इतिहास

इतिहास म्हणजे भूतकाळात जे घडले त्या विषयीची माहिती, ज्ञान, आकडे (data), इ. इ. सर्व. भूतकाळाशी संबंधित वस्तू (भांडी, शस्त्रे, नाणी, कपडे, दागिने, इ.), वास्तू (भवने, राजवाडे, किल्ले, रस्ते , इमारती, शिलालेख, इ.) आणि माहिती, आकडे, ज्ञान (दस्तावेज, पत्रव्यवहार, लेख, विचार, इ.) या सर्वांची जुळवाजुळव करून भूतकाळात काय घडले असावे हे वर्तमानात सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना इतिहासकार किंवा इतिहासतज्ज्ञ म्हणतात.
जगाचा आद्य इतिहासकार म्हणून महर्षी व्यासांकडेच पाहता येईल. ज्याकाळी लिहून ठेवण्याच्या सोयीच नव्हत्या त्या इ.पू. जवळपास १०,००० वर्षांपासून विभिन्न ऋषिमुनींनी जे श्लोक रचले त्यांत त्या काळातील अनेक घटनांचे वर्णन व ज्ञान, कला, इ. सर्वांची माहिती होती. ते सर्व एका पिढीतून दुसऱ्या पिढीला पाठांतरातून अबाधित रूपात संक्रमित करण्यात आले. ते सर्व म. व्यासांनी चार वेदांच्या रू पात विषयवार विभागणी करून संपादित केले. त्यावरून वेदकालीन जीवनाचे थोडेफार प्रत्यंतर आज येऊ शकते. म्हणून ऋग्वेद हा एक आद्य इतिहासग्रंथच होय. त्याचबरोबर म. व्यासांनी जय नामक एक ग्रंथ लिहून त्यात त्यापूर्वी झालेल्या सर्व महत्त्वाच्या घटनांची एक इतिहास म्हणून जाणकारी लिहून ठेवली आहे. त्याच ग्रंथाचे नंतर व्यापक झालेले (१ लाख श्लोकांचे) व आज उपलब्ध असलेले रूप म्हणजे महाभारत. हा एक त्या काळाचा इतिहासच आहे. त्यांच्या लिखाणाचा एक निश्चित उद्देश जाणवतो तो, असा की व्यक्तीला व समाजाला आवश्यक अशा सर्व सद्गुणांची व जे अवश्यपणे टाळावे अशा सर्व दुर्गुणांची जंत्री करून घटनांच्या वर्णनाच्या माध्यमातून समाजधारणेस्तव ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या वाचनातून योग्य असे संस्कार होऊन समाजजीवन उन्नत राहावे ही संकल्पना होती व आहे. त्यामुळे इतिहासलेखनाला तेव्हापासून उद्देश आहे, तसाही तो निरुद्देश्य कधीच नसतो. इतिहासलेखनाचा हा प्रारंभबिंदू आहे. हे मान्य व्हावे.
त्यात सर्व विवरण हे सामान्यपणे राजेरजवाडे, त्यांच्या घरांतील अंतःकलह, राजकारण, त्यांनी लढलेल्या लढाया व युद्धे, इ.चेच आहे. अर्थात थोडाफार भाग सामाजिक संबंधांतील कला, विज्ञान, समाजविज्ञान, संगीत, अन्य शास्त्रे, इ.चाही आहे. याचबरोबर म. व्यासांनी भागवत नामक ग्रंथ लिहून त्यात पुनः वरील प्रकारची काही माहिती व भक्तिमार्गाचे निरूपण केले आहे. भारतात आजपर्यंत या दोन ग्रंथांचे जेवढे वाचन, त्यावर कथा-कीर्तने-प्रवचने इ. द्वारा प्रबोधन व चर्चा आणि विभिन्न काळातील टीकाटिप्पणी एवढ्या प्रमाणात आणि एवढ्या प्रकाराने झाल्या आहेत, तेवढ्या अन्य कोणत्याही ग्रंथाबद्दल झाल्या नाहीत. समाजजीवनातील त्यांचे महत्त्व व प्रभाव आजही सहज लक्षात येतो. तो आजतागायत कायम तर आहेच पण पुढेही राहणार आहे.
आजच्या संदर्भात हा सर्व प्रागैतिहास किंवा प्राचीन इतिहास समजला जातो. तो पाठांतरातून पुढच्या पिढीच्या हाती देत आजपर्यंत कायम राखण्यात यश मिळाले. प्रागैतिहासिक काळातील व नंतरही लिहिलेले अनेक ग्रंथ, पुराणे इ. सर्व आज ऐतिहासिक दस्तावेज म्हणून उपलब्ध आहेत. असे सर्व ज्ञानभंडार मुख्यतः नालंदा व तक्षशिला नामक दोन विद्यापीठांत सुरक्षित ठेवून त्यावर अधिक अध्ययन होत असे. पण इस्लामी आक्रमणात यांतील अधिकांश दस्तावेज जाळून नष्ट करण्यात आले. अशा इतिहास अध्ययन व लेखनाला इस्लामी आक्रमणानंतर जवळपास पूर्णविराम मिळाल्यासारखे झाले.
अर्वाचीन इतिहासाच्या अध्ययनाला व तो लिहिण्याला खरी सुरुवात झाली ती युरोपमधील रेनेसाँच्या काळात. त्याला अनेक कारणे घडली. त्यात पोपच्या तानाशाहीच्या विरोधातील प्रतिक्रिया प्रमुख होती. ती विभिन्न रूपांत प्रकटली. त्यामुळे बुद्धी उन्मुक्त होऊन तर्काला प्राधान्य देण्यास सुरुवात झाली. त्यातून विज्ञानाचा, म्हणजे निसर्गाचा अभ्यास सुरू होऊन ज्ञानाचे सार्वत्रिकरण झपाट्याने झाले. स्वातंत्र्य हे मूल्य विकसित होऊन जनतांत्रिक पद्धती विकसित होऊन सर्वसामान्यांनी समाजव्यवस्थेत, न्यायदानात, शिक्षणक्षेत्रात दखल देणे सुरू झाले. जुन्या ग्रीक व लॅटिन विद्यांचा, ग्रंथांचा अभ्यास सुरू होऊन इतिहासाचे पुनरवलोकन व लेखन करण्यास प्रारंभ झाला. इ.स.पूर्व काही शतकांपासून ते जवळपास इ.स. १५ व्या शतकापर्यंत, मुख्यतः नंतरच्या ईसाई धर्माच्या प्राबल्यामुळे, खंडित झालेला अभ्यासाचा काळ पुनश्च सुरू झाला. हाच तो अर्वाचीन इतिहासलेखनाचा प्रारंभ. भारतात या १५-१६व्या शतकांत परकीय मुस्लिम आक्रमकांसमोर जिवंत राहण्याच्याच समस्या एवढ्या बिकट होत्या की अध्ययन-अभ्यासाचा प्रश्नच उद्भवला नाही.
युरोपात रेनेसाँ काळात इ.स.पूर्व ५ व्या शतकातील दोन मूळ ग्रंथ सापडले आहेत. एक होता हेरोडोटसचा दि हिस्टरीज हा ग्रंथ, ज्यात पर्शिया विरुद्ध ग्रीस या युद्धाचे वर्णन मिळाले. दुसरा होता युकिडायडीजचा हिस्टरी ऑफ पेलोपोनेशियन वॉर’, ज्यात अथेन्स विरुद्ध स्पार्टातील युद्धाचे वर्णन होते. यापासून प्रेरणा घेऊन जुन्या वस्तू, वास्तू, पत्र-व्यवहार, अन्य दस्तावेज, भांडी, कपडे, दागिने इ. च्या अभ्यासातून भूतकाळातील घटनांचे वर्णन करण्यास प्रारंभ होऊन अर्वाचीन इतिहासलेखनास प्रारंभ झाला. त्या ऐतिहासिक लिखाणावर वरील दोन्ही ग्रंथांच्या लेखनपद्धतीचा परिणाम होता. ती मुख्यतः गद्य कथानक लिहिण्याची पद्धती होती व त्यात राजे-रजवाड्यांचाच इतिहास असे.
हे सर्व मुख्यतः युरोपमध्ये घडल्याने अर्वाचीन इतिहासलेखनास युरोपातच प्रारंभ झाला. नंतर त्यात अन्य वसाहती देश जुळत गेले. इतिहासलेखनाला ज्ञानशाखेत रूपांतरित होण्यास १९व्या शतकापर्यंत वाट पहावी लागली. २० व्या शतकात त्याचे रूपांतर समाजविज्ञानाच्या शाखेत होऊन त्यावर वैज्ञानिक पद्धतीने लिखाणास प्रारंभ झाला.
त्यानुसार इ.स.पूर्व ४-५व्या शतकानंतरचा इतिहास लिहिण्यात यश मिळाले आहे. त्यापूर्वी युरोप हा रानटी प्रदेशच होता, म्हणून त्यापूर्वीचा इतिहास मिळणार नाही ही धारणा बनली. त्याला अन्य देशांनी होकारार्थी मान डोलावली. त्याला भारत अपवाद राहिला नाही. त्यामुळे इ.स.पूर्व ५ व्या शतकाच्या पूर्वीचा भारतीय इतिहासही नाकारावा लागला. त्याच्या अभ्यासार्थ पुरातत्त्वशास्त्र (archeology) पुढे आले, व त्याला प्रागैतिहास ठरवून ते मोकळे झाले. ते सर्व सत्य मानून भारताने पारतंत्र्यात ते स्वीकारले. पण तेच अद्याप सुरू आहे हे आपले दुर्दैव आहे. भारतात इ.स. २-५ व्या शतकाच्या आधी किमान काही हजार वर्षे तरी सुसंस्कृत मानवसमाज कृषियुगीन रूपात राहात होता. त्यातच वेद, उपनिषदे, ब्राह्मणे, आरण्यके, रामायण, महाभारत, भागवत, अन्य अनेक ग्रंथ, काही पुराणे, इ. निर्माण झाले. यांत तेव्हाच्या समाजजीवनाची झलक स्पष्ट दिसते. या सर्वांची यथायोग्य सांगड घालून आपला संपूर्ण इतिहास आज व्यवस्थित लिहिला
जाऊ शकतो. पण हा असला काही इतिहास नसून ते फक्त कल्पनारम्य विश्व (mythology, myths) आहे, म्हणून भारतीयच त्यांची हेटाळणी करतात आणि तो लिहिण्यात येऊ नये यास्तव प्रयत्नशील असतात, हे आपले मोठे दुर्दैव आहे.
व्यक्तिसापेक्षता
इतिहास हा व्यक्तीने लिहिला असल्यामुळे त्यात काही प्रमाणात व्यक्तिसापेक्षता येणे टाळताच येत नाही. एकच घटना डोळ्यांसमोर घडलेली असताना दोन व्यक्तींच्या त्या घटनेच्या वर्णनांत तफावत आढळते. येथे तर कोणीच तो भूतकाळ पाहिला नसल्यामुळे लेखक त्याचे वर्णन, कदाचित अपुया अशा वस्तू, वास्तू, दस्तावेज, इ.च्या आधारावर काय घडले असेल याचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत कोण्याही इतिहासकाराद्वारा प्रमाद घडण्याची पुरेपूर सोय आहे. पण प्रत्येकाच्या बाबतीत हे सत्य असल्यामुळे मुळात सत्य हे असे व्यक्तिसापेक्ष, इतिहासकारसापेक्ष, रूपांतच मिळू शकते. अर्थात त्यात व्यक्तिसापेक्षता किमान असावी, इतिहासकार सत्यनिष्ठ असावा, कोणत्याही प्रकारे त्याने बुद्धिपुरस्सर तथ्यांची तोडफोड करू नये, ही अपेक्षा आहे. अशी व्यक्तिसापेक्षता मुळात त्यावरील संस्कारामुळे, शिक्षणामुळे, इच्छाआकांक्षामुळे, वर्तमानाविषयीच्या पूर्वग्रहदूषित मानसिकतेमुळे, आवडीनिवडींमुळे, समाज-व्यक्तिसापेक्षतेमुळे, इ. अनेक कारणांमुळे येऊ शकते. पण ऐतिहासिक तथ्यांकडे पाहण्याच्या दृष्टीवर याचा किमान परिणाम व्हावा ही अपेक्षा आहे.
एवढे होऊनही ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करताना त्याचे स्पष्टीकरण आणि कल्पनाशक्ती, तर्क आणि हेतुपुरस्सरता, कल्पकतेतून लावलेला अर्थ आणि बुद्धिपुरस्सर केलेली मोडतोड, क्षुल्लक चुका आणि तथ्यांची जाणीवपूर्वक केलेली विकृती, अनवधानाने नजरेआड झालेले तथ्य आणि जाणीवपूर्वक दाबून टाकलेली गैरसोयीची माहिती; अशा अनेक बाबतींतील सीमारेषा फार पुसट असल्यामुळे समोर येणारा इतिहास व्यक्तिसापेक्षच असतो, किमान तसा तो भासतो अवश्य. यावर उपाय म्हणून लिखाणात तळटीपांचा उपयोग आवश्यक आहे. पण अशा तळटीपा वापरून जाणीवपूर्वक विकृत केलेल्या लिखाणाला वरकरणी उगाच अधिकृतता प्राप्त होते.
इतिहासकार स्वतःला व स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला पूर्णपणे बाजूला सारून सत्यनिष्ठ इतिहास लिहूच शकत नाही. त्यामुळे इतिहासलेखनातील प्रत्येक प्रयत्न टीका ओढवून घेऊ शकतो. त्यांपैकी कोणत्याही प्रकाराला म्हणूनच वैश्विक मान्यता मिळत नाही. म्हणूनच इतिहास हे अवैज्ञानिक विज्ञानाच्या श्रेणीत टाकले आहे. एकूण ज्ञानच कधीही व्यक्तिनिरपेक्ष नसते. आता तर पदार्थविज्ञानातही या व्यक्तिसापेक्षतेला मान्यता देण्याचा काळ विकास पावला आहे. मग इतिहासासारखे समाजविज्ञान त्यातून अस्पर्शित कसे राहणार?
यातून मुख्यतः दोन प्रकारे अर्वाचीन इतिहासलेखनाला १५ व्या शतकात प्रारंभ झाला. एका प्रकारावर थुकिडायडीजच्या च्या ग्रंथप्रकाराचा प्रभाव होता. म्हणजे लेखनात अधिकृतता, सर्वज्ञता व निर्णयात्मकता असायची. दुसऱ्या प्रकारावर हेरोडोटसच्या ग्रंथप्रकाराचा प्रभाव होता व त्यात तात्पुरतेपणा, एकाबरोबर अनेक स्पर्धक कथा/घटनांनाही एकसारखे महत्त्व देण्याचा आणि हे सर्व विडंबन वाटावे या सीमेपर्यंत ताणण्याचा खुलेपणा होता. जोपर्यंत कथात्मक, वर्णनात्मक, गद्य लेखनशैलीचाच प्रभाव होता. व ज्याकाळापर्यंत इतिहास म्हणजे राजेरजवाड्यांच्या कथांनाच महत्त्व देण्याची पद्धत होती, तेथपर्यंत हे सर्व चालले. नंतरच्या काळात इतिहासलेखनात अन्य अनेक विषय जुळल्याने इतिहासलेखनाची पद्धतच बदलली.
लिओपोल्ड व्हॉन रँकऽ या इतिहासकाराने सर्वप्रथम (१९व्या शतकारंभी) इतिहासकाराला निश्चित उद्देश असतो आणि तो त्याच्या सर्वसाधारण दृष्टिकोणाचा परिणाम असतो हे ठामपणे सांगितले.
जेकब बुर्कहाईटच्या मते इतिहास हे अवैज्ञानिक विज्ञान आहे. त्यातील ज्ञान कधीही व्यक्तिनिरपेक्ष व वस्तुनिष्ठ असूच शकत नाही. इतिहासकार स्वतःच्या व्यक्तित्वाला व काळ-वेळ परिस्थितीला बाजूला ठेवून इतिहास लिहूच शकत नाही. इतिहास कोणत्याही प्रकारे लिहिला तरी त्यावर त्यामुळेच टीका होणे अवश्यंभावी आहे.
नित्शेच्या मते इतिहासाचे तीन मुख्य प्रकार आहेत. एकात त्याला स्मारकासारखे मानून त्यावरील विश्वास वाढविण्याचा प्रयत्न होतो. दुसऱ्यात तो पुराणवस्तुसारखा मानून त्याला जसेच्या तसे ठेवण्याचा प्रयत्न होतो, त्यात बदल खपवून घेतला जात नाही. तिसऱ्या प्रकारात त्याला क्रिटिकल किंवा छिद्रान्वेषी मानून त्याला दूषणे देऊन संपविण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक देशाला या तीन्ही प्रकारच्या इतिहासाची आवश्यकता असते. फक्त कोणता भाग कोणत्या प्रकारात मांडावा याचे तारतम्य हवे. अर्थात त्यात एकमत कधीच होत नसते.
अॅक्टनच्या मते इतिहासकार हा नैतिक टीकाकार असतो. त्याने निर्लिप्त असावे, पण टोकाचे निर्लिप्त होण्याचे कारण नाही. कारण त्या स्थितीत त्याला मतप्रदर्शनच करता येणार नाही. म्हणून इतिहासकाराने मानवीय सदुद्धीच्या भूमिकेतून इतिहासाकडे पाहावे. इतिहासात अपराधी, शोषक, भ्रष्टाचारी, तानाशाह, खुनी इ. सर्व कदाचित शिक्षेपासून वाचले असतील पण ते इतिहासकाराच्या निर्णयातून सुटता कामा नयेत. इतिहासाद्वारा नैतिक व बुद्धिवादी प्रशिक्षण होत असल्यामुळे इतिहासकाराने नैतिकता जपावी. अर्थात दस्तावेजाचे काळजीपूर्वक अर्थ काढावे, त्यात व्यक्तिनिरपेक्षता असावी, भेदभाव नसावा. त्यातून मानवतेचे उन्नयन व्हावे. राष्ट्रीय (सामूहिक) इच्छाआकांक्षा फलद्रूप व्हाव्यात. भावनाविरहित असा इतिहास सांगताच येणार नाही, कारण भावना हा त्या शोधप्रक्रियेचा हिस्साच आहे. व्यक्तिनिरपेक्ष इतिहास हा अगदी रटाळ असेल. या सर्व निकषांवर महाभारत या ग्रंथाला इतिहास म्हणून सर्वांत वरचे स्थान देणे क्रमप्राप्त आहे.
इतिहास तेव्हाच जागृतावस्थेत येतो, जेव्हा तो वर्तमानाशी संबंधित होतो. इतिहास हा त्या काळातील पुराव्यांच्या नाही तर इतिहासकाराच्या माध्यमातून बोलत असतो. कारण इतिहासकार त्याचा अर्थ लावीत असतो. अर्थ हा वर्तमानाच्या आवश्यकता व उपयोग, भीती व आकांक्षा, अशा सर्व संदर्भातून लागू शकतो. अर्थ हा सापेक्ष असतो. तो निरपेक्ष नसतो. त्यामुळे तीच ऐतिहासिक घटना वा पुरावा प्रत्येक पिढी आपल्या परिप्रेक्ष्यांत निराळ्या प्रकाराने मांडत असते. म्हणून इतिहासलेखन नेहमी सृजनशीलच असते व ते पुनःपुनः होत असते. अन्यथा एकदा लिहिल्यावर त्यावर पुनश्च लिहिण्याचे कारण उरत नाही. अशा इतिहासलेखनाद्वारे भूतकाळ वर्तमानात बोधप्रद होऊ शकतो.
इतिहासकार निर्जीव भूतकाळाचा अभ्यास करीत नसतात, तर भूतकाळ वर्तमानात जिवंत होऊन त्याचा अभ्यास होत असतो. वर्तमानातील आवड भूतकाळाला जिवंत करीत असते. कोणताही ऐतिहासिक पुरावा तेव्हाच ग्राह्य होतो, जेव्हा वर्तमानात कोणीतरी त्याच्या ऐतिहासिकतेबद्दल विचार करतो.
इतिहासात कोणी जर जे करणीय होते ते न करता जे अकरणीय होते तेच केले असेल (वर्तमानाच्या संदर्भात), तर त्यावर आपले मत प्रदर्शित करण्याशिवाय इतिहासकारासजवळ पर्यायच नसतो. त्यामुळे कदाचित खळबळ उडू शकते. लिओपोल्ड व्हॉन रँकऽच्याच मताप्रमाणे म. व्यासांचा महाभारत हा ग्रंथ लिहिण्यासंबंधातील दृष्टिकोण असाच स्पष्ट होता. त्यामुळे तो इतिहास अजरामर झाला हे विसरता येणार नाही. त्या दृष्टिकोणाला समोर ठेवूनच अलीकडील काळात शिवाजी, राणाप्रताप, गुरुगोविंदसिंह, इ. चा इतिहास लिहिला गेला आहे.
इतिहासाचे फार जास्त आकर्षण नको. त्यातून प्राप्त परिस्थितीत प्रेरणा घेण्याइतपत त्याचे आकर्षण सहज मान्य होण्यासारखे आहे. पण इतिहासात फार जास्त रमल्याने वर्तमानाकडे जेवढे लक्ष दिले जावे तेवढे कदाचित दिले जात नाही. वर्तमानातील आह्वाने भूतकाळातील आह्वानांसारखी असूच शकत नाही, कारण काळ बदललेला असतो. म्हणजेच वर्तमानातील परिस्थितीत नवीन प्रकारची कल्पक कृतिशीलता अपेक्षित आहे. ती भूतकाळाच्या अधिकच्या आकर्षणातून सिद्ध होऊ शकत नाही. यातील तारतम्य ही एक तारेवरची कसरतच असते. त्यामुळे इतिहास विसरण्याचे मूल्यही पुरेसे आहे. पण किती विसरायचे व किती ध्यानात घ्यायचे हे व्यक्तिसापेक्ष असते. यात निश्चित विभाजन करता येत नाही. भारतातील सद्यःस्थितीत तर हे स्पष्ट जाणवते की सर्वसाधारण भारतीय वाजवीपेक्षा जास्त इतिहासाचे ओझे घेऊन जगत असतो. दुसऱ्या टोकाला सर्व इतिहास विसरून जाण्याची प्रेरणा देणारेही येथे दिसतात. सामाजिक उत्क्रांतीतील महत्त्वाचा हिस्सा म्हणून इतिहासाकडे पाहणे सर्वथैव योग्यच आहे. त्यामुळे त्यातील सातत्य व वेळोवेळीच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांचा आधार कळण्यास मदत होते. त्यातून अधिक तर्काधारित प्रगती आणि आनुषंगिक प्रगती वेगवेगळी समजून त्या एक दुसऱ्यास कशा पूरक किंवा विरोधी ठरल्या हे कळू शकते.
ऐतिहासिक सत्य नेहमीच अनेक लहानसहान सत्यांश मिळूनच तयार होत असते. त्यामुळे इतिहासातील लहानमोठी सर्व सत्ये महत्त्वाची ठरतात. हे थोडे व्यक्तिसापेक्षतेनेच कळत असते. पण पूर्ण सत्य गवसण्याची त्यातून आशा अवश्य निर्माण होते. इतिहासकार भूतकाळाचा अभ्यास करीत नसून भूतकाळ वर्तमानात जिवंत होऊनच त्याचा अभ्यास होत असतो. कोणाला तो किती जिवंत करता आला यावर सत्य इतिहास कळणे अवंलबून असते. पुरंदऱ्यांनी शिवाजीचा इतिहास कदाचित अन्य अनेक समकालीन शिवाजी-इतिहासकारांपेक्षा जास्त जिवंत केला म्हणून तो अधिक व्यापकतेने ग्राह्य झाला. इतिहासा-इतिहासातील हा फरक केवळ व्यक्तिसापेक्षतेमुळेच दिसतो. इतिहासात व्यक्ती आणि घटना यांचा जो संबंध अनिवार्यपणे भासतो तो खऱ्या अर्थाने इतिहासकाराने आपल्या कल्पनेतून लादलेला संबंध असू शकतो, कारण इतिहासकार अनेकदा निश्चितता टाळून वाच्यार्थाखेरीज इतर अर्थ जाणिवेत येतील असे लेखन जाणीवपूर्वक करतो. म्हणून इतिहास ही एक पद्धती आहे. त्याचे त्यानुसार काही उद्दिष्ट नाही. जगाला जाणण्याची ती एक पद्धती आहे.
विकास
गद्य ह्या साहित्यातील प्रकाराचे आणि इतिहासाचे अतूट नाते आहे. दोघांनी एक-दुसऱ्याचे पोषण करीतच वाटचाल केली आहे. यालाच वर्णनात्मक (narrative) इतिहासप्रकार म्हणतात. सुरुवातीचा अर्वाचीन इतिहास हा लढाया-युद्धांचाच इतिहास होता. त्यात अन्य गोष्टी आनुषंगिक म्हणूनच जोडण्यात आल्यात. १९ व्या शतकापर्यंत साधारणपणे असाच इतिहास लिहिला गेला.
त्यातून पुढे ऐतिहासिक नाटके व अगदी अलिकडे ऐतिहासिक सिनेमांद्वारे तीच कथा सांगण्याचे प्रयत्न झाले. गद्य हा इतिहास लेखनाचा आधार होता, त्यामागील इतिहासाचे शोधकार्य, दस्तावेजाचा अभ्यास, इ. पण नाटक-सिनेमे ही मुख्यतः मनोरंजनाची साधने असल्यामुळे त्यांत उपलब्ध इतिहासातील आवडते कथानक केंद्रीभूत मानून, मूलभूत संकल्पना तशीच ठेवून पण पात्रांच्या तोंडी वर्तमानाला साजेसे संवाद विकसित करून हा इतिहासप्रकार मनोरंजक करण्याचा प्रयत्न झाला. यात साधारणपणे कोणी मुळातील ऐतिहासिक शोधकार्याच्या भानगडीत फारसे पडत नाहीत. अशा माध्यमांनुसार विषयांना साहित्यिक मूल्य प्राप्त होण्यास्तव त्यात बदल करावे लागतात. या प्रकारांतून जरी इतिहासच सांगायचा आहे तरी त्याचे साहित्यिक रूपांतर आवश्यक असते. हे स्वरूप प्रत्येकाचे स्वतंत्र असते. कदाचित अनेक कमी महत्त्वाच्या सत्यांना थोडेफार विकृत करूनही हा इतिहास सादर होत असतो. याचबरोबर ऐतिहासिक कादंबरी म्हणून एका अन्यप्रकारे रंजकतेने इतिहास सांगण्याचा प्रयत्न झाला. हा ललित साहित्याचा प्रकार असल्यामुळे यात ललित गद्याला भरपूर वाव मिळाला. एकेकाळी हरि नारायण आपट्यांची उषःकाल ही कादंबरी अशीच खूप गाजली. वि.स.खांडेकरांची ययाती, जीवर त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, तीसुद्धा याच श्रेणीत येते. हे सर्व इतिहासकथनाचे प्रकार आहेत. त्यांमागे निश्चित उद्देश्य आहे. त्यात ऐतिहासिक घटना/कथा वर्तमानात काळानुकूल लोकप्रिय करण्याकरिता कश्या सांगता येतील याची झलक मिळते. हे माध्यम सामान्य माणसाला इतिहासाकडे आकृष्ट अवश्य करते. एक केंद्रीभूत कथानक सोडले तर कथानकाचा शेष सर्व तपशील हा लेखकाचा कल्पनाविलास व कल्पकता याचे मिश्रणच असते. त्यातील संवाद तर शुद्ध काल्पनिकच असतात. त्यांचा त्या काळापेक्षा वर्तमानाशीच संबंध अधिक असतो.
असाच कथनाचा एक वेगळा प्रकार म्हणजे त्यात्या ऐतिहासिक कथानकाला तात्त्विक बैठक देऊन सविस्तर लिहिणे किंवा बोलणे (discourse). भारतातील ऐतिहासिक विषयांवरील कीर्तनेप्रवचने या श्रेणीत येतात. अशा कथनात्मक शैलीत, मग ते नाटक, सिनेमा, कादंबरी इ. कसल्याही प्रकाराने केलेले असो, शब्दरचनेला, अलंकरणाला भरपूर वाव असतो, नव्हे त्याशिवाय ही शैली रटाळ भासते. त्यात मध्येमध्ये ऐतिहासिक कोरे सत्य कोठेतरी डोकावत असते. म्हणून त्यात दीर्घकाळाच्या इतिहासाऐवजी वर्तमानात महत्त्वाची वाटणारी विशेष कथा, गोष्ट, विषय इ. कशाला तरी महत्त्व दिले जाते. असा इतिहासकार खरे तर मूलतः कथाकार असतो. स्वतः इतिहाससंशोधक साधारणपणे नसतोच. परंपरागत इतिहासकार हा दीर्घपल्ल्याचा विषय निवडून त्याच्या अध्ययनातून त्यातील आकृतिबंध शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याला अलंकरणाची आवश्यकता पडत नाही. त्याला अधिकाधिक सत्याधारित इतिहास लिहायचा असतो.
भारतात गद्याऐवजी पद्यात इतिहास लिहिण्याचीच परंपरा होती. त्यामुळेच वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण, अन्य अनेक जुन्या घटना सांगणारे ग्रंथ श्लोकात्मक काव्यरूपांत लिहिले/रचले गेले. युरोपात हा प्रकार फारसा वापरला गेला नाही. तेथे गद्यरूपावरच जोर होता.
आजकाल टी.व्ही.वर ऐतिहासिक मालिका दाखविल्या जातात. हा सिनेमाचाच एक बृहत् प्रकार आहे. यात भरपूर वेळ असल्यामुळे दीर्घकालीन इतिहास सांगण्याचा प्रयत्न असतो. यात ऐतिहासिक प्रवाह, ऋश्ररीह-लरलज्ञ आणि ऋश्ररीह-षीरीव पद्धतीचा यथायोग्य वापर करतात. यात भाषा, काही तात्त्विकता, यांचा वापर करून एकूण कथानक हे आदर्शाकडे झुकलेले असते. यात कल्पकता व काही अंशी काल्पनिकता येणे अवश्यंभावी आहे. कादंबरी, सिनेमा, टीव्ही मालिका, प्रवचने, कथाकथन इ. सर्व इतिहासप्रकारांतून एकूण मांडणी ही दुःखांत, विनोदी, शृंगारिक, विडंबनात्मक, उपरोधिक, प्रेरणादायी अशा प्रकारे परिणामकारी करण्याचा प्रयत्न नेहमीच होत असतो. ऐतिहासिक गोष्ट काही आंतरतः दुःखद, विनोदी किंवा शृंगारिक नसते. पण ज्या प्रकाराने तिचे सादरीकरण होईल तसा परिणाम अवश्य जाणवतो. अर्थात हे सर्व सादर करणाऱ्याचे कसब असते.
अर्वाचीन इतिहासलेखन व राज्यीय-राष्ट्रविकास (nation-state) हा समांतरपणे होत गेल्यामुळेही हे घडले असावे. त्याकरिता राजेरजवाडे प्रेरणादायी ठरल्यास नवल नाही. तसेही त्या सामंतशाही मानसिकतेत राजेरजवाड्यांचे जीवन श्रेष्ठ समजले जात होते. त्याचमुळे ओपोल्ड व्हॉन रँकऽचेही मत असेच होते की इतिहास म्हणजे श्रेष्ठ वंश, जाती, व्यक्ती म्हणजेच राजेरजवाड्यांचाच इतिहास. सामान्य माणसांचा इतिहास लिहिण्याचे काही प्रयोजन त्यांना मान्यच नव्हते. त्याकाळी अशाच श्रेष्ठ लोकांबद्दल माहिती मिळत होती, सामान्यांबद्दल नाही. जर ते राजेरजवाडे विजयी झाले असतील तर त्याबद्दल अधिक प्रभावीपणे लिहिणे समाजाला मान्य होई, व आवडेही. अशा इतिहासातून आपापल्या राष्ट्रीयत्वाचाच बोलबाला व दुसऱ्याला कमी लेखणाऱ्या आपपरभावामुळेच युरोपात अनेक राज्यीय-राष्ट्र विकसित होऊन स्थिरावली. या आपपरभावातून राष्ट्राराष्ट्रांत मत्सर, द्वेष वाढला व राष्ट्रीय भाव अधिक ठोस रूपात विकसित झाला. त्यातूनच महायुद्धापर्यंतची परिस्थिती उद्भवली, हेही तेवढेच खरे.
१७-१८ व्या शतकातील औद्योगिक क्रांतीने युरोपातील समाजजीवनात आमूलाग्र परिवर्तने होऊ लागली. सामान्य माणसांचे जीवन आमूलाग्र बदलू लागले. त्यात शिक्षण, विज्ञानतंत्रज्ञान, मनोरंजन, प्रवास, कला, इ.ना. पुरेसे महत्त्व आले. त्यामुळे त्या प्रत्येक विषयाच्या इतिहासाबद्दल एक उत्सुकता निर्माण होणे अगदी स्वाभाविक होते. तेव्हापासून इतिहासलेखनात हे अन्य अनेक मूलभूत विषय जुळून परिवर्तन होत गेले.
इतिहास आणि मार्क्सवाद
युरोपीय इतिहासाला सर्वांत जास्त हादरून सोडले असेल तर ते १९ व्या शतकाच्या मध्यात कार्ल मार्क्स या समाजशास्त्रज्ञाने. त्याने संपूर्ण मानवसमाजाच्या इतिहासाला कलाटणी देणारे एक प्रमेय फक्त दोन पानांत १८५९ साली मांडले. त्याचे शीर्षक होते. A Contribution to the Critique of Political Economy. त्याचबरोबर त्याने लिहिलेल्या Das Capital या ग्रंथानेही समाजजीवनातील सर्व विषयांवर पुनर्विचार करण्यास बहुतेकांना प्रवृत्त केले. त्याच्या अशा क्रांतिकारी विचाराला पार्श्वभूमी होती, औद्योगिक क्रांत्युत्पन्न उत्पादन व वितरणाची अगदी नवीन प्रणाली, आणि त्यात श्रमिकांचे भांडवलवाद्यांकडून चाललेले शोषण. त्याच्या विचारांमुळे अर्थकारण, समाजकारण, राजकारण इ. सरळ संबंधित विषय ढवळून निघालेच; पण त्यापासून मनोरंजन, कला, साहित्य, धर्म, शिक्षण, संगीत इ. कोणतेही महत्त्वाचे अंग अलिप्त राहू शकले नाही. मार्क्सच्या मते, “समाजव्यवस्था बाह्यतः जी दिसते ती तशी नसते. त्यात अदृश्य असा आर्थिक संबंधांचा एक ढाचा (strucure) असतो व तोच अधिक महत्त्वाचा असतो. त्यात वैयक्तिकतेपेक्षा सामूहिकतेलाच फार जास्त महत्त्व असते. त्यामुळे इतिहासाचे अध्ययन करताना व्यक्ती कितीही मोठी असली तरीही त्यापेक्षा या सामाजिक ढाच्याकडेच अधिक लक्ष देणे गरजेचे असते. त्यातूनच खरा इतिहास कळू शकतो. यात वर्गसंघर्ष (haves vs. have nots) हा फार महत्त्वाचा असा मुद्दा आहे, ज्याद्वारे इतिहास घडत असतो.”
ज्याने संपूर्ण समाजाचे एक प्रतिमान उभे केले, असा मार्क्स हा पहिला इतिहासकार आहे. त्या आधारावर सर्व सामाजिक क्रियाकलापांना समजता येईल, असे एकूण वातावरण त्याने उत्पन्न केले. मार्क्सच्या विचारांनुसार सर्व सामाजिक क्रियाकलापांचे उगमस्थान अर्थकारण/अर्थरचना हेच आहे. या मूलभूत ढाच्यावरच समाजातील संगीत, कला, साहित्य विज्ञान, राजकारण इत्यादी त्या बाह्य ढाच्याच्या (super structure) रूपांत विकसित होतात; त्यांना मूलभूत स्वरूप नसते; मूलभूत फक्त अर्थकारणच असते. इतिहासकाराने या मूलभूत ढाच्यात कशीकशी परिवर्तने होत गेली हे शोधायला हवे. या विचाराने १९ व्या शतकातील युरोपातील व २० व्या शतकात तर सर्वदूरच्या देशांतील समाजांना विशेषतः तेथील समाजधुरीणांना, एवढे भारून टाकले होते की त्यांना अन्य कोणताच विचार पटत नव्हता. ज्याची प्रतिक्रिया म्हणून मार्क्सवादी विचार प्रस्फुटित झाला त्या भांडवलशाही व्यवस्थेत रस असणाऱ्यांना त्याविरुद्ध कोणतीच ठोस अशी वैचारिक/नीती चौकट प्रस्तुत करता आली नाही, आणि आजही करता येत नाही.
यातून कथा-कथनात्मक शैलीकृत इतिहासापेक्षा एकूण विश्वच आविष्कृत करण्याकडे लक्ष गेले. त्यातून इतिहासाच्या संकल्पना अधिक स्पष्ट होत गेल्या. संकल्पना हा खरे तर विज्ञानाच्या मूलशोधाचा विषय असल्यामुळे ऐतिहासिक संकल्पनांद्वारे अधिक तर्काधारित, शास्त्रशुद्ध वैश्विकता समोर येऊ लागली. पण भौतिक विज्ञानासारखा कार्यकारणभाव इतिहासात स्पष्ट असणे शक्य नाही. इतिहास हा मानवीय क्रियाकलापांचा अभ्यास आहे. त्यात एकाच कारणाची प्रतिक्रिया निरनिराळ्या व्यक्ती व समाज निरनिराळ्या प्रकारे देऊ शकतात, नव्हे देतातच. परंतु त्यातून काही वैश्विक ऐतिहासिक नियम समोर ठेवण्याचा प्रयत्न २० व्या शतकाच्या मध्यावर केला. द्वितीय महायुद्धापर्यंत किंवा फार तर १९६० पर्यंत इतिहास-अध्ययनावर मार्क्सच्या विचारांचा बराच प्रभाव होता. रशियातील मार्क्सवादी प्रयोगातील प्रचंड हिंसाचार, त्यात झालेली स्वातंत्र्याची गळचेपी, विज्ञानतंत्रज्ञानातील अकार्यक्षमता. इ. नी त्या विचारांची पिछेहाट होत गेली. याचबरोबर अमेरिकेच्या पुढाकाराने स्वातंत्र्य या मूल्याला प्रचंड अशी वैश्विक मान्यता लाभून कोणत्याही परिस्थितीत ते मूल्य अबाधित राहावे, असे वातावरण तयार होत गेले. यामुळे मार्क्सवादाच्या ग्राह्यतेवर विपरीत परिणाम अवश्य झाला.
मार्क्सवादी आकृतिबंधातील त्रुटी लक्षात येऊ लागल्या. समाजजीवन असे एकांगी असू शकत नाही. त्यातील सर्व आयाम एकदुसऱ्याला प्रभावित करतात. उदाहरणार्थ, तंत्रज्ञान, शिक्षण, विज्ञान, मनोरंजन इ. सर्व अर्थकारणावर परिणाम करतात. पण अर्थकारण हेच मुळात याच आयामांना प्रभावित करते. मग यातील मूलभूत काय आहे? यावर मार्क्सवाद्यांना निरुत्तर व्हावे लागले.
व्यापकता
द्वितीय महायुद्धानंतर अमेरिकेच्या पुढाकाराने जे वैश्विक स्वातंत्र्याचे वारे वाहणे सुरू झाले त्याचा सर्वाधिक परिणाम झाला तो महिला विश्वावर. महिलामुक्ती, महिलांचे इतिहासातील स्थान व योगदान यांबाबत गंभीर चर्चा सुरू झाली. या सर्वांचा परिणाम म्हणून शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, महिला योगदान, धर्म इ.मध्येही इतिहासकारांना रुची निर्माण झाली. त्यातून इतिहासाचे आधुनिक रूप समोर येऊ लागले. तोपर्यंत इतिहास म्हणजे एक मऊ विज्ञान, किंवा फार झाले तर संघटित ज्ञानभांडार एवढेच, हा जो समज होता, तो बदलून ते एक कठोर विज्ञान म्हणून विकसित होऊ लागले. त्यामुळे इतिहासलेखन अधिक सर्वव्यापी होऊन वैश्विक आकृतिबंध समजण्यास मदत झाली. इ.स.१८७० पासून विद्यापीठांत महिला विद्यार्थी म्हणून येणे सुरू झाले. १९६० पर्यंत त्यांची उपस्थिती नगण्यच होती. त्यामुळे १९६० पर्यंत सांगण्यालायक कोणी महिला-इतिहासकार झालीच नाही. तोपर्यंत पितृसत्ताक पद्धती हाच महिला प्रगतीतील एकमेव अडथळा आहे, अशी धारणा होती. पण १९७० नंतर मात्र लिंग व सेक्स हे अडथळ्याचे मुख्य कारण म्हणून समोर येऊन महिला प्रगती, सबलीकरण, जाणीव इ. सर्व लिंग व सेक्स या विचारांशी अधिक निगडित आहेत, हा मुद्दा समोर येऊन इतिहासातील महिलांचा सहभाग चर्चेत आला. परंपरेवरील विश्वासांतून महिला-दमन घडले, की ते उत्क्रांतीचा अविभाज्य टप्पा म्हणून घडले, यावर जोरात चर्चा सुरू झाली.
आधुनिकवाद (Modernism) आणि आधुनिकोत्तरवाद (Postmodernism)
२० व्या शतकाच्या सुरुवातीपासून, प्रथम महायुद्धाने तर विशेषत्वाने साहित्य, कला, समाजशास्त्रे इ.मधील संकल्पना, मुख्य विषय, आकार-प्रकार, शैली इ. सर्व संबंधित विषयांत नवीन विचारांचे वारे वाहू लागले. चालत आलेल्या परंपरागत विचारांपासून जाणीवपूर्वक फारकत घेणे सुरू झाले. या बदलालाच सर्वसाधारणपणे आधुनिकवाद म्हणून संबोधण्यात आले. नवीन चिंतकांनी चालत आलेल्या सामाजिक संघटनांतील, धर्मांतील, नैतिकतेसंबंधी इ. विभिन्न विषयातील निश्चिततेच्या संकल्पनांनाच आह्वान देणे सुरू केले. तोपर्यंत विज्ञान हे न्यूटन, डेकार्ट यांच्या निश्चिततेच्या संकल्पनांवरच मुख्यतः आधारले होते. त्याचा एकूण परिणाम हा जीवनाच्या अन्य सर्व क्षेत्रांत निश्चिततेच्या संकल्पनांच्या विकासाच्या रूपात झाला होता. पण आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादामुळे मुळात विज्ञानच निश्चिततेपासून फारकत घेऊन शक्यतांच्या आधारावर बेतले जाऊ लागले. त्याचा परिणाम अन्यत्रही झाला. समाजजीवन एका निश्चित आकृतिबंधानुसार विकसित होते, हे अमान्य होऊन ते विकसित होण्यात विविधता तेवढीच महत्त्वाची ठरू लागली. या मूलभूत विचारांनी सर्व समाजशास्त्रांना प्रभावित केले. ही एक प्रकारची मासिस्टांच्या प्रभावाची तीव्र प्रतिक्रियाही होती; त्याच्या आकृतिबंधीय विचारांची प्रतिक्रिया होती. अर्थात समाजविज्ञानांत कोणतीच वैचारिक पद्धत समूळ उखडून टाकता येत नाही. त्यातील थोडाफार तथ्यांश यत्रतत्र उपयुक्त असतोच. पण त्यामुळे मार्क्सिस्टांचे जे एकछत्री प्राबल्य होते ते मात्र निकालात निघाले. तरीही मार्क्सला विचारात घेतल्याशिवाय कोणताच समाजवैज्ञानिक विचार पूर्ण होऊ शकणार नाही. याचबरोबर नित्शे, फ्रॉईड, जे. जी. फ्रेझर इ.च्या विचारांचेही आधुनिकवादावर परिणाम झाले.
प्रथम महायुद्धामुळे पूर्वापार चालत आलेल्या संकल्पनांची सीमितता व अपूर्णता लक्षात आली. एकूण समाजजीवनातील व्यवस्थांत भासणारी निष्फळता व गोंधळाचा हा विशेष परिणाम होता. त्यातून परंपरागत सांस्कृतिक मूल्यव्यवस्थेलाच झिडकारून नवीनाची ओढ निर्माण झाली आणि आधुनिकवाद जीवनाच्या सर्व अंगात वेगाने पसरू लागला. याचा सर्वांत जास्त परिणाम झाला तो भाषेवर व तीद्वारे कथन केल्या जाणाऱ्या इतिहासासारख्या समाजशास्त्रांवर. तोपर्यंत चालत आलेल्या इतिहासलेखनाच्या प्रकारांत त्यामुळे आमूलाग्र बदल झाले. यात जे कलाकार, साहित्यिक, इतिहासकार आघाडीवर होते त्यांनी आपापल्या विषयातील परंपरागत शैलींवर जोरदार आघात करून स्वतःला त्या शैलींपासून अलग दाखविण्याचा प्रयत्न चालविला. त्यामुळेही आधुनिकवाद विकसित होण्यास मदत मिळाली.
द्वितीय महायुद्ध, त्यातील नाझींनी केलेला ज्यूंचा नरसंहार, एकूण युद्धातील नरसंहार, अणुबाँबने विकसित केलेली संपूर्ण विनाशाची क्षमता, पर्यावरणाची भरून न येणारी हानी, प्रचंडपणे वाढत चाललेली मानवसंख्या, ऊर्जेचे संकट व त्यावरील सामंतशाही आणि धार्मिक मूलत्तत्ववाद्यांची असलेली एकाधिकारशाही, इ. विषयांच्या होणाऱ्या भयावह परिणामांतून आधुनिकवादाला प्रखर चालना मिळाली. परंपरागत संकल्पनांवर पुनश्च एकदा नवीन हल्लाबोल सुरू झाले. विशेष म्हणजे, वरील सर्व भयावह परिस्थितींमुळे मानवासमोर जीवनाविषयी जी एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती त्यावर मात करून मानव सर्व समस्यांवर उत्तरे शोधू शकतो, या व्यक्तिकेंद्री आधारावर नवचिंतन सुरू झाले. अशा विषयांना गती मिळाल्यामुळे इतिहासाबाबत जिज्ञासा वाढली. व्यक्ती किंवा समाजजीवन कोण्या एकाच आकृतिबंधानुसार नियंत्रित व विकसित होते, हेच मुळात अमान्य होऊन ते विकसित होण्यात विविधता तेवढीच महत्त्वाची ठरू लागली. यातून एक अगदी निराळा आत्मविश्वास जागृत झाला. समाजात कोणतीही गोष्ट केवळ परंपरेने चालत आली म्हणून तशीच मान्य करण्याचे कारण नाही. मानव सृजनशीलतेची सीमा गाठू शकतो. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत अगदी स्वतंत्र नवविचार करून तो योग्य विकासप्रक्रियेला चालना देऊ शकतो. मानव सर्वप्रकारच्या अडथळ्यांवर मात करून नवीन जीवन उभे करू शकतो. आजपर्यंतच्या झालेल्या प्रगतीत हेच प्रकर्षाने जाणवते. यातून प्रस्थापित सर्वच गोष्टींना नाकरण्याची एक वैचारिक लाटच १९७० च्या दशकात सुरू झाली. तिने आता पुरेसे बाळसे धरले आहे. हीच ती आधुनिकोत्तर (postmodernism) लाट, किंवा हाच तो वाद होय.
या आधुनिकवादाचा एक परिणाम असा झाला कती मार्क्सच्या विचारांचे इतिहासावर जे एकछत्री प्राबल्य होते ते निकालात निघाले. त्यांच्या पद्धती अशा होत्या की कोणत्याही किरकोळ ऐतिहासिक घटनेचा अर्थसुद्धा संपूर्ण इतिहासातून आणि फक्त उत्क्रांतीच्या परिभाषेतच लावण्याचा केलेला प्रयत्न मान्य होत असे. उरलेल्या अर्थाला बा ठरवून त्यागले जाई. आधुनिकोत्तरवादामुळे कोणत्याही घटनेचा अर्थ संपूर्ण इतिहासातून आणि उत्क्रांतीच्या परिभाषेत लावण्याचे कारण उरले नाही. त्यामुळे आधुनिक आकृतिबंधी इतिहासाला नाकारणे सुरू झाले. कोणतीही निश्चित इतिहासलेखनपद्धती न स्वीकारता तिला पुरेशी मुक्तता व स्वातंत्र्य मिळाले. आकृतिबंद इतिहास नाकारून, कथनात्मक शैली सोडून इतिहासकारांना आपापल्या शैलीतील इतिहास लिहिण्यास यामुळे भरपूर वाव मिळाला.
आकृतिबंधीय वाद (structuralism) आणि आकृतिबंधोत्तरवाद (Post structuralism)
यच्चयावत मानवी विचारांचे आदानप्रदान, जिची क्षमता उत्क्रांतीत फक्त मानवालाच मिळाली, त्या भाषेद्वारेच शक्य आहे. त्यामुळे भाषेतील आकृतिबंध या संबंधात फार महत्त्वाचे आहेत. अॅरिस्टॉटलपासूनच या विषयाचे महत्त्व ध्यानात घेतले गेले. त्यातून भाषेचे विज्ञान, भाषेची तात्त्विक बैठक इ.वर लक्ष केंद्रित होणे स्वाभाविक होते.यातून भाषेतील आकृतिबंधवाद (structuralism) निर्माण झाला. त्यावर आग्रह धरणारे आकृतिबंधवादी (structuralist) म्हणवले गेले. द्वितीय महायुद्धानंतर या चळवळीला खऱ्या अर्थाने वेग आला. भाषेच्या प्रारूपामुळे सांस्कृतिक जडणघडण, जी दंतकथा, पौराणिक कथांच्या रूपात समोर आली, ती आता समाजधारणांचा विषय म्हणून अभ्यासली जाऊ लागली.त्यातील विभिन्न प्रकारांचे परस्परसंबंध महत्त्वाचे ठरू लागलेत. हे सर्व मिळून समाजाचा जो एक आकृतिबंध तयार होतो त्याचेच वर्णन मूळ कथानक, उपमा, अलंकार, इ. रूपांत प्रगटत असते.यातून संस्कृतिविकास होत असतो. त्यामुळे त्यातून व्यक्तिव्यक्तींतील संबंध विकसित होतात.ते एकदुसऱ्यास पूरक ठरून व्यक्ती व संस्कृतीचा विकास करतात. व्यक्ती हे कदाचित जाणीवपूर्वक करीत नाही. ते आपोआपच घडते. आकृतिबंधी याचाच अभ्यास भाषेच्या अभ्यासामार्फत करीत असतात.
या विकासप्रक्रियेत आकृतिबंधीयांनी सर्वप्रथम भाषेच्या मूळ पायावरच लक्ष केंद्रित करून त्यातील अर्थहीनता, विरोधाभास, संदिग्धता, अनिश्चितता दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या असे लक्षात आले की सर्व सांस्कृतिक आणि परंपरागत साहित्याचा एकूण परिणाम हा आदर्शवादाच्या रूपातच किंवा समाजातील सत्तेच्या आकृतिबंधाच्या रूपातच प्रगटतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे व्यक्तीला हे साधारणत: जाणवतच नसते. आकृतिबंधीयांनी मात्र याचे महत्त्व समजून आपले सर्व लक्ष यावरच केंद्रित केले. त्यांच्या मताप्रमाणे कोणतेही साहित्य हे त्याच्या भाषेच्या आकृतिबंधांवरच आधारलेले असते. त्यामुळे भाषाशास्त्राच्या आधारावर त्याचे विवेचन शक्य आहे. म्हणून कोणत्याही साहित्यप्रकारात म्हणजे कथा, कथानक, पद्य, गद्य, उपमा, अलंकार, इ. सर्व मिळून त्याचा अर्थ आकृतिबंधांनुसारच लागू शकतो. या नवविचारांचा सर्वांत जास्त संबंध आला तो इतिहासाशी, कारण इतिहासाचा अभ्यास जुन्या साहित्याचा अर्थ लावण्यातूनच सुरू होतो. त्यामुळे त्यातून अर्थाचा अनर्थ होऊ देणे टाळूनच हे सर्व करावे लागते.
आकृतिबंधीयांनी याद्वारेच ऐतिहासिक साहित्याच्या द्वारे सत्यकथनाच्या सीमा स्पष्ट केल्या. त्या साहित्यातून (मूळ आलेखासहित) इतिहासकारांच्या भावनांचा व कल्पकतेचाच परिचय अधिक होण्याची शक्यता आहे, हे सप्रमाण दाखवून दिले. साहित्याद्वारे त्याचा निर्माता व वाचक यांत संपर्क जरी होत असला, तरी त्यातून अर्थ प्रवाहित होईल किंवा नाही, हा वाद कायम राहतो. म्हणून आकृतिबंधवादी परंपरागत साहित्यिक कल्पनांपेक्षा निराळ्या साहित्यविज्ञानविषयक संकल्पना विकसित करण्याच्या प्रयत्नात असतात. या मताप्रमाणे साहित्यिक विश्वाकडे फक्त त्याचे मूळ लेखन (text) यापलीकडे पाहण्याचे कारण नाही. ते सत्याची जाणीव करून देण्याचा आभास मात्र उगाच निर्माण करतात. जे कोणी त्याची स्वतःची रचना ही एक मूळरचना आहे या आविर्भावात वावरतात ती वास्तवात फक्त एक भाषाप्रणाली मात्र असते. त्यात अस्तित्वात असलेले भाषाविषयक नियम परंपरा, संकेत, शब्द जोडण्याच्या रीती (phrases) इ. द्वारा फक्त लेखन तयार होत असते.तो खरा इतिहास असण्याचे कारण नाही. त्यातून इतिहासकार तयार न होता फक्त लेखक तयार होत असतो. ज्याला ग्रंथजनक म्हणतात तो वास्तवात एक वाचक मात्र असतो, असे विनोदाने म्हटले जाते. आकृतिबंधवादी इतिहासकारांना इतिहासकार न मानता भाषेच्या नियमांचा, परंपरांचा, संकेतांचा, साहित्यिक भावांचा, शब्द-शब्दसमूह-वाक्यांशाचा उपयोग करून लेखन तयार करणारा, या श्रेणीत ढकलतात.
१९६०-७० च्या दशकानंतर अशा आकृतिबंधांच्या पलीकडे पाहण्यास सुरुवात झाली. या मताप्रमाणे लेखनातील अर्थ हा लेखन व भाषानियमांनी निश्चित होत नसतो. लेखकाने सांगितलेल्या लेखनामागील निश्चित अर्थाखेरीज वाचणाऱ्याने त्याच्या समजुतीप्रमाणे निश्चित नियमांच्या आधारावरील अर्थापेक्षा विभिन्न नियमाधारित आपापला अर्थ काढावा. परंपरेच्या आधारावरील सुखदायी व आरामदायी किंवा आदर्शवादी अर्थ काढण्यापेक्षा विलासवादी (hedonic) आधारावर जमेल तेवढा अर्थ काढावा, अशा वैचारिक भूमिकेवर आकृतिबंधानंतरच्या (post-tructuralism) चिंतनातून अर्थ काढणे सुरू झाले. इतिहासावर या स्थित्यंतराचे फार दूरगामी परिणाम झाले.
इतिहास नाकारणारा वाद (Negationism)
इतिहासातील आकृतिबंधीय विचाराची चौकट जवळपास समाप्त होऊन, विरोधाभासाला महत्त्व येऊन, इतिहासाची नव्याने पुनर्बाधणी सुरू झाल्यामुळे त्यात हेतुपुरस्सर विकृती आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यात विशिष्ट स्वार्थापोटी इतिहासातील गैरसोयीच्या किंवा अडचणीच्या घटना नाकरण्याची एक दुर्दैवी खेळी खेळली गेली व जात आहे. पोस्टस्ट्रक्चरलिस्टांनी त्याचा असा दुरुपयोग केला.उदा. हिटलरने ज्यूंची प्रचंड कत्तल करून त्या जातीलाच समाप्त करण्याचे कार्य केले नाही, किंवा द्वितीय महायुद्धात जपान्यांनी चीनमध्ये नानकिंग येथे मानवतेला काळीमा फासण्याचे कोणतेच कृत्य केले नाही, किंवा आस्ट्रेलियातील आदिवासींची टस्मानियात सरसकट कत्तल झालीच नाही इ. ढोबळ घटना सहज सांगता येतील. याला इतिहासशास्त्रात नकारवाद किंवा पशरींळेपळीी म्हणून ओळखतात. यात भाषेचाच खेळ जाणवतो. वर्गसंघर्षाच्या भूमिकेतून मार्क्सिस्टांना यातील अत्याचार झालेल्यांची बाजू तशीही घेता येतेच. पण वरील उदाहरणांपेक्षा इतिहासच नाकारण्याचा भयानक प्रयत्न भारतात स्वातंत्र्योत्तर काळात हिरीरीने होत आहे. त्याला सरकारचे (म्हणजे काँग्रेसचे) छुपे समर्थन प्राप्त आहे. भारतीय इतिहास महामंडळामार्फत हा प्रयत्न बिनबोभाट सुरू आहे. त्यातून अधिकृतपणे भारताचा खरा इतिहास डावलून, खोटा इतिहास प्रसारित करून, तोच शाळा-महाविद्यालयात शिकविला जात आहे. त्यात सर्वप्रथम भारताला कोणताही उज्ज्वल इतिहास नाही, हे गृहीत धरून सर्व इतिहासाची नव्याने मांडणी केली जात आहे. त्यामुळे वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भागवत, अन्य पुराणे, त्यांवरील टीका, इ.सर्व दंतकथेच्या श्रेणीत टाकले जात आहे. इतिहास आणि भविष्य
इतिहास म्हणजे भूतकाळ. इतिहासाचे अध्ययन का करावे? केवळ एवढ्याकरिता की आधी काय काय घडले हे समजावे म्हणून ? इतिहासाचे अध्ययन अनेक कारणांकरिता केले जाते. अर्थात भूतकाळांत कायकाय झाले याची माहिती केवळ मानवाचे कुतूहल पूर्ण करण्याकरिता आवश्यक ठरते. पण त्याचा उपयोग अधिकही आवश्यक आहे. इतिहासात झालेल्या चुका लक्षात घेऊन त्या भविष्यात पुनः होणार नाहीत याची काळजी घेतली जाऊ शकते. इतिहासातून पुढच्या पिढ्या प्रेरणा घेऊन कृतिशील होणे सोपे आहे. इतिहास हा समाज व राष्ट्रजीवन व्यवस्थित चालण्याच दृष्टीने अत्यंत उपयुक्त साधन आहे. इतिहासातून सुखदुःखाची समान अनुभूती घेणारे, त्यातील पौरुषपराक्रमाबद्दल, समान आदर ठेवणारे, झालेल्या चुकांबद्दल समानतेने दुःखी होणारे, असे सर्व एका आंतरिक मानसिक एकात्मतेने सहजी जुळून येऊन सामाजिक एकात्मतेचा अनुभव करतात.
अनेकजण इतिहासाचाच विस्तार करून भविष्य तसेच घडेल, असे प्रतिपादन करतात.पण इतिहासावर एवढी भिस्त ठेवण्याचे कारण नाही. त्यातून भविष्याचे आकलन फारसे होत नाही. इतिहासाचा उपयोग इतिहासाला हवा तसा अर्थ देऊन पुरावा म्हणून सादर करण्याचा प्रयत्न अवश्य होतो.
इतिहास मूलतः वर्णनात्मक असतो, कारण ते करणे तसे सोपे आहे. पण ती जगाला जाणण्याची परीक्षा मात्र नव्हे. जग तसे फार अनिश्चित असते. त्यामुळे इतिहासाबद्दलच्या धारणा ज्याच्या त्याच्या अलगअलग असतात. त्याला आवर घालता येत नाही. त्यावर विभिन्न प्रकारे आपापले निर्णयही घेतले जातात. पण यातूनच सत्य समोर येत असते.

आधारः टाईम (२४ ऑगस्ट ‘०९)
व्हायरस (virus) म्हणजे सजीवांचे काही गुण असणाऱ्या, पण वर्षानुवर्षे निर्जीव स्थितीतही टिकून राहू शकणाऱ्या रचना. त्यांच्यात पुनरुत्पादनाची क्षमता नसते. परंतु सजीवांच्या पेशींमध्ये घुसून या रचना त्या पेशींची पिल्ले देण्याची यंत्रणा वापरून स्वतःचे पुनरुत्पादन करू शकतात. जैवरासायनिक दृष्टीने काही डीएनएचे रेणू व त्यांच्यावरील प्रथिनांचे आवरण, असे व्हायरसेसचे रूप असते. H1N1 चा वंशवृक्षः १९९० च्या आधी ओळखले गेलेले चार व्हायरसेस आजच्या मानवी H1N1 व्हायरसचे पूर्वज आहेत. अभिजात स्वाईन फ्लू (Classic Swine Flue) पासून आधी स्वाईन H3 N2 हा व्हायरस घडला. अभिजात स्वाईन, एव्हियन आणि मानवी H3 N2 यांपासून स्वाईन H1 N2 हा व्हायरस घडला. हे दोन प्रकार (स्वाईन H3 N2 व स्वाईन H1 N2) २००० सालाआधी ओळखले गेले. मग या दोन प्रकारांत यूरेशियन (Eurasion) स्वाईन हा १९९० आधी ओळखला गेलेला व्हायरस मिसळला, व त्यांतून आजचा मानवी H1 N1व्हायरस घडला.
दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे व्हायरसेस एकापेक्षा जास्त जीवजातींमध्ये पसरू शकतात. दुसरी म्हणजे त्यांच्यात परिवर्तने व संमिलने होऊ शकतात. लागण : हा व्हायरस श्वासावाटे शरीरांत शिरतो. पेशींमध्ये पोचल्यावर तो पेशींच्या केंद्रांत जातो, आणि स्वतःच्या प्रतिकृती तयार करू लागतो. ह्या प्रती इतर पेशींना लागण करतात, व रोग बळावतो.
शरीरांची प्रतिरक्षाव्यवस्था (immune system) काही प्रमाणात व्हायरसेसना निष्प्रभ करू शकते. या व्यवस्थेने घडवलेले अँटिबॉडीज नावाचे रेणू व्हायरसेसच्या कातडीला जाऊन चिकटतात. किल्ली कुलपाला ओळखते तशा अँटिबॉडीज विशिष्ट भागांना ओळखतात. हे विशिष्ट भाग व्हायरसेसना पेशींमध्ये शिरण्यात मदत करत असतात. आता अँटिबॉडीज चिकटल्याने व्हायरसेसचा प्रसार मंदावतो. H1N1बद्दल बोलायचे तर व्हायरसना पेशींमध्ये शिरू देणारा एक विशिष्ट रेणू (हीमाग्लुटिनिन) अँटिबॉडीजमुळे निष्क्रिय होतो.
व्हायरसेसना पेशींमधून बाहेर पडायला उपयुक्त असे एक वितंचक (enzyme) असते, (न्यूरॅमिनिडेज). टॅमिपलू (Tamiflu) हे औषध या वितंचकाला चिकटून व्हायरसेसचा प्रसार थांबवते. लसीकरण शक्य झाले तर शरीरेच अँटिबॉडीजचे व टॅमिफ्लूसारख्या रेणूंचे उत्पादन वाढवू शकतील. परंतु व्हायरसेसचे वेष बदलणे, इतर व्हायरसेससोबत नवे व्हायरसेस घडवणे, वगैरे बाबींमुळे लस तयार करणे सोपे नाही. तशी लस घडवता आली तरी तिला न जुमानणारे व्हायरसचे प्रकार उद्भवून लशींचा परिणाम कमी होऊ शकतो. आजतरी HINA फारसा मारक नाही, ही सुखाची बाब आहे. पण तो वेगाने पसरतो व त्यावर नेमकी औषधे आजतरी पुरेशी उपलब्ध नाहीत, हे त्रासदायक ठरू शकते. बालरोग ! साधे ऋतुबदलाच्या काळात उद्भवणारे फ्लूचे प्रकार व कछ, यांच्या रोग्यांचे वयोगटांनुसार अभ्यास केले गेले. निष्कर्ष असे —
साधे फ्लू HINA बालवय (१७ वर्षे व कमी) २२% ५६% तारुण्य व मध्य वय (१८ ते ४९ वर्षे व कमी) ७९% ३१% उतारवय (५० वर्षे व वर) ५९% १३%
याचा अर्थ असा की (आजतरी) स्वाईन फ्लू (HINI) हा बालतरुणांमध्ये सहज पसरतो, तर उतारवयीन लोकांमध्ये कमी. हे इतर फ्लूंच्या तुलनेतले आजवरचे निष्कर्ष आहेत. मुळात क छ, चा प्रादुर्भाव जून २००९ नंतर वाढला आहे हे पाहता चित्र सहज बदलू शकेल, हे लक्षात ठेवायला हवे.
पण १९५७-५८ मधील फ्लूच्या साथीचा अनुभव असा की शाळा सुरू होताना रोगाचा प्रसार सर्वाधिक वेगाने होतो. कछ, बाबतचा अनुभवही वेगळा नाही. बचाव व तयारी : आज असे दिसते की गरोदर स्त्रिया, आरोग्यसेवक (नर्सेस व डॉक्टर्स) आणि चोवीस वर्षांखालील लोक यांना लागण होण्याचा संभव सर्वांत जास्त आहे. ज्यांना जुनाट (लहीपळल) आजार असतील त्यांनाही धोका जास्त आहे. पण रोग टाळण्याचे मार्गही सुचवले जात आहेत, व ते शाळकरी आरोग्यशास्त्राच्या शिकवणींपेक्षा फार वेगळे नाहीत.
१) शाळा बंद ठेवणे हा उपाय बरेच लोक वापरतील. मुलांना नेहेमीपेक्षा जास्त काळ घरांतच राहावे लागेल. याची तयारी करा!
२) हात धुण्यावर लक्ष ठेवा, व घरे स्वच्छ राखा. ३) आजारी असाल तर कामावर जाऊ नका.
४) घाबरून जाऊ नका! प्रसार : आज अमेरिका (USA), मेक्सिको व अर्जेंटिना या देशांत बळींच्या संख्या शंभरावर गेल्या आहेत. कॅनडा, चिले व थायलंडमध्ये बळी शंभराच्या आत, पण पन्नासावर आहेत. ग्रेटब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व दक्षिण अमेरिका खंडातील सहा देश यांमध्ये मृत्युसंख्या दहा ते पन्नास आहे. इतरत्र प्रसार फारसा नाही. पण साधे फ्ल्यूही दरवर्षी अडीच ते पाच लाख बळी घेतात. जागतिक आरोग्य संघटनेला ही साथ जगाच्या लोकसंख्येच्या पंधरा ते पंचेचाळीस टक्क्यांना प्रभावित करेल, अशी काळजी वाटते आहे. आजवरचा अनुभव दाखवतो, की १.६ लाख लागण झालेल्यांपैकी बाराशे दगावले आहेत; आणि हे जागे होण्याआधीचे आकडे आहेत ! आर्जेंटिनात ५ ऑगस्ट ‘०९ पर्यंत एकूण फ्लूने बाधित रोगी ७ लाख, दगावलेल्यांची संख्या ३३७, असे आकडे आहेत. यांत HIN1 प्रमुख व इतर फ्ल्यू थोडेथोडे, असे चित्र आहे. आर्जेटिनाचा अनुभव पाहता कछ, इतर फ्लूंपैकीच एक आहे, फार मारक नसलेला. विश्रांती, द्रव पदार्थांचा मारा, लहानांना लागण झाल्यास टॅमिफ्लू, एकूण स्वच्छता, जमल्यास शाळांना एकदोन आठवडे सुट्ट्या देणे, येवढ्याने हा रोग माणसाळवता येईल. फार घाबरण्याचे कारण नाही. पुण्यात काही जागी हुल्लडबाजी व दंगासदृश घटना घडल्या. दुकानांतून मास्क्स लुटले गेले. असल्या प्रतिसादांनी झाले तर नुकसानच होईल.