मेंढा लेखा: जैव-सामाजिक प्रणाली विज्ञानाचा उत्कृष्ट नमुना!

मुख्य शब्द: जैव-सामाजिक प्रणाली (social-ecological system), बहुकेन्द्रित शासन (polycentric governance), अनुकूलन क्षमता (adaptation), स्वसंघटन (self-organization), संश्लेषण (synthesis), तंत्रविचार (systems thinking), एलिनोर ओस्ट्रॉम, Tragedy of Commons, सह-उत्क्रांती (coevolution), Panarchy, Anthropocene.

प्रस्तावना आणि विषय प्रवेश
गडचिरोलीतील मेंढा-लेखा गावात झालेला ग्रामस्वराज्याचा विलक्षण प्रयोग, आणि एकंदरच विकेंद्रीकरणाच्या धोरणांमुळे जेव्हा माणसांच्या समूहांमध्ये स्व-संघटन[A] होऊन काहीतरी नव-सर्जन घडते, ते बघून मानवी मन सुखावते, आनंदी होते. असे सर्जन बघून मन का सुखावते? गोष्ट मेंढा गावाची[1] ह्या पुस्तकात मिलिंद बोकील लिहितात – “विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने प्रगती झाली असली तरी मानवी जीवन स्वस्थ आणि सुरक्षित नाही. समुदायात जगताना निरामय, आनंदी आणि निर्भय जीवनाचा प्रत्यय फारसा येताना दिसत नाही. मात्र ह्या गोष्टींची तहान माणसाला कायमच असते, म्हणून मेंढासारख्या उदाहरणांचा मानवी मन सदैव वेध घेत असते.” का घेत असावा माणूस असा वेध? माझ्या मते हे मूलभूत प्रश्न आहेत. ह्याविषयी मुक्त चिंतन करीत असता, माझ्या मनात सहज म्हणून एक विचार येतो की कदाचित ही उदाहरणे द्योतक आहेत एका व्यापक प्रक्रियेची – निसर्ग आणि माणूस ह्यांच्यातला परात्मभाव (alienation) काहीअंशी मिटण्याच्या प्रक्रियेची, तेही सामूहिक स्तरावर आणि म्हणूनच कदाचित एका व्यक्तीच्या तुलनेत दीर्घकाळ टिकणारी! मेंढा-लेखा आणि तत्सम प्रयोगांकडे लोकनीती, संविधानातील मूल्य, अथवा स्वराज्यशास्त्राच्या आधारे बघताच येईल[2,3]; पण विज्ञानाच्या अंगाने त्याकडे बघता येईल का? किस्से आणि अनुभवजन्य विश्लेषण (empirical and anecdotal analysis) ह्यांच्या पलीकडे जाऊन बघता येईल का? ह्याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न आहे.

मागील काही दशकांपासून, विज्ञानामध्ये होऊ घातलेल्या एका आमूलाग्र दृष्टिबदलाचा (paradigm shift चा) उत्कृष्ट नमुना म्हणून ह्या प्रयोगांकडे बघता येईल. तो दृष्टिबदल म्हणजे, पृथ्वीवरील सामाजिक (मानवी) आणि नैसर्गिक (न-मानवी) प्रणाल्यांना सुटे सुटे न बघता एका समग्रतेने बघता येण्याची दृष्टी. नैसर्गिक प्रणाल्यांमध्ये भू-गर्भीय, जैव, पर्यावरणीय अशा प्रणाली मोडतात, तर सामाजिक मध्ये आर्थिक, राजकीय, तांत्रिक अशा प्रणाल्यांचा समावेश होतो. २१ व्या शतकातील व्यामिश्र जगात ह्या दोन्ही प्रकारच्या प्रणाल्या एकमेकींत अशा काही विलक्षण पद्धतीने गुंतल्या गेल्या आहेत, की त्यांचा समग्रतेने विचार केल्यावरच आजच्या अनेक घटनांचा अथवा प्रश्नांचा योग्य संदर्भ लागू शकतो. उदाहरणार्थ, हवामानबदलासारखा प्रश्न नीट समजून घ्यायचा असेल, तर फक्त हवामानशास्त्र पुरेसे नाही, त्यासोबत अर्थशास्त्र, राजकारण, तांत्रिक विकास, आणि सांस्कृतिक आचरण ह्या सर्वांचा विचार करणे आवश्यक ठरते. विज्ञानामध्ये समग्रतेने विचार आणि तंत्र विकसित करण्याचा एक सिद्धांत मागील काही वर्षांमध्ये मांडला गेला आणि व्यापक प्रमाणावर वापरला जात आहे, तो म्हणजे तंत्रविचार (Systems Thinking). विश्लेषणाला (analysis ला) पूरक असेलेली संश्लेषणाची (synthesis ची) प्रक्रिया ह्यामुळे विकसित होते. तंत्रविचार हा विशिष्ट-विचाराला पूरक असतो, वरचढ नव्हे. त्यामुळे तो कधी आणि कसा वापरावा हे माणसाच्या विवेकावर अवलंबून आहे.

तंत्रविचार ही संकल्पना म्हणजे एक समग्र, कार्यशील, व बहुस्तरीय प्रणाली, जी घटक, उर्जा, नियम व उद्देश्य यांचा परस्परसंबंध समजून घेते, समग्र समज, जीवनशैली आणि कृती यांचा संगम मानली जाते. ‘तंत्रदृष्टी’ ही समग्र प्रणाली विचाराचीच एक सुसंगत अभिव्यक्ती मानता येईल – जर ती समजून वापरली गेली, तर.

तुम्ही हत्ती आणि चार आंधळे ही गोष्ट ऐकली असेलच. ह्या ठिकाणी आंधळे हे विशिष्ट दृष्टिकोनाचे किंवा ज्ञानशाखेचे प्रतीक म्हणता येईल, ज्या मध्ये एकाच प्रणालीचा विशिष्ट अभ्यास (अर्थात विश्लेषण) होतो. हत्तीचे पूर्ण ज्ञान त्याने होऊ शकत नाही. आंधळ्यांना सत्यग्राही बनले पाहिजे आणि इतर आंधळ्यांसोबत संवाद करून हत्तीचे समग्र चित्र उभे करता आले पाहिजे. हा संवाद करता येणे आणि त्यातून ज्ञाननिर्मिती होणे म्हणजेच समग्र प्रणाली विचार, अर्थात् तंत्रविचार (अर्थात संश्लेषण) होय. मेंढा-लेखामधील प्रयोग म्हणजे तो हत्ती. अनेक आंधळे ह्याच्या आकलनाचा भाग आहेत. एका बाजूला वनहक्क कायदा, ग्रामसभा, आदिवासी परंपरा – ह्या सर्व सामाजिक प्रक्रिया/संस्था, आणि दुसऱ्या बाजूला जंगल, त्यात असणारी नैसर्गिक संसाधने, कीटक, प्राणी, ओढे – अशा भू आणि जैव प्रक्रिया/संस्था. ह्या सर्व प्रक्रियांना, आणि पर्यायाने त्याच्या ज्ञानशाखांना आपण जेव्हा एकत्र बघतो, तेव्हा ती संलग्न (coupled) अशी जैव-सामाजिक प्रणाली (Social-Ecological System) म्हणून उदयास येते. ह्या ठिकाणी Ecology ह्या शब्दाचा अर्थ नैसर्गिक परिसंस्था, ह्या व्यापकतेने घ्यावा. विज्ञान साहित्यात ह्याला coupled human-natural systems असेही संबोधले जाते. ह्या प्राणलींचा वैज्ञानिक अभ्यास, इतिहास आणि काही सार्वत्रिक गुणधर्म ह्या लेखात आपण समजून घेऊ. त्यामुळे मुख्य विषय मेंढा-लेखा नसून जैव-सामाजिक प्रणाल्यांची शाश्वतता, रेसिलियन्स, त्याचे एकंदरच विज्ञान आणि इतिहास हा होतो. ह्या नमुन्यातून आपली जैव-सामाजिक प्रणाल्यांची समज अधिक दृढ होईल का? ह्याविषयी वाचकांनी चिंतन करावे.

२. मुख्य आलेख
तंत्रविचार ही एखादी विशिष्ट ज्ञानशाखा नाही, तर गोष्टींना एकत्रितपणे समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या समस्येची गुंतागुंत समजत नाही, किंवा तिचे स्पष्टीकरण एका घटकातून देता येत नाही, तेव्हा आपण नकळत तंत्रविचाराकडे वळतो. असा दृष्टिकोन कोणत्याही ज्ञानसंपादनाच्या प्रक्रियेत नैसर्गिक पद्धतीने विकसित होतच असतो – खासकरून जेव्हा पृथक्करणाच्या (reductionism च्या) मर्यादा लक्षात येतात किंवा कुठल्याही गृहीतकाच्या (hypothesis/assumptions च्या) सीमा आणि अतिसार्वत्रिकतेचा धोका लक्षात येतो. उदाहरणार्थ, नदीचे पात्र कोरडे पडल्याचे कारण आपण फक्त पावसाच्या अभावात शोधले, तर ते अपुरे ठरेल. पावसासोबतच धरणांचे नियोजन, शेतीची पाणीवापर पद्धत, भू-जल शोषण, हे सगळे घटक एकमेकांवर परिणाम करत असतात. ही गुंतणूक लक्षात घेतल्याशिवाय प्रश्नाचे पूर्ण चित्र समजत नाही.

त्याचबरोबर, जर असे गृहीत धरले की पाणीपुरवठा सरकारकडूनच झाला पाहिजे किंवा स्थानिक लोक नैसर्गिक संसाधनांचा गैरवापरच करतात, तर त्या सार्वत्रिक गृहीतकांमुळे आपण स्थानिक व्यवस्थापनाच्या यशस्वी उदाहरणांकडे दुर्लक्ष करू शकतो. अश्यावेळी आपल्याला संदर्भनिष्ठ आणि परस्परसंलग्न विचार करणे आवश्यक वाटते. आणि हेच तंत्रविचाराचे/संश्लेषण प्रक्रियेचे मूळ आहे.
मेंढा गावाची गोष्ट ही अशी कोणत्या व्यापक दृष्टिबदल आणि संश्लेषण प्रक्रियेचे प्रतीक आहे हे बघू. गोष्ट सुरू होते १९६८ साली, जेव्हा गॅरेट हार्डिन ह्या ह्यूमन इकॉलॉजीच्या प्राध्यापकाने Science ह्या प्रख्यात जर्नलमध्ये Tragedy of Commons[4] असा लेख प्रकाशित केला. सार्वजनिक नैसर्गिक संसाधनांचा माणूस कशा पद्धतीने वापर करतो, ह्याबद्दल केलेली ती एक मीमांसा होती. सार्वजनिक संसाधनांची मालकी माझी एकट्याची नसल्याने, त्याचा उपभोग घेण्याची किंमत मला थेट मोजावी लागत नाही; म्हणून कुठल्याही नियंत्रण अथवा नियमनाच्या अभावी, वैयक्तिक फायद्याच्या शर्यतीत, संसाधनांचा विनाश (tragedy) अपरिहार्य असेल, अशी ही थोडक्यात मांडणी[5]. सार्वजनिक संसाधनांबद्दल (common-pool resources) पूर्वापार चालत आलेल्या आर्थिक धोरणांमागचा पायाच जणू ह्या लेखाने नेमक्या शब्दात मांडला. आणि अप्रत्यक्षपणे त्याला पुष्टी देऊन तो सार्वत्रिकदेखील केला/झाला. शोकांत टाळायचा असल्यास ठराविक गोष्टी सुचवल्या जातात, जसे की शासनाचे किंवा खासगीक्षेत्राचे नियमन आणि नैसर्गिक-संपत्ती अधिकारांचे स्पष्ट दस्तावेजीकरण इत्यादी. ह्या विचारांमधली स्थलकालातीत सार्वत्रिकता किती योग्य आहे? शोकांत करणे (लवकर करो अथवा उशिरा) हा माणसाचा स्थायिभाव आहे का? हार्डिनने ह्या लेखाचा शेवट नवीन नैतिकतेच्या विस्ताराची आवश्यकता (need for the fundamental extension in morality) ह्या विचाराने केला. अशा नैतिकतेचा समाजास्वतःहून उदय होईल, ह्यावर हार्डिनचा फारसा विश्वास नव्हता. त्याच्या मते, लोकांची वृत्ती आणि वर्तन बदलण्यासाठी बाह्यनियम, नियंत्रण, आणि कठोर शासन, आवश्यक ठरते. म्हणजेच नैतिकतेचा स्वीकार हा स्वयंस्फूर्त नसून, लादलेला असावा लागतो. परंतु मेंढा गावचे उदाहरण आपल्याला ह्याविपरीत चित्र दाखवते. इथे tragedy of commons होताना दिसत नाही! एका-एका व्यक्तीने नव्याने कुठलीतरी नैतिकता अंगीकारली असे फारसे दिसत नाही! आणि बाहेरून नैतिकता लादली गेली असे तर अजिबातच दिसत नाही! अजबच म्हणावे लागेल.

पुढे १९९० च्या दशकामध्ये एलिनोर ओस्ट्रॉम ह्या स्वीडिश अर्थतज्ज्ञाने जगातील सार्वजनिक संसाधनांच्या व्यवस्थापनावर सखोल अभ्यास केला[6] आणि असे दाखवून दिले की जगभरात अनेक खेडी, जमाती, गाव-समूह असे आहेत जे आपल्या परिसरातील सार्वजनिक संसाधनांचे यशस्वी व्यवस्थापन आणि स्थानिक-अभियांत्रिकी करीत असतात. यशस्वी आशा अर्थाने की त्यामध्ये संसाधनांचे पुनरुज्जीवन (renewability) आणि समूहाची उपजीविका/आर्थिक गरज ह्यांमध्ये एक गतिमान संतुलन (dynamic equilibrium) प्रस्थापित असते. प्रोफेसर मार्क पेनिंग्टन ह्यांच्या शब्दात सांगायचे तर[8] “Ostrom’s work Governing the Commons[6] is a superb testament to the understanding that can be gained when economists observe in detail how people (self-organize) and craft arrangements to solve their problems in ways often beyond the imagination of textbook theorists (could be extended to the imagination of different top-down entities).” ओस्ट्रॉम ह्यांचा हा सुरुवातीचा अभ्यास प्रामुख्याने अनुभवसिद्ध निरीक्षणांपुरता (empirical) जरी असला, तरी पुढे त्यांनी ह्यातून काही सिद्धांत शोधले, समांतर संरचना शोधून काढल्या आणि त्याला अर्थशास्त्रीय धोरणांमध्ये, व्यवस्थापन पद्धतीमध्ये कसे बद्ध करता येईल, ह्यावरदेखील अभ्यास केला[8,9]. अशा पॅटर्नचे एक उदाहरण म्हणजे बहुकेन्द्रित शासन (polycentric governance) आणि यशस्वी व्यवस्थापन करण्यासाठी लागणारी अनुकूलता (adaptability), ह्या दोन पैलुंमध्ये असलेले घट्ट सहसंबंध. बहुकेन्द्रित शासन म्हणजे निर्णय घेण्याची मुभा आणि जबाबदारी वेगवेगळ्या पातळ्यांवर विभागलेली रचना. ह्यामुळे संस्थात्मक विविधता हा अत्यंत महत्वाचा पैलू निर्माण होतो. अशी अनेक प्रणालीवैशिष्ट्ये आणि रचनातत्त्वे (design principles) त्यांनी शोधून काढली[8,9,10]. ही तत्त्वे म्हणजे कोणतीही समुदायाधारित संस्था दीर्घकाळ पर्यावरणीय शाश्वततेसाठी आणि सोबतच स्वतःच्या उपजीविकेसाठी कशी सक्षम होऊ शकते, ह्याचे मार्गदर्शन आहे. ओस्ट्रॉम ह्यांना ह्या संशोधनासाठी २००९ साली नोबेल पारितोषिक मिळाले. अर्थशास्त्रातील नोबेल मिळालेल्या त्या पहिल्या महिला होत्या. ओस्ट्रॉमचे काम म्हणजे अर्थशास्त्र आणि नैसर्गिक व्यवस्थापनशास्त्रामधला एक व्यापक तंत्रविचारच आहे. त्यातून Ecological Economics ह्या ज्ञानशाखेच्या पायाभरणीसदेखील मदत झाली.

अर्थशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्र ह्यांमध्ये इकॉलॉजीचा दृष्टिकोन कसा विकसित होत गेला, आणि तसा समग्र विचार करणे कसे अनिवार्य आहे, ह्याचे विवेचन[5,7] मध्ये वाचावे.

पुढे ह्याचे व्यापकत्व अजूनच विस्तारले. अनेक लोक (अर्थतज्ज्ञ, इकॉलॉजिस्ट, सामाजिक विषयांवरचे तज्ज्ञ, तत्त्वज्ञ इत्यादि) ह्यावर विचार आणि काम करू लागले आणि ह्याच प्रक्रियेमधून ओस्ट्रॉम ह्यांचे कार्य पुढे जैव-सामाजिक प्रणाल्यांच्या (Social-Ecological Systems – SES च्या) वैज्ञानिक अभ्यासाशी एकरूप झाले. त्यांनी ह्या नव्या चौकटीच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली[10]. ही चौकट नेमकी काय आहे? जैव-सामाजिक प्रणाली (SES) म्हणजे अशी एक व्यामिश्र आणि अंतर्ग्रथित प्रणाली, ज्यामध्ये मानवसमाज आणि नैसर्गिक परिसंस्था ह्यांचे अतूट परस्परसंबंध असतात, ज्याला सह-उत्क्रांतीचा इतिहास असतो. पारंपरिक वैज्ञानिक दृष्टिकोनात मानव आणि निसर्ग ह्यांना वेगळे समजले जात असे, पण ९० च्या दशकात असे लक्षात आले की मानव आणि निसर्ग ह्यांच्या परस्परसंबंधाचे जाळे इतके घनिष्ठ आहे की ते एकत्र अभ्यासणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय अनेक घटनांचे आकलन पूर्ण होऊ शकत नाही. अर्धज्ञानातून आलेली व्यवस्थापनाची धोरणे मोठा घात करू शकतात. थोडक्यात सांगायचे तर ह्या SES प्रणालीमध्ये एका बाजूला मानवी वर्तन, संस्था, आणि निर्णय हे नैसर्गिक-परिसंस्थेवर परिणाम करतात, तर दुसऱ्या बाजूला परिसंस्थेतील बदल हे समाजातील नियम, जीवनशैली आणि वर्तनावर परिणाम करतात. म्हणून त्याला सह-उत्क्रांतीचा इतिहास असतो. कोणी म्हणेल की हा विचार तर आपल्या परंपरेमध्ये आहे. ते खरेही आहे. पण ह्या ठिकाणी आपण ह्या विचाराला वैज्ञानिक मूर्तरूप (Tacit तत्त्वांना explicit करणे), पुष्टी, आणि तंत्रामध्ये रूपांतरित होण्याची क्षमता देत आहोत. व्यामिश्र तंत्रविज्ञानाच्या (Complex Systems च्या) फ्रेमवर्कमध्ये समजून घेतले[13,14,C] तर SES प्रणालीची ताकत आणखीच दृढ होते. एका व्यामिश्र आणि अनुकूलनाची क्षमता (adaptive capacity) असलेल्या प्रणालीमध्ये काय वैशिष्ट्ये आढळतात?

दोन उदाहरणे बघूया. (१) स्व-संघटन आणि नव-सर्जन: केंद्रिय नियंत्रणाशिवाय प्रणालीत सुव्यवस्था निर्माण होते आणि परस्परक्रियांमधून नवीन गुणधर्म प्रकट होतात[A]. (२) अनुकूलनासाठी लागणारी लवचिकता (resilience). रेसिलियन्स म्हणजे केवळ धक्का सहन करण्याची क्षमता नव्हे, तर बदलत्या परिस्थितीमध्ये स्वतःला नव्याने रचण्याची आणि नव-संतुलन प्रस्थापित करण्याची क्षमता होय. १९७० च्या दशकामध्ये नैसर्गिक परिसंस्थांसाठी (ecological systems साठी) रेसिलियन्सची संकल्पना सी. एस. हॉलिंग ह्यांच्या कामात पहिल्यांदा आली[11]. पुढे मग ती जैव-सामाजिक परिसंस्थांसाठी विस्तारली गेली. एकंदरच SES प्रणालीमध्ये अनुकूलन, चक्रिया कार्यकारणसंबंध आणि त्यातून आलेली अरेखीयता, रेसिलियन्स इत्यादि वैशिष्ट्ये कशी आणि कधी उत्पन्न होतात, ह्याचे शास्त्र विकसित होत गेले[7,12,14,A].

रेसिलियन्ट जैव-सामाजिक प्रणाली बाह्य किंवा अंतर्गत धक्क्यांनंतरही कोसळत नाही, तर स्थानिक ज्ञान, सामाजिक भांडवल,आणि संस्थात्मक विविधता आणि बहुकेन्द्रितता (institutional diversity and polycentricity) ह्या वैशिष्ट्यांमुळे नव्या सर्जक मार्गांनी पुढे जाण्याची क्षमता राखते[9,10,17]. मेंढा-लेखामधील अनुभव हेच दाखवतो. वनहक्क मिळाल्यावर ग्रामसभेच्या मार्फत स्वशासन आणि सामूहिक जबाबदारी ह्यांवर आधारित निर्णय आणि व्यवस्थापनप्रक्रिया निर्माण झाली. त्यावर जंगलाविषयीच्या आणि एकंदरच आदिवासी परंपरांचा प्रभाव होता (these act as cultural and social institutions, as elements of polycentricity) आणि विशिष्ट नेतृत्वाचा प्रभाव होता – देवाजी तोफा, मोहन हिराबाई हिरालाल. अभ्यासगटामुळे शिक्षण/विज्ञान ह्यांचा एक प्रभाव होता. The institutional diversity of the process was very rich and polycentric in its governance. म्हणून ह्या प्रक्रियेमध्ये बदल स्वीकारण्याची तयारी, संस्थात्मक पुनर्रचना, आणि दीर्घकालीन विचार करण्याची क्षमताही अंतर्भूत होती. अशा व्यामिश्र आणि अनुकूलनक्षमता असणाऱ्या प्रणाल्यांमध्ये अनिश्चिततेला सामोरे जाण्यासाठी स्थानिक ज्ञान, सतत शिकण्याची तयारी, आणि सामूहिक निर्णयप्रक्रियेची गरज असते. मेंढा गावाची गोष्ट ह्या सर्व विचारांचे/तत्त्वांचे एक मूर्तरूप आहे. आदिवासी समाजाने स्वतःहून संस्थात्मक फेररचना करून, आपले जंगल सामूहिकरीत्या टिकवले आणि त्या प्रक्रियेत सामाजिक सशक्तीकरण आणि परिसंस्थेचे संरक्षण, दोन्हीं साधले. कोणतीही सामाजिक किंवा जैव प्रणाली केवळ एका स्तरावर चालत नाही. ती स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय, किंवा जागतिक, अशा अनेक स्तरांवर कार्यरत असते. आणि ह्या सर्व स्तरांमध्ये समानांतर आणि परस्परसंलग्न अशी अनुकूलनाची चक्रे चालू असतात. ह्याला पॅनार्की (Panarchy)[12] ह्या पुस्तकात तात्त्विक रूप प्राप्त होते. जैव-सामाजिक प्रणाली ह्यासुद्धा बहुस्तरीय आणि परस्परसंलग्न असतात आणि त्याचा विस्तार हा ग्रहीय (planetary-scale) असतो. ह्याविषयी अधिक[B] मध्ये वाचावे.

३. समारोप आणि मुक्त चिंतन
Tragedy of Commons ह्या लेखाचा शेवट करताना, हार्डिन ‘नवीन नैतिकतेच्या विस्ताराची आवश्यकता’ हा विचार मांडतो. त्यानुसार सार्वजनिक संसाधनांचे रक्षण करायचे असेल, तर व्यक्तींनी स्वतःच्या काही स्वातंत्र्यांवर स्वेच्छेने मर्यादा घालायला शिकले पाहिजे. अशी सामूहिक नैतिकता समाजातून आपोआप, स्वाभाविकपणे विकसित होईल; ह्यावर हार्डिनचा फारसा विश्वास नव्हता. त्याला वाटायचे की अशा समस्यांवर उत्तर म्हणजे कडक नियम, खाजगीकरण किंवा शासकीय नियंत्रण. ओस्ट्रॉमसारख्यांनी दाखवून दिले की नैतिकता, सहकार्य आणि त्यासाठी स्वीकारलेले नियम ह्या फक्त सुट्या आदर्श कल्पना नाहीत, तर एका रेसिलियन्ट आणि सह-उत्क्रांत होत गेलेल्या जैव-सामाजिक प्रणाल्यांचा तो स्थायीभाव आहे. पुढे आपण हेही बघितले की अशा प्रणाल्यांच्या नियमनाचा आधार हा केंद्रित उतरंड नसून अनेक स्तरांवर कार्य करणाऱ्या, बहुकेन्द्रित आणि आपोआप संघटित होणाऱ्या प्रणालीसंस्था असतात. ह्यालाच पॅनार्की असे म्हणतात – जिथे स्थानिक व जागतिक स्तरांवरचे निर्णय, संघर्ष आणि नवकल्पना एकमेकांवर परिणाम करत असतात[B].

ह्या विषयातील अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते अशा निष्कर्षाप्रत आलेले दिसतात की जैव-सामाजिक प्रणाल्यांमध्ये असणाऱ्या ह्या sustainability-potential ला प्रकट होण्यासाठी केवळ अनुकूल परिस्थिति तयार करणे, ही दिशा आपण घ्यायला पाहिजे[17,18]. जैव-सामाजिक प्रणाल्यांचे व्यामिश्र विज्ञान हे कदाचित स्वराज्यशास्त्राचा एक वैज्ञानिक आधार आहे. मेंढा आणि तत्सम प्रयोगांचे यश आणि अपयश, दोन्हींची मीमांसा ह्याआधारे करता येईल. पृथ्वीच्या आजच्या युगाला Anthropocene[19] असे संबोधले जाते. म्हणजे पृथ्वीचे असे युग जिथे मानव हा भू-गर्भीय चलनाचे (geological dynamics चे) एक महत्त्वाचे कारण बनलेला आहे. काही लोकांना ह्या काळात जीवसृष्टीतील सहाव्या महाविनाशाची चिन्हे दिसतात. Anthropocene मध्ये काय व्हावे, काय करावे?, हा एक मुक्त प्रश्न आहे. परंतु एक नक्की की मानवी-जीवन आणि जीवनाचा समग्र विचार ह्यांमधील द्वंद्व आणि परात्मभाव कमी करायचा असेल, आणि जर ह्या संज्ञेला नैतिक जबाबदारी अथवा दिशा म्हणून स्वीकारायचे असेल, तर मेंढा-लेखामधील प्रयोग आणि त्यापाठीशी असलेला व्यापक वैज्ञानिक आधार, हे आपल्याला कदाचित मार्गदर्शक ठरतील.

संदर्भ, टीप, वेब-लिंक्स
[1] गोष्ट मेंढा गावाची, मिलिंद बोकील, प्रकाशक: ग्रामसभा मेंढा (लेखा), २०१२.
[2] महात्मा गांधी आणि विनोबांचे विचार, खास करून मोहन हिराबाई हिरालाल ह्यांनी संपादित केलेल्या सर्वसहमतीची निर्णय प्रक्रिया ह्या पुस्तकात संकलित केलेले, प्रकाशक: वृक्षमित्र चंद्रपूर/ गडचिरोली.
[3] १९९२ सालची ७३वी घटनादुरुस्ती; पुढे १९९६ सालचा पेसा कायदा आणि २००६ चा वनहक्क कायदा – ह्यांमागे असलेली वैचारिक मूल्यबैठक.
[4] Hardin, Garrett. “The tragedy of the commons: the population problem has no technical solution; it requires a fundamental extension in morality.” science 162, no. 3859 (1968): 1243-1248.
[5] अनर्थशास्त्र, गुरुदास नूलकर, प्रकाशक: मनोविकास प्रकाशन, २०१९. ह्या पुस्तकात लेखकाने अर्थशास्त्राचा इतिहास आणि बदलत्या विचारधारा ह्यांचा मागोवा घेत, परिस्थितिकीय प्राणालींशी त्याचा कसा अनिवार्य परस्पर संबंध आहे, ह्याची मराठीत विस्तृत मांडणी केली आहे. प्रकरण ६ मध्ये tragedy of commons विषयी, आणि प्रकरण ७ मध्ये शाश्वत विकास/ Ecological Economics ह्या बद्दल वाचता येईल.
[6] Ostrom, Elinor. Governing the commons: The evolution of institutions for collective action. Cambridge university press, 1990.
[7] Capra, Fritjof, and Pier Luigi Luisi. The systems view of life: A unifying vision. Cambridge University Press, 2014. | And the corresponding course that can be accessed here: https://www.capracourse.net/
[8] Ostrom, Elinor, Christina Chang, Mark Pennington, and Vlad Tarko. “The future of the commons-beyond market failure and government regulation.” Institute of Economic Affairs Monographs (2012).
[9] Ostrom, Elinor. “Polycentricity, complexity, and the commons.” The Good Society 9, no. 2 (1999): 37-41. आणिElinor Ostrom’s Noble Prize lecture, 2009.
[10] Ostrom, Elinor. “A general framework for analysing sustainability of social-ecological systems.” Science 325, no. 5939 (2009): 419-422.
[11] Holling, Crawford S. Resilience and stability of ecological systems. 1973.
[12] Gunderson, L.H., and Holling, C.S., Panarchy: Understanding transformations in human and natural systems. 2002.
[13] https://www.resalliance.org/ | https://www.stockholmresilience.org/
[14] Norberg, J. and Cumming, G., 2008. Complexity theory for a sustainable future. Columbia University Press.
[15] Janssen, M. Use of Complex Adaptive Systems for Modelling Global Change. Ecosystems 1, 457–463 (1998). https://doi.org/10.1007/s100219900041
[16] Janssen, M.A. and Osnas, E.E., 2005. Adaptive capacity of social-ecological systems: lessons from immune systems. EcoHealth, 2, pp.93-101.
[17] Gadgil, Madhav & Guha, Ramachandra (1992). This Fissured Land: An Ecological History of India.
[18] Gadgil Madhav “Today’s Environmentalism: Time for Constructive Cooperative Action.” Economic and Political Weekly 51, no. 46 (2016): 57–61. http://www.jstor.org/stable/44165707.
[19] Ellis, Erle C. Anthropocene: a very short introduction. Vol. 558. Oxford University Press, 2018.

[A] स्व-संघटन म्हणजे एखादी रचना किंवा सुव्यवस्था केंद्रित नियंत्रणाविना निर्माण होणे. उदाहरणार्थ, स्थानिक पाणवठ्यांचे व्यवस्थापन; जिथे शेतकरी स्वतःहून पाणीवाटपाचे नियम बनवतात आणि पाळतात. दुसरे उदाहरण, मुंग्यांची रांग. कोणतीही एक ‘नेतृत्त्व’ करणारी मुंगी नसतानाही, मुंग्या एखादा अन्नस्रोत सापडला की आपोआप एक रेषा तयार करतात. त्या एकमेकींच्या मागोमाग जातात, कारण प्रत्येक मुंगी आपल्यामागे फेरोमोन रसायनाचा वास सोडते. ज्या वाटेवर जास्त फेरोमोन साचते, तो मार्ग इतर मुंग्यांना आकर्षून घेतो. अशारीतीने, पूर्ण रेषा तयार होते, जी सतत पुनर्रचनेतून (reorganize) बदलते. अन्नस्रोत बदलल्यास रांग नवी दिशा घेते. स्व-संघटनाच्या प्रक्रियेतूनच काही वेळा प्रणालीमध्ये असे गुणधर्म किंवा नमुने प्रकट होतात, जे प्रत्येक घटकाच्या वर्तनातून स्वतंत्रपणे दिसत नाहीत. ह्यालाच नव-सर्जन (emergence) म्हणतात. उदाहरणार्थ, मुंग्यांची रांग हा एक नवीन पातळीवरील नमुना (collective behaviour) आहे, जो एकाच मुंगीच्या वर्तनावरून समजत नाही. अशाप्रकारे, अनेक साध्या घटकांच्या परस्परसंवादातून एक जटिल पण कार्यक्षम रचना आपोआप तयार होते
[B]
पॅनार्की (Panarchy) च्या संदर्भात: बदल, अशांतता आणि पुनर्रचना ह्या प्रक्रिया प्रत्येक स्तरावर चालू असतात, हे स्तर एकमेकांवर वरून-खाली आणि खाली-वर परिणाम घडवतात, आणि त्यामुळे कोणत्याही धोरण किंवा हस्तक्षेपाचा प्रभाव एका स्तरापुरता मर्यादित नसतो, तर त्याचे परिणाम इतर स्तरांवरही दिसून येतात. पुनश्च एकदा आपल्या ध्यानात येईल की मेंढासारखी उदाहरणे ह्याची पुष्टी देतात. स्थानिक स्तरावरची सामूहिक क्रिया – जसे की जंगलाचे स्वशासन, – फक्त त्या गावापुरतीच मर्यादित राहात नाही, तर ती धोरणात्मक चर्चा, संसदीय कायदे आणि NGO क्षेत्रातील प्रयोगांवरही प्रभाव टाकते. अशाप्रकारे, एक लहानशी अ‍ॅडाप्टिव्ह सायकल (adaptive cycle) वरच्या स्तरांवर अधिक व्यापक परिवर्तन घडवू शकते. आणि त्याचवेळी, वरच्या स्तरांवरील बदल (उदा. कायदे, निधी, बाजारातील बदल) हे स्थानिक स्तरांवरची लवचिकता आणि टिकाव ह्यावर प्रभाव टाकतात.
[C] Complexity Science: गणित, संगणन (computation) आणि भौतिकशास्त्रामध्ये विकसित झालेल्या संकल्पनांचा आणि साधनांचा प्रणालीविज्ञानाला मूर्तरूप देण्यास आणि त्यातून तयार झालेल्या ज्ञानाची अभिव्यक्ति करण्यास ज्या ज्ञानशाखेची उत्क्रांती झाली, त्याला व्यामिश्रतेचे विज्ञान, अर्थात Complexity Science असे म्हणतात. ह्यामार्फत आपल्याला जैव, सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा बहुविध प्रणाल्यांना समग्रतेने बघता येत आहे (बहुतांशी सैद्धांतिक पातळीवर का होईना). त्यात कारणमीमांसा आणि भूत-भविष्यवेध करण्याच्या शक्यता तयार होत आहेत.

लेखक शिक्षणाने भौतिकशास्त्र आणि प्रणालीविज्ञानाचा विद्यार्थी आहेत. सध्या एका नॅच्युरलिस्टच्या दृष्टिकोनातून जैव-सामाजिक प्रणाली आणि Anthropocene या विषयांमध्ये स्वतंत्र संशोधन आणि शिक्षणाचे काम करतात.
Email: kswanand95@gmail.com
Mobile number: +91 9588469521

अभिप्राय 4

  • स्व संघटन आणि complexity science या दोन महत्त्वाच्या बाबी समजल्या.
    प्रत्येक प्रणालीवर केंद्रित नियंत्रणाचा हट्टाहास हा गरजेचा नाही, आणि उपयोगी पण नाही हे या लेखातून कळाले.
    Sustainable development यावरील स्थानिक पातळीवरील चालत आलेल्या पद्धतींचा अभ्यास करायला हवा आणि यातून climate change हवामान बदल सारख्या समस्यावर उत्तर मिळू शकतात असे वाटतं.
    या स्थानिक पातळीवरील उपयोगी पद्धतीने प्रणालींना अधिक मजबूत resilient करण गरजेचा आहे. हे लेख वाचून विनोबांच्या लोकनीती या क्रांतिकारी पुस्तकाची आठवण झाली. त्यात स्व शासन आणि स्थानिक प्रणालींच महत्व सांगितल होतं.
    Complexity Science यातून system चा एकत्रित अभ्यास करण्याचं महत्व कळत. विकासाच्या योजना बनवण्यासाठी पाणी, शेती, आरोग्य असं वेगवेगळे विषय न बघता त्यांचं एकमेकांवर होणारा परिणाम बघितला पाहिजे.

  • अभ्यासपूर्ण लेख आहे.

    फक्त सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक दृष्टया न बघता वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न अतिशय छान झाला आहे. लिखाणात सखोलतेचे दर्शन दिसते. फक्तच वैयक्तिक मत न मांडता संदर्भ दिले आहेत.

    हत्ती व आंधळे या गोष्टीतून लेखाचा गाभा कळतो.
    “हत्तीचे पूर्ण ज्ञान त्याने होऊ शकत नाही. आंधळ्यांना सत्यग्राही बनले पाहिजे आणि इतर आंधळ्यांसोबत संवाद करून हत्तीचे समग्र चित्र उभे करता आले पाहिजे. हा संवाद करता येणे आणि त्यातून ज्ञाननिर्मिती होणे म्हणजेच समग्र प्रणाली विचार, अर्थात् तंत्रविचार (अर्थात संश्लेषण) होय.

    हे अतिशय महत्वपूर्ण वाटलं.

    पुढील कामाला शुभेच्छा 🌱

  • विज्ञान आणि समाज यामधील नात्याला समजून घेण्याचा विचारपूर्वक प्रयत्न लेखामधून झालेला आहे. विज्ञानदृष्टी हा मुख्य आधार ठरतो.

    विज्ञानाच्या सामाजिक व आर्थिक पैलूंवर विचार करताना system thinking व प्रगतीची समग्र दृष्टी मांडली आहे. नैतिकतेच्या मूलभूत विस्ताराची गरज अधोरेखित करत, नव्या विचारसरणीला design principles चा आधार दिला आहे. Refrence पण छान दिले आहेत.

    शाश्वततेच्या दिशेने जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याचा मुद्दा कनेक्ट झाला. संकल्पनांनी समृद्ध असलेला हा लेख पर्यावरणीय व सामाजिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर सखोल विचाराला प्रवृत्त करतो.

  • सखोल मांडणी.
    नैतिकता उधार आणावी लागत नाही. ती सामुहिक निर्णयातून येते. असे समजले

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.