महिला नाहीत अबला… पण केव्हा?

Image by Wokandapix from Pixabay
Image by Wokandapix from Pixabay

निसर्गात कोणतीही गोष्ट साचून राहिली की दूषित होते. प्रवाहीपणा व बदल हा निसर्गाचा नियम आहे. पण आपली जातिसंस्था, कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, समाजातील रूढी-परंपरा गतकालानुगतिक जशाच्या तशा आहेत व आतल्या आत सडत आहेत. काळ बदलला तसे संदर्भही बदलले. तेव्हा या सर्व संस्थांमध्ये, रूढी-परंपरांमध्ये बदल करून त्यांना बदलत्या समाजरचनेप्रमाणे सुटसुटीत, प्रवाहित व काळानुरूप करण्याची गरज आहे. म्हणूनच पुरुषी वर्चस्व झुगारण्याची सुरुवात कुटुंबातील स्त्रियांनाच करावी लागेल. वैचारिक दुर्बलता मागे टाकून प्रगतीची उत्तुंग झेप सर्वसामान्यांनी घेण्यासाठी योनिशुचितेचे अवडंबर दूर करून नैसर्गिकतेने जगणे आवश्यक आहे. बलात्कारासारखी एखादी घटना घडली तर तो अपघात समजून योनिशुचितेला महत्त्व न देता सहजपणे इतर दुर्घटनांप्रमाणे त्याकडे बघावे लागेल. अर्थात त्यासाठी मानसिक तयारी करणे आवश्यक आहे. पण आजच्या आधुनिक काळातही आपल्या समाजात स्त्रीची समानता आभासीच आहे. जी काही थोडीफार समता व स्वातंत्र्य स्त्रीला मिळालेले दिसते, ते तिला शिक्षणाने आलेल्या समाजभानामुळे, तिच्या मानवी हक्कांच्या जाणिवेमुळे, कायद्यामुळे आणि एकंदर जगातच वाहणाऱ्या स्वातंत्र्य, समता इत्यादी तत्त्वांच्या विचारप्रवाहामुळे. परंतु मुळात जाऊन पाहिले तर सरंजामी वृत्तीतून येणारी पुरुषी वर्चस्वाची मानसिकता व त्यातून निपजणारी विवेकहीनता बदललेली नाही. उलट अंत:करण हेलावून टाकणाऱ्या प्रसंगी ती वाढलेलीच दिसते आणि तिने नृशंस हिंसेचे रूपही घेतलेले दिसते.

आपल्या समाजातील परंपरागत धारणांमुळे पुरुषी वर्चस्वाच्या मानसिकतेचा परिपोष तर होतोच पण त्यातून स्त्रीबद्दल पुरुषांच्या ठायी असूया निर्माण झाली आहे ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. स्त्री तिला लाभलेल्या कायदेशीर स्वातंत्र्यामुळे, शिक्षणामुळे व अंगच्या गुणवत्तेमुळे जे नेत्रदीपक यश मिळवत आहे ते पुरुषांना आपल्या वर्चस्वाला बसलेला धक्का वाटतो. मी पुरुषांकडून स्त्रीच्या गुणवत्तेविषयी आदराऐवजी असूयेने भरलेली व स्त्री-स्वातंत्र्यावरील संतापाने खदखदणारी अनेक विधाने ऐकली आहेत. या रोषाचे प्रकटीकरण पुरुषी वर्चस्व जिथे हमखास दाखविता येईल अशा बलात्कारात व स्त्रीवरील हिंसाचारात होते. यावरील उपायांची सुरुवात स्त्रीने स्वत:पासूनच करायला हवी. पुरुषांनी केलेले विविध अन्याय व अत्याचार यांपुढे ती मान का तुकवते? मुलांना घडविण्याचे काम स्त्रियांच्या हातात असते. तिने ठरवले तर पुरुषी वर्चस्वाची मानसिकता ती आपल्या कुटुंबात बदलू शकते. मात्र त्यासाठी तिने स्वत:च्या मनातूनही पुरुषी वर्चस्वाची मानसिकता पुसून टाकावयाला हवी. पुरुषी वर्चस्वाची सुरुवात अगदी नवरा-बायको एकमेकांना निवडतात तेथूनच होते. नोकरी करणारी स्त्री कायम घर आणि संसारही सांभाळते. या परंपरेला छेद दिला तरच पुरुषी वर्चस्वाची मानसिकता बदलू शकेल. त्यासाठी संपूर्ण जीवनशैलीच बदलली पाहिजे.

स्त्रियांनी आई झाल्यावर अगदी लहानपणापासूनच आपल्या मुलांना वाढवताना मुलगा/मुलगी असा भेद खेळणी वा घरातील कामे यांत करू नये. मुलांवर स्त्री ही एक व्यक्ती आहे असे बिंबवून तिचा आदर करण्याचे संस्कार करायला हवेत. मुलींना मुलांसारखेच स्वसंरक्षणाचे बाळकडू पाजायला हवे. मुलांना “तू बायल्यासारखा का वागतोस? हातात बांगड्या भरल्या आहेस का? मुलीसारखा मुळूमुळू काय रडतोस?” अशाप्रकारचे स्त्रीला कमी लेखणारे, दुय्यम समजणारे आणि भेदभाव करणारे संस्कार करू नयेत. वयात येणाऱ्या मुलामुलींना योग्य शब्दात शास्त्रीय माहिती दिली तर मुले मुलींकडे फक्त शारीरिक दृष्टीने बघणार नाहीत. शारीरिक बदल ही एक नैसर्गिक घटना आहे आहे असे समजून एकमेकांकडे निकोप दृष्टीने पाहायला शिकतील. घरातील मुलींना त्यांच्या आवडीचे शिक्षण दिले पाहिजे. शिवाय त्यांना शारीरिक सामर्थ्य कमावण्यासाठी, स्वत:चे संरक्षण स्वत:ला करता यावे यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे. शाळेमध्ये मुलामुलींसाठी आठवड्यातील काही तास पाककलेचे दिले पाहिजेत. रोजच्या आहारातील खाद्यपदार्थ सर्व विद्यार्थ्यांना करता आलेच पाहिजेत. हा विषय सक्तीचा असावा. सायकल किंवा स्कूटर चालवणे, पोहणे ही कौशल्ये शाळेतच विकसित व्हावीत. त्यात मुलगा-मुलगी असा फरक केला जाऊ नये. मुलींचा व्यक्तिमत्त्वविकास झाला की तिला आपोआप समाज आदराने वागवेल. मुलाला लहानपणीच जर घरातील कामे करण्याची सवय लावली तर त्याची पुरुषी वर्चस्वाची मानसिकता आपोआप कमी होईल. अशाप्रकारे जर घरातच मुलामुलींना समान वागणूक देऊन वाढवले तर पुढच्या पिढीत बलात्काराचे प्रमाण नक्की कमी होईल.

आपल्या व्यवस्थेतील रूढी, परंपरा आणि चुकीच्या प्रथा यांमुळे वेगवेगळ्या पातळ्यांवर सोसावे लागणाऱ्या अनेक स्त्रिया असतात. आम्ही जेव्हा स्त्रीवादाविषयी बोलतो तेव्हा अनेकदा त्याच्याविरोधात एक मुद्दा मांडला जातो, तो म्हणजे, ‘स्त्रीच स्त्रीची शत्रू असते.’ मला स्वत:ला हे मान्य नाही. या व्यवस्थेने स्त्रीला दुसऱ्या स्त्रीची शत्रू व्हायला भाग पाडले आहे. सतत एक असुरक्षित वातावरण तिच्याभोवती निर्माण केले गेले. शील, अब्रू, पावित्र्य असे शब्द तिच्या शरीराशी जोडले गेले, वंशाचा दिवा म्हणजे मुलगा जन्माला घालण्याची सक्ती तिच्यावर केली गेली, ती कमजोर आहे आणि तिला शारीरिकष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या पुरुषावरच अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नाही, असे सतत सांगितले गेले. त्यामुळे अनेकदा आपल्याशिवाय पुरुषाच्या आयुष्यात असलेल्या इतर स्त्रियांशी ती सतत स्पर्धा करत राहिली, मग ती त्याची आई असो, बायको असो की बहीण असो की मैत्रीण असो. जेव्हा स्त्री आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्याही पुरुषावर अवलंबून राहणे बंद करेल तेव्हा दुसऱ्या स्त्रियांना शत्रू मानण्याचे ती बंद करेल. स्त्री ही एखाद्या पुरुषाची – या व्यवस्थेने व्याख्या केली आहे – तशी बायको होण्यापेक्षा मैत्रीण झाली आणि एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वत:कडे पाहायला लागली आणि पुरुषही तिचा एक जिताजागता माणूस म्हणून सन्मान करायला लागला, तर ती खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता असेल.

सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई आदी अनेक विदुषींवरील परंपरा तोडण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांवर झालेल्या जहरी टीका व मानसिक प्रहार हे पुरुषसत्ताक मानसिकतेचे विकृत स्वरूप सिद्ध करतात. हीच पद्धत थोड्याफार फरकाने आजही दिसून येते. हेच कर्तबगार स्त्रियांच्या चारित्र्यावर करण्यात येणाऱ्या टीकेवरून लक्षात येते. स्त्रीला उडण्यासाठी आकाश उपलब्ध करून दिले गेले तरी पक्षी म्हणून भरारी मारू देण्यापेक्षा पतंग बनवून त्याच्या दोऱ्या स्वत:च्या हातात ठेवण्याचा दुटप्पीपणा हे या पुरुषप्रधान समाजाचे वैशिष्ट्यच जणू! नमूद करण्याची गोष्ट म्हणजे फक्त पुरुष हेच पुरुषप्रधान संस्कृतीचे घटक नसतात, तर या पुरुषप्रधान संस्कृतीला बळकट करणारा प्रत्येक घटक हा पुरुषप्रधानच असतो. म्हणूनच स्त्रियासुद्धा पुरुषप्रधान वृत्तीच्या असू शकतात. स्त्रियांचा लढा, त्यांचे प्रश्न याकडे केवळ स्त्रीवादी दृष्टिकोनातून न पाहता मानवतावादी दृष्टीने पाहिले तरच शोषण थांबून खरी समानता प्रस्थापित होईल.

आज मात्र कळप-समूह-समाज ही आजवरची कालसंक्रमणा विसरून उलट दिशेने भूक आणि वासना या आदिम प्रेरणेपर्यंत आपण प्रवास करतो आहोत, असे सद्य:स्थितीवरून वाटते. बाहेरच्या रावणाची भीती घालून स्त्रीसाठी परंपरेच्या लक्ष्मणरेषा आखल्या गेल्या. मातृत्वाचे गोडवे व अन्नपूर्णेचे वरदान यांच्या अवाजवी महतीने तिला चूल व मूल यामध्येच आजन्म कैद केले. संसाराच्या गाभाऱ्यात एकदा प्रतिष्ठापना झाली की तिने आयुष्यभर देवपण ‘सोसायचे’ हा दंडकच झाला. तिची देवता म्हणून पूजा करण्याऐवजी, माणूस म्हणून आदर केला तर तिच्या अस्तित्वाला खरा अर्थ येईल.

आपल्याकडे आदर्श पुरुष व आदर्श स्त्री यांच्या संकल्पना अगदी विरोधाभास दाखवणाऱ्या आहेत. ज्या पुरुषाकडे नेतृत्वकौशल्य आहे, आत्मविश्वास, धडाडी आहे तो आदर्श पुरुष व खाली मान घालून जगणारी, वडिलधाऱ्यांचे ऐकणारी, कुटुंबासाठी खपणारी ती आदर्श स्त्री. खरे तर स्त्रिया या पुरुषांची प्रेरणा ठरतात, जेणेकरून त्यांना जग जिंकायला स्फुरण मिळते. स्त्रीला स्वातंत्र्य हवे ते नेमके कोणापासून? पिता, पती, संसार की समाज? म्हणजेच स्त्रियांनी स्वत:च्या स्वातंत्र्याच्या अपेक्षांची निश्चिती करायला हवी. समाजाच्या मानसिकतेत बदल महत्त्वाचा आहे. जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत आपण मानलेली अथवा जाणलेली समानता प्रत्यक्षात येणे अवघड आहे. समानता म्हणजे दोघांनी एकमेकांच्या प्रगतीसाठी पोषक वातावरणनिर्मितीचा प्रयत्न करणे व निर्भेळ सहजीवन अनुभवणे. प्रत्येक स्त्रीने व पुरुषाने असे करण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने समानता अस्तित्वात येईल.

१९७५ सालापासून ८ मार्च हा ‘महिला दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. स्त्रियांमध्ये शिक्षणाचीही वाढ झाली आहे. पण ह्या सुशिक्षित महिला आजही मोठ्या प्रमाणात जेव्हा वेगवेगळ्या बाबा-बुवांच्या दरबारात वाढत्या संख्येने उपस्थित रहातात, वेगवेगळ्या कर्मकांडात हिरीरीने सहभागी होतात, आसारामबापूंच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करतात, मोठ्या भक्तिभावाने उपासतपास आणि व्रतवैकल्ये करतात, तेव्हा त्यांना स्वातंत्र्याचा अर्थ उमगला आहे की नाही असा संभ्रम पडतो. कारण ह्या सगळ्या अंधश्रद्धा स्वातंत्र्याला बाधक आहेत हे त्यांच्या लक्षातही येत नाही. अंधश्रद्धा ठेवणे म्हणजे मानसिक गुलामी स्वीकारणे आणि धर्माने व रुढींनी लादलेली बंधने स्वीकारणे आहे. त्यामुळे अशा अंधश्रद्धाळू महिलांनी ‘महिला दिन’ कितीही जोमाने साजरा केला तरी त्या स्वतंत्र आणि सक्षम कशा होणार?

शिक्षणाने त्या फक्त साक्षरच बनत असतील तर काय उपयोग? शिक्षणाने त्यांच्या विचारात प्रगल्भता आली पाहिजे. ‘महिला दिन’ म्हणजे स्त्रीमुक्ती दिन म्हणजेच पुरूषीवृत्ती जी स्त्रियांना वस्तू समजते, दासी बनवते त्या विरोधातील लढा आहे हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. तरच हा दिवस खऱ्या अर्थाने साजरा केल्याचे समाधान मिळेल आणि अबला महिलांचे सबला महिलांत रूपांतर होईल.

अभिप्राय 1

  • खूप छान मांडणी आहे.8 मार्च हा सुद्धा एक सण होऊ पहात आहे.या दिवसी फक्त महिला म्हणून सरसकट महिलांचा मान – सन्मान,सत्कार होतो.पुरूषांना आणि स्त्रीयांना वाटते,’झाली स्त्री-पुरूष समता’ पण या निमित्ताने जे विवाहित पती-पत्नी नव्हे तर मित्र -मैत्रीण म्हणून जगतात त्यांचाच सत्कार करायला हवा.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.