निधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता – सर्वधर्मसमभाव – इहवाद (पूर्वार्ध)

आज काल सेक्युलॅरिझम व सेक्युलर बद्दल बरेच बोलले जाते. जेष्ठांच्या बैठकित यावर चर्चा होणे स्वाभाविक होते. ज्याना जशी माहिती तशी त्यानी सांगितली. यांतून कांही गोष्टी जाणवल्या त्या अशा.
• सेक्युलर हा भारतीय शब्द नसून पाश्चात्य देशाकडून आपल्याकडे आला आहे. व हा शब्द जीवनशैली बरोबरच राज्यशासन व्यवस्थेशी जोडला गेला आहे.
• या शब्दाला बरेच अर्थ आहेत जसे इहवाद येथपासून ते कांही सामाजिक तुष्टीकरणा बरोबर याच संबंध जोडला जातो.
• पाश्चात्य व भारतीय विचारसरणी सेक्युलरबाबत भिन्न आहे. पण आपल्याला भारतीय संविधानाने यासाठी मान्य केलेला सर्वधर्मसमभाव हा शब्दच मान्य करावा लागतो. व त्याला सांस्कृतिक, अध्यात्मिक, राजकीय व सामाजिक संदर्भ आहेत.
• आधुनिक विचारसरणीत सेक्युलर या शब्दास वेगळे महत्व असल्याचे जाणवते. कारण जो सेक्युलर नाही तो प्रतिगामी असून मागास आहे. असे पुरोगामी लोकांचे मत असते पण वास्तवात धर्म व सेक्युलर यांच्या मूळ अर्थाबद्दलची माहिती याचा अभाव जाणवला. म्हणून जरा खोलात जाऊन मूळ सेक्युलर हा शब्द कसा आला व त्याचा आपल्याकडे कसा विचार केला. हा जाणण्याचा एक प्रयत्न.
पाश्चात्य विचार
सेक्युलर हा शब्द पाश्चात्य देशाकडून आपल्याकडे आला आहे. Secular याचा शब्दकोशीय अर्थ-ऐहिक किंवा जडगोष्टी संबंधी ज्यात अध्यात्माला स्थान नाही असा.
हा शब्द प्रथम 1841 साली जार्ज जेकब होलीओक यानी स्वतंत्र विचाराच्या नैतिकतेने जीवन जगण्यासंबंधी उपयोगात आणला. सेक्युलॅरिझम हे एक जीवन जगण्याची अशी विचारप्रणाली आहे जी धर्माशिवाय नैतिकता मानते आणि ती नैतिकता मानवाच्या व विज्ञानाच्या वाढीस मदत करते ज्या होलीओक शास्त्रज्ञाने हा शब्द वापरात आणाला, त्याचा निरीश्वरवाद व धर्मनिरपेक्षता याचा कांही संबंध आहे यावर विश्वास नव्हता. पण त्याच सुमारास चार्लस ब्रॅडलॉक या तत्त्ववेत्याने Secular असण्यासाठी चक्क निरीश्वरवादी असणे ही अटच घातली. व त्याचा पुरस्कार केला. म्हणून होलीओक यानी 50 वर्षानंतर त्यांच्या सेक्युलरची व्याख्या 1896 मध्ये अशी केलीः
“ Secularism is a code of duty pertaining to this life, founded on consideration purely human, and intended mainly for those who find theology indefinite or inadequate, unreliable or unbelievable . Its essential principles are
• The improvement of life by material means.
• The science is available Providence of man.
• That is good to do good whether there be other good or not the good of the present life is good and it is good to seek that good.
अर्थ – सेक्युलॅरिझम ही एक जीवना सबंधीची नियमावली आहे, ज्यात फक्त मानवतेच्या दृष्टिकोनातून, मानवाच्या अभ्युदयाच्या विचार केला जातो. (मुख्यत्वेकरुन ज्यांचा ब्रम्हविद्येवर विश्वास नाही किंवा ती अपूरी वाटते.) याची तीन तत्त्वे आहेत:
• आयुष्याचा अभ्युदय फक्त ऐहिक गोष्टीनेच होतो.
• विज्ञानाचा दूरदर्शीपणाच पुढील दिशा दाखवू शकतो.
• प्राप्त झालेल्या आयुष्याचे कल्याण करणे, दुसरे कांही कल्याणकारी आहे किंवा नाही याचा विचार करण्यापेक्षा आहे तेच कल्याणकारक मानणे आणि त्याचा पाठपुरावा करणे.
येथे विचार करण्याची गोष्ट म्हणजे, ज्या होलीओकने प्रथम ही संज्ञा वापरली व त्यावर निरीश्वरवाद्याचा प्रभाव व विचार लक्षांत घेवून त्याने या संज्ञेचे (Secular) अंतिम प्रारुप समोर ठेवले व ज्यात धर्मक्षेत्राचा भाग नाकारला नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे धर्मक्षेत्र भागीदार असले काय ? किंवा नसले काय ? याचा फारसा फरक पडत नाही. असाच त्याच्या अंतिम व्याख्यांचा अर्थ होतो. कदाचित याच कारणास्तव भारतीयानी Secular याला धर्मनिरपेक्षता हा शब्द वापरला असावा.
पण भारतातील सेक्युलॅरिझमचे पुरस्कर्ते व इहवादी श्री. यशवंत मनोहर याना हा धर्मनिरपेक्षता शब्दच मान्य होत नाही. ते म्हणतात ‘ इहवादाचे भाषांतर सेक्युलॅरिझम अस केलं जातं. पण सेक्युलॅरिझमला सर्वधर्मसमभाव वा धर्मनिरपेक्षतावाद म्हणणे इहवादाला मान्य नाही, किंवा इहवादाला धर्मसंस्थाच मान्य नाही. यामुळे इहवादाला वा सेक्युलॅरिझमला सर्वधर्मसमभाव म्हणणे म्हणजे इहवादाच्या गळयात आपल्या मर्यादांचा आणि सोयीचा पुष्पहार घालण्यासारखे ठरते. (‘इहवाद’ ,यशवंत मनोहर, आजचा सुधारक जून 2015.)
आज सेक्युलॅरिझमचा सर्वमान्य व योग्य व्याख्या विर्गिलीयस फर्म Virgilius Ferm या तत्त्ववेत्याने त्याच्या Encyclopedia of Religion या ग्रंथात केली आहे. तो म्हणतो.
“ Secularism is a variety of utilitarian social ethic which seeks human improvement without reference to religion and exclusiviely by human reason, science and social organization. If has developed into a positive and widly adopted out look which aims to direct all activities and institutions by a non religious concern for the goods of the percent life for social well being.”
धर्मनिरेक्षता किंवा सेक्युलॅरिझम ही उपयोगप्रदान सामाजिक नीतीचा एक प्रकार असून ती धर्माशिवाय मानवाचा अभ्युदय, हा मानवी कारणाने, विज्ञानाने आणि सामाजिक संस्थेने होऊ शकतो. हा विचार सकारत्मकरित्या वृध्दिगंत होऊन सर्वमान्य होत आहे आणि सर्व कार्यक्रम व संस्था या धर्माशी संबंध नसल्याने जीवनाचे व समाजाचे कल्याण साधू शकतील.‘
पाश्चात्य सेक्युलॅरिझमचा हा जीवनशैली बाबतचा विचार झाला. या सेक्युलॅरिझमध्ये मुख्य तीन तत्त्वांचा समावेश असतो.
• धर्माचे स्वातंत्र्य
• समान नागरी कायदा मग तो नागरिक कोणत्याही धर्माचा वा पंथाचा असो.
• धर्माची राज्यशासन व्यवस्थेतून फारकत. हाच पाश्चात्य लोकशाहीचा महत्वाचा घटक आहे ज्यांत राज्यशासनात धर्माचा कोणताच अधिक्षेप नसतो.
होलीओक याने सेक्युलॅरिझमचा विचार जीवन कल्याणप्रद व सुखावह होण्यासाठी जरी केला असला तरी याचा फायदा धर्मास राज्यसंस्थेपासून पूर्णपणे अलिप्त ठेवण्यात पाश्चात्य देशाना यश झाले. याची मुख्यतः दोन कारणे संभवतात.
• धर्मसंस्थाचा राज्य संस्थेत तसेच शैक्षणिक, सामाजिक व विश्वस्त संस्थामध्ये झालेला असहय असा अधिक्षेप ज्यामूळे प्रजा धर्माच्या जाचाने त्रस्त झाल्याचे चित्र समोर येते.
• या जीवनशैलीत व्यक्तिस धर्माचे स्वांतत्र्य असते पण समान नागरी कायद्याच्या कडक अंमलबजावणीमूळे सर्वाना सार्वजनिक जीवन समानरितीने व्यतित करण्यास भाग पडते. त्यामूळे सांप्रदायिक तणावास वाव मिळत नाही.
भारतीय सेक्युलॅरिझम – धर्मनिरपेक्षता – सर्वधर्मसमभाव
भारतात सेक्युलॅरिझम हा शब्द 1885 मध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कॉग्रेसमध्ये समाविष्ट करण्यात आला. पूढे 1950 साली घटनेच्या प्रीएम्बल मध्ये समाविष्ट करुन भारतीय प्रजासत्ताकाची घोषणा केली तेव्हा त्याचा असा उल्लेख करण्यांत आला.
We the people of India, having solemnly resolved to constitute India into Sovereign Socialist Secular Democratic Republic and to Secure all its citizens.
• Justice Social, Economic and Political
• Liberty of Thought, Expression, Belief, Faith and Worship.
• Equality of Status, and opportunity and to promote among all
• Fraternity assuring the dignity of Individual and unity of Nation in our constituent Assembly this 26.11.1949 as hereby adopt, enact and give to ourselves this constitution.
लक्षांत घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सेक्युलर या शब्दाची संविधानांत किंवा भारताच्या कायद्यात कोठेच व्याख्या करण्यात आली नाही. तरी पण धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे असे राज्य जे सर्वधर्माची रक्षा करते पण त्या राज्याला स्वतःचा असा धर्म असणार नाही.
घटना आणि धर्मनिरपेक्षता
घटनेने जी धर्मनिरपेक्षता अपेक्षिली आहे त्यांत खालील तिन्ही तत्वांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे.
• राष्ट्र हे कोणत्याही धर्माच्या सिध्दांतावर आधारित नाही.
• समान नागरिकत्वाच्या संकल्पनेवर ते आधारित आहे.
• सामाजिक न्याय, सुव्यवस्था, नागरिकांचे आर्थिक हित, आरोग्य, शिक्षण,बौध्दीक व कलात्मक संस्कृतीचे रक्षण इत्यादी केवळ ऐहिक गोष्टी ती स्वीकारते.
धर्मनिरपेक्षता
धर्मनिरपेक्षतेचे Secularismचे तत्वज्ञान युरोपांत जीवनशैली व ख्रिश्चन धर्मासबंधात निर्माण झाल्याने युरोपशिवाय इतर ठिकाणी त्याच्या उपयोगांत तात्त्विक आणि व्यावहारिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. भारताचा विचार करता येथील धार्मिक सांप्रदाय म्हणजे हिंदू, इस्लाम व शीख याच्यामध्ये धर्म आणि जीवन व्यवहार (यांत राज्य व्यवहारही आला) यांची इतकी गुंतागुत आहे कीं, राजकारण धर्मापासून वेगळे करणे अगदी अशक्य जाणवते. कारण भारतीय हिंदू समाजात धर्माचा विचार मूळ शाश्वत तत्त्वाबाबत केला असून, सर्वामध्ये एकच तत्त्व अस्तित्वांत आहे असे दृढ प्रतिपादन केले आहे. याच मूळ धर्मापासून, ज्याला सनातन धर्म म्हटले जाते जे वेगवेगळे धार्मिक सांप्रदाय निर्माण झाले ते स्वंतत्र धर्मानेच संबोधिले गेले. यामूळे धार्मिकसांप्रदायाचीच (Religion) विचारसरणी म्हणजे खरा धर्म समजण्याची रुढी कायम पडली. खरा मूळ सनातन धर्म हा मानवाच्या मानवतेर अवलंबून असून म्हणजेच तो मानवतावादी आहे. आणि याच धर्मात मानवाच्या अभ्युदयाची नीती समाविष्ट आहे. म्हणून धर्म आणि नीती वेगळे करणे कठीण होऊन बसते. थोडक्यात मानवांच्या उत्कर्षाच्या नाण्याच्या धर्म व नीती या एकच आहेत ही धारणा झाली. खरा सनातन धर्म ज्या शाश्वत परमतत्त्वावर आधारित आहे आणि ज्याच्या प्राप्तीसाठी जीवनाचा आटापिटा करावा ही अपेक्षा ठेऊन ऐहिक व पारमार्थिक जीवन अशी रचना भारतात झाली. यामुळे धर्मनिरपेक्षतेचे विविध अर्थ निघत गेले. त्यापैकी काही
• मूलतत्त्वादी राष्ट्र किंवा एखाद्या धर्माचे राष्ट्र या शब्दाच्या विरोधी अर्थी हा शब्द वापरला जातो.
• सर्वधर्मसमभाव: या अर्थाने धर्मनिरपेक्षेतेला Secularismने संबोधिले आहे व हेच भारतीय संविधानाने मान्य केले आहे. यांत सर्व नागरिकांनी सर्व धर्माचा आदर करावा अशी भूमिका असते. याचा दुसराही भाग असा असतो कीं, ज्यात शासन सर्वधर्मापासून सारख्याच अंतरावर असले पाहिजे कोणत्याही एका धर्माची शासनाने बाजू घेण्याचे कारण नाही.
• तिसरा अर्थ सहिष्णूतेचा धर्मनिरपेक्षता परधर्मसहिष्णूता या अर्थाने वापरला जातो. सहिष्णूता सर्व धर्मात असते असे मानले जाते. कारण सर्व धर्म त्यांच्या तत्त्वज्ञानात याची भलावण करीत असतात. अशा सहिष्णूतेचा उपयोग, धर्मनिरपेक्ष, इहवादी शासनासाठी व्हावा अशी अपेक्षा असते.
धर्मनिरपेक्षता आणि धार्मिकता
• धर्मनिरपेक्षता ही धर्मविरुध्द आहे का ? खरे पाहता धर्मनिरपेक्षता आणि धार्मिकता हो दोन्ही शब्द त्यांचे स्वंतत्र अस्तित्व दाखवतात. ते एकमेकांचे शत्रू नाहीत.
• धर्मनिरपेक्षतेच्या चळवळीसाठी धर्माचा त्याग करण्याची गरज नाही. (असेच प्रायः होलीओक यांचे म्हणणे होते) धर्मनिरपेक्षता आणि धार्मिकता एकाच वेळी नांदू शकतात.
• धर्मनिरपेक्षता धर्माविरुध्द नसून फक्त धर्माचा वापर वैधानिक, शैक्षणिक व राजकीय संस्थामध्ये न व्हावा अशी अपेक्षा करते.
• जो पर्यंत धर्म त्याच्या मर्यादेत असतो तेव्हा धर्मनिरपेक्षता नैसर्गिकच असते. धर्माचे समर्थन अथवा अव्हेर करत नाही आणि हाच विचार कान्स्टूअंट असेंब्लीमध्ये गृहीत धरला गेला आहे. यावर भाष्य करताना एच.व्ही.कामत सारख्या राजकीय तज्ञाने असे लिहून ठेवले आहे.
• ‘जेव्हा मी म्हणतो की, राज्याने कोणत्याही धर्माची जवळीक करु नये तेंव्हा मला असे म्हणावयाचे असते की राज्य हे धर्मविरोधी नसावे किंवा निधर्मी असावे. आम्ही भारतास धर्मनिरपेक्ष राज्य घोषित केले हे खरे आहे. माझ्या मते धर्मनिरपेक्ष राज्य हे ईश्वररहित राज्य अथवा निधर्मी राज्य नसते.‘
वरील धर्मनिरपेक्षेतेचे वेगवेगळे अर्थ तसेच राजकीय धुरीणांची विचारप्रणाली आणि संविधानाने मान्य केलेले धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व या सर्वाचा विचार करता भारतात (Secularismचे ) धर्मनिरपेक्षतेचे खालील प्रारुप आढळून येतात.
गांधी प्रारुप
व्यक्तिगत जीवनातही सश्रध्द असणे, धार्मिक असणे, आणि सार्वजनिक जीवनातही धार्मिकतेचा आग्रह धरणे हे गांधीजीच्या प्रारुपतेचे वैशिष्ट होते. एका अर्थाने त्यांची धर्माधिष्ठीत धर्मनिरपेक्षता होती. कारण गांधीजीच्या मते धर्म आणि राजकारण यांची फारकत करणे केवळ अशक्य आहे. गांधीजीच्या मते हिंदू माणसाची कोणतीही लहान मोठी क्रिया ही धर्माने बाधित असते. ते धार्मिकसंप्रदायाचा ठशश्रळसळेप धर्म न मानता धर्म हा नैतिकता या अर्थाने वापरतात. काण नीतीशिवाय धर्म असूच शकत नाही. उपनिषदकारांच्या तत्त्वानुसार नीती हा धर्माचा पाया आहे. म्हणून गांधीजी ‘धार्मिक’ याची व्याख्या अशी करतात ‘ जो नीती तत्त्वाने स्वार्थरहित जीवन जगतो तो धार्मिक.’
गांधीजी धर्माचे दोन भाग करतात. एका भागाला ते ‘धर्मामधला धर्म’ म्हणतात म्हणजे ‘आंतला आवाज’ तर दुसèया भागाला ‘ऐहिकता‘ म्हणतात. सर्व धार्मिकसंप्रदायामधला ‘धर्मामधील धर्म’ हा नाहीसा होत आहे. याची खंत त्याना होती. ‘धर्मामधील धर्म’ म्हणताना त्याना ‘ईश्वर व नीती’ अभिप्रेत होती. ऐहिक गोष्टी विषयी उदासीन असावे व धार्मिक विषयांचा लोभ अधिक मोकळा सोडावा असे त्यांचे मत होते. या त्यांच्या व्याख्येमूळे त्यानी धर्मालाच इहवादी बनवून टाकले. राजकारणात धर्म गरजेचा आहे असे त्यांचे म्हणणे ते याच अर्थाने. नैतिकता हाच व्यवहाराचा निकष असला तर जीवनातील सर्वगोष्टीत इहवादी अर्थ प्राप्त होतो आणि जीव, जगत व जगदीश या त्रिपूटी पुरतेच धर्माचे अस्तिव शिल्लक राहते. असे त्यांचे म्हणणे होते.
माझे आणि परमेश्वराचे नाते हाच त्यानी धर्म मानला आणि ते टिकवण्यासाठी मी जीव ही देईन असे गांधीजी म्हणत. त्याना हिंदू, खिश्चन, किंवा अन्य कोणताही धर्म अपेक्षित नाही. अशा रीतीने त्यानी राजकारणांत अध्यात्म आणले व धर्माचे इहवादीकरण केले. म्हणून ते इहवादी होते पण युरोपियन अर्थाने नव्हे. हा इहवादाचा अर्थ त्यांची स्वतःची निर्मिती आहे. त्यांच्या या विचारांचा प्रभाव भारतीय धर्मनिरपेक्षेतेच्या संकल्पनेवर पडल्याचे जाणवते.
नेहरु प्रारुप
नेहरु हे इहवादी असून अज्ञेयवादी होते. त्यांचा विज्ञानावर गाढा विश्वास होता. आर्थिक विकास, शिक्षण व आधुनिक विचारसरणी यातून भारतीय समाजाची मानसिकता आपोआप बदलेल व समाज धर्मनिरपेक्ष बनेल अशी त्यांची अटकळ होती. व भारतात देखील पाश्चात्य देशासारखी इहवादी वृत्ती रुजेल असा त्याना विश्वास होता. नेहरु स्वतः अज्ञेयवादी असले तरी त्यांचा सर्वधर्मसमभावावर विश्वास होता. आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणजे धर्मविरोधी किंवा अधार्मिक शासन नाही तर ते सर्वधर्माचा सारखाच सन्मान करेल व सर्वाना समान संधी उपलब्ध करुन देईल. वैयक्तिक किंवा सामाजिक जीवनांत धर्म, ईश्वर यांची गरज न पडता, बुध्दीने आणि विवेकाने निर्णय घेणे व हा मार्ग अधिक स्वावलंबी आहे अशी त्यांची धारणा होती. म्हणून भारतीय धर्मनिरपेक्षतेमध्ये धर्मास त्यानी व्यक्तिगत व चार उंबऱ्यांच्या आंतच बंदिस्त केले असे जाणवते.
इंदिरा गांधी प्रारुप
व्यक्तिगत जीवनात धार्मिक असणे आणि सार्वजनिक जीवनात धर्मनिरपेक्ष असणे यावर त्यांचा अधिक भर होता आणि व्यवहारात हे अंमलात आणणे जास्तीत जास्त शक्य आहे असे त्यांचे मत होते. धर्माची गरज नाही असे म्हणणारे बुध्दीवादी कमीच असणार असे त्यांना वाटे, धर्माची गरज असल्याची त्यांची भावना सोव्हियट देशातील परिस्थितीवरुन त्याना जाणवली. यांच्याच काळांत त्यानी ४२ वी घटना दुरुस्ती करुन सर्वधर्मसमभावाच्या अर्थाचे Secularism म्हणजे धर्मनिरपेक्षता याला वैधानिक रुप दिले. आपला धर्म न सोडता सामाजिक व्यवहारांत जास्तीत जास्त सहिष्णूतेने वागून धर्मनिरपेक्षता साकार करता येते. याचे इंदिरा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्याची उदाहरणे आहेत. आणि असाच हिंदू जीवन पध्दतीचा वारसा आहे.
दलाई लामा प्रारुप
दलाईलामा हे बौध्द धर्म गुरु. वास्तव्याने भारतातच रहात असल्याने त्यानी भारतीय संस्कृतीचा जवळून अभ्यास केला असल्याने भारतीय समाजमनाची त्याना पूर्ण कल्पना आहे. त्याना भारतीय संविधानातील सेक्युलॅरिझमचा विचार मान्य आहे व सर्व धर्मसमभाव हे तत्त्वही मान्य आहे. पण ते सेक्युलॅरिझमला मानवतेच्या दृष्टिकोनातून बघू इच्छितात म्हणून त्यानी त्यांच्या Beyond Religion या पुस्तकात नीतीचे परिमाण मानवतेच्या दृष्टिकोनातून मांडले आहे व त्याला ते Secular Ethics हे नांव देतात. म्हणजे ही ‘धर्मनिरपेक्ष नैतिकता’ असे मानतात त्यांच्या मते ही मानवतेची नैतिकता दोन खांबावर अवलंबून आहे.
• आपण सर्व मानवतेचे भागीदार आहोत किंवा सर्वजण सहभागी आहोत.
• आपण सर्व एकमेकावर अवलंबून आहोत म्हणून तर आपल्या एकमेकांत आत्मियता व कणव आहे.
येथे प्रश्न पडतो कीं, मानवतेमध्ये अध्यात्म आहे का? मानवता हे सांगते कीं, आपण एकमेकावर प्रेम करावे, दया दाखवावी. तसे बघितले तर हा मानवाच्या उपजत वा सहजधर्म आहे. थोडे अधिक विचारांती असे जाणवते कीं, एकमेकांकडे आकर्षित होण्यासाठी दोघांत समान गुण व तत्त्व असले पाहिजे. हे समान तत्त्व म्हणजेच त्या परमतत्त्वाचा अंश अशी भारतीय विचारसरणी आहे. शेवटी अध्यात्म म्हणजे तरी काय? तर त्या परमतत्त्वाची जाणीव असणे आणि सर्वामध्ये तो आहे हे मानणे हाच भारतीयांचा सर्वधर्मसमभाव आहे.
भारतीय धर्मनिपेक्षता
भारतीय धर्मनिरपेक्षतेला मुख्यत्वे अध्यात्मिक, सांस्कृतिक व राजकीय आशय खूप मोठा आहे असे वाटते. अध्यात्मिक आशय – भारतीय राज्यघटना व राज्यशासन स्वातंत्र्याच्या, समतेच्या व बंधूभावाच्या ध्येयाशी उत्कटपणे वचनबध्द आहेत हे स्वांतत्र्य आपल्या विचाराचे, आपल्या प्रज्ञेचे, विवेकाचे, आपल्या आवडीच्या धर्माचा आचार व विचार आणि त्याचा प्रसार करण्याचे, इतकेच नव्हेतर कोणत्याही धर्म श्रध्देवाचून जीवन जगण्याचे आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात कीं, स्वांतत्र्य हीच विकासाला सर्वाधिक आवश्यक गोष्ट आहे. माणूस हा विचारक्षम प्राणी असून यातच त्याचा गौरव आहे. व हाच त्याच्यात व पशूत फरक आहे. म्हणून आपण विचाराला वाव व चालना दिली पाहिजे.
भारतीय समाजाची चिंतनशक्तीने याला प्रेरणा मिळाली आणि यातून त्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी भारतीय राज्य व्यवस्थेने उच्चार-आचार आणि विचार याचे स्वातंत्र्य आणि त्याची हमी दिली. भारताने स्वतःला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित केले त्याचा हा अर्थ आहे.
मनुष्याच्या व्यक्तिमत्वाला इंद्रिय प्रधानतेतून वेगळी श्रेष्ठ अशी अध्यात्माचे परिमाण आहे असे जी मानते, धर्माविषयी उपेक्षा किंवा धर्माला विरोध करणारी नास्तिकता याच्याशी जी सोयरिक करीत नाही, मात्र सर्व धर्माच्या प्रगतीसाठी जी निपःक्षपणे प्रयत्न करते अशा धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्थेची निर्मिती ही अनन्य साधारण घटना आहे. अशा राज्य व्यवस्थेला वेदांती राज्य व्यवस्था म्हणून ओळखणे अधिक योग्य होईल. कारण ही विचारसरणी उपनिषदांतील तत्त्वावर आधारलेली आहे. उपनिषदे सर्व समावेषक सहिष्णू भूमिका याचेच प्रतिपादन करतात. तसेच ते निर्भय व मुक्त होण्याचाच संदेश देतात. विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे, उपनिषदे सर्व पंथाच्या दीनदुबळया व दलित लोकाना जागृत करुन ती त्याना ललकारुन सांगतात कीं, आपापल्या पायावर उभे रहा व मुक्त व्हा. मुक्ती व स्वाधिनता- शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक स्वाधिनता हीच उपनिषदांची घोष वाक्ये आहेत.
याच संदर्भात डॉ. राधाकृष्णन म्हणतातः ‘अंतिम तत्त्वावरील श्रध्दा हे जरी भारतीय परंपरेचे मूलतत्त्व असले तरी भारतीय शासन हे कोणाही एका धर्माशी वा परंपराशी तादात्म्य होणार नाही. किंवा त्याची बांधिलकी स्वीकारणार नाही. किंवा त्याच्याकडून नियंत्रित केले जाणार नाही. आपल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जीवनात, निरपेक्षता, सामंजस्य आणि सहिष्णूतेच्या या धोरणाला प्रासादिक भूमिका बजावयाची आहे. भारतीय धर्मनिरपेक्षता याचा अर्थ इहवाद अथवा नास्तिकवाद असा लावला जाऊ नये.प्राचीन भारताच्या परंपरेनुसार येथे धर्मनिरपेक्षतेची व्याख्या केली आहे. तिचा हेतू विविध धर्माच्या अनुयायामध्ये बंधुत्व भावना निर्माण करण्याचा आहे. त्यात कोणत्याही धर्माची वैशिष्टये दडवून त्याना मोठया गटात सामील करुन घ्यावे अशी भूमिका नसून त्यांच्यात परस्पर संवाद असावाही भूमिका आहे. ही चैतन्यमय बंधुभावना विविधतेत एकता या तत्त्वावर आधारलेली आहे. आणि या तत्त्वातच खरी प्रतिभा आणि नवनिर्मितीची क्षमता आहे’.( Recovery of Faith)
येथे हे लक्षांत घेतले पाहिजे कीं, वेदान्ताला मनुष्याच्या अंतरिक धर्मश्रध्देविषयी अंतर्दृष्टी आहे आणि मनुष्याच्या बाहय जीवनाशी तिचा समन्वय वेदांताने केलेला असल्यामुळे वेदांन्त हे जीवनाकडे स्थिरतेने पाहण्याचे, जीवनाच्या समग्रतचे दर्शन घेण्याचे धैर्य व क्षमता असलेले परिपूर्ण दर्शन आहे. आणि याचेच प्रतिबिंब भारतीय घटनेच्या धर्मनिरपेक्षेतेतून प्रतीत होते.
भारतीय संस्कृतीच्या दृष्टिकोनांतून या निरपेक्षतेकडे बघता असे जाणवते कीं, ही संस्कृती माणसाच्या गतिमान जीवनावर क्रिया-प्रक्रिया घडवून त्याचे माणूसपण वाढीस लावणे व माणसाची मानसिक शक्ती वाढीस लावून त्याच्या ठिकाणी मानवतेचा पूर्ण विकास करुन देणे हे जीवन संस्कृतीचे खरे काम असते.समाजातील प्रत्येक व्यक्ति समाधानी रहावी हाच उद्देश असतो. आणि या साठी भारतीय ऋषी-मुनीनी जीवनांचा सखोल अभ्यास, चिंतन व मनन करुन वर्णाश्रम जीवनपध्दती आचरणांत आणावयास लावली. भारतीय संस्कृतीच्या आधारे जीवनाच्या सफलतेचे रहस्य कशात आहे, तर ऋषी योगावसिष्ठानी श्रीरामचंद्रास राज्य शासन करताना केला होता. याची आठवण आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येवरुन जाणवते. तो उपदेश खालील मंत्राने केला.
अंतस्त्यागी बहिःसंगो,अंतर्बोधो बहिर्जडः!
अंतरेको बहिर्नाना लोके विहार राघव!!
अर्थः तू मनाने प्रपंचातून सुटलेला पण देहाने प्रपंचात गुंतलेला, मनात आत्मज्ञान जागे असलेला, पण देहाने ज्ञान नसल्यासारखे वागणारा, मनाने एका आत्मवस्तूला सत्य मानणारा, आणि देहानी बहुरंगी जग सत्य मानणारा, अशी प्रपंच परमार्थाची जोड घालून रामा, तू जीवनात विहार कर.

अपूर्ण….

Dr.rapathak@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.