‘आजचा सुधारक’च्या अंकासाठी ग्रामस्वराज्य हा विषय हातात आला त्याच्या आठच दिवसांआधी, मी राहतो त्या परिसरातल्या एका गावात मोठा इतिहास झाला होता. गट-ग्रामपंचायत असलेल्या त्या गावच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला होता. कारण गावकऱ्यांना न पटणाऱ्या काही मोठ्या घडामोडी गावात घडल्या होत्या. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या शर्यतीत असलेल्या उमेदवाराने वस्तीवरच्या गावकऱ्यांना पाणी पिण्यासाठी निवडणुककाळात पाईप आणून दिले होते. परंतु निवडणूक संपल्यानंतर वस्तीवरच्या लोकांना पाणी भरण्यासाठी दिलेले पाईप परत मागितले. नंतर दोन महिन्याने वस्तीशेजारी असणाऱ्या भेंडगावच्या एका शेतकऱ्याला वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांची कीव आली आणि त्याने त्याच्या शेतीतल्या विहीरीचं पाणी देण्याचे ठरवले. गावकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन ती विहीर अधिग्रहीत केली, आणि पाणी पिण्याची थोडीशी सोय झाली होती.
परंतु ज्या शेतकऱ्याने विहीरीचे पाणी पिण्यासाठी दिले, विहीर अधिग्रहीत केली, त्याचे पाण्याचे बिलदेखील ग्रामपंचायतकडून महिनो न् महिने दिले गेले नाही.
दुसरी गोष्ट – गावात गल्लीरस्त्याचे काम मंजूर झाले. ते काम कसेबसे केले; परंतु त्या गल्लीरस्त्यासाठी मंजूर झालेला पैसा ग्रामपंचायतच्या सदस्यांमध्ये व्यवस्थित वाटप झाला नाही. ह्या गोष्टी बाहेर आल्या. रस्त्याच्या कामाचे बिल निघाले नाही. त्याचा वाद बाहेर आला आणि सरपंचाविरोधात अविश्वास ठराव आणला. आता हे प्रकरण कोर्टामध्ये असून ह्यानिमित्ताने ग्रामीण भागात राहणाऱ्या व उदरनिर्वाहासाठी गावात राहून मोसमानुसार शहरात कामासाठी भटकणाऱ्या समाजातल्या युवक-युवतींसमोर काही प्रश्न उभे राहिले. त्यांना त्यांचे हक्क, अधिकार मिळवायचे असतील, कामासाठी भटकणे थांबवायचे असेल तर त्यांच्या गावातल्या बेडा-वस्तीमधल्या ग्रामसभा सक्षम करणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागात राहणाऱ्या युवकांनी ग्रामसभेत सहभाग वाढवला तर गावातच सरकारी योजना, अनुदाने, वस्तू, रेशन, चांगली शाळा हे सगळे ग्रामपंचायत आपल्याला देऊ शकते. पण हे सगळे बाहेरचे कुणी येऊ देणार नाही आणि आपली परिस्थिती बदलणार नाही. त्यासाठी आपल्यालाच ग्रामसभांमध्ये जावे लागणार आहे. आपल्या हक्कांसाठी लढावे लागणार आहे.
मी कोविडकाळात फासेपारधी समुदायातल्या मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्नावर काम सुरू केले. जेथे काम सुरू केले, त्या बेड्यामध्ये जाण्यासाठी पांधनरस्ता (बैलगाडी वाट) फक्त होता. त्या बेड्यावर आंगणवाडी शाळा नव्हती. आरोग्यकेंद्र तेथून दोन किलोमीटर दूर होते. पावसाळ्यात एखादा मुलगा बाहेरगावच्या शाळेत शिकायला गेला तर पांधनरस्त्याने जातांना हात-हातभर चिखलात त्याचे पाय फसायचे. अनेकवेळा गर्भवती महिलांच्या प्रसूती पांधनरस्त्यातच झालेल्या गावकऱ्यांकडून ऐकण्यात आले. बेड्यामध्ये रस्ता आणि वीज मिळवण्यासाठी आम्हाला बाहेरगावच्या लोकांसोबत, जवळ असणाऱ्या सरकारी व्यवस्थेसोबत मोठा संघर्ष करावा लागला. ह्या संघर्षाची गोष्ट मी समाजमाध्यमांमध्येसुद्धा अनेकवेळा लिहिली आहे. मी जेथे राहतो त्या गावातील ग्रामसभांसोबत आम्ही केलेला कामाचा अनुभव, मी जेथे शिक्षणावर काम सुरू केले त्या बेड्यामध्ये कामी आला. युवकांच्या बैठका घेऊन त्यांना त्यांचे हक्क मिळवण्यासाठी ग्रामसभेत सहभाग वाढवा, हे सांगितले. ग्रामसभा आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा मिळवून देऊ शकते, हा विश्वास दिला. त्यांच्या अधिकारांबद्दल युवकांना जागृत केले. पिढ्या दर पिढ्या रानोमाळ शिकारीसाठी भटकत राहणाऱ्या आमच्या ह्या समुदायाला ग्रामसभा म्हणजे काय असते, हे नीट माहीत नव्हते. वर्षानुवर्षे बाहेरगावच्या मोठ्या वर्गाच्या लोकांकडून होत राहिलेल्या मारहाणींमुळे युवकांमध्ये भिती होती. ह्या बेड्यावरच्या समुदायाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी ग्रामसभेत सहभाग वाढवण्याचा एक टप्पा आम्ही पूर्ण केला.
परिणामी, त्या बेड्यामध्ये आम्हाला पक्का रस्ता मिळाला. ग्रामपंचायतीकडून नवीन वीज मीटर (डीपी) बसवण्यात आले. तीस वर्षांनंतर आमच्या बेड्यामध्ये वीज आली. तीस वर्षांपर्यंत या बेड्यावरची माणसे अंधारात जीवन जगत होती. ह्या गोष्टी मिळवण्यासाठी कोणी बाहेरच्या साहेबलोकांनी येऊन बदल केला नाही. आम्ही युवकांना जागृत केले. ग्रामसभेत त्यांचा सहभाग वाढवला. पक्क्या रस्त्यासाठी, वीज मीटर बसवण्यासाठी अनेकवेळा ठराव दिले.
शेवटी इतर गावांना मिळतात तशा सुविधा आम्हालाही मिळाल्या. मुख्य प्रवाहात येण्यासाठीचा हा संघर्ष अजूनही चालू आहे.
अक्षरभूमी शाळा, अकोला.