भाजपाच्या दहशतीने हादरलेली काँग्रेस

सध्या देशभरात व विशेषतः महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे बरेच हाल होत आहेत. लोकसभेच्या निवडणुकांतून ज्या प्रचंड बहुमताने भाजपाचे सरकार निवडून आले त्याच्या परिणामी व सत्तासाधनांचा सूडबुद्धीने दुरुपयोग करून दहशत निर्माण करण्याची आर.एस.एस.ची जी पद्धत आहे, तिच्यामुळे काँग्रेससह त्यांच्या समकक्ष असलेले इतर विरोधीपक्षही धास्तावले आहेत. २०१४ च्या निवडणुकांवेळी मोदींनी ‘काँग्रेसमुक्त’ भारताची घोषणा केली होती. त्यावेळी केवळ निवडणुकांतून काँग्रेसला पराभूत करून तो पक्ष संपविण्याची ते भाषा करीत आहेत व तसे होणे शक्य नाही असे बहुतेकांना वाटत होते. त्यावेळी ते सत्तासाधने असलेल्या सी.बी.आय., ई.डी.सारख्या संस्थांचा गैरवापर व न्यायव्यवस्थेचाही वापर करून काँग्रेसमध्ये दहशत फैलावतील व त्या धाकापोटी त्यांना आपल्यात सामावून घेऊन पावन करतील व याप्रमाणे त्या पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतील, अशी कल्पनाही कोणी केली नसेल. पण ते आज वास्तवात उतरत असताना आपण पहात आहोत. दहशत पसरवण्याबरोबरच हिंदुसमाजाचे ध्रुवीकरण करण्यासाठी मुस्लिमाविरुद्ध समाजांतर्गत द्वेष पसरवणे हाही त्यांच्या कामाचाच भाग आहे. त्याचाही ते मोठ्या खुबीने वापर करीत आहेत. निवडणुकांपूर्वी पुलवामा, बालाकोट प्रकरणे घडविली. त्या जोरावर ते प्रचंड बहुमताने निवडून आले. त्यानंतर त्यांनी काश्मिरसंबंधाचे ३७० कलम रद्द करून मुस्लिमद्वेषात भर घातली. देशभरातील हिंदुजनतेने या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले. याप्रमाणे देशापासूनच केवळ काश्मिर वेगळे पाडले असे नव्हे, तर एकी असलेल्या जम्मू व लद्दाखपासूनही काश्मिर वेगळे पाडले. आपल्या स्वार्थासाठी काश्मिरची बाजू घेणारा पाकिस्तान तर जगापासूनही वेगळा पडला अशी आताची स्थिती आहे.

याबाबतचे विधेयक भाजपने लोकसभेत मांडले असताना काँग्रेसची दाणादाण उडाली. या मुद्द्यावर त्यांच्यात फाटाफूट दिसून आली. ज्योतिरादित्य शिंदे, मिलिंद देवरा, दिपेंद्र हुड्डा, जनार्दन द्विवेदी यांसारख्या नेत्यांनी याप्रकरणी भाजपाला पाठिंबा दिला. या मुद्द्यावरून काँग्रेसपक्षाचे राज्यसभेतील खासदार व पक्षप्रतोद भुवनेश्वर कलिता यांनी आपल्या पदाचा व काँग्रेसपक्षाचाही राजीनामा दिला. अशा या वातावरणात भाजपाने काँग्रेसपक्षावर दुसरा घाव घातला. त्यांचे महत्त्वाचे पुढारी माजी गृहमंत्री व अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या घरावर सी.बी.आय.ने धाडी घालून त्यांना अटक केली..ते सध्या तुरुंगात आहेत व जामिनासाठी धडपडत आहेत. सी.बी.आय. प्रमाणेच ई.डी.ही त्यांच्यामागे हात धुऊन लागली आहे. अत्यन्त गलितगात्र होऊन ते कधीतरी जामिनावर बाहेर येतीलही पण तोपर्यंत काँग्रेसही बरीच गलितगात्र झालेली असेल. कारण हा घाव काँग्रेसच्या वर्मी बसला आहे. त्यामुळे केवळ काँग्रेसमध्येच नव्हे, तर त्यांच्या समकक्ष असलेल्या इतर पक्षांतही भीतीचे वातावरण पसरले आहे. चिदंबरमसारख्या दिग्गज नेत्याचे जर असे हाल होऊ शकतात तर मग आपल्यासारख्यांचे काय? असे काँग्रेससह इतर पुढाऱ्यांना आता वाटते आहे. त्यामुळे हरियाणाचे मुख्यमंत्री राहिलेल्या भूपेंद्रसिंग हुड्डासारखे नेतेही ‘काँग्रेस आपल्या मार्गावरून ढळली’ असे विधान रॅलीज् काढून करू लागले आहेत. सुनंदा प्रकरणात अडकलेले शशी थरूरांसारखे लोक बोलीभाषेतील शब्दांच्या निमित्ताने मोदींची स्तुती करू लागले आहेत. जयराम रमेशांसारख्या नेत्यांनी ‘मोदींच्या प्रत्येक कार्यक्रमाला काँग्रेसने विरोध करायला नको’ (तसा विरोध काँग्रेसने केलाही नाही. पुलवामा प्रकरणी आपण मोदींच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले होते) असे विधान करताच अभिषेक मनु सिंघवीसारख्या काँग्रेसच्या वकिलांनी त्यांची पाठराखण केली.. मायावतीबाबत आता आग्रा-प्रकरण जुने झाले असले तरी त्यांच्या भावावर भाजपाने आर्थिक व्यवहाराबाबतीत नव्याने चौकश्या लावल्या आहेत. इन्कमटॅक्स विभाग त्यांच्यामागे लागला आहे. अश्या परिस्थितीत अडकलेल्या मायावतींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत ३७० कलमाबाबत मोदी सरकारला पाठिंबा देऊन विरोधीपक्षावर ताशेरे ओढले आहेत.. इतरांप्रमाणेच हे सर्व पुढारी आता मोदीभक्त का बनत आहेत? याबाबत शंका यावी अशी आताची राजकीय परिस्थिती आहे.

पुढील महिन्यात महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. गणेशोत्सवानंतर त्याबाबतची आचारसंहिताही लागू होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या तयारीसाठी सत्ताधारी भाजपाने “महाजनादेश यात्रा” काढली आहे. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेने आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात ‘जन-आशीर्वाद’ यात्रा काढली आहे. खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा पुढाकार व अजित पवारादींचा सहभाग असलेली राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य यात्रा’ चालू आहे. काँग्रेसचीही ‘महापर्दाफाश यात्रा’ चालू आहे. या सर्व यात्रांच्या गदारोळातून देवेंद्र फडणविसांच्या यात्रेत बराच उत्साह आलेला दिसतो. त्याखालोखाल आदित्य ठाकरेही उत्साहात आहेत असे म्हणता येईल. मरणकळा आली आहे ती राष्ट्रवादीच्या ‘शिवस्वराज्य’ हिला. याचे कारणही तसेच आहे. ते म्हणजे सध्याच्या सत्ताधारी युतीच्या सरकारने शेतकऱ्यादी जनविभागांची फार कामे केली आहेत म्हणून त्यांना जनतेचा फार पाठिंबा आहे, हे नव्हे. तर मोदींच्या करिश्म्याने लोकसभेतील प्रचंड बहुमत, त्याचबरोबर ३७० कलमाला मिळालेला जनतेचा प्रतिसाद या वाऱ्यावर ते सध्या स्वार झाले आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकावेळीच काँग्रेसमधून भाजपामध्ये जाण्याचे उद्घाटन त्यावेळचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटलांनी केले होते. त्यांचाच कित्ता आता काँग्रेसचे इतर पुढारी गिरवीत आहेत. पण त्याची लागण राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही मोठ्या प्रमाणात झालेली दिसते..त्यांचेही दिग्गज पुढारी भाजपा-शिवसेनेमध्ये जात आहेत. त्या सर्वांची येथे नावनिशी चर्चा करण्याची गरज नाही. गेल्या महिन्याभरातील दररोजची वर्तमानपत्रे उघडली की काँग्रेस व राष्ट्रवादीपैकी रोज कोणी ना कोणी भाजपा किंवा शिवसेनेत जाण्यासाठी आसुसलेला आहे असे दिसते. याबाबत शरद पवारसारख्या संयम ठेवणाऱ्या नेत्यालाही आपला राग पत्रकारांवर काढावा लागला, इतकी ही परिस्थिती विकोपाला गेली आहे. ग्रामीण भागातील पाटलांच्याच असलेल्या या पक्षाच्या नेत्याला ‘पाटील, तुम्ही सुद्धा” असे म्हणायची वेळ आली आहे. नारायण राणेंनी फार पूर्वीच काँग्रेस सोडली होती. पण ते आता आपला ‘स्वाभिमान’ गुंडाळून भाजपात कोणताही आडपडदा न ठेवता जाण्यास आतुर झाले आहेत. त्यात त्यांना अडथळा शिवसेनेचा आहे. पण तोही अडथळा काही दिवसानंतर दूर केला जाईल. काँग्रेस, राष्ट्रवादींच्या पुढाऱ्यांची ही जी लांबचलांब रांग भाजपा-शिवसेनेकडे लागली आहे ती काही भाजपा-शिवसेनेच्या प्रेमामुळे नव्हे, तर भाजपाने केंद्रपातळीवर पी.चिदंबरमसारख्यांची तुरुंगात रवानगी करून त्यांचे आम्ही काय हाल करू शकतो याचे उदाहरण सर्व काँग्रेसवाल्यांपुढे उभे केले आहे त्यामुळे. तद्वतच राज्यातही राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारसह, त्यांचे राजकीय सहकारी मीनाक्षी पाटील, दिलीप देशमुख, विजय वडेट्टीवार, विजय मोहितेपाटील सारख्या ३१ पुढाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही त्यात लपेटण्याचा प्रयत्न आहे. प्रफुल्ल पटेल यांना पूर्वीच विमानखरेदी प्रकरणात ई.डी. कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. राज ठाकरेंनाही ई.डी. कार्यालयाकडे जावे लागले आहे. तेव्हा आता ‘आपलीही काही धडगत राहणार नाही, त्यापेक्षा सत्ताधारी पक्षात गेलेले बरे’ हा साधा हिशोब भाजपात जाणाऱ्या नेत्यांनी केला आहे. अर्थात गेली ५०-६० वर्षे हे सर्व दिग्गज राज्यातील विविध ठिकाणच्या सत्तास्थानीच होते. तेथे त्यांनी भ्रष्टाचारी आचरण केले आहे. हे त्यांच्याप्रमाणेच भाजपवाल्यांनाही माहीत आहे. त्यांची सर्व कागदपत्रे, फाईली जशा सत्ताधारी पक्षाकडे आहेत, तसेच सी.बी.आय., ई.डी., इन्कमटॅक्स इत्यादीही त्यांच्या दिमतीला तैनात आहेत. तेव्हा कोणाची वर्णी कधी लागेल व तुरुंगात जाऊन बसावे लागेल याचा नेम नाही. त्यापेक्षा आयुष्यभर भ्रष्टाचार करून सात पिढ्यांसाठी केलेली कमाई जर नीट ठेवायची असेल व ती स्वतःलाही येत्या काळात निवांत बसून खायची असेल तर भाजपात गेलेले बरे, असा साधा हिशोब त्यांनी केला आहे. तेथे गेल्यानंतर सत्तास्थाने मिळतीलच असे नाही. मिळाली तर बरेच. मिळाली नाही तरी चालेल, पण निदान चौकश्या होऊन तुरुंगात जाऊन बसावे लागू नये, याचीच ते काळजी घेत आहेत. अन्यथा शरद पवारांना दैवत मानणारे जगजीतसिंह राणा व पद्मसिंह पाटील हे पिता-पुत्र राष्ट्रवादीपक्ष सोडत असताना एकमेकांच्या गळ्यात पडून ओक्साबोक्सी रडले नसते.

याचा अर्थ भाजपा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे असे नव्हे. भ्रष्टाचार कोणत्याच भांडवली राजकीय पक्षाला संपावा असे वाटत नाही व तो तसा संपूही शकत नाही. पण हे दोन्ही सत्ताधारी व विरोधीपक्ष भ्रष्टाचाराच्या प्रश्नाचा उपयोग जनतेची दिशाभूल करून जसा राजकारणासाठी करीत असतात तसाच तो आता भाजपा करीत आहेत. अन्यथा त्यांच्यात येडीयुरूप्पासारख्या अनेक दिग्गज भ्रष्टाचारी नेत्यांची मुळीच कमतरता नाही. पण ते त्यांना काहीच करणार नाहीत. इतकेच नव्हे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीमधीलही जे पुढारी भाजपा-शिवसेनेत जातील त्यांच्याही भ्रष्टाचारावर ते पांघरूणच घालणार आहेत. किंबहुंना ते त्यासाठी त्यांना अभयच देत आहेत. ह्याच कारणासाठी हे पुढारी भाजपामध्ये जात आहेत. तेव्हा भ्रष्टाचाराचा मुद्दा येथे अत्यंत गौण आहे. विद्यमान फॅसिस्ट सरकारच्या पहिल्याच हल्ल्यात काँग्रेसपक्ष गलितगात्र झाला आहे. त्यांच्यातील अनेक दिग्गजांनी सत्ताधारी पक्षापुढे शरणागती पत्करली आहे. असा हा काँग्रेसपक्ष पुढे चालून विद्यमान फॅसिस्ट सरकारच्या पुढील हल्ल्यामध्ये देशातील इतर कष्टकरी जनसमुदायांवर, त्यांच्यातील विविध धार्मिक जातीसमूहांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या वेळी त्या समुदायांची साथ देऊ शकेल? संघटित पक्षाच्या रूपात ते हे काम मुळीच करू शकणार नाहीत. हां, त्यांच्यातील काही व्यक्ति, काँग्रेसच्या काही जुन्या धर्मनिरपेक्ष धोरणांचे वाहक म्हणून अथवा यांच्या हल्ल्याचे बळी म्हणून मदतनीस ठरू शकतील. तेव्हा त्यांनी या फॅसिस्टांच्या हल्ल्याविरोधात पुढे होणाऱ्या संघर्षात सामील व्हायला हरकत नाही. पण त्याबाबतीत काँग्रेसपक्षावर विसंबून चालणार नाही. त्यांचे व भाजपाचे वर्गीय स्वरूप एकच आहे हे त्यांच्या जागतिकीकरणाच्या आर्थिक धोरणावरून जसे आतापर्यंत स्पष्ट होते तसेच आताच्या पक्षांतराच्या घडामोडीवरून ते आणखी प्रकर्षाने दिसून येत आहे.

तसेही देशाच्या स्वातंत्र्यासाठी व स्वातंत्र्योत्तर गेल्या ७० वर्षांतील विकासाच्या काळात ज्याप्रमाणे भारतीय जनतेला व सत्ताधारी वर्गालाही काँग्रेसपक्षाचा उपयोग झाला तसा तो आता देशाच्या बदललेल्या आर्थिक परिस्थितीत होईल याची शक्यता नाही. त्यामुळे सद्यःस्थितीत देशातील जनतेला तो जसा उपयोगी वाटत नाही तसाच तो सत्ताधारी वर्गालाही उपयोगाचा राहिला नाही. काँग्रेसचेच नवीन आर्थिक व औद्योगिक धोरण भाजपाच जास्त नंगाटपणाने, जाती-धार्मिक समूहांत द्वेष पसरवून, त्यांना एकमेकांविरुद्ध पेटवून जास्त परिणामकारकपणे राबवू शकते व राबवीत आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत तरी सत्ताधारीवर्गाला काँग्रेसपेक्षा भाजपाच फायदेशीर ठरणार आहे. पण पुढील काळात भाजपाबरोबर जाऊन आपले काहीही भले होऊ शकणार नाही हे सामान्य जनतेच्या अनुभवास येणार आहे. त्यावेळी जनतेला क्रांतिकारी पक्षाचा नवीनच पर्याय उभा करावा लागेल. त्यास सद्यःस्थितीतील कोणत्या पक्षाच्या किती जणांचा कसा हातभार लागेल हे येणारा काळच दाखवून देईल.

हा लेख यापूर्वी ‘लाल निशाण’ व ‘अक्षरनामा ’च्या वेब-पोर्टलवर प्रकाशित झाला आहे.

संपर्क: ट्रेड युनियन सेंटर, कोतवालपुरा, औरंगाबाद, मो. ७५८८१६५१८७

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.