‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..!

आज मानव ‘विज्ञान’रूपी साधनांचा वापर करून निसर्गात घडणाऱ्या घडामोडींचा वेध घेऊ शकतो. माणूस जेव्हा आदिम अवस्थेत होता तेंव्हा भोवताली घडणाऱ्या घटनांचा अर्थ समजून घ्यायला त्याच्या ‘मेंदू’ला कसरत करावी लागत होती. मग काय? मेंदूच्या आवाक्यातील गोष्टींनुसार तो या साऱ्या जगाचा अर्थ लावायचा प्रयत्न करू लागला. तदनुसार तग धरून राहण्यासाठी उपाययोजनाही करू लागला. अर्थातच हे सारे ‘चुका आणि शिका’ स्वरूपात सुरू असताना मानवी मेंदूने अनेक क्लृप्त्या लढवण्यास सुरुवात केली. एकप्रकारे मानवप्राणी त्याच्याकडे असलेले ‘मेंदू’ नामक अजब अस्त्र वापरून या गजब दुनियेत दिमाखात वाटचाल करू लागला. याच प्रवासाचा एक भाग म्हणजे ‘कुणी’तरी या जगाचा पसारा चालवत असावे हा ‘अंदाज’! सुरुवातीच्या काळात या गृहीतकामुळे त्याच्यासाठी बरेच प्रश्न ‘सोपे’ झाले. यामुळे मानसिक पातळीवर काही निर्णय घेऊन ‘पुढे’ जाऊन पाहता आले.त्यावेळी काही गोष्टी या गृहीतकाशी जुळल्याचा भास होत होता व पुढील प्रवास तात्पुरता सुसह्य होत होता. 

हे गृहीतक म्हणजे आजचे ‘आस्तिक्य’ आहे. ह्या गृहीतकाच्या आधारावरच आजही आस्तिक माणूस मानतो की हे जग चालवणारा ‘कुणी’तरी अति-नैसर्गिक शक्तिशाली निर्माता आहेच. त्याशिवाय का इतक्या सूत्रबद्ध रीतीने जगाचा पसारा नियमितपणे चालू आहे? अर्थातच, हा तर्क कितीतरी गोष्टी आपल्याला ‘अज्ञात’ आहेत या कारणास्तव पुष्टिदाखल पुढे रेटला जातो. 

या गृहीतकाला नाकारणारे ते ‘नास्तिक्य’. त्यासाठी विज्ञानाचा, वैज्ञानिक पद्धतीचा आधार घेता येईल. विज्ञानामुळे मानवप्राणी निसर्गातील कोडी सोडवत आला आहे. त्याआधारेच कितीतरी गोष्टी, ज्या पूर्वी अगम्य स्तरावर होत्या, त्या आज समजू लागल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्यांवर नियंत्रणही करणे शक्य झाले आहे. कित्येक गोष्टींची पुढील वाटचाल काय असेल, हेदेखील वर्तवणे सोपे झाले आहे. 

तर अशा विज्ञानाचे एक साधे तत्त्व आहे. एखादी गोष्ट ‘सत्य’ म्हणून कधी स्वीकारावी? तर विशिष्ट नियमांप्रमाणे ती गोष्ट सिद्ध करता यायला हवी. एवढेच नाही तर, त्यात खरेच काही तथ्य असेल तर त्या नियमांचा वापर करून अगदी कुणालाही त्याची सिद्धता मांडता यायला हवी. जर एखादी ठराविक प्रक्रिया असेल, काही कृती असेल तर जो कुणी ती कृती/प्रक्रिया पूर्ण करेल त्यांनाही तोच परिणाम दिसायला हवा. म्हणजे व्यक्तिनिरपेक्ष सिद्धता… हीच सत्यता! 

तर… खरेच हे जग निर्माण करणारा असा ‘कुणी’तरी असेल, तर उद्या ही जगनिर्मितीची प्रक्रिया समजून घेऊन ‘कुणाला’ही अशी निर्मिती करता यायला हवी! निदान ‘हे जग कुणीतरी निर्माण केले आहे’ ह्या गृहीतकासाठीचे तर्क तरी सिद्ध करता यायला हवेत. तेव्हांच ते स्वीकारणे योग्य ठरेल… म्हणजेच, जोपर्यंत ‘आहे’ काय हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत ते ‘नाही’च आहे!

अभिप्राय 5

  • बीजगणितातील निगमन पध्दतीचा (Deduction method) आधार घेऊन,आपण ‘हे जग कुणी तरी निर्माण केले आहे.’ या गृहितकाचा पडताळा घेता येतो का ते बघुया.जसे आपल्याला वर्गसमीकरणाची मुळे माहित नसतील,तर दिलेल्या माहितीनुसार…”ती मुळे ‘x’ आणि’y’ मानू ” असे म्हणून आपण सुरूवात करतो.अगदी त्याचप्रमाणे,”हे जग कुणीतरी निर्मीले आहे.” असे आपण तात्पुरते गृहित धरूया.मग असा प्रश्न विचारता येईल की: निर्मात्याने हे जग कसे निर्मीले? आधी काहीतरी होते,त्यातून निर्मीले काय? तसे असेल तर त्याला आद्यनिर्माता का म्हणायचे? किंवा मग आधी काही नव्हतेच त्यातून निर्मात्याने हे जग निर्मीले ? तर आधी काहीच नव्हते ,तरीही त्यातून काहीतरी निर्मिले.हे मान्य करणे कठीण आहे.अशाप्रकारे,जगनिर्मात्याचा युक्तिवाद कात्रीत सापडतो. जे.एस.मिल यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे: माझ्या वडिलांनी मला शिकवले की, ‘मला कुणी निर्मिले ?’ हा प्रश्न विचारू नकोस,कारण लगेचच ,’ जगनिर्मात्याला’ कुणी निर्मीले?हा प्रश्न पुढे येईल.
    त्यामुळे,’हे जग कुणीतरी निर्मीले आहे.” हे गृहितक आपण माणसांनीच निर्मीले आहे ,यांची सतत जाण ठेवणे गरजेचे आहे.कारण ,या गृहितकावरूनतरी ,तो ‘आहे काय?’ हे निगामी तर्काने सिध्द करता येत नाही.

  • श्री. कलगुंडे आणि सुरोशे यांनी ही स्रुष्टी निर्माण करणारी कोणी अज्ञात शक्ती नसल्याचे पटवून देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. सुरोशे यांनी बीजगणिताचा आधार घेतला आहे. पण एखाद्या जास्त पिकलेल्या फळात जसे जिवंत किडे निर्माण होतात; त्यातलल्या रासायनिक प्रक्रियेचा अभ्यास करून शास्त्रज्ञ जीव निर्माण करू शकले आहेत काय? स्रुष्टीत अशा प्रकारे जीव कोण निर्माण करतो, या प्रश्नाचे उत्तर आहे काय? नास्तिक लोक कितीही परमेश्वराचे अस्तित्व मानत नसले; तरी त्यांच्यावर एखादे अनिवार्य संकट आले की, अभावितपणे ते सुध्दा त्या अज्ञात जग्नियंत्यालाच शरण जातात. या स्रुष्टित परमेश्वर जरी दिसत नसला तरी तो संकट समयी कोणत्या ना कोणत्या रुपाने मदत करतच असतो. पण नास्तिक त्याचे श्रेय परमेश्वराला देत नाहीत. पण अस्तिक मदत करणाय्राला, अइदी देवासारखा धाऊन आलास असे म्हणून परमेश्वराचे स्मरण करतात.

  • ‘क्ष’ ची ‘य’ विषयीची गैरसमजूत, आपल्याला ‘य’ विषयी जे सांगते , त्यापेक्षा अधिक ‘क्ष’विषयीच सांगते.त्यामुळे, बीजगणित हे शास्त्र म्हणून अप्रमाण ठरत असल्यास ,ते तसे अप्रमाण कधी ठरते?यासाठीच्या आवश्यक आणि पर्याप्त अटी(necessary and sufficient conditions) श्री.वेदकजी यांनी अगोदर स्पष्ट करायला हव्यात आणि नेमकं तेच त्यांनी केले नसल्याने ‘अयशस्वी प्रयत्न’म्हणजे काय असतो?याचं चांगलं उदाहरणच त्यांनी आपल्यासमोर प्रस्थापित आहे.

  • सुरोशेजी, बीजगणित हे शास्त्र नाही असे विधान मी केलेले नाही. पण नास्तिक लोक देवाचे अस्तित्व नाकारण्यासाठी वेगवेगळ्या अप्रस्तुत शास्त्रांचा आधार घेण्याचा प्रयत्न करत असतात. पण श्रध्दावान लोकांना परमेश्वराची प्रचिती येत असते आणि त्याची अडचण दूर झाल्यावर ते प्रामाणिकपणे त्याचे श्रेय परमेश्वराला देत असतात. हे मी केले, ते मी केले असे अहंकारी व्यक्ती म्हणत असते. पण खरे ज्ञानी लोक कधीच असे म्हणत नाहीत. या कलीयुगात परमेश्वराला प्रत्यक्ष पहाण्याची पात्रता लोकांत नसल्यामुळे श्रध्दावान व्यक्तीला देव हस्ते,परहस्ते मदत करत असतो. परमेश्वराचे अस्तित्व हा गहन विषय आहे. त्यामुळे मी अयशस्वी प्रयत्न केला हे ठरवणारे आपण कोण. याला सुध्दा अहंकारच म्हणावे लागेल. या स्रुष्टीची कर्तीकरवती एक शक्ती आहे; आणि तीच परमेश्वर आहे. ज्ञानेश्वर माऊलिंनी त्या शक्तीलाच “अद्या” असे संबोधिलेले आहे. ती शक्ती अद्या आहे. तिचा कोणी निर्माता नाही. पण या स्रुष्टीची निर्माती शक्ती तीच आहे. मी दिलेल्या उदाहरणात फळ जास्त पिकले की त्यात जीव उत्पन्न होतात. शास्त्रज्ञ त्याला रासायनिक क्रिया म्हणतात. पण तशीच रासायनिक क्रिया करून शास्त्रज्ञ जीव निर्माण का करू शकत नाहीत?

  • ईश्वराचे अस्तित्व, आत्म्याचे अमरत्व आणि संकल्पस्वातंत्र्य ही तत्त्वेदेखील नैतिक जीवनास आवश्यक वाटत असली, तरी प्रत्यक्षानुभवात अथवा तर्कबुद्धीने ती सिद्ध करता येत नाहीत. ती ‘अज्ञेय’च राहतात पण अज्ञेय असल्यामुळे ती असत्य आहेत असे ज्ञानही आपल्याला नसते व म्हणून नीतिप्रवण मनाला त्यांवर श्रद्धा ठेवता येते;परंतु असे असले तरीही,ती ‘सत्यच’ आहेच आहेत,याची अनुभव वा तर्काच्या सहाय्याने सिध्दी होईपर्यंत सत्यशोधक मनाने त्यांविषयी शंका बाळगणे हेसुद्धा नेहमीच युक्त ठरते.. अशाप्रकारे,माझी सद्य भूमिका एका प्रश्नकर्त्याची आहे,अहंमन्य व कृतक उत्तरे देणाऱ्याची नाही.ही अज्ञेयवादी(Agnostic) भूमिका आहे,आस्तिक वा नास्तिकाची नाही!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.