अफवा आवडे सर्वांना! – प्रभाकर नानावटी

जगभरातील अफवा आणि त्यांचे बळी

जगभरात ठिकठकाणी हैदोस घालत असलेल्या करोना विषाणूमुळे भीतीचे व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून जगातील एकूण एक राष्ट्र भांबावून गेलेले असताना या भीतीची तीव्रता वाढविण्यात समाजमाध्यमावरून पसरत असलेल्या अफवांना कसे अटकाव करावे हा मोठा प्रश्न सर्व संबंधितांच्या समोर उभा आहे. करोना संसर्गाला आटोक्यात आणून ठप्प झालेल्या जागतिक स्तरावरील सर्व व्यवहारांना पूर्वस्थितीवर आणण्यासाठी सर्व पातळीवरून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य, प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन इत्यादींसकट संपूर्ण यंत्रणा वेळ व श्रम खर्ची घालत असताना या अफवांमुळे त्यांच्या या प्रयत्नांना खीळ बसते आहे. आपण आपल्या मोबाईलवरील वाट्सअ‍ॅपवर जे काही लिहिले आहे ते सर्व खरे आहे व/वा टीव्हीच्या पडद्यावर जे काही पाहतो ते सत्यकथन आहे, यावर आपला भलताच विश्वास असतो. समाजमाध्यमावरून दर सेकंदाला लाखोंनी झळकणारे लंगोटीसंदेश वाचून आपण आपली मते बनवत असताना त्याचा कुणीतरी गैरफायदाही घेऊ शकतो वा त्यापासून कुणाचे तरी नुकसान होऊ शकते याची पुसटशी शंकासुद्धा आपल्याला शिवत नाही. त्यामुळे खरे काय व खोटे काय याचा विवेकच आपण हरवून बसलेलो आहोत. जे काही आपण ऐकतो वा पाहतो ते सर्व खरे आहे असे समजण्यात हशील नाही.

अफवा ही पडताळणी न केलेली माहिती असते व या अफवांमुळे दंगलीच्या वेळी, साथीच्या कालखंडात व युद्धप्रसंगी जगभरात अनेकांना मृत्युमुखी पडावे लागलेले आहे, हे आपण नाकारू शकत नाही. अफवा म्हणजे एका प्रकारे ‘सुधारून’ प्रसारित केलेली/करणारी बातमी. मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार यांच्या संख्येत व/वा आशयात चढ-उतार होत असते. अगदी नगण्य तथ्यांश असलेल्या अशा बातम्यांमध्ये आकर्षित करणारा मालमसाला भरगच्च भरलेला असल्यामुळे ऐकणारे/पाहणारे भारावून जातात.

अफवा, कुटाळक्या (गॉसिप), रसभरित कहाण्या व गप्पा-टप्पांमधून माहितीची देवाण-घेवाण होत असते. संपर्क माध्यमांची उणीव असताना माहिती पोचण्यास वेळ लागत होता. परंतु अलीकडे वाऱ्याच्या वेगाने, नव्हे तर प्रकाशाच्या वेगाने माहिती पोचवता येत असल्यामुळे ही अर्धवट माहिती शक्य ती साधने वापरून आपल्या ओळखी/अनोळखी विविध गटापर्यंत पोचवण्यात येत असते. ही वाढ भूमितीश्रेणीत होत असल्यामुळे बघता बघता काही क्षणांतच माहिती सर्वदूरपर्यंत पोचू शकते. एखादा चिकित्सक या माहितीतील सत्यासत्यता पडताळून प्रतिवाद करण्याच्या पावित्र्यात असला तरी अफवांच्या विरोधात केलेल्या प्रतिवादात तेवढा दम नसल्यामुळे हा प्रतिवाद फार कमी लोकापर्यंत पोचतो. व जे काही नुकसान होणार आहे ते टाळता येऊ शकत नाही. हे नुकसान काही वेळा जीवावरही बेतू शकते.

इतिहासतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ व मानसतज्ज्ञ यांचा अफवा व गॉसिप हे आता अभ्यासाचे विषय झाले असून यांच्या ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय परिणामांचा ते शोध घेत आहेत. इतिहासातील कुठली माहिती खरी आहे व कुठली माहिती पेरलेली आहे याचा शोध घेऊन इतिहासाचे पुनर्लेखन केले जात आहे. गंमत म्हणजे अफवा पसरवत असताना त्याचे काय परिणाम होणार आहेत याची कल्पना अफवांना जन्म देणाऱ्यांनासुद्धा नसते. एक गुळमुळीत, अर्धे सत्य व अर्धे खोटे, काहीतरी अंदाज दर्शविणारे त्याचे स्वरूप असते व बघता बघता ते हिट् होते (किंवा दुर्लक्षिलेही जाऊ शकते.) म्हणूनच दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात ठिकठिकाणी शांत रहा व आपले काम करत रहा (keep calm and carry on) अशा प्रकारच्या पाट्या लावलेल्या होत्या. आताच्या करोनाच्या साथीच्या उद्रेकाच्या काळातसुद्धा सामान्य जनतेला असेच काही सांगण्याची गरज भासते आहे.

अफवांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी व दंगे झालेले अनेक दाखले इतिहासात आहेत. १७५०च्या सुमारास १५वा लुई हा फ्रान्सचा राजा, पॅरिस शहरातल्या मुलांना पळवतो अशी अफवा पसरली. तो कुष्ठरोगाने पिडीत असून लहान मुलांना मारून त्यांच्या रक्तात आंघोळ केल्यावर रोग नाहिसा होईल म्हणून तो मुलांना पळवतो आहे यावर शहरवासीयांचा विश्वास बसला. रातोरात सर्व जनता रस्त्यावर उतरली व राजाच्या विरोधात घोषणा देऊ लागली. खरे पाहता रस्त्यावरील मुलांना पकडून रिमांड होममध्ये पाठवण्याची मोहीम पोलीसयंत्रणेने हाती घेतली होती. परंतु त्या मुलांना राजवाड्यात पाठवून त्यांचा खून केला जात आहे या अफवेमुळे पोलीसयंत्रणा हतबल झाली. १७६१ साली भूकंपाच्या दोन सौम्य धक्क्यांने लंडन शहर हादरले. त्याच वेळी ५ एप्रिल रोजी मोठा भूकंप होऊन लंडन शहर नष्ट होईल म्हणून एका माथेफिरूने अफवा पसरवली. सर्व लोक सैराभैरा होऊन शहर सोडून जाऊ लगली. काहींनी शेतात जाऊन तळ ठोकला. एक पोलीस वेडा-पिसा होऊन नग्नावस्थेत भर रस्त्यावर पळत सुटला. व शेवटी त्याला मनोरुग्णालयात दाखल करावे लागले. १४व्या शतकात युरोपमध्ये प्लेगची साथ पसरली होती. ज्यू धर्माची माणसं क्रिश्चियन वसतीतील पाण्याच्या विहिरीत विष कालवतात व त्या बदल्यात ‘होली स्पिरिट’ प्लेगपासून ज्यूंचे रक्षण करतो अशी अफवा पसरली. त्यामुळे हजारो ज्यूंची कत्तल करण्यात येऊ लागली. फ्रान्समधील एका शहरात पाच हजार ज्यूंना जिवंत जाळले गेले. ज्यूंना मारून टाकण्याचा कायदा पास केला गेला. परंतु ते निरपराध होते हे शेवटपर्यंत कळले नाही. फ्रेंच राज्यक्रांतीच्या कालखंडातील भीतीचा फायदा घेत क्रांतीला विरोध दर्शविणारे खेड्यातील शेतकऱ्यांना मारून त्यांचे धान्य लुटण्यासाठी दरोडेखोरांची टोळी उभी करत आहेत अशी अफवा पसरली. ठिकठिकाणी शेतकरी गटा-गटाने रात्रभर पहारा देऊ लागले. एके ठिकाणी तीन हजारांचा गट दरोडेखोर जंगलात पळून गेले म्हणून पाठलाग करू लागली. परंतु गायी-म्हशींच्या कळपाशिवाय त्यांना तेथे काही सापडले नाही. इंडोनेशियात सरकारनेच बंदरनिर्मिती वा तेल विहिरींच्या मोठमोठ्या प्रकल्पासाठी माणसांची मुंडकी गोळा करण्याच्या कामासाठी अधिकारी नेमले आहेत, ही अफवा वरचेवर पसरत असते. त्यामुळे जिवाच्या भीतीने घाबरलेले कामगार कामावरच येत नाहीत. कामावर आल्यास हे अधिकारी आपला खून करून मुंडकी घेऊन जातील ही भीती नेहमीच त्यांना सतावत असते. १९९८च्या सुमारास स्थानिक मांत्रिकांच्या विरोधात इंडोनेशियातील काही खेड्यात तंग वातावरण होते. या मांत्रिकांनी पूर्वी केलेल्या पापाच्या प्रायश्चिततेची मागणी हे खेडूत करत होते. त्यामुळे या मांत्रिकांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची व्यवस्था सरकार करू लागली. आपण मांत्रिक आहोत याची नोंद करण्यासाठी त्यांना जवळच्या पोलीसचौकीत जावे लागत होते. परंतु चौकीवर जाणाऱ्या मांत्रिकामुळेच गावातील शेजारीपाजारी आजारी पडत आहेत अशी अफवा पसरली. त्यामुळे चौकीपाशी येणाऱ्या प्रत्येक मांत्रिकाचा हे गावकरी खून करू लागले. अशा प्रकारे केवळ अफवेमुळे अनेकांना हकनाक जीव गमवावे लागले. १९९६च्या सुमारास मध्यपूर्वेतील इजिप्तमधील व इतर काही देशांतील तरुणांना इस्राइल मादक द्रव्याच्या आहारी घालणारा डिंकासारखा पदार्थ पुरवून नादी लावत आहे अशी अफवा पसरली. तरुणींनी हा पदार्थ खाल्यास त्या वेश्याव्यवसाय करू लागतात व इस्राइलतर्फे गुप्तचर म्हणून काम करू लागतात अशीही अफवा पसरू लागली. ठिकठिकाणच्या मशीदीतील स्पीकरवरून अशा पदार्थांचे सेवन करू नये अशी घोषणा वारंवार करण्यात येऊ लागली. कित्येक दुकानांवर छापे टाकले गेले. परंतु हाती काही लागले नाही. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामालासुद्धा अशा प्रकारच्या अफवांचे बळी व्हावे लागले. २३ एप्रिल २०१३ रोजी ओबामाच्या व्हाइट हाउसमध्ये स्फोट झाल्यामुळे ओबामा थोडक्यात बचावले व काही किरकोळ इजा झाल्यामुळे उपचार घेत आहेत असा असोशिएटेड प्रेसचा हवाला देणारा ट्वीट प्रसारित झाला. बघता बघता न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज ५०० अंकानी कोसळला व गुंतवणुकदारांचे १३००० कोटी डॉलर्सचे नुकसान झाले. काही चाणाक्ष वार्ताहारांमुळे या अफवेचा स्रोत शोधला गेल्यामुळे थोडक्यात निभावले.

खरे पाहता संसर्ग रोगाची लागण जगभरात अगदी पूर्वीपासून होत आहे. (तक्ता पहा)

नाव काळ (इ.स) बळींची संख्या
अँटोनाइन प्लेग १६५-१८० ५० लाख
जपानीज स्माल पॉक्स ७३५-७३७ १० लाख
प्लेग ऑफ जस्टिनियन ५४१-५४२ ३-५ कोटी
ब्लॅक डेथ १३४७-१३५१ २० कोटी
न्यू वर्ल्ड स्माल पॉक्स १५२० नंतर ५.६ कोटी
लंडनचा प्लेग १६६५ १ लाख
इटालियन प्लेग १६२९-१६३१ १० लाख
कॉलराची साथ १८१७-१९२३ १० लाखापेक्षा जास्त
तिसरा प्लेग १८८५ १ कोटी २० लाख *
यल्लो फिव्हर १८००च्या उत्तरार्धात १ ते १.५ लाख **
रशियन फ्ल्यू १८८९-१८९० १० लाख
स्पॅनिश फ्ल्यू १९१८-१९१९ ४-५ कोटी
एशियन फ्ल्यू १९५७-१९५८ ११ लाख
हाँगकाँग फ्ल्यू १९६८-१९७० १० लाख
HIV/AIDS १९८१ ते फेब्रुवारी २० २.५-३.५ कोटी
स्वाइन फ्ल्यू २००९-२०१० २ लाख
SARS २००२-२००३ ७७०
इबोला २०१४-२०१६ ११०००
MERS २०१५ ते फेब्रुवारी २० ८५०
COVID-19 डिसें २०१९ ते फेब्रु २० ४७००

* चीन व भारत
** अमेरिका

अफवा पसरविणारे, स्वयंघोषित डॉक्टर होऊन भलतेसलते उपचार सुचविणारे कदाचित मोठ्या प्रमाणात होत असलेल्या याच जीवितहानीचा फायदा दुर्धर संसर्गाच्या काळात घेत असावेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत असताना अफवा पसरवण्यात, चुकीचे संदेश पाठवण्यात काही तारतम्य वापरल्यास बाधितांना नक्कीच दिलासा मिळाला असता.

एके काळी ( व आतासुद्धा!) काही समाजात दैवी प्रकोपामुळेच साथीच्या रोगांची लागण व त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत असते यावर पूर्ण विश्वास असतो. मृत पावलेल्यांनी या जन्मी किंवा पूर्वीच्या कुठल्या तरी जन्मात काही दुष्कृत्ये केलेली असल्यामुळे परमेश्वर (वा भूत!) त्यांना शिक्षा म्हणून वा इतरांनी धडा घ्यावा म्हणून त्यांचा बळी घेतला जातो याबद्दल त्यांची खात्री झालेली असते. प्लेगसारख्या रोगांचा प्रसार समुद्रमार्गे व्यापार करण्यातून होत असतो हे माहीत असूनसुद्धा साथीचे मूळ शोधून उपाय करण्यापेक्षा समस्यांचे सुलभीकरण केले जात होते. अशा प्रकारे अवैज्ञानिकरित्या समस्यांचे विश्लेषण करत असल्यामुळे लाखोंनी नसली तरी हजारोंनी माणसं मृत्युमुखी पडत होती.

काही अपवाद वगळता त्याकाळी देव-धर्माचा जबरदस्त पगडा धुडकावण्याइतके धैर्य कुणाकडेही नसावे असे म्हणता येईल इतकी वाईट परिस्थिती होती. परंतु जसजसे त्यांच्यातील काही जण चिकित्सकरित्या विचार करू लागले, तेव्हा मात्र अशा प्रकारच्या जीवघेण्या समस्यांना उत्तरे मिळू लागलीत. शहरात सांडपाण्याची व्यवस्था केल्यास मृत्युचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकते; सूक्ष्मजंतुमुळे रोग होतो व जलदरित्या प्रसार होतो; निर्जंतुकीरणामुळे उपचारादरम्यान दगावणाऱ्यांची संख्या कमी होते; प्रसूती किंवा शस्त्रक्रियेच्या वेळी सर्व साधने उकळत्या पाण्यात काही काळ ठेवून वापरल्यास नंतरच्या रुग्णाला जंतुसंसर्ग होत नाही; हात स्वच्छ धुतल्यामुळे रोगप्रसार टाळता येतो; आयोडीनयुक्त मीठ खाल्ल्यामुळे काही आजारांना रोखता येते; इत्यादी गोष्टी हळूहळू कळू लागल्या. रक्तातील पांढऱ्या पेशींना बाह्यजंतुंची अगोदरच ओळख करून दिल्यास शरीर त्या विशिष्ट रोगांचा सामना करू शकते या लसीकरण प्रकाराचा शोध लागला व प्रतिकारशक्तीत वाढ होऊ लागली.

वैज्ञानिकरित्या काटेकोरपणे संशोधन केल्यास रोगाचे मूळ शोधता येईल, यावर किमान वैज्ञानिक जगतात तरी दुमत नाही. परंतु वैज्ञानिक पद्धत ही अनेक वेळा फार खर्चिक व वेळखाऊ असू शकते. संशोधनात अचूकतेकडे व काटेकारपणाकडे जास्त लक्ष देत असल्यामुळे घिसाडघाई करून बाजारात औषधे आणून रुग्णांच्या माथी मारल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते. यासंबंधातील पूर्वीच्या कटु अनुभवांवरून हे शहाणपणा आल्यामुळे क्लिनिकल ट्रायल्स न घेता, प्रमाणीकरणाचे निकष न ठरवता बाजारात औषधे आणता येत नाहीत वा आणू दिले जात नाही. करोनावरही वैद्यकीय उपाय नक्कीच सापडतील व ही साथ नक्कीच आटोक्यात येईल. परंतु अफवा पसरवणाऱ्यास तेवढा दम कुठे?

आपल्याही देशातसुद्धा अफवांचे पीक तसूभरही कमी होत नाही. अवाच्यासवा दावे करणाऱ्यांची संख्याही कमी नसून त्या दाव्यांना बळी पडून अफवा पसरवणाऱ्यांच्या संख्येतही सतत वाढ होत असते. पैशाचा पाऊस पाडणारे, कुठल्या तरी झाड-पाल्याचे दोन थेंब डोळ्यात घालून लाखो अंधांना दृष्टी दिल्याचा दावा करणारे, उद्या ये उद्या ये (नाळे बा नाळे बा) म्हणून दरवाज्यावर लिहून भीतीत भर घालणारे, मंत्रोपचाराने, मंत्रित केलेल्या पाण्याने वा ‘सायन्टिफिक’ होम हवन करून असाध्य रोग बरे केल्याचा दावा करणारे, पोटावर हात फिरवल्यास मूल होणार याची खात्री देणारे, गोमूत्र सेवनातून करोना पूर्णपणे बरा होईल असे आश्वासन देणारे, इत्यादी चित्रविचित्र दावे करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. विविध माध्यमांतून या तथाकथित चमत्कारसदृश उपायांचा अपप्रचार होतच असतो; अफवा पसरत जाते व लोक बळी पडतात. आपल्या देशात (व इतर देशातसुद्धा) पाय रोवून असलेली बुवाबाजी व आर्थिक फसवणुकीचा मनोरा अफवांच्या भक्कम पायावर उभा आहे असे म्हणावयास वाव आहे. म्हणूनच शांत रहा व आपली कामे करत रहा असे सुचवावेसे वाटते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.