मनोगत

सादर निरोप

नंदा खरेंनंतर एका वर्षाच्या आत ‘आजचा सुधारक’ने आणखी दोन खंदे विचारवंत गमावले.

सुनीती देव

लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ता, विवेकी विचारवंत, आणि ‘आजचा सुधारक’च्या संपादकमंडळात अनेक वर्षे कार्यरत सुनीती देव ह्यांचे २ मे २०२३ ला निधन झाले. अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयात त्या तत्त्वज्ञान विषयाच्या प्राध्यापिका होत्या. परंतु नागपुरात त्यांची ओळख फार वेगळी होती. सुनीतीताई जगन्मित्र होत्या. त्यांचे सोबत असणे अतिशय आश्वासक वाटे. त्यांचे हास्य केवळ त्यांच्यापुरते नसून संपूर्ण वातावरणात आह्लाद पसरवणारे होते.

‘आजचा सुधारक’च्या अगदी सुरुवातीपासून (तेव्हाचा, नवा सुधारक) त्या संपादकमंडळात तर होत्याच, पण तेव्हा वर्गणीदारांची यादी बनवण्यापासून, पत्ते आणि तिकिटे चिकटवून अंक पोस्टात टाकण्यापर्यंतच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. 

कुटुंबात, दि.य. देशपांडे, बा.य. देशपांडे, ह्यांसारखे दिग्गज तत्त्वज्ञ असतानाही तत्त्वज्ञानासारख्या विषयात त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. मे. पु. रेगेंच्या, ‘मी आस्तिक का आहे’, ह्या लेखाचा त्यांनी केलेला प्रतिवाद ह्या निमित्ताने आठवतो.

आजचा सुधारकच्या माध्यमातून अनेक उत्तम नाटकांची आणि चित्रपटांची परीक्षणे त्यांनी लिहिली. त्यावेळच्या वाचकांची अभिरुची घडवण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. 

दिवाकर मोहनी

जुलैच्या अंकाची तयारी शेवटाला आली असतानाच, १९ जून २०२३ रोजी दिवाकर मोहनी उर्फ आमचे प्रिय मोहनी आबा ह्यांचे निधन झाले.

शाळेत न गेलेले, आणि कदाचित त्याच्याचमुळे अनेक विषयांबद्दल कुतूहलातून शिकत जाणारे मोहनी आबा अनेक वर्षे ‘आजचा सुधारक’चे संपादक होते. ज्ञान मिळवण्यासाठी कुठल्याही औपचारिक शिक्षणपद्धतीची गरज नसून ज्या कुटुंबात, समाजात आपण वावरत असतो, तिथूनच आपले ‘शिकणे’ सहजपणे होत असते याचा त्यांनी स्वतः अनुभव तर घेतलाच, पण यातून त्यांनी मिळवलेल्या प्रचंड ज्ञानाचा आणि सखोल विचारसरणीचा अनुभव त्यांच्या परिचयातील सर्वांनाच आला असणार याविषयी दुमत नसावे. आबांमधील कुतूहल सदोदित जागे असायचे. आपल्या ज्ञानाचे ओझे त्यांनी कधीच कुणावरही येऊ दिले नाही.

त्यांनी, खादी, रोजगार, पैसा, स्त्रीमुक्ती, कुटुंबसंस्था, धर्म, विवेकवाद, सृष्टिक्रम अशा विविध विषयांवर विपुल लेखन केले.

व्यवसायाने मुद्रक असणाऱ्या आबांनी आपल्या व्यवसायाला पूरक म्हणून भाषेचा अभ्यास केला आणि नागरीलिपीतील नियम, त्याचे व्याकरण, प्रमाणभाषेचे लिखाणातील महत्त्व आणि शुद्धलेखनामागचे तत्त्वज्ञान यावरील त्यांच्या अभ्यासातून ‘माय मराठी, कशी लिहावी, कशी वाचावी’ आणि ‘शुद्धलेखनाचे तत्त्वज्ञान’ ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली.

लोकसान्निध्याची त्यांची लालसा वयाच्या ९१ व्या वर्षीदेखील अबाधित होती आणि हेच त्यांच्या दीर्घ आयुष्याचे गमक असणार. कारण आबा वयाने कधी वृद्ध झालेच नाहीत.

या दोन्हीं विचारवंतांचा परिचय वाचकांना व्हावा म्हणून त्यांच्याविषयी वृत्तपत्रांत आणि इतरत्र प्रकाशित झालेल्या काही लेखांच्या लिंक्स सोबत देत आहोत. याव्यतिरिक्त अनेक लेखांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नसू याची जाणीव आम्हाला आहे.

https://www.aksharnama.com/client/trending_detail/6721

  • प्रवीण बर्दापूरकर

https://www.loksatta.com/sampadkiya/columns/vyaktivedh-diwakar-mohni-consciousness-movement-language-grammar-amy-95-3735960/

  • लोकसत्ता, २१ जून २०२३

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0MKDrDTyysnPcS6XABBL7MuPQTHNBxYJYdkwwUpEEQbEFV74d2WBi8Rq3UZZnnLfwl&id=100000109201846&scmts=scwsplos

  • प्रमोद मुनघाटे

https://www.facebook.com/prachi.mahurkar.9/posts/pfbid02QuvSin2EQ5ZxQtPt47eRnd6iuXKX9poVw7NAvQ53B1rQKQz3WRZQCE1pievGy5hUl?notif_id=1687273360566275&notif_t=feedback_reaction_generic&ref=notif

  • प्राची माहूरकर

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0VhD18aCAxsV5vW3uhce5duE38SHfWCXF2ZXbSRpgFr6KUAyKmaXQSRsqGvhuXUVhl&id=1434246783&mibextid=Nif5oz

  • प्रणव प्रियदर्शी

https://chauthiduniya.com/sudharak-diwakar-mohni-shraddhanjali-suresh-khairnar/

  • सुरेश खैरनार

https://www.saamana.com/article-thasa-on-diwakar-mohni/

  • सामना, २४ जून २०२३

ह्या अंकाविषयी:

कृत्रिमप्रज्ञेकडे आपण सगळे किती गांभीर्याने पाहात आहोत, याचा अनुभव ह्या अंकासाठी केलेल्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादावरून लक्षात येतो. 

वाचनालयातून पुस्तके आणून, ती वाचून मोठी झालेली एक पिढी संगणक, मोबाईल, समाजमाध्यमे, विनाविलंब संदेशवहन, क्लाऊड कम्प्युटिंग आणि आता कृत्रिमप्रज्ञा एवढा प्रवास आपल्याच आयुष्यकाळात बघते, तेव्हा हा प्रवास जितका विस्मयकारी असतो, तितकाच तो भयावहही वाटू शकतो.

आजवरच्या विकासात बनलेली साधने, उपकरणे, तंत्रज्ञान हे माणसाचे शारीरिक श्रम कमी करून त्याची ऊर्जा आणि त्याचा वेळ वाचवण्यासाठी बनलेली दिसतात. असा फुरसतीचा वेळ मिळाला तर बुद्धी सृजनाचे काम अधिक करते. आज कृत्रिमप्रज्ञेसारख्या शोधाने मात्र माणसाच्या बुद्धीला पूर्णवेळ गुंतवून टाकले आहे, टाकत आहे. म्हणजे शारीरिक श्रम कमी, पण फुरसतीचा वेळच नाही. एवढेच नव्हे तर कृत्रिमप्रज्ञा माणसाच्या विचारांना दिशाही देते आहे. मानवी बुद्धीला काम करण्याची गरज कमी झाली. स्क्रीन-टाईम या एका रोगाचे आपण सर्वच बळी ठरत आहोत.

मानवाच्या उत्क्रांतीचा दीर्घ कालावधी आणि आजच्या तंत्रज्ञानाची भरधाव, वेगवान झेप यांमध्ये आजची पिढी भांबावलेली आहे, तसेच मनात भविष्याविषयीची काळजीही आहे. या अंकातील लेखांमध्ये असेच संमिश्र भाव उमटलेले दिसतील. विकासाच्या प्रत्येक टप्प्यात नैतिकतेची भूमिका किती महत्त्वाची ठरते यावरही अनेक लेखांमधून विशेष भर दिलेला दिसेल.

आपले सहयोगी श्रीधर सुरोशे मार्क्सच्या अर्थमीमांसेवर एक लेखमालिका लिहीत आहेत. याचा पहिला भाग ह्या अंकापासून आपण सुरू करतो आहोत. याचे पुढचे भाग पुढच्या अंकांमधून प्रकाशित करण्यात येतील.

‘आजचा सुधारक’चा हा अंक माहितीपूर्ण आणि विचारप्रवर्तक ठरेल याची आम्हाला खात्री आहे.

प्राजक्ता अतुल
समन्वयक, आजचा सुधारक

अभिप्राय 2

  • अंक खूपच वाचनीय आहे. पण ईमेल तेवढा बघितला जात नाही. मध्यंतरी मोबाईल च्या समस्येमुळे सुधारक चा नंबर बदलल्याचे लक्षात आले नाही. कृपया मला नवीन नंबर मिळू शकेल का?

  • विवेकी विचारांना अग्रक्रम देणारे दिवाकर मोहनी यांचे दुःखद निधन

    विवेकवादी चिंतनाला वाहिलेल्या आजचा सुधारक या मासिकाचे दीर्घकाळ संपादक असलेले दिवाकर मोहनी यांचे १९ जून २०२३ रोजी दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते ९३ वर्षाचे होते. दिवाकर मोहनी यांचा जन्म गांधीवादी कुटुंबातला. त्यामुळे गांधींच्या प्रेरणा, दृष्टी आणि जीवनकार्याचा आदर्श दिवाकर मोहनी यांच्याही आयुष्याचा एक भाग बनला. गांधींच्या वैचारिक तत्त्वज्ञानाला आपल्या लिखाणाचा मुख्य आधार बनवून दिवाकर मोहनी यांनी स्त्री स्वातंत्र्य, धर्म, संपत्तीचे स्वरूप यासह विविध विषयांवर तर्कसंगत मते मांडली.

    नागपूर येथील विवेकवादी तत्त्ववेत्ते आणि तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, दि.य. देशपांडे यानी १९९०मध्ये सुरु केलेल्या आजचा सुधारक या मासिकात त्यानी आपले विचार मांडले. संपादकाची धुरा संभाळत अनेक लेखकांना पुरोगामी विषयावर लेखन करण्यास त्यानी प्रेरित केले. आपले परखड मत व्यक्त करताना ते कधीच हातचे राखून ठेवत नव्हते.
    आजचा सुधारकमध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लेखांचा आवाका पाहिल्यास दिवाकर मोहनींच्या अभ्यासूवृत्तीचे व त्यांचा समाजाविषयीचे असलेल्या कळकळीची कल्पना येते. विवेकी विचारांशी सुसंगत असलेले कुठलेही विषय त्यांच्या लेखनासाठी वर्ज्य नव्हते. स्त्रीमुक्ती, स्त्रियांचे पुरुषावलंबन, एकल माता, कुटुंब, विवाह, लैंगिक स्वातंत्र्य, योनीशुचिता, लोकशाही, समता, समान नागरी कायदा, श्रीमंती, जातीसंस्था, धर्म, धर्मनिरपेक्षता, भाषा, जात, वर्ग, आरक्षण, रोजगार, खादी आणि रोजगार, विज्ञानाचा हेतू, रोजगार हमी योजना, आध्यात्मक शिक्षण, मनुस्मृती, सावरकर, प्रमाण भाषा, अशा विविध विषयावर त्यांनी मते मांडली, चर्चा केली व या विषयावर अनेकांना लिहिते केले.

    स्त्रीमुक्ती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यांच्या मते गेली कमीतकमी १० वर्षे स्त्रीमुक्तीची चळवळ आपल्या देशात चालू आहे. पण स्त्रीमुक्तीविषयी, किंवा असे म्हणू या की त्या विषयाच्या व्याप्तीविषयी, आपणा बहुतेकांच्या मनांत संदिग्धता आहे. स्त्रीमुक्तीच्या अंगाने त्यांनी समान नागरी कायद्याचे विश्लेषण केले आहे. २०१९मधील एका लेखात प्रचलित राजकीय सत्तेविषयी उल्लेख करताना “दिसायला लोकशाही – प्रत्यक्षात हुकुमशाही!” असे उद्गार काढले आहेत. ‘श्रीमंती पैशाने येत नाही’ हा त्यांचा लेख संपत्तीचा संबंध पैशाशी न लावता त्याचा संबंध तंत्रज्ञानाच्या वापरातून माणसाला मिळणाऱ्या फुरसतीशी आहे, अशी अभिनव मांडणी करणारा होता. भारतात तंत्रज्ञानातील नवसर्जन का घडत नाही, उत्पादन, चलनवाढ व उपभोग ह्यांचा परस्परसंबंध कसा असावा अशा महत्त्वाच्या प्रश्नांचा वेध घेणारा हा लेख होता. ‘धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यातून उद्भवणारे काही प्रश्न’ या त्यांच्या लेखात धर्म आणि धर्मनिरपेक्षता ह्यांविषयी हिन्दुनेतृत्व काय म्हणते आणि त्यांनी केलेल्या कृतीमध्ये कशी विसंगती निर्माण होते त्याचे विश्लेषण केले आहे. आरक्षणाच्या गरजेविषयीसुद्धा त्यांनी आपल्या अनेक लेखात मांडणी केली आहे. रोजगार हमी योजनेविषयी आपले मत व्यक्त करताना आपल्या देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत तीव्र स्वरूप धारण करीत आहे आणि कदाचित ही समस्या अत्यंत गंभीर स्वरूप धारण करून परिस्थिती लवकरच स्फोटक बनेल अशी शक्यता असून प्रश्न अत्यंत अवघड आहे अशी कल्पना देतात. सध्याची अर्थकारणाची घडी बदलावयाला पाहिजे व रोजगार वाढता ठेवणे व तो टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांना वाटत होते. कुटुंब-व्यवस्थेविषयी लिहिताना परिपूर्ण स्त्रीमुक्तीच्या संकल्पनेला जो विरोध होत आहे त्याचे मुख्य कारण त्याचा परिणाम कुटुंबविघटनामध्ये होईल अशी भीती ते व्यक्त करतात.
    अभ्यास, चिंतन, कृती आणि आकलन या चार पायांवर उभा असलेला विवेकवाद मानवी मूल्यांचे रक्षण करेल, या आशावादावर कायम लेख लिहिणारे दिवाकर मोहनी आज आपल्यात नाहीत, याचे दुःख वाटते.

    अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दिवाकर मोहनी यांना हृत्पूर्वक आदरांजली.

    – प्रभाकर नानावटी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.