसाने हस्तक्षेप केला तेव्हाच मरणातही तो करावा लागणार हे अटळ होते.
प्रगत शहरी समाजापुरते निरीक्षण नोंदवायचे झाले तर, आसन्नमरण स्थितीतील रोग्यांचे प्राणवायू पुरवठा करणारे यंत्र चालू ठेवायचे की नाही याचा निर्णय तुम्हीच घ्या, असे नातेवाईकांना सांगणारी डॉक्टरमंडळी वेगळे काय करत आहेत ? ‘तेरी भी चूप मेरी भी चूप!’ असा कायदा व्यवहारात वापरात आहे आणि या प्रकरणाचे भरतवाक्यही ठरलेले आहे. ‘डॉक्टर म्हणालेच होते, असे ठेवून काही सुधारणा होणार नाही. तुम्हाला निर्णय घ्यायलाच लागेल. काय करावे अगदी सुचत नव्हते. पण एवढ्यातच ते गेले. अगदी अवघड जबाबदारीतून सोडवले बघा त्यांनी आम्हाला!”
शेवटी आपल्या माणसाचा हात हातात असताना मृत्यू येणे, एका अज्ञाताच्या प्रवासासाठी प्रस्थान ठेवायला मिळणे हे खरोखरच अहोभाग्य असणार. पण त्यासाठी स्वतःच स्वतःचा भाग्यविधाता व्हावे लागणार हे नक्की! कारण असा रिझर्वेशनचा प्रवास नियोजनाशिवाय करायला मिळणे अशक्यच की.
‘पुरेसे जगून झाल्यावर’ मरणाचा हक्क जर माणसाला मिळाला तर नक्कीच त्याला आहे ते जगणे अधिक हवेसे वाटेल. ते अर्थपूर्ण करण्यासाठी तो अधिक धडपडेल. मृत्यूची किंबहुना विनासायास मृत्यूची शाश्वती त्याच्या जगण्याला एक सकारात्मक बळ देईल. डी-२०२, कपिल अभिजात, डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे ४११ ०३८. संपर्क : ९४२२३०२२८७
लेखिका ‘मृत्यू : स्वाधीन की पराधीन’ या विषयाच्या सामाजिक, भावनिक, आर्थिक, जीवशास्त्रीय अशा अंगांची चर्चा व्हावी, असे सुचवतात. इच्छुकांचे लेख संपादन करून छापले जातील. सं.]