इस्लामवादी दहशतवाद: पडद्यामागचे राजकारण

 इस्लामच्या नावावर गेल्या अनेक वर्षांपासून जगाने हिंसा आणि दहशतवादाच्या असंख्य घटना झेलल्या आहेत. यातील अनेक इतक्या क्रूर आणि माथेफिरूपणाच्या आहेत की, ना त्या विसरल्या जाऊ शकतात, ना त्यांना माफ करता येते. ओसामा-बिन-लादेनने योग्य ठरविलेल्या 9/11च्या हल्ल्यात 3000 निरपराधी व्यक्तींचे मृत्यू, पेशावरमधील शालेय मुलांवरील हल्ला, बोकोहरमद्वारे केलेले शाळेतील मुलांचे अपहरण, चार्ली हेब्दोवरील हल्ला आणि आयसिसद्वारे केल्या गेलेल्या घृणास्पद हत्या इत्यादी हल्ले यात सामील आहेत. या सर्व घटना घोर निंदा करण्यास पात्र आहेत आणि त्या साऱ्या सभ्य समाजाला शरमेने मान झुकविण्यास बाध्य करणाऱ्या आहेत.
‘इस्लामिक दहशतवाद’ हा नवा शब्दसमूह 9/11च्या हल्ल्यानंतर प्रचलित करण्यात आला. हा शब्द इस्लामला सरळ दहशतवादाशी जोडतो. इस्लामवादी दहशतवाद बऱ्याच काळापासून सुरु आहे आणि साऱ्या जगात कर्करोगासारखा पसरत आहे, हे खरे आहे. इस्लामच्या नावे वारंवार होत असलेले हिंसक आणि दहशतवादी हल्ले होत असल्याने, याचा संबंध इस्लामशी आहे, असे प्रतीत आहे. हीच गोष्ट अमेरिकन प्रसारमाध्यमे अनेक वर्षांपासून प्रसारित करत आली आहेत आणि हळूहळू अन्य देशातील प्रसारमाध्यमांनीही हाच राग आळविणे सुरु केले आहे. एक अगदी साधारणसा प्रश्न हा आहे की, जर या घटनांचा संबंध इस्लामशी आहे, तर या घटना मुख्यत: तेल उत्पादक देशातच का होतात?
या समाजव्याप्त भ्रमाला पुढे नेत, अनेक लेखकांनी इस्लाममध्ये सुधारणा घडवून आणल्यास, या समस्येचे निराकरण होईल असा तर्क केला आहे. इस्लामला अतिरेकी प्रवृत्तींपासून मुक्त करण्यासाठी ‘धार्मिक क्रांतीची’ गरज आहे, असे काहींचे म्हणणे आहे. इस्लामवर, हिंसा आणि दहशतीवर विश्वास असणाऱ्या कट्टरपंथी तत्त्वांचे वर्चस्व स्थापित झाले आहे, असेही म्हटले जात आहे. म्हणून इस्लाममध्ये सुधारणा झाल्यास हिंसा संपून जाईल. प्रश्न हा आहे की, कट्टरपंथियांमागे अशी कोणती ताकद आहे, की ज्या भरवशावर, इस्लाम एक शांतिपूर्ण धर्म, या रूपाने असलेल्या इस्लामची व्याख्या नाकारता येईल. ती ताकद इस्लाम आहे काय? की इस्लामचा मुखवटा घातलेले राजकारण आहे? या काळात जगभरात इस्लामच्या नावे जी हिंसा होत आहे, तो मानवतेच्या इतिहासातील एक कलंकित अध्याय आहे, आणि त्याची केवळ निंदा करून चालणार नाही, तर त्याला मुळातून उखडून टाकण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, यावर कोणतेही दुमत नाही.
इस्लामवादी दहशतवादी, मानवतेचे शत्रू बनून गेले आहेत. परंतु आपल्याला हे सारे प्रकरण समजून घेण्याची, आणि जे केवळ वरवर दिसते, त्या आधारावर आपले मत न बनविण्याची गरज आहे. यामागे कोणत्या शक्ती आहेत, हे समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ सैद्धांतिक सुधारणा करून ‘तेलाच्या राजकारणाचा’ सामना करता येवू शकेल – त्या राजकारणाचा, ज्याला चोरून-लपून काही निहित स्वार्थ समर्थन देतात, कारण ते कोणत्याही मार्गाने आपले ध्येय साध्य करू इच्छितात. ज्या राजकारणाने, इस्लामच्या नावावर या प्रकारच्या हिंसक प्रवृत्तींना जन्म दिलाय, ते राजकारण आपण ओळखायला हवे आणि त्याला उघडे पाडायला हवे.
मौलाना वहिदुद्दिन खान, असगर अली इंजिनिअर आणि अन्य व्यक्तींनी, दहशतवाद जगाच्या एका भागातून दुसऱ्या भागात फैलावत असताना आणि अत्यंत क्रूरतापूर्ण व कुत्सित दहशतवादी कारवाया सुरु असताना, इस्लामचा मानवतावादी चेहरा जगासमोर ठेवला. इस्लामची मानवतावादी तत्त्वे मुख्य प्रवाहात का येत नाहीत? कट्टरपंथी लोक इस्लामच्या संस्करणाचा वापर हिंसा आणि अमानवी कार्ये करण्यासाठी करीत आहेत आणि इस्लामचे औदार्यवादी आणि मानवतावादी विचार बाजूला सरकविले जात आहेत. कुराणचा वेगवेगळा अर्थ लावला जात नाही, असेही नाही. आणि तर्कवादी आंदोलने नाहीत असेही नाही. परंतु जगातील तेलाच्या साठ्यावर कब्जा करण्याच्या राजकारणाने दहशतवादाचे उत्पादन करणारे कारखाने स्थापन केले आहेत आणि औदार्यवादी आणि मानवतावादी आवाज पूर्णपणे दाबून टाकला जात आहे. आर्थिक-राजकीय कारवाया सुरु असल्यामुळे इस्लामचे मानवतावादी रूप कमजोर पडले आहे.
वर्चस्ववादी राजकीय शक्ती, त्यांच्या राजकीय आणि आर्थिक कार्यक्रमाला अनुरूप असलेला धर्माचा तो भाग निवडतात आणि त्यावर भर देतात. कुराणच्या त्या आयती संदर्भापासून बाजूला करून इस्लामच्या मुखवट्याआड लपलेले राजकीय उद्देश लपवून ठेवले जातात. काही मुसलमानांना काय म्हणायचे ते म्हणू द्या, परंतु दहशतवाद आणि धन प्राप्त करण्यासाठी इस्लामचा केला जाणारा वापर ही समस्या आहे. आपल्याला, कट्टरवाद आणि दहशतवाद, जो इस्लामच्या नावे औचित्यपूर्ण ठरविला जात आहे, त्याचा उदय आणि त्याच्या मजबूत होत जाण्यामागच्या कारणांना समजावे लागेल. ‘काफिरांना मारून टाकायला हवे’ याची चर्चा चहूकडे सुरु असताना, सर्व माणसे एक-दुसऱ्यांचे भाऊ आहेत आणि इस्लामचा अर्थ शांती आहे, या इस्लामच्या शिकवणुकीला काहीच महत्त्व नाही, याचे काय कारण आहे.
दहशतवादाची पाळेमुळे पश्चिम आशियातील तेल भांडारांवर कब्जा करण्याच्या राजकारणात आहेत. अमेरिकेने अल कायदाला समर्थन आणि उत्तेजन दिले. पाकिस्तानात असे मदरसे स्थापन केले गेले, की त्यात इस्लामच्या वहाबी संस्करणाचा उपयोग जिहादींची फौज तयार करण्यासाठी करण्यात आला, जेणे करून, अफगाणीस्तानातील रशियन सैन्याशी सामना करता यावा. अमेरिकेने अल कायदाला 800 कोटी डॉलर्स आणि 7000 टन हत्यारे उपलब्ध करून दिली, त्यात स्टिंगर क्षेपणास्त्रेही सामील होती. व्हाइट हाउसमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अल कायदाच्या जन्मदात्यांना अमेरिकेच्या संस्थापकांच्या बरोबरीचे म्हटले होते. इराकमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले मोसाडेग सरकार 1953मध्ये उचलून फेकून देण्यात आले. त्याबरोबर घटनाचक्र सुरु झाले. त्याने इस्लामच्या हिंसक रुपाची चर्चा सुरु झाली आणि त्याचा मानवतावादी-उदारवादी चेहरा विसरला गेला. मौलाना रुमींनी, शांती आणि प्रेम, यांना इस्लामच्या सुफी संस्करणाची केंद्रीय तत्त्वे म्हणून निरुपित केली होती. मग असे काय झाले की, आज जगावर इस्लामचे वहाबी रूप लादले गेले आहे? इस्लामचे खलाफी रूप दोन शतकांपासून अस्तित्त्वात होते, परंतु त्याचा उपयोग गेल्या काही दशकांपासून होतोय, याचे काय कारण आहे? विनाकारण हिंसा आणि लोकांचे जीव घेण्यात लिप्त असलेल्या तत्त्वांचा जाणूनबुजून इस्लामच्या या संस्करणात उपयोग केला गेला, कारण त्याने त्यांचे राजकीय उद्देश साध्य व्हावेत.
धर्माचा उपयोग नेहमीच सत्ता मिळविण्यासाठी केला जातो, याला इतिहास साक्ष आहे. राजा आणि बादशहा क्रुसेद, जिहाद, धर्मयुद्ध या नावांनी आपले स्वार्थ साधत आले आहेत. भारतात ब्रिटीश राजवटीत अस्त होत चाललेल्या जमीनदार आणि राजे (हिंदू-मुसलमान दोन्ही धर्मातील) या वर्गाने मिळून युनायटेड इंडिया पॅट्रिअॅटिक असोसिएशनची स्थापना केली आणि याच संस्थेतून मुस्लिम लीग आणि हिंदुमहासभा निर्माण झाली. सांप्रदायिक संस्थांनी घृणा फैलावली. त्यातून सांप्रदायिक हिंसा भडकली. युनायटेड इंडिया पॅट्रिअॅटिक असोसिएशनचे संस्थापक होते ढाक्याचे नबाब आणि काशीचा राजा. आता आपण मुस्लिम लीग, हिंदुमहासभेसारख्या जातीयवादी संघटनांच्या निर्मितीसाठी हिंदू आणि मुस्लिम धर्माला दोषी ठरविणार आहोत?, की ज्या राजकारणासाठी या जमीनदार आणि राजांनी इस्लाम आणि हिंदू धर्माचा वापर केला, त्यांना दोषी ठरविणार आहोत? आपण सध्या, दक्षिण आशियात म्यानमार आणि श्रीलंकेत बौद्ध धर्माच्या नावे गठीत झालेल्या गटांच्या कारवाया पाहात आहोत.
थोडे लक्षपूर्वक पहिले तर आपल्या हे लक्षात येईल, की इस्लामी दहशतवाद, इंडोनेशियासारख्या मोठी मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशात न वाढता, मुख्यतः तेल उत्पादक देशात वाढला आहे. दहशतवादाचे बीज कुण्या धार्मिक नेत्याने पेरलेले नाही, ते तेलाचे भोक्ते असलेल्या महाशक्तींनी पेरले आहे. सौदी अरेबियाच्या वाळवंटात कुठे पडून असलेली मौलाना वहाबींची इस्लामची व्याख्या खोदून काढण्यात आली आणि तिचा उपयोग सध्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी करण्यात आला. राजकीय शक्ती, त्यांच्या हिताला अनुकूल असणारा धर्माचा भाग निवडतात. काही लोक मुलींसाठी शाळा उघडत आहेत. ते असे म्हणतात की, ते ही गोष्ट कुराण ज्ञानाला फार महत्त्व देतो, म्हणून करीत आहेत. दुसरीकडे त्याच कुराणाचा आधार घेवून कुणी शाळेत जाणाऱ्या मुलींवर गोळ्या झाडत आहेत. दहशतवादी समूह, धर्माच्या आपल्या संस्कारणावर ना चर्चा करू इच्छितात ना करू शकतात. त्यांना फक्त त्यांनी निवडलेल्या वचनांशी मतलब आहे, जे त्यांच्या डोक्यात ठोसून दिले आहेत आणि ज्यांनी त्यांना हातात बंदूक आणि बॉम्ब असलेले जनावर बनविले आहे.
हिंदू धर्माच्या नवे गांधीजींनी अहिंसेला आपला मुख्य आदर्श मानले. त्याच हिंदू धर्माच्या नावे गोडसेने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या सर्वात धर्म कुठे आहे? सध्या जगवारचे संकट बनलेल्या इस्लामवादी दहशतवाद्यांना अमेरिकेने स्थापन केलेल्या मदरशांमधून शिक्षण मिळाले आहे. आयसिस अतिरेक्यांमागे अमेरिका असू शकते, अशीही बातमी आहे. साम्राज्यवादाच्या काळातही राजकारणावर वेगवेगळ्या धर्मांची लेबले लागलेली असत. साम्राज्यवादी शक्ती नेहमीच सामंती व्यवस्था जिवंत ठेवीत होती. आता तेल उत्पादक क्षेत्रातील मुख्य रहिवासी मुसलमान आहेत, म्हणून इस्लामचा वापर राजकीय ध्येय प्राप्त करण्यासाठी केला जात आहे. विडंबना ही आहे की, मुसलमान आपल्याच संपदेचे – काळ्या सोन्याचे शिकार होत आहेत.

ram.puniyani@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.