नास्तिकांचे अध्यात्म

सध्या इये मराठीचिये देशी नास्तिक मेळाव्यांचा हंगाम आहे. आयोजनातील वीरश्री पहाता लवकरच नास्तिकांसाठी आरक्षणाची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, सावधान!!! त्याचवेळी हे ‘असले’ मेळावे घेऊन काय साध्य होणार? ह्या प्रश्नावर घमासान चर्चा झडत आहेत. एकुणांतच नास्तिकांत हाणामाऱ्या फार. सगळेच शहाणे, तेंव्हा असे होणारच. त्यात सर्व नास्तिकही समान नाहीत. त्यातही देव नाहीच अशी खात्री असलेले/ल्या, नुसती शंका असणारे/ऱ्या, निसर्गपूजक असे प्रकार आहेत. त्यामुळे इथे जरी मी ‘नास्तिक असे करतात’ वगैरे विधानार्थी भाषा वापरली असली तरी मी आपला माझ्यापुरता बोलतो आहे. ‘आपुलाचि वाद आपणांसी’ अशा प्रकारचा हा संवाद आहे. आमच्या गावातली एक भाजीवाली दरवेळी दर सांगताना एक डिस्क्लेमर टाकत असते, ‘भाव पटला तर घ्या, न्हाय तर ऱ्हायलं’. तीच माझीही भूमिका आहे!

आस्तिकांना असे वाटते की सर्व गहन प्रश्नांची उत्तरे धर्माकडे आहेत. धर्माला चिकटून राहण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. “धर्माला वगळा गतप्रभ झणी होतील ही उत्तरे”, अशी त्यांना भीती असते. तेव्हा त्यातल्या काही गहनगूढ प्रश्नांची उत्तरे मी आत्ताच देऊन टाकतो. 

माणसाला प्रश्न पडतो की हे विश्व कोणी निर्माण केले? 

याचे विज्ञानाला ठाऊक असलेले उत्तर म्हणजे, कोणीही नाही. हे विश्व स्वयंभू आहे. 

हे विश्व का निर्माण झाले? या लीलेचा हेतू काय? 

याचे उत्तर, याला काही हेतू नाही

माणूस कोणी निर्माण केला? 

माणूस अपघात मात्र निर्माण झाला

मानव जन्माचा अर्थ काय? जीवनाचा हेतू काय? 

आपल्या अस्तित्वाला हेतूबितू चिकटवून नाकाने कांदे सोलू नये. जिथे सृष्टी निर्मितीच हेतूरहित आहे तिथे मानवी जन्माची काय कथा? अर्थ कसला आलाय? खरेतर जीवनाचा अर्थ आपण त्याला जो देतो तो; हे समर्पक उत्तर आहे. 

मीच का? हे भोग माझ्याच वाट्याला का? 

हा प्रश्न अनेक संदर्भात विचारला जातो. दुर्दैवाच्या दशावतारांसंदर्भात हमखास, आणि सुदैवाच्या दशावतारांबद्दल सहसा नाही. आस्तिकांना छळणारा हा एक गहन प्रश्न आहे. चमडीचा कर्करोग मलाच का? पासून ते माझीच बायको चवचाल का? पर्यंत काहीही प्रश्न असू शकतात. ज्ञात कारणे वगळता ह्याला, यद्यपी अज्ञात, एवढेच उत्तर आहे.

यातले काही प्रश्न तर सरळसरळ विज्ञानाच्या अखत्यारीतले आहेत. विश्व नेमके कसे उत्पन्न झाले, पहिला सजीव कसा निपजला, जाणीव कशी निर्माण झाली, चमडीचा कर्करोग मलाच का? वगैरे प्रश्नांची रास्त उत्तरे कधीकाळी मिळालीच तर ती वैज्ञानिक पद्धती वापरूनच मिळतील. भवतालच्या परिस्थितीत भौतिक कारणे शोधा, ती अपुरी ठरतील त्या जागा रिकाम्या ठेवा. दैवी व दानवी बुजगावण्यांनी भरून काढू नका. प्रयत्न आणि संशोधन सुरू असू दे. काही कारणे नव्याने समजतील. नवी तावून सुलाखून घ्या. जुनी कारणे त्यागून नव्याने जागा भरा. यथावकाश काही जागा भरल्या जातील. काही नाहीच भरता येणार. त्या रिकाम्या जागांसाठी संशोधन जारी ठेवा. 

याची धर्माकडील उत्तरे अर्थातच शुद्ध थापा आहेत. भिन्न भिन्न धर्मात विश्वनिर्मितीची कथाच मुळी भिन्न आहे. मानव जन्माचे सार्थकच भिन्न भिन्न सांगितले आहे. सुदैवाची आणि दुर्दैवाची कारणे भिन्न आहेत. त्यामुळे या प्रश्नांना धर्माने शोधलेली उत्तरे चुकीची आणि निरुपयोगी आहेत.

हे भारीतले प्रश्न संपल्यावर सांसारिक दुःख येतात. देवच कटाप म्हटल्यावर, नास्तिक मंडळी यांचा सामना कसा करतात, याबद्दलही आस्तिकांना मोठे कुतूहल असते. परीक्षेतील अपयश ते भिशीचालक फरार आणि बायको नांदत नाही ते बायको माहेरी जात नाही; अशा सतराशे साठ अडचणी असतात. नास्तिक प्रत्येक दुःखाचे किंवा अडचणीचे कारण आधी भौतिकात शोधतात. त्यांना शकुन-अपशकुन, पाप-पुण्य, पुनर्जन्म, कोप अथवा प्रसन्न पावणाऱ्या देवता, यांच्याशी काही संबंध नसतो. त्यामुळे पारलौकिकाची उपासना किंवा शमन त्यांना गरजेचे वाटत नाही. ते/त्या अनुभवींचा सल्ला घेतात. व्रतवैकल्यात खर्च होणारी शक्ती ते/त्या डोके चालवण्यात, विचार करण्यात व्यतीत करतात.

उपरोल्लेखित सांसारिक अडचणीपेक्षा आप्तजनांचे मृत्यू म्हणजे दुःखाचा डोंगर. यातून उद्भवणारे दुःख आणि विरह नास्तिकांनाही चुकलेले नाहीत. धार्मिक अंत्यविधी, दहावा, बारावा, तेरावा वगैरे नास्तिकांना उपलब्ध नाहीत. हे असले काही न केल्याने नास्तिक भावनाशून्य भासतात पण मृताप्रती ममत्वाचे श्राद्धपक्ष एवढे एकच माप नाही. हे विधी आस्तिकांच्या दुःख आणि विरहाचे विरेचन करून पुन्हा विवेकाची आणि सामान्य आयुष्याची सुरुवात करू पहातात. ‘मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे’, अशी शिकवण देत असतात. या साध्याशा शहाणपणाच्या स्पष्टीकरणासाठी आणि पुष्टीकरणासाठी जन्म, मृत्यू, कयामत, पुनर्जन्म, पाप-पुण्याचे मोजमाप वगैरे भाकडकथांचा डोलारा आस्तिकांसाठी उभारलेला दिसतो. 

नास्तिकांना या आराशीत काही रमणीय आढळत नाही. गाभ्याचा विचार त्यांनी आधीच आत्मसात केलेला असतो. ते पाषाणहृदयी नसतात तर जन्म आणि मृत्यूचे स्वरूप त्यांनी समजावून घेतलेले असते. मृत्यूची निव्वळ अपरिहार्यताच नाही तर आवश्यकताही जाणून घेतलेली असते. या जाणिवेमुळेच कायमच्या विरहासाठी त्यांच्या मनाची मशागत झालेली असते आणि कर्मकांडातील वैयर्थही लक्षात आलेलं असते. प्रिय व्यक्तीच्या सत्कार्यांचे स्मरण, एकत्र असतानाच्या सुखद आठवणीही, दु:ख आणि विरह विरेचक असतातच. मग नास्तिक हेच करतात.

आत्म्याच्या आणि परमात्म्याच्या भानगडीमुळे मृत्यू पचवणे सुकर होत असेलही, पण भूत, प्रेत, पिशाच्याच्या भीतीमुळे ते दुष्करही होऊ शकते. आपला चुलत सासरा आता सुखात असून रंभा त्याच्या डोक्यावर तेल थापते आहे आणि उर्वशी वारा घालते आहे, हे जसे येते; तसेच तो आता पिशाच्च होऊन, चुलत सासूला वश आहे आणि तिच्यामार्फत माझ्या घराची वाट लावणार आहे, हेही येते. शरीर संपुष्टात येते त्याचवेळी इच्छा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा, राग, लोभ, द्वेष, मत्सर इत्यादींसकट मनही संपुष्टात येते हेच खरे. मनाला आणि त्यातील भावभावनांना शरीराशिवाय वेगळे अस्तित्व नाही, आत्मा ही निव्वळ कल्पना आहे, अशा धारणा स्पष्ट असल्याने भूत, प्रेत, आत्मे, पुनर्जन्म वगैरेपासून नास्तिकांनी सहजच मुक्ती मिळवलेली असते. असल्या कल्पनांत रममाण होण्यापेक्षा नास्तिक ‘आपला चुलत सासरा आता चराचरात विलीन झाला आहे’ असे समजतो. ‘माती असशी मातीत मिळशी’ वगैरे समजावून घ्यायला कोणाही नास्तिक नचिकेताला यमधर्माची निकड भासत नाही. अर्थात काही मृत्यू, अपमृत्यू, अकाली मृत्यू हे चटका लावून जातात. हे सगळे तत्त्वज्ञान कळते आहे पण वळत नाही अशी संभ्रमित अवस्थाही येते. पण अशावेळी नास्तिक मन अनिश्चिततेचा स्वीकार करत, कमी अधिक प्रयत्नाने शांती पावते. 

अनिश्चितता हँडल करण्याचा ‘स्वीकार’ हा नास्तिक मार्ग आहे. मृत्यू असो, हुकलेले प्रमोशन असो वा न होणारे लग्न, परिस्थितीतील काही घटक आपल्या नियंत्रणाबाहेर असणार याचा स्वीकार नास्तिकांनी केलेला असतो. त्यामुळे असल्या प्रश्नांसाठी ते देव-दानवांना जबाबदार धरत नाहीत. त्यामुळे ते तोडगे व उपाय शोधण्यासाठी सहदेव भाडळीची पुस्तकेही वाचत नाहीत. शिवाय एकदा, चुकीच्या का असेना, कारणाचे लेबल लावले की शोध थांबतो. कृतक समाधान मिळते. पण त्यापुढे योग्य कारण कधीच न सापडण्याचा धोका वाढतो. 

यावर आस्तिक मंडळी म्हणतात की तुम्हाला अजून दैवाचा तडाखा बसला नाही म्हणून बोलताय. एकदा का त्यांच्या शनिने इंगा दाखवला की कळेलच. असेलही, पुढचे कोणी बघितले आहे? कठीण समय येतां नास्तिकता गुंडाळून देवाच्या भजनी लागणे कोणाच्याही बाबतीत शक्य आहे. असे किती प्रमाणात होते वगैरे अभ्यास माझ्या वाचनात नाही. पण नास्तिकांना नेस्तनाबूत करण्यासाठी दैवही विशेष उत्सुक दिसत नाही. निदान इहलोकी तरी अन्य चार लोकांइतकीच सुख-दुःखे नास्तिकांच्या वाट्याला येतात. 

मुळात हा तथाकथित दैवाचा तडाखा, ते दैवाचा मानतच नाहीत. तडाखा दैवाचा ठरवला की त्याबरोबर त्याच्या पारलौकिक कारणांसह एक निराश हतबलता सोबत येते. याउलट नास्तिकांनी अनिश्चिततेचा स्वीकार केलेला असल्यामुळे सुखदुःखाकडे, अडचणींकडे आणि संधींकडे, यशाकडे आणि अपयशाकडेही ते समदृष्टीने पाहू शकतात. यश काय अपयश काय, दोन्हीही अनित्य, तात्कालिक असणार. यश मिळाले असेल तर ते टिकवण्यासाठी काय करायला हवे आणि अपयश असेल तर त्याची कारणे काय? त्यातल्या कोणत्या कारणांचे निराकरण करता येईल? अशी सदैव प्रगतीशील मनोधारणा नास्तिक बाळगून असतात. यशापयशाकडे पाहण्याचा नास्तिक दृष्टिकोन असा असतो. सुखाने मोहरून जाणे आणि दुखाःने कोलमडून जाणे घडत नाही असे नाही, पण आपोआप मोजूनमापूनच घडते. स्थितप्रज्ञता म्हणतात याला. असा सम्यक दृष्टिकोन उपयुक्त ठरतो. यासाठी कोणत्याही पारलौकिक मुलाम्याची त्यांना गरज नसते. असा चिकित्सक, विश्लेषक, दृष्टिकोन असल्यामुळे इतरांचे भले झाले, तरीही नास्तिक याच दृष्टीने विचार करतात. त्यामुळे आपोआपच मत्सर किंवा असुरी आनंद वगैरेंपासून त्यांचे ते संरक्षण मिळवू शकतात. खरे तर अध्यात्मात हेच शिकवतात. हे अप्राप्य प्राप्त करण्यासाठी शरीर-मन झिजवतात. पण नास्तिक असले काहीही न करता, आपल्या तर्कबुद्धीने, स्वयंप्रेरणेने, ही मूल्ये आत्मसात करतात. निव्वळ धर्ममार्गी मंडळीच काही विशिष्ठ, उच्च मूल्ये बाळगून असतात, हा गैरसमज आहे. त्यातून माझ्याच धर्माची मूल्ये सर्वोच्च, हा आणखी एक गैरसमज. यातूनच कितीतरी ‘धर्मसंकटे’ निपजलेली आहेत. 

‘ट्रकखाली चेंदामेंदा झालेला तो टू-व्हीलरवाला मीही असू शकलो असतो’, असा विचार नास्तिकांच्या मनातही येतोच की; पण ‘ट्रकखाली चेंदामेंदा झालेला तो टू-व्हीलरवाला मीही असू शकलो असतो, थॅंक गॉड!’, असा मात्र येत नाही. जीवनातील अनिश्चितता हँडल करण्याचा; अतर्क्य, अकस्मात, अनाकलनीय, संभाव्यतांची बूज राखण्याचा; ‘थॅंक गॉड’ हा आस्तिक मार्ग आहे. तशी धारणा असणाऱ्यांना तो उपयुक्त ठरतो. जप, नामस्मरण अशा मूक, निरुपद्रवी क्रियांपासून ते डॉल्बीच्या दणदणाटापर्यंत ही ‘थॅंक गॉड’गिरी दिसते. अमुक झाले, ही ती तमक्याची इच्छा; तमुक झाले, अमुक माझ्या पाठीशी; असे जनात, गणात आणि मनात ते सतत बजावत रहातात. नास्तिकांना असं करायची आवश्यकता वाटत नाही. सगळेच नियम आपल्याला कळले नसले, तरी विश्व स्वतःच्या नियमानुसार चाललेले आहे. आपल्या थँक्यूने विश्वाच्या चालीत काही फरक पडणार नाही हे ते जाणून असतात. थँक्यू म्हणायचे तर ते स्वीकारणारा कोणीच नाही. जयजयकार करायचा तो कोणाचा? स्तुतिस्तोत्रे गायची ती कोणाची आणि आरती म्हणायची ती कोणाची? 

नास्तिक सतत देवाला थॅंकत नाहीत हा आस्तिकांना त्यांच्या उर्मटपणाचा पुरावा वाटतो. ह्यांना त्या जगद्नियंत्याप्रती लीन भाव नाही, हे स्वतःला देवाच्या बरोबरीचे समजतात, असे वाटते. नसलेल्या देवाची बरोबरी करण्यात काय मातबरी? उलट स्वतःला भगवंताचा दूत, अंश, बायको, अपत्य किंवा चक्क अवतार म्हणवणारे/ऱ्या आस्तिकच शेकड्याने आहेत. हे/ह्या मात्र उर्मट नाहीत! 

या थँक्यू म्हणण्यामध्ये त्याला मोठेपण देण्याबरोबरच स्वतःकडे धाकुटेपण घेणेही आहे. उपासनेची भाषा आणि भक्तीची देहबोली अशा चिह्नांनी आणि संकेतांनी मढलेली आहे. यात विश्वाच्या पसाऱ्यामध्ये मानवी जीवन क्षणभंगुर असून, आपण अगदी कस्पटासमान आहोत ही भावना आहे. पण एकीकडे हा कस्पटभाव सांगत असतानाच पृथ्वी जगाच्या केंद्रस्थानी आहे, विश्वात एकदम स्पेशल आहे, माणूस लई भारी आहे, देव तुझ्याकडे बघतो आहे, सारी सृष्टी कनवाळू देवाने मानवाच्याच उपभोगासाठी घडवली आहे; अशा मानवी अहं कुरवाळणाऱ्या कल्पना, धर्म रुजवत असतात. ह्या मानभावीपणाची संगती कशी लावावी? 

कधी या ‘थॅंक गॉडगिरी’मागे काही उदात्त भावना वसत असते; तर बरेचदा शुद्ध मांडवली करण्याचा डाव असतो. तू महान, कनवाळू, छप्पर फाडके देणारा दाता आहेस; मी लहान, दीन, हीन, लीन, फाटक्या झोळीचा याचक/याचिका आहे; सबब हे तुला आणि बदल्यात ते अमुक अमुक मला अशी मांडवली असते. पण मनात हे ‘लहानपण’ जागवण्यासाठी नास्तिकांना ‘दे गा देवा’ अशी आळवणी करण्याची गरज नसते. कस्पटभावासाठी आपल्यापेक्षा सर्वार्थाने पॉवरफुल असा जगबुडी घडवणारा, आकाशातला पप्पा, सप्तस्वर्ग, सप्तपाताळ इत्यादी कल्पिण्याची गरज नसते. 

कचकड्याच्या या बेगडी धार्मिक संकल्पनांपेक्षा विज्ञानाने पुरवलेली पुरावाधिष्ठित कस्पटकल्पना अधिक प्रगाढ, प्रशांत आणि वास्तव आहे. सजीवांचे अंती एक गोत्र, असे सांगून डार्विननी सृष्टीकडे बघण्याची विशाल जीवनदृष्टी दिली आहे ती मानवाला श्रेष्ठ मानणाऱ्या धर्म कल्पनांपेक्षा कितीतरी उन्नत आहे. अणूरेणूंच्या अंतरंगातील सूक्ष्मातिसूक्ष्म कणांपासून ते विश्वाचे वय, त्याचा पसारा, ग्रह-ताऱ्यांचे आकार आणि या साऱ्यात मानवाच्या क्षुद्र स्थानाबद्दलचे जे भान विज्ञान देते, ते तर कोणत्याही धार्मिक आकलनाच्या पल्याड आहे. विज्ञानाच्या आधी अज्ञान असते आणि विज्ञान संपते तिथेही अध्यात्म नाही तर अज्ञानच सुरू होते. निसर्गाकडे उघड्या डोळ्याने पाहताच आपल्याला जाणवणारे क्षुद्रत्व, विज्ञानाने वर्धमान आणि वर्धिष्णू केले आहे. म्हणूनच कस्पटभावाचा विज्ञानदीप्त नंदादीप नास्तिक मनात अखंड तेवत असतो. उक्ती आणि कृतीतून त्याचा सतत उच्चार त्यांना अनावश्यक आणि निरर्थक वाटतो. 

ईश्वरभक्तीच्या परमोच्च क्षणी सृष्टीशी आणि ईश्वराशी तादात्म्य अनुभवायला येते; अचाट प्रतिभेचे, नृत्य-नाट्य-चित्र-संगीतातील कळसाच्या कलाविष्काराचे, नव्या शोधाचे, निर्मितीच्या उर्मीचे, तल्लीन, क्षण साक्षात्कारी असतात असे वर्णन केले जाते आणि मन विचारमुक्त करत करत अपार शांतीचा प्रत्यय येतो. नास्तिकही जिजीविषेच्या आर्ततेने असे क्षण अनुभवतच असतात. नास्तिकांना ते नापासही नाहीत आणि नापसंतही नाहीत. उत्तम (भक्ती)संगीतात(ही) रंगून जाणे, (रास)नृत्याच्या(ही) तालावर बेभान होणे, रसाळ (स्तोत्र)काव्याने(ही) घायाळ होणे, निसर्गाच्या अदाकारीने पुलकित होणे, हे होतच असते. एकदा देव आणि त्याच्या दलालांमार्फत होणारी त्याची आपल्या आयुष्यातली लुडबूड बाजूला काढली, की धर्मग्रंथ सांस्कृतिक दस्तावेज म्हणून आणि कर्मकांड सामाजिक ऐवज म्हणून उरतात. देव गेला, धर्मग्रंथ गेले, दलाल गेले की आपण आणि चराचर सृष्टी एवढेच उरतो. उलट असा मध्यस्थविरहित तादात्म्यभाव सहजसुलभ असतो.

असे अनुभव नास्तिक नाकारत नाहीत आणि त्यांना ते पारखेही नाहीत. फक्त अशा अनुभवांचा अर्थ लावण्यासाठी त्यामागे भगवंताचे अधिष्ठान कल्पिण्याची किंवा त्यांचे वर्णन करण्यासाठी दैवी शक्तींना आवाहन करण्याची आवश्यकता त्यांना भासत नाही. बस् एवढेच. पण अशी देवधर्म संकेतविरहित भाषाही अभावानेच उपलब्ध आहे. षड्ज लावताच जणू ईश्वरी स्पर्श घडला, याऐवजी अननूभूत आनंद झाला. स्वामींनी माझ्याकडून यात्रा करवून घेतली, याऐवजी माझी तीव्र इच्छा असल्याने मी तो खडतर प्रवास केला; अशा साध्या शब्दात ते असे अनुभव मांडतील. अर्थात ‘ईश्वरी स्पर्शाची’ आणि ‘स्वामींने करवीयले’ची सर या भाषेला नाही. ही एक मोठीच अडचण आहे. 

सगळे सणवार, उत्सव म्हणजे अशा तृप्त क्षणांच्या फॅक्टऱ्या आहेत. असे ‘नास्तिक सण-उत्सव’ निर्माण करणे नास्तिकांना शक्य झालेले नाही. समाजाला ते रुचत नाहीत आणि समाजात ते रुजत नाहीत ह्याचे हेही एक कारण आहे. कलेच्या, विचाराच्या, शोधाच्या परमोच्च क्षणी जे अनुभवायला मिळते ते इथे सहजप्राप्य होते. अशा क्षणांची सहज सोबत मिळते म्हणून लोक देव, धर्म, कर्मकांड याकडे आकर्षित होत असावेत. त्याबरोबरच सामाजिक मान्यता, लौकिक, आधार असे बरेच काही पदरी पडत असते. लोक मूर्ख नसतात. सतत शोषित वगैरे नसतात. काहीसे ऐषीतच असतात. 

धार्मिक चित्र, शिल्प, कला, साहित्याचा आस्वाद नास्तिकही घेत असतात. ते/त्या या सगळ्याकडे ‘शोले’ बघावा तसे बघतात. म्हणजे असे, की ‘शोले’ बघताना जर का तुम्ही सतत असा विचार करत राहिलात, की ठाकूरचे हात खरेतर त्या कुडत्याच्या आत शाबूत आहेत…, तर मग ‘शोले’ बघणे अवघड आहे! म्हणजे तुम्हाला तो दिसेल पण अनुभवता नाही येणार. नास्तिकांना उत्तम (भक्ती)संगीतात(ही) रंगून जाणे, (रास)नृत्याच्या(ही) तालावर बेभान होणे, रसाळ (स्तोत्र)काव्याने(ही) घायाळ होणे अशक्य नाही ते यामुळे. तसेच मायकल एंजेलोच्या चित्रांचे, कैलास लेण्याचे, गंगालहरीसारख्या सुंदर काव्याचे आहे. नास्तिक त्यातल्या कथा, कल्पना, देवांची आणि आदीकांची, दैवी आणि दानवी शक्तींची सगळी भुतावळ, तात्पुरती खरी मानूनच या साऱ्याचा आनंद घेतात. काम झाले की सोडून देतात. मधूनच समाजभ्रमाचे हे विभ्रम पाहून थोडी गंमतही वाटते. मजा येते. 

वरील साऱ्या विवेचनातील कस्पटभाव, अनित्य, समदृष्टी, स्थितप्रज्ञ, सम्यक, स्वीकार असे शब्द वाचून, तुम्हाला आपण नास्तिकतेवरचा निबंध वाचतो आहोत की प. पू. अभ्यंकरबुवांची दिव्य प्रवचने वाचतो आहोत; असा प्रश्न पडेल. पण नास्तिक विचार अंगी बाणवला की वरील गुणवैशिष्ठ्ये वाढीस लागतात आणि नास्तिक बाय-डीफॉल्ट ‘आध्यात्मिक’ बनत जातात. नास्तिक अधिक सहिष्णू, उदारमतवादी, नव्याबद्दल स्वागतशील असतात. हे सारे प्राप्त होण्यासाठी त्यांना ना शरीर कष्टवून तीर्थयात्रा कराव्या लागतात, ना मान मोडून मंत्रपठण करावे लागते. ही जीवनदृष्टी नास्तिक विचाराचा सहजस्फूर्त, स्वाभाविक आणि अटळ परिपाक म्हणून विनाअट प्राप्त होते. म्हणूनच नास्तिकही सच्चे/च्च्या आध्यात्मिक असतात.

पूर्वप्रसिद्धी
अवतरण (मुंबई सकाळ)
दिवाळी अंक २०२३

अभिप्राय 7

  • अभ्यंकरांनी भावनिक, रसाळ, संवेदनशील, मार्मिक लिहिण्याच्या नावाखाली उगाच गोल-गोल लिहिलंय. त्यामुळे वाचणं सहन होत नाही.

    नास्तिक अध्यात्मिक होतात! हे स्टेटमेंट त्यांनी नीट समजावून सांगितलेले नाही. आणि त्यात विरोधाभासही आहे. कुठलीही कलाकृती एन्जॉय करायला तातपुरतं आस्तिक होण्याची नाही तर empathyची जास्त गरज असते.

  • सुरुवातीलाच सांगून ठेवतो की मी स्वतः नास्तिक आहे त्यामुळे लेखात मांडलेले मुद्दे हे टीका नसून एक आत्मचिंतन आहे.

    जेव्हा नास्तिक आपली बाजू मांडतात तेव्हा साहजिकच आस्तिक विरुद्ध नास्तिक अशी मांडणी होत असते. जेव्हा अशी तुलना केली जाते तेव्हा अनवधानाने का होईना दोन टोकाच्या उदाहरणाचे दाखले दिले जातात. एक टोकाचा आस्तिक आणि टोकाचा बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्ती यांच्यातील तुलना दिशाभूल करणारी आहे असे माझे मत आहे.

    आपल्या आयुष्यातील घटनांना आपण कसे सामोरे जातो हे आपल्या व्यक्तिमत्वावर ठरत असते. आणि हे व्यक्तिमत्व घडण्यामागे आयुष्यातील घटना, संकटे आणि उपलब्ध स्त्रोत यांचा मोठा वाटा असतो. अर्थात विचारांचा वाटा असतो हे अमान्य करत नाही परंतु केवळ विचार आपले व्यक्तिमत्व घडवत नाहीत. उदाहरणार्थ नोकरी सोडून व्यवसाय सुरू करावा हा निर्णय घेताना केवळ नोकरीत जास्त फायदा की व्यवसायात जास्त फायदा इतका विचार होत नसतो तर दोन्ही मध्ये होणाऱ्या तोट्यात मोठा तोटा किंवा रिस्क कोणती याचा विचार होत असतो. हा विचार मुख्यतः भावनेच्या आधारावर होतो. व्यक्ती ज्या परिस्थितीत वाढली आहे , तिच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या आहेत आणि उपलब्ध मदत किती आहे यावर निर्णय अवलंबून असतो. ईथे रॅशनल विचार करता येणे जवळ जवळ अवघड असते.
    आपण केलेला विचार आपल्या बाबतीत रॅशनल आहे अशीही एक पळवाट यातून काढता येते. त्यात आणि आस्तिक व्यक्तीने केलेल्या “माझेच नशीब वाईट ” या विचारां मध्ये गुणात्मक काहीच फरक दिसत नाही.

    संकटे आल्यावर नास्तिक व्यक्ती अत्यंत विवेकी पद्धतीने त्याला सामोरे जाते आणि त्यामुळे ती व्यक्ती संकटात दीर्घकाळ कोलमडत नाही, हे देखील खरे नाही. माझ्या स्वतःच्या आणि जवळच्या नास्तिक मित्रांचा अनुभव वेगळा आहे.
    नास्तिक व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा ती इतर आस्तिक व्यक्ती सारखीच irrational वागू शकते. जेव्हा ती संकटात सापडते तेव्हा ती भयभीत होऊन निष्क्रिय होऊ शकते.
    या उलट कठीण प्रसंगी देखील स्वतःचे चित्त ढळू न देता ठाम राहणाऱ्या आस्तिक व्यक्ती मला माहित आहेत.

    आस्तिक व्यक्ती सदा सर्वदा नशिबावर अवलंबून असतात असा निष्कर्ष काढणे देखील चुकीचे आहे. प्रॅक्टीकली बहुतांशी व्यक्ती नशिबावर सतत अवलंबून नसतात . स्वतःचे आयुष्य जगताना त्या वैज्ञानिक प्रयोग करत नसतात. त्यांना जास्तीत जास्त सुखकर मार्ग काढायचा असतो. त्यामुळे आजारी पडल्यावर देवाचा धावा करताना तो औषध घ्यायचे चुकवत नाही. देवाला नवस करतो तसाच डॉक्टरांची फी देखील भरत असतो.
    नास्तिक व्यक्ती असे करणार नाही याचे कारण तो फार रॅशनल असतो हे नाही तर अशा गोष्टींनी काहीच फायदा होणार नाही याची त्याला खात्री असते म्हणून.
    परंतु असाच नास्तिक व्यक्ती homeopathy ची औषधे घेणार नाही असे नाही.

    नास्तिक व्यक्ती होण्यासाठी फक्त कॉमन सेन्स त्या संदर्भात लागू करण्याची गरज आहे. आस्तिक व्यक्ती फक्त त्या बाबतीत तो कॉमन सेन्स वापरत नाहीत इतकेच.
    हाच कॉमन सेन्स ज्या बाबतीत आस्तिक वापरत असतील तेथे कदाचित नास्तिक व्यक्ती वापरत नसतील असेही असू शकेल. उदाहरण द्यायचे झाले तर आर्थिक शहाणपण प्रत्येक नस्तिकाकडे असेल असे नाही.
    अनिश्चिततेचा स्वीकार हे मानसोपचार पद्धतीतील एक महत्वाचे साधन आहे. परंतु ते नेहमीच्या आयुष्यात कितपत उपयोगी ठरते याबद्दल थोडे संशयाने पाहिले पाहिजे. इथे हे देखील लक्षात घेतले पाहिजे की एखादी संकल्पना मांडली जाते तेव्हा त्याचे अर्थ व्यक्तीनुसार बदलतात. आपण काही प्रयत्न केले आणि अपेक्षित परिणाम नाही मिळाला तर काय करावे? प्रयत्न चालू ठेवावे की सोडून द्यावेत याचा रॅशनल विचार कसा करणार?
    उदाहरणार्थ मी प्रयत्न सोडून दिले आणि कदाचित मी यशाच्या जवळ असेन तर ? किंवा उलट ही होऊ शकते.
    यावेळेस मी खूप प्रयत्न केले आणि यश हाती लागले नाही तर पुढच्या वेळेस मी जास्त प्रयत्न न करण्याची शक्यता आहे.
    अनिश्चितता स्वीकारणे याचा दुसरा अर्थ पळपुटे पणा देखील होऊ शकतो. प्रयत्न चालू ठेवा फळाची अपेक्षा करू नका असा संदेश देण्यासाठी नास्तिक असणे गरजेचे नाही.
    नास्तिक व्यक्ती अधिक आनंदी असतात असा आपला नस्तिकांचा समज असतो. आणि आपल्याला आवडणाऱ्या निष्कर्षाची जास्त चिकित्सा आपण करत नाही हे तत्व नास्तिकाना देखील लागू पडते.
    माझ्या MA सायकॉलॉजी साठी religious belief and anxiety असा विषय सुरुवातीला निवडला होता. त्यावेळेस जेव्हा reference शोधत होतो तेव्हा लक्षात आले की जे काही सर्वे झालेत त्यात बहुतांशी असे सांगतात की नास्तिक व्यक्तींना anxiety जास्त जाणवते.
    याचा अर्थ असा नव्हे की नास्तिक होण्यात कमी शहाणपणा आहे. जशी पार्टी बदलावी तसे हे मत बदलता येत नाही. परंतु नास्तिक असण्याने आपण शहाणे आहोत असे मानू नये. नास्तिक झाल्याने आपण आपोआप बुद्धिप्रामाण्यवादी होतो किंवा आपल्या आयुष्यातील समस्यांकडे समदृष्टीने पाहायला शिकतो असे नव्हे.

    • Rational, rationalist, तार्किक / तर्कट म्हटलं
      की पुढे “नास्तिक उत्क्रांत बुद्धिप्रामाण्यवादी विज्ञानवादी विज्ञानदास विज्ञानेश्वर” आदि विशेषणे लावणे म्हणजे पुनरुक्ती होत नाही का?
      “आध्यात्मी, आढयात्मी” आदि बिरूद बुजगावण्यांचेही तेच…

  • नास्तिकवादाचे असे वास्तववादी ,मानसशास्त्रीय लेखन स्वागतार्ह आहे. माणूस केवळ बुध्दिवर चालत नाही तर भावना व समाज हे आणखी दोन घटक त्यांच्या वर्तनावर परिणाम करतात.म्हणूनच माझे म्हणणे आहे की नास्तिक असणे अभिमानाची गोष्ट नाही.
    नास्तिक होण्यापेक्षा बुध्दिप्रामाण्यवादी व विज्ञानवादी होण्याचे प्रयत्न करावेत. येथे ह्यूमचे एक वचन आठवते: ” Reason Is and Ought Only to be the Slave of the Passions’
    आपण कितीही प्रयत्न केला तरी तर आपले आयुष्य विवेकानं चालवणं कठीण आहे. लाखो वर्ष आपला मेंदू भावनांनी कोरून काढला आहे .त्याच्यावर Frontal Cortex चे नियंत्रण ठेवणे हा एक आदर्श होऊ शकेल पण वास्तव नाही. सावरकरांनी जी उदाहरणं Irrational म्हणून दिली आहेत ती भावनांनी Frontal Cortex वर मात केल्याची आहेत.म्हणूनच तो होमिओपॅथीची औषधे घेईल. चूकीचे आर्थिक निर्णय घेईल.संकटात कोलमडेल. न्यूटनसारख्या शास्त्रज्ञाला बायबलने वेडे केले तेथे आपल्यासारख्या पामरांची काय कथा.

  • वरील अभिप्राय संजय सावरकरांच्या प्रतिक्रियेवर आहे

  • आस्तिक आणि नास्तिक अशी विभागणी मुळातच अनावश्यक आहे. एक तर या दोन्हीसंज्ञांचे मूळ अर्थ वेगळे आहेत. वेद हे ईश्वर निर्मित आहेत असे मानतात ते आस्तिक आणि जे वेदांची निर्मिती मानवाने केली आहे असे मानतात ते नास्तिक. कालांतराने आपण मानू लागलो की ज्यांचा ईश्वरावर (आणि त्याच्याशी जोडल्या जाणाऱ्या धार्मिक परंपरा, कर्म कांड इ. वर) श्रद्धा आणि विश्वास आहे ते आस्तिक आणि ज्यांची नाही ते नास्तिक. आपल्या जगण्यात वेदांची निर्मिती कोणी केली आणि कशी झाली याचा कितपत संबंध येतो? आपल्या पुढचे प्रश्न वेगळेच आहेत. सोयीकरता आपण आस्तिक आणि नास्तिक अशी मांडणी करून मोकळे होतो आणि उगाच भांडत बसतो. डॉ. शंतनू अभ्यन्करांनी रोजच्या जगण्यातल्या प्रश्नांची उत्तम चर्चा करत नास्तिकता आणि विज्ञाननिष्ठ मानसिकता तसेच विज्ञान आणि अध्यात्म यांचा परस्पर संबंध खूप छान स्पष्ट केला आहे. पुन्हा सोयीकरता आपण म्हटले की नास्तिक हे विज्ञानवादी असतात तर मग आस्तिक कोण असतात? विज्ञान आणि तंत्रज्ञान यापासून मिळणाऱ्या सगळ्या सुख सोयी ते आनंदाने उपभोगतात आणि श्रेय द्यायची वेळ आली की आकाशाकडे बोट दाखवितात. याला काय म्हणावे?

  • डॉक्टर अभ्यंकरजी आपण या लेखात केलेली अस्तिक आणि नास्तिक यांची तुलना अप्रस्तुत आहे. अस्तिक लोक आपल्या देववरील श्रध्येसमवेत आपले जीवन सुखेनैव जगत असतात. ते नास्तिक लोकांच्या भानगडीत पडत नाहीत. उलट नास्तिक लोकच अशा परिषदा आयोजित करुन आस्तिकांच्या जीवनात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतना दिसतात. दुसरे असे की अस्तिक लोक विज्ञानवादी नसतात हा जावई शोध कोणी लावला? उलट मी म्हणतो आपले ऋषिमुनी हे विज्ञानवादीच होते. त्यांनीच चिंतन करुन या ब्रह्मांडाचा अभ्यास केलेला होता; आणि त्यांनी केलेले संशोधन आजच्या वैज्ञानिकांनी मान्य केले आहे. त्यामुळे अस्तिकांबद्दलचे गैरसमज मनातून काढून टाका. आपला सनातन हिंदू धर्म सांगत असतो की देव निर्गुण निराकार आहे. पण सर्वसाधारण लोकांसाठी देवदेवतांच्या मूर्ती अस्तित्वात आणल्या गेल्या. सण-वार हे जिवनात आनंद निर्माण करण्यासाठी निर्माण केले गेले आहेत. मूळ सनातन हिंदू धर्मात कर्मकांडं नाहीत. ति कांही स्वार्थी लोकांनी आपल्या चरितार्थासाठी निर्माण केलेली असावित. त्यामुळे नास्तिक लोकांनी ते विज्ञानवादी आसून अस्तिक तसे नाहीत हा गैरसमज मनातून काढून आपले जीवन सुखेनैव जगावे. आस्तिकांच्या जीवनात उगाच ढवळाढवळ न करणे इष्ट.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.