स्नेह.
निवडणूक आयुक्त हा ‘यस-मॅन’, होयबा नसावा असे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना सांगावे लागते. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेला प्रचार आणि प्रसारमाध्यमे काडीचेही महत्त्व देत नाहीत. निव्वळ बातमी म्हणूनही त्याची दखल घेतली जात नाही. माध्यमांतील ‘होयबां’मुळे अनेक महत्त्वाच्या घटना जनतेसमोर येत नाहीत किंवा त्या घटनांबद्दलचे सत्ताधीशांना हवे तेच नॅरेटिव्ह समोर येते. राज्यकर्त्यांना गैरसोयीच्या होतील अशा घटनांविषयी बोलणारा एखादाच रवीशकुमार असतो. आणि त्यालादेखील ‘नमस्कार! मैं रवीशकुमार, अब आप टीव्ही पर ये नहीं सुनेंगे!’ असे म्हणून निघून जावे लागते.
हे सारे मुद्दे आपल्याला बोलते आणि लिहिते करण्यासाठी पुरेसे आहेत.
पुणे येथे १८ डिसेंबर २०२२ ला ‘ब्राईट्स सोसायटी’तर्फे आयोजित नास्तिक परिषद होणार आहे. या पार्श्वभूमिवर अनेक प्रश्न साहजिकच समोर येतात. समाजात पसरलेली दांभिकता आणि अंधश्रद्धा यांचेशी सामना कसा करावा? विवेकवादी विचारांचा नास्तिक्याशी ताळमेळ कसा बसतो? आस्तिक लोक या परिषदेकडे कसे बघतात? आपला अंक प्रकाशित होईल तोवर ही परिषद झालेली असेल. तर या निमित्ताने बुद्धिप्रामाण्याचे, तर्कशुद्ध विचारांचे तसेच वैज्ञानिकतेचे महत्त्व यावरही आपल्याला लिहिता येईल. या परिषदेत चर्चिलेले मुद्देही ‘आजचा सुधारक’च्या ह्या अंकात घेता येतील. ह्यासाठी परिषदेच्या आयोजकांना आणि परिषदेत उपस्थित असणाऱ्यांसही हे आवाहन.
आपले साहित्य लेख, निबंध, कविता, कथा, रेखाचित्रे, व्यंगचित्रे, ऑडिओ, व्हिडीओ अशा कुठल्याही स्वरूपात पाठवू शकता. शब्दमर्यादा नाही. आपले साहित्य २५ डिसेंबरपर्यंत aajacha.sudharak@gmail.com यावर पाठवा अथवा +91 9372204641 ह्या क्रमांकावर WhatsApp च्या माध्यमातून पाठवा.
– प्राजक्ता अतुल
समन्वयक, आजचा सुधारक