मनोगत

कुठल्याही शैक्षणिक संस्थेत एखादा विषय अभ्यासक्रमाच्या स्वरूपात घेतला जातो, तेव्हा त्या विषयावर लिहिलेल्या साहित्याकडे प्रमाणित साहित्य म्हणूनच बघितले जाते. तेव्हा ज्योतिषकलेत येणाऱ्या कुंडली, पत्रिका, ग्रह-ताऱ्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम या साऱ्यांविषयीची माहिती प्रमाणित होऊन सामान्य माणसाच्या मानसिकतेवर तिचा गंभीर परिणाम होण्याचा धोका संभवतो. ज्योतिष हे शास्त्र नाही हे सिद्ध करणारे अनेक प्रयोग झालेत, परंतु ते शास्त्र आहे असे आजवर तरी सिद्ध झालेले नाही या पार्श्वभूमीवर आम्ही ज्योतिषाला ‘कला’ असे संबोधले आहे.

ज्योतिषाची गरज माणसाला का पडते? याची मानसशास्त्राला माहीत असलेली अनेक कारणे आहेत. माणसाचे मन कधी असुरक्षिततेमुळे, अनिश्चिततेमुळे, काळजीपोटी कमकुवत बनते, कधी भावनेपोटी, मायेपोटी, परस्परसंबंध, बंध यांच्यामुळे नाजूक बनते. अशा प्रत्येकवेळी त्याला आत्मीयता, सहकंप, सहानुभूती इत्यादींचा आधार हवा असतो. अज्ञाताचे भय, कुतूहल, उत्कंठा या तर मानवाच्या मुलभूत प्रेरणा आहेतच. याच प्रेरणांमधून ‘आपल्या आयुष्यात पुढे काय होणार’ याबद्दलची असुरक्षितता आणि त्या अनुषंगाने ज्योतिष ही कला फळाला आली असे म्हणणे वावगे ठरू नये.

ज्योतिष हा विषय अभ्यासक्रमात घेण्यामुळे होणारा दुसरा धोकाही तितकाच गंभीर आहे. विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जेव्हा एखाद्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतात तेव्हा त्यांचा पुढील रोजगार हा त्या शिक्षणातूनच निर्माण होणार असे अभिप्रेत असते. जसे LLB चा विद्यार्थी पुढे वकीली करतो, MBBS चा विद्यार्थी वैद्यकीय व्यवसाय करतो, CA चे शिक्षण घेणारा पुढे टॅक्सेस, बॅलन्स शीट्स, इत्यादी वित्ताशी संबंधित कामे करतो (अपवाद वगळता). तर ज्योतिषशास्त्र हा विषय अभ्यासासाठी निवडणारे याला फक्त गमतीखातर, विज्ञानपूर्व जगाचा इतिहास म्हणून किंवा काल्पनिक शास्त्र म्हणून शिकणार नाहीत. त्यातून व्यवसायाच्या संधी शोधतील. एवढेच नव्हे, तर हा व्यवसाय चालत राहावा यासाठी नवे नवे ग्राहक शोधत राहाणे आणि ते टिकवून ठेवणे, आपली बाजारपेठ वाढवत राहाणे हे ते करतीलच. थोडक्यात काय, तर ज्योतिषाची पदवी म्हणजे शास्त्रशुद्ध नसलेल्या पद्धतीने ग्राहकांची फसवणूक करण्याचा परवानाच जणू.

असे वाटत असल्यामुळेच फलज्योतिषाला थोतांड म्हणणाऱ्यांचे वेगवेगळे मुद्दे वाचकांपर्यंत पोहोचावे असाच या अंकामागचा हेतू होता हे उघडपणे कबूल करायला आमची हरकत नाही. फलज्योतिष विशेषांकासाठी साहित्य मागवीत असता फलज्योतिषाच्या बाजूने एकही तर्कशुद्ध लिखाण येणार नाही आणि हा अंक एकांगी होईल अशी आम्हाला भीती होती. ती खरीही ठरली. परंतु तन्मय केळकर यांनी आपल्या लेखात ज्योतिषकलेला थोतांड न ठरवता त्याविषयीची एक वेगळी बाजू काही नेमक्या शब्दांत मांडली. त्यामुळे फलज्योतिषाची ही दुसरी बाजूही ‘आजचा सुधारक’च्या वाचकांसमोर चर्चेसाठी आणता आली हे विशेष!

या अंकातून लोकांच्या मनातील अनेक शंकांना/प्रश्नांना उत्तरे मिळतील, अनेक नवे प्रश्नही उभे राहतील. त्या सर्व प्रश्नांचे स्वागत.

प्राजक्ता अतुल
समन्वयक, आजचा सुधारक
०९३७२२०४६४१

अभिप्राय 3

  • खर तर मी हा लेख पाठवणार होतो. पण आता इथे देतो.

    **या ज्योतिषाच काय करायच?**
    -प्रकाश घाटपांडे
    सिगारेट पिणे आरोग्यास अपायकारक आहे हे वैज्ञानिक दृष्टया सिद्ध झाले आहे. त्यासाठी संख्याशास्त्रीय चाचण्याही घेण्यात आल्या. त्यातील निष्कर्षानुसार ते आरोग्यास अपायकारक असल्याचे सिद्ध झालेने ते पाकिटावर वैधानिक इशारा म्हणून छापणे सक्तीचेही केले. तो इशारा वाचणे हे सिगारेट पिणाऱ्याना सक्तीचे नसले तरी त्याची त्यावर नजर जावी एवढया मोठया अक्षरात तो छापला गेला. मोठा आणि ठळक वाटला तरी त्यावर वाचकाची नजर स्थिरावणार नाही असा फॉन्ट जाहिरात कंपन्या वापरतात. बहुसंख्य लोक तो एकदा तरी नजरेखालून घालतात. तो वाचून किती लोकांनी सिगारेट पिण्याचे सोडून दिले आहे? सिगारेट पिणाऱ्यांमध्ये विद्वान , बुद्धीजीवी लोक नाहीत काय? या इशाऱ्याशी सहमत असणारे कित्येक डॉक्टर्स सुद्धा या सिगारेट पिणाऱ्यांमध्ये आहेत.
    मग फलज्योतिष हे विज्ञान नाही असे प्रयोगांती सिद्ध झाले तर त्यामागे धावणाऱ्यांचे प्रमाण किती कमी होईल? ते विज्ञान आहे अशा भूमिकेतून फलज्योतिषावर विश्वास ठेवणारे व त्याचा वापर करणारे लोक किती?
    वैज्ञानिक दृष्टिकोणातून एखाद्या गोष्टीकडे बघताना बहुसंख्य लोकांचा विश्वास ही बाब गौण ठरते.वस्तुनिष्ठ चाचणी घेवून, त्याचे पुन:पुन: प्रयोग करुन मगच निष्कर्ष काढणे ही गोष्ट आवश्यक ठरते. फलज्योतिष हे विज्ञान आहे की नाही हे ठरविण्याकरिता जे निकष लावावे लागतात ते निकष ज्योतिषांना मान्य आहेत की नाहीत? हा मुद्दा महत्वाचा ठरतो.नारळीकरांनी आवाहन केलेल्या ज्योतिषाच्या चाचणीचा कळीचा मुद्दा तोच आहे. फलज्योतिष हे विज्ञान आहे असे समर्थन करणाऱ्यांना जेव्हा कळून चुकले की हे विज्ञान ठरणे अवघड आहे त्यावेळी त्यांनी त्याला हे भौतिक विज्ञान नाही अशी भूमिका घ्यायला सुरवात केली काहींना ते विज्ञान म्हणून सिद्ध होण्याची गरजच वाटत नव्हती. कारण ते वस्तुनिष्ठ असण्या ऐवजी ते व्यक्तिनिष्ठ असण्यातच त्यांचे हित होते. वस्तुनिष्ठ गोष्टींचे विश्लेषण हे गुंतागुंतीचे असले तरी संगणक युगात हे विश्लेषण सहज शक्य आहे. परंतु तारतम्य हा घटक जो माणसाकडे असतो तो संगणकाकडे नसतो.त्यामुळे संगणाकाच्या आधारे फलज्योतिष शास्त्र आहे की नाही हा निर्णय लावणे उचित नाही असे काही ज्योतिषी लोकांना वाटते.
    समजा, भविष्यात हा निर्णय लागला आणि फलज्योतिष हे शास्त्र नाही हे सिद्ध झाले. पुढे काय? एखादी गोष्ट शास्त्र नाही म्हणून ती काय लगेच त्याज्य बनते काय? हा प्रश्न उपस्थित होतोच. मेघमल्हार राग म्हटल्याने पाउस पडत नाही. कुठलेही संगीत हे २० हर्टझ ते २० किलो हर्टझ या ध्वनीलहरींच्या मर्यादेतच आहेत. कुठल्याही स्वरांची जुळवाजुळव कशाही पद्धतीने केली तरी ही मर्यादा ओलांडता येत नाही. या ध्वनी लहरींचे भौतिक गुणधर्माचे मोजमाप करता येते पण या ध्वनी लहरीतून निर्माण झालेले संगीत हे कुणाला किती आनंद देईल याचे मोजमाप भौतिक शास्त्रीय कसोटयातून करता येणार नाही.
    फॅन्टसी म्हणजे वास्तव नव्हे. पण तरीही माणूस त्यात गुंगून जातो. बहुतेक कविकल्पना या वास्तव नाहीत. शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी … या कवितेची चिरफाड करुन शुक्र हा तारा नाही तो ग्रह आहे असे म्हणून त्याचे रसग्रहण होउ शकेल काय? रामसे बंधूंच्या भयपटांचे ‘थ्रिल` एन्जॉय करणारे, दुरदर्शनच्या गूढ मालिकां गूढ एन्जॊय करणारे पण रसिक प्रेक्षक आहेत ना.
    भविष्य काळात डोकावण्याचे प्रयत्न पूर्वीपासून चालू आहेत. ते तसे असणंही स्वाभाविक आहे. खगोलीय स्थिती व भूतलीय घटना यांचा परस्पर काही संबंध आहे का? हे तपासण्याच्या प्रयत्नातूनच मेदिनीय ज्योतिषाचा जन्म झाला. नक्षत्र व पाउस यांचा परस्पर संबंध हा याच प्रकारात मोडतो. कृषीप्रधान काळात शेतीची कामे कुठल्या नक्षत्रावर करावीत हा ज्योतिषातील संहिता स्कंधाचा भाग आहे.खगोलीय घटनांचा भूतलीय घटनांशी संबंध व पुढे भूतलीय घटनांचा तुमच्या सुखदु:खाशी संबंध. याच सूत्रातून खगोलीय घटनांचा तुमच्या सुखदु:खाशी संबंध लावण्याच्या प्रयत्नातून होरा या स्कंधाचा म्हणजेच फलज्योतिषाचा जन्म झाला.
    भूतकाळात घडलेल्या घटनांतून काही सूत्र मिळते का ते पाहून भविष्य काळाविषयी काही अडाखे बांधण्याची कल्पना निर्माण झाली. काही आडाखे बरोबर यायचे तर काही चुकायचे. मग सूत्र चुकतयं की त्याच्या अन्वयार्थावरुन बांधलेले आडाखे चुकतायेत याचे विश्लेषण चालू झाले. आजतागायत हे विश्लेषण चालूच आहे.
    *मटका ज्योतिष*
    मटका किंवा एक आकडी लॉटरी मध्ये चाळीस पन्नास आठवडयाच्या निकालातून काही सूत्र मिळते का? हे पहाणे याला लाईन म्हणतात. त्यातून काही आडाखे काढून नंगा, अपोझिट व सपोर्टिंग असे नंबर काढले जातात. नंगा म्हणजे एकच ’फिट्ट’ वाटणारा आकडा काढणे. अपोझिट म्हणजे एखादे सुलट चित्र काढल्यानंतर उलट चित्रही काढणे; न जाणो काळाला सुसंगत वाटणारी प्रतिमा ही आपल्या दृष्टीने उलट असेल तर? सपोर्टिंग म्हणजे उलट सुलट प्रतिमा झालेवर त्या प्रतिमेला पूरक वाटेल असे चित्र काढणे. आता येणारे हे चित्र ० ते ९ या आकडयांमध्येच असणार हे उघड आहे. समजा तुम्ही ठरविलेल्या चित्रांपैकी एक चित्र न येता वेगळेच चित्र आले तर इथे लाईन तोडली असे म्हणतात. एखद्याचे नंगा चित्र बरोबर आले तर त्याची लाईन फिट बसली असे म्हणता येते. नंगा आकडा खेळण्याची रिस्क नको म्हणून नंग्याच्या सोबत अपोझिटही खेळला जातो. ही रिस्क अजून कमी करण्यासाठी या दोन्ही सोबत सपोर्टिंगही खेळला जातो. कुठलाही आकडा येण्याची शक्यता दहात एक म्हणजे दहा टक्के असते. अपोझिट व सपोर्टिंग खेळल्यामुळे ती अजून वीस टक्के वाढते. तरीसुद्धा जर आकडा आला नाही तर इथे लाईन तुटली. एखाद्याची लाईन तुटली असेल तर दुसऱ्या कुणाची तरी लाईन फिट बसली असे घडू शकते. कारण त्याचे सूत्र हे वेगळे असते. म्हणजे कुणाचे तरी चित्र बरोबर आलेच ना! ज्योतिषांचीही भाकितचित्रे ही साधारण अशाच प्रकारची असतात. तुमच्या मनातील भूत वर्तमान वा भविष्याबाबत एखादा चित्ररुपी आकडा एखाद्या ज्योतिषाचा नंगा येतो, एखाद्याचा अपाझिट येतो तर एखाद्याचा सपोर्टिंग येतो. एखाद्या ज्योतिषाची लाईन तुटली तरी दुसऱ्या ज्योतिषाची लाईन फिट्ट बसते. सातत्याने मटका वा लॉटरी खेळून श्रीमंत झालेला माणूस अभावानेच मिळेल पण मटका खेळवून वा लॉटरी विकून श्रीमंत झालेले अनेक दिसतील. मटका किंवा लॉटरी ची लाईन काढून द्यायचा उद्योग करणारे काही लोक असतात. लाईन फिट बसली तर स्वत:हून लाभार्थी आपल्यातला काही वाटा या आकडेशास्त्री लोकांना देतो. नाही लागला आकडा तर त्याचे नशीब! ज्योतिषी लोकांचेही तसेच आहे. चुकले भाकित तर जातकाचे नशीब! बरोबर आले तर ज्योतिषाचा लाभ! जातकाचे भविष्य बरोबर येण्यासाठी जातक आणि ज्योतिषी यांचे परस्पर ग्रह जुळावे लागतात तरच ते भाकित बरोबर येते ते जर जुळले नाही तर महान ज्योतिषाने केलेले भाकित सुद्धा चुकते आता बोला?
    असो! तर जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत फलज्योतिषाला मरण नाही हेच आमचे भाकित!
    ( उपक्रम, मिसळपाव व मायबोलीवर पूर्वप्रकाशित)

  • महत्वाचा अंक! फल ज्योतिषाला कोणताही तर्कशुद्ध आणि शास्त्रशुद्ध आधार नाही हे सांगायला तर्काची आवश्यकता नाही.. कारण हे तथाकथित शास्त्र – म्हणजे याची गृहितकेच – मुळात तर्क किंवा आधुनिक विज्ञान यांच्यावर आधारित नाहीत. तरी सुद्धा जगभर संस्कृतीच्या नावावर म्हणा किंवा श्रद्धा, विश्वास, धर्म वगैरेचा आधार घेउन म्हणा याला बढावा देणारे अनेक आहेत. मात्र याला उघड उघड सरकारी मान्यता आणि प्रतिष्ठा प्रथमच मिळत असावी. याच कारणानं समाज प्रबोधनाची आवश्यकता वाढली आहे. हे करतांना सर्व संस्कृती, परंपरा, इतिहास यांना नाकारून हे साध्य होणार नाही. आर्यभट, वराहमिहीर, ब्रह्मगुप्त, नीळकंठ, भास्कर-२ इत्यादी ज्योतिर्विदांचे (ज्योतिषांचे नव्हे) ऋण मान्य करून आणि त्यांचाच आधार घेउन हे करता येईल का हे पहायला हवे. नारळीकरांनी हा प्रयत्न काही प्रमाणात केला. पण तो मोठ्या प्रमाणात व्हायला हवा असं वाटतं. थोडक्यात संस्कृतीचाच आधार घेऊन संस्कृतीचा त्याज्य भाग बाजूला करता येईल का हे पहायला हवे. यात कठोर चिकित्साही आली. मला वाटतं हे सर्व मार्ग आजचा सुधारक आणि त्याचे सुशिक्षित वाचक यांना माहीत आहेत.. आणि आपल्या परीनं आ.सु. हे काम करतोच आहे. त्याबद्दल आ.सु.आणि त्याचे संचालक, संपादक, वाचक या सर्वांना धन्यवाद!

  • ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी….. प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तकाच्या वेळी लिहिलेलेल माझे लेखक नात्याने मनोगत.

    ”तू ज्योतिषाचा कोर्स कुठं केला?“ असा एक प्रश्न मला हमखास विचारला जातो. पण मी कुठंही कोर्स केला नाही. हे सांगितलं तर त्यांना पटत नाही. या विषयातले ग्रंथ,लेख, व्याख्यानं, चर्चासत्र, अधिवेशन आणि आपली शिकण्याची इच्छा हेच आमचे गुरु. या विषयांत मी जातक, विद्यार्थी, अभ्यासक, समर्थक, ज्योतिषी, चिकित्सक अशा सर्व पातळयांवर अनुभव घेतले.
    भविष्याविषयी उत्कंठा असणं ही अत्यंत स्वाभाविक आहे. केवळ उत्कंठे साठी ज्योतिषाकडे येणारी माणसे कमी व अडचणीत आहे, संकटात आहे म्हणून मार्गदर्शनासाठी येणारी माणसेच जास्त. मनुष्य अडचणीत असला की चिकित्सा वगैरे असल्या भानगडीत तो पडत नाही. साहजिकच श्रद्धा हाच भाग मग जोपासला जातो. आपल्या धर्मामध्ये चिकित्सेला मोठी परंपरा आहे. फलज्योतिषात विविध मतप्रवाह आहेत. पण तरीही ज्योतिष विषयाला एक गूढ वलय प्राप्त झालेले आहे. तोडगे,यंत्र, मंत्रतंत्र, दैवी उपाय, सिद्धी, उपासना या गोष्टी ज्योतिषापासून वेगळया करता आलेल्या नाहीत.
    ज्योतिषी आणि जातक यांच नातं हे आपल्याकडे डॉक्टर आणि रुग्णा सारखं आहे. तिथ अपेक्षा असते समीक्षा नसते. ज्योतिषाविषयी विविध क्षेत्रातल्या लोकांची मते अजमावण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. परिवर्तनवादी चळवळीतल्या लोकांना जेव्हा आपला ज्योतिषावर विश्वास आहे का? असा प्रश्न विचारतो तेव्हा तो त्यांना अडचणीचा वाटतो. ” आमचा तसा विश्वास नाही. पण …….“ ” आपला त्यातला काही अभ्यास नाही.“ पण त्या विषयाच्या अंतरंगात डोकवावे असे काही वाटत नाही. ज्योतिष हा विषय सोपा करुन सांगावा असं खूप दिवस मनात होतं. पण कितीही सोपं केलं तरी ते लोकांना अवघडच वाटत राहीलं. मग हा विषय लोकांच्याच मनातल्या प्रश्नांमधून मांडला तर? असं मनात आल्यावर त्या चष्म्यातून उत्तरे शोधू लागलो आणि या पुस्तकाचा जन्म झाला.
    माझे जेष्ठ स्नेही श्री. माधव रिसबूड यांचेशी वेळोवेळी होणारी अनौपचारीक चर्चा हा तर या पुस्तकाचा पाया आहे. ग्रहांकित मासिकाचे संपादक मा. चंद्रकांतजी शेवाळे उर्फ दादा यांचेशी गप्पा मारताना त्यांनी मर्मावर अचूक बोट ठेवले. ते म्हणाले, ” सर्वसामान्य माणसाला ज्योतिषाकडे जावंस वाटाव अशीच इथली सामाजिक परिस्थिती आहे. ती जेव्हा बदलेल त्या वेळी ज्योतिषाकडे जाणारा वर्ग आपोआप कमी होईल.“
    हे पुस्तक चिकित्सकांनी सर्वसामान्य माणसांच्या चष्म्यातून वाचावे, सर्वसामान्य माणसांनी चिकित्सकांच्या चष्म्यातून वाचावे आणि ज्योतिषांनी अंतर्मुख होउन वाचावे असं अपेक्षित आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.