भारतातलं राजकारण पाकिस्तानच्या दिशेनं?

गणपती गेले. आता देव्या येतील.
गणपती आले होते तेव्हां प्रत्येक गणपती मंडळाच्या बाहेर राजकीय पक्षांचे फलक होते. गणेश भक्तांचं स्वागत करणारे. बहुतेक फलकांवर त्या त्या पक्षाच्या गल्लीनिहाय पुढाऱ्यांचे फोटो होते. गणपतीचं विसर्जन झालं तेव्हां गणपतींना निरोप देणारे फलक लागले.
नवरात्रात असे किती फलक लागतात ते पहावं लागेल. कारण नवरात्र असेल तेव्हां महाराष्ट्रात निवडणुका असल्यानं आचार संहिता असेल. फलकांवर झालेला खर्च उमेदवाराच्या खर्चात सामिल होईल.
गणपती उत्सव सुरू झाला तोच मुळी राजकीय कारणांसाठी. टिळकाना जनजागृती करायची होती. स्वातंत्र्यासाठी. टिळकांच्या काळात उत्सवाचा खर्च कमी असे. कारण भाषणं, कीर्तनं इत्यादी प्रबोधनाच्या कार्यक्रमांवर भर होता. मूर्ती लहान, सजावट अगदीच सामान्य. त्यामुळं खर्चही अगदीच कमी.
अलीकडं मूर्तीही कायच्या काय मोठ्या झाल्या. त्या सार्वजनिक जागेत बसवाव्या लागल्या. मग मंडप आले. मग सजावट आली. हे सारं करण्यासाठी मोठमोठी मंडळं. मग त्यांचे खर्च आले. असं करत करत गणेशोत्सव खर्चिक झाला. आता हा खर्च कुठून भरून काढायचा? सुरवातीला स्थानिक दुकानदार, त्या दुकानात विकल्या जाणाऱ्या वस्तू आणि त्या वस्तुंचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या यांच्या जाहिराती येऊ लागल्या. या जाहिराती आणि सजावट येवढी असे की त्या पुढे गणपती आणि एकूण उत्सव थिटा पडू लागला.
केव्हां तरी या गणपती उत्सवाचा ताबा राजकीय पक्षांनी घेतला. नेमकी तारीख काही सांगता येणार नाही. गणपती उत्सव आणि दही हंडी. दोन्हींना स्थानिक पुढारी स्पॉन्सर झाले. दोन्ही इव्हेंटचं बजेट वाढू लागलं, काही लाख आणि कोटीच्या घरात जाऊ लागलं.
बंगालमधे दुर्गापूजा असते. म्हणजे नवरात्रच. पक्षांनी तो उत्सव ताब्यात घेतला. देव न मानणाऱ्या मार्क्सवाद्यांनीही देवीला स्पॉन्सर केलं. दुर्गापूजा मंडळांची बजेट काही कोटीच्या घरात गेली. मुंबईत जसा लालबागचा राजा असतो तसं कलकत्त्यात भवानीपूर मंडळ इत्यादी असतात. ही मंडळं म्हणजे धार्मिक क्लब असल्यासारखीच असतात. करोडोंचा व्यवहार. या व्यवहारात सारदा चिटफंड सारखे फ्रॉड घुसल्याचं लक्षात आल्यावर आता या मंडळांच्या कारभाराची चौकशी तपासखात्यांनी आरंभलीय. चोरीचा पैसा मंडळातल्या पुढारी आणि कार्यकर्त्यांकडं सरकवायचा. पैसा आला की इमान आलंच. ज्या राजकीय पक्षाच्या मेहेरबानीनं पैसा येतो त्या पक्षाला मतं मिळवून देणं अशी परतफेड. बदल्यात फ्रॉड करणाऱ्यांना अभय. चौकशी आणि अटकांच्या फेऱ्यात तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, भाजप, मार्क्सवादी अशी सर्वच मंडळी सापडलीत.
महाराष्ट्रात राजकीय पक्ष गणपती, नवरात्र, दहीकाला यात गुंतलेले आहेतच. अगदी उघडपणे. फक्त यात फ्रॉड किती आहेत ते माहित नाही. आमदार मंडळी या कार्यक्रमांचा वापर आपल्या निवडून येण्यासाठी करत आहेत हे खरं.
एक निरीक्षण असं. ज्या समाजात धर्मनिष्ठा प्रभावी असतात त्या समाजात राजकीय पक्ष धर्माला-धार्मिक प्रतिमांना-उत्सवांना वेठीस धरतात, त्या वाटेनं लोकांना प्रभावित करतात.
आज पाकिस्तानात तसं घडतंय. खरं म्हणजे पाकिस्तान निर्मितीपासूनच तसं घडत आलंय. जिना या धर्म न मानणाऱ्या माणसानं इस्लाम धोक्यात आहे अशी हाकाटी करून भारतातले मुसलमान गोळा केले आणि पाकिस्तान घडवलं.  पाकिस्तान निर्माण झाल्यापासून जिना, पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि नवाज शरीफ यांची मुस्लीम लीग या पक्षांनीही धर्मनिरपेक्ष-सेक्युलर कार्यक्रम अमलात आणत असतानाच धार्मिक भावनांनाच साद घातली.  पीपल्स पार्टीच्या तर घटनेतच समाजवाद आणि समता या दोन गोष्टी होत्या, इस्लामशी मेळ न खाणाऱ्या. तरीही झुल्फीकार आणि बेनझीर दोघंही वेळोवेळी इस्लामचा नारा देत लोकांकडं पोचले. नवाज शरीफ यांचा भर आर्थिक सुधारणांवर आहे. उद्योग, व्यापार विकसित व्हावे यासाठी त्यांची खटपट आहे. तेही इस्लामचाच उच्चार करतात, जमाते इस्लामी आणि  तहरीके तालीबान या टोकगामी इस्लामी पक्षाशी संधान ठेवून, त्याच्याशी आघाडी करून, त्यांची परवानगी आणि पैसे घेऊन निवडणुक लढवतात.
पाकिस्तानी समाजाच्या घडणीत या वास्तवाचं रहस्य दडलेलं आहे. पाकिस्तानात शिक्षणाचं प्रमाण खूपच कमी आहे. चाळीसेक टक्के अशिक्षितता आहे. स्त्रियांनी शिकावं असा वातावरण पाकिस्तानात नाही. त्यामुळंच मुलींनी शिकावं असा आग्रह धरणाऱ्या मलाला या मुलीच्या तोडावर असिड फेकलं जातं, तिचा खून करण्याचा प्रयत्न होतो.
दुसरं म्हणजे जी माणसं शिकलेली आहेत त्यांचं मन, त्यांच्या सवयी, त्यांचे विचार, त्यांचे व्यवहार धर्मनिरपेक्ष नाहीत. आर्थिक विकास, विज्ञान, तंत्रज्ञान, बाजार, व्यवस्थापन इत्यादी गोष्टींकडं त्याना मोकळेपणानं पहाता येत नाही. जो काही धर्म त्यांच्या डोक्यात आहे तोच त्यांच्या एकूण व्यवहारात जास्त प्रभावी ठरत असतो. माणसानं धार्मिक असावं परंतु एकूण व्यवहारात धर्माच्या नावाखाली जे सांगितलं जातं ते मर्यादित ठेवावं, होता होईतो धर्म हा व्यक्तिगत आणि खाजगी व्यवहाराचा भाग असावा हे त्यांना पटत नाही. सार्वजनिक व्यवहारातही धर्मानं सांगितलेल काही तत्व जरूर येतात. पण सार्वजनिक व्यवहारात इतरही धर्मनिरपेक्ष तत्वं प्रभावी असतात हे त्याना पटत नाही. शिकलेल्या लोकांनाही.
म्हणूनच धार्मिकतेला आव्हान करण्याकडं पाक राजकीय पक्षांचा कल असतो. राजकीय पक्ष जेव्हां आर्थिक गोष्टीत असमर्थ ठरतात, भ्रष्ट होतात तेव्हां सत्तेत जाण्यासाठी धार्मिक भावनावर भर देऊ लागतात. त्यातूनच अती धार्मिकता आणि नंतर दहशतवाद फोफावतो असा पाकिस्तानचा अनुभव आहे. नेमकं तेच अफगाणिस्तानातही झालं आहे. आणि तेच सीरिया, इराक इत्यादी देशात होतंय.
भारतात गणपती, नवरात्र, दहीहडी, बिहू इत्यादी उत्सवात राजकीय पक्ष पडतात याचा अर्थ काय घ्यायचा? पाकिस्तानमधल्या वेगानं नसेल पण त्याच चाकोरीत भारत चालला आहे असं समजायचं काय?

(http://niludamle.blogspot.in/2014/09/blog-post_21.html सौजन्याने)

damlenilu@rediffmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.