‘एक लढाई, जी बांगला देशने जिंकलीच पाहिजे’

या खुनाची पूर्वसूचना खूप आधीच देण्यात आली होती. खुनाआधी साधारण एक वर्ष म्हणजे, फेब्रुवारी ९, २०१४ रोजी मुख्य आरोपी शफिउर रहमान फराबी याने फेसबुक वरील आपल्या मित्रांना सांगितले होते कि अविजित रॉय अमेरिकेमध्ये राहतात. “त्यामुळे त्याला आत्ता मारणे शक्य होणार नाही. जेव्हा तो परत येईल तेव्हा त्याला मारता येईल,” असे तो म्हणाला होता. फराबी सध्या अटकेत आहे. त्याने नंतर अविजित यांच्या कुटुंबाचे फोटो तसेच त्यांच्या अमेरिकेतील पत्त्याचा ठावठिकाणाही शोधला होता. त्याने अविजित यांच्या मित्रांकडेही चौकशी केली होती. फराबी याला दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती व सहा महिन्यामध्ये त्याची जामिनावर सुटका झाली होती. ‘मुक्त विचारांना’ पाठिंबा देणाऱ्या सर्व ब्लोगरना मारण्याच्या त्याच्या प्रयत्नांना त्याने तात्काळ परत सुरवात केली होती. त्यावेळी सुटकेनंतर त्याने लिहिले कि, “माझ्या मते नास्तिक लोक म्हणजे किड्यासमान आहेत आणि किडे हे मेलेलेच बरे.”
फराबी आणि अविजित यांचा मुक्त विचार आणि धार्मिक मूलतत्ववाद या विषयांवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून वाद झाला होता. मात्र फराबी कडून जिवे मारण्याच्या धमक्या आल्यावर अविजित यांनी सर्व संभाषण बंद केले होते. त्यानंतर फराबीने त्यांना मोबाईलवर धमक्यांचे संदेश पाठविण्यास सुरवात केली. या सर्व पार्श्वभूमीवर अविजित यांनी आपल्या पत्नीसोबत बांगला देशला भेट देण्याचे ठरविले होते. त्यांची हि भेट केवळ कौटूबिक नव्हती तर देशातील सर्वात मोठ्या म्हणवल्या जाणाऱ्या पुस्तक जत्रेमध्ये ते त्यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन करणार होते. हि जत्रा १९५२ च्या ‘भाषा चळवळीच्या’ आठवणीनिमित्त आयोजित केली जाते व २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा होतो. दहशतवाद्यांच्या धमकीला कमी लेखण्याची चूक त्यांनी केली आणि त्यांना आपल्या प्राणास मुकावे लागले.
हुमायून आझाद या बांगला देशातील प्रसिध्द लेखकालाही २००४ मध्ये अशाच प्रकारच्या हिंसक हल्याला तोंड द्यावे लागले होते. ते हल्ल्यात वाचले मात्र काही काळानंतर जर्मनीमध्ये त्यांचे निधन झाले. सोशल मीडियामुळे उभ्या राहिलेल्या युध्दकाळातील गुन्ह्यांसंबधित खटल्याला समर्थन देणाऱ्या विद्यार्थी उठावानंतर फेब्रुवारी १५, २०१३ रोजी राजीब हैदर या ब्लोगरचाही खून करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरकत-उल-जिहाद इस्लामी बांग्लादेश, जमत-उल-मुजाहिदीन बांग्लादेश, जाग्रता मुस्लीम जनता बांग्लादेश, शहदत-ए-अल-ह्कीमा, हिझबूत तौहिद, इस्लामी समाज, उलेमा अंजुमन अल बैयीनात, हिझ्ब-उत तहरीर, इस्लामिक डेमोक्रेटिक पार्टी, तौहीद ट्रस्ट, तामिर उद-दिन आणि अल्ला’र दल या १२ अतिरेकी संघटनांवर बांगला देशात सध्या बंदी आहे. हे गट वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या नावानी काम करतात. अद्याप बंदी न आलेले जवळपास छोटे – मोठे असे डझनभर गट अजूनही अधूनमधून डोके वर काढीत असतात.
अतिरेकी विचारसरणीच्या अनेकांना बांगलादेश सरकारने अटक केलेली आहे. तरीही, पोलिसांच्या अंदाजानुसार त्यांच्यापैकी २७० अजूनही बाहेर आहेत आणि बऱ्याच केसेस मध्ये ते हवे आहेत. २००८ ते अध्यापपर्यंत जवळपास ४७८ लोकांना १७७ केसेस मध्ये कोर्टात खेचण्यात आले आहे. बंदी घातलेल्या संघटनाच्या ५१ अत्युच्च नेत्यांना फाशी सुनावण्यात आली आहे, १७८ जणांना जन्मठेप तर २४५ वेगवेगळ्या कालावधीसाठी जेलमध्ये आहेत.
२००० च्या सुरुवातीस ही अतिरेकी विचारसरणी बांग्लादेशमध्ये झपाट्याने पसरली. यांचा म्होरक्या होता ‘बांगला भाई,’ ज्याचा स्वघोषित कायदेरक्षक गट लोकांमध्ये भीती पसरविण्यासाठी ‘मृत्युदंड’ सुनावीत असे आणि प्रेते झाडावर लटकवित असे. ‘जमात-उल-मुजाहिदीन बांगला देश’ या संघटनेचा प्रमुख या नात्याने देशाच्या उत्तर भागावर वर्चस्व गाजविण्यास पुरेशी ताकद त्याच्याकडे होती. मजेची गोष्ट म्हणजे त्यावेळच्या पंतप्रधान खालिदा झिया यांनी ‘बांगला भाई’ याचे अस्तित्वच नाकारले होते आणि त्याला केवळ मिडियाने उभारलेला बागूलबुवा असे संबोधीले होते. याच पंतप्रधानांच्या मंत्रीमंडळामध्ये जमात-ए-इस्लामीचे जे दोन मंत्री सहभागी करून घेण्यात आले होते, ज्या दोघांवरही युद्धकाळातील गुन्ह्यांबद्दल खटले चालू आहेत.
ऑगस्ट २००५ मध्ये या दहशतवादी कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाली. जमात-उल-मुजाहिदीन बांगला देशने बांगलादेशातील ६४ पैकी ६३ जिल्ह्यांमध्ये एकामागोमाग एक असे ४५९ स्फोट घडवून आणले. जरी यात केवळ दोघांचा मृत्यू झाला असला तरी याचा प्रभाव प्रचंड होता. या स्फोटांमागील अतिशय सूक्ष्म नियोजन आणि या संघटनेचे देशभरातील जाळे यामुळे अख्खा देशच स्तंभित झाला होता. सरकारमधील जमत-उल-मुजाहिदीन बांगला देश या पक्षाचे पाठीराखे त्यांचे समर्थन करीत राहिले. या साऱ्यामुळे हा गट शक्तिशाली होत राहिला. तीन महिन्यांच्या आत या गटाने पुन्हा हल्ला चढविला आणि दोन न्यायाधीशांची हत्या केली. त्यापाठोपाठ अनेक स्फोट आणि हत्या करण्यात आल्या. अखेरीस २००७ मध्ये ‘जमात-उल-मुजाहिदीन बांगला देश’चे अब्दुर रहमान आणि बांगला भाई या अत्युच्च नेत्यांसह सहा उच्च नेत्यांना फासावर लटकविण्यात आले. या संघटनेचे अनेक सदस्य अटक करण्यात आले ज्यामुळे हि बंदी घालण्यात आलेली संघटना बऱ्याच अंशी कमजोर झाली आहे.
२००८ च्या अखेरीस सत्तेत परत आलेल्या शेख हसीना यांच्या सरकारने या अतिरेक्यांच्या विरोधात अतिशय जोमाने व तत्काळ कारवाई सुरु केली आणि २००९ ते २०१३ या कालावधीमध्ये बराच मोठा पल्ला गाठण्यात त्यांना यश आले. मात्र, पुन्हा तीव्र झालेले राजकीय वैर आणि ऑक्टोबर २०१३ ते जानेवारी २०१४ मधील निवडणुका या कालावधीमध्ये झालेला हिंसाचार यामुळे या सर्व धार्मिक मुलतत्ववादी गटांना पुन्हा एकत्र येण्यास नवी संधी मिळाली. या कालावधीत, कायदेरक्षक आणि गुन्हेगारी विरोधातील व्यवस्था हि पूर्णपणे राजकीय तिढा सोडविण्यात गुंग झाली होती. अटकेत असलेले अनेक अतिरेकी जामिनावर बाहेर पडले, तसेच अनेक अतिरेकी गट तयार झाले. यातीलच एक म्हणजे ‘अन्सारुल्ला बांगला’ ज्याने अविजित यांच्या खुनाची जबाबदरी घेतली आहे. या दरम्यान धार्मिक प्रवचने देण्यासोबतच आपल्या धार्मिक मतांपेक्षा दुसरी मते असणाऱ्यांच्या विरोधात खुनाची धमकी देण्यासाठीही सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला होता.
केवळ कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या दलांवर विसंबणे हि अतिरेक्यांच्या विरोधात लढणाऱ्या सरकारच्या प्रयत्नांतील सर्वात मोठी चूक होती. सरकारी प्रयत्नांमध्ये ‘कठोर’ व ‘मृदू’ अशा दोन्ही प्रकारे काम करून घेण्याच्या प्रयत्नांचा अभाव असणे हे खरोखरीच आश्चर्यकारक आहे. जरी सरकारची राजकीय इच्छाशक्ती कमालीची प्रबळ असली तरी ते केवळ पोलिसांची कृती व कोर्टखटला यावरच विसंबून राहात आहेत. पुरेशा साक्षीदारांच्या व पुराव्यांच्या अभावी जामीन मिळवणे या अतिरेक्यांना सहज शक्य होते.
बांगलादेशच्या दहशतवादविरोधी मोहिमेतील सर्वात मोठी कमतरता म्हणजे राष्ट्रीय पातळीवर दहशतवादविरोधी सामाजिक – सांस्कृतिक व धार्मिक चळवळीचा अभाव. सात वर्षांपूर्वी पंतप्रधान हसीना यांनी अशा प्रकारची मोहीम सुरु केली होती. हा संकटाशी दोन हात करणाऱ्या समाजाच्या सर्व थरातील लोकांना एकत्र आणणारी हि कल्पना चांगली आणि समयोचित होती. मात्र विशिष्ट मार्गदर्शनाअभावी ती मागे पडली.
हिंसाचाराने भरलेल्या विरोधी पक्षांच्या आंदोलनाला तोंड देण्यात सरकार गर्क असल्याने, अतिरेकी प्रवृत्ती या संधीचा आपली पाळेमुळे घट्ट करण्यासाठी कसा उपयोग करतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अर्थात, एक गोष्ट आम्हाला नक्कीच माहीत आहे ती म्हणजे हि एक अशी लढाई आहे जी बांगलादेशने जिंकलीच पाहिजे आणि आमचा विश्वास आहे कि ती आम्ही जिंकू.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या सौजन्याने

अनुवाद – आलोक देशपांडे

alok.desh86@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.