ग्रामस्वराज्याचा शिल्पकार

उन्नत आदर्शांचे आकर्षण करोडो लोकांना असते. पण आयुष्यात उतरवणे अशक्य वाटून ते आदर्श केवळ पुस्तकी आहेत, असे ठरवून ते त्या आदर्शांचा पिच्छा करणे सोडून देतात. त्या आदर्शांवर जगण्याची इच्छा बाळगून त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करणारेदेखील लाखो असतात. संपूर्ण जग ज्या दिशेने जात आहे, त्या प्रवाहाच्या विपरीत पोहतांना नाकातोंडात पाणी जाऊन दमछाक झाल्यामुळे, कालांतराने प्रवाहासोबत वाहू लागणारेही अनेक असतात. पण काही मोजकेच, कितीही संकटे आली, तरी आपल्या आदर्शांवर ठाम विश्वास ठेवून त्या दिशेने मार्गस्थ होतात. अशाच एका दुर्मिळ ध्येयवेड्याने शतकभरापूर्वी आपल्या ह्या जिद्दीमुळे जगभरातील अनेकांना वेड लावले. अर्धे जग वसाहतवादाच्या छायेत असतांना आणि साम्राज्यवादी देश आपल्या साम्राज्यविस्तारासाठी आपसात अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज होऊन लढत असतांना, त्याने केवळ आपल्या आत्मबलाच्या आधारे अहिंसक मार्गाने ब्रिटिश साम्राज्याला जेरीस आणले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. देश स्वतंत्र झाल्यावर आणि त्याच्या हौतात्म्यानंतर जन्मलेलेदेखील त्याच्या आदर्शांनी प्रभावित होऊन लाखो तरुण स्वतःचे आयुष्य झोकून देऊन समाजपरिवर्तनाच्या कामाला लागले. त्यातील काही भरकटले, काही थकले, तर काही कुठल्याही विपरीत परिस्थितीत न डगमगता अथकपणे कार्यरत राहिले. अशाच मोजक्या ध्येयवेड्यांपैकी एक म्हणजे मोहन हिराबाई हिरालाल होत.

बाबा आमटेंच्या कामाने प्रभावित होऊन त्यांच्या हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पात काम करण्याकरिता सुखवस्तू कुटुंबातील हा तरुण तिकडे गेला. साधारण वर्षभर तेथे काम केल्यावर मोहनभाईंना लोकनायक जयप्रकाश नारायण ह्यांच्या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनाने आकर्षित केले. कदाचित सेवाकार्यापेक्षा परिवर्तनाच्या कार्याकडे ते जास्त आकर्षित झाले असावेत. कारण पुढे आयुष्यभर त्यांनी परिवर्तनाच्या दृष्टीनेच काम केले. छात्र युवा संघर्ष वाहिनीच्या कामात असतांनाच त्यांच्या गृह जिल्ह्यात ‘जंगल बचाव, मानव बचाव’ आंदोलन सुरू होते. त्याचे नेतृत्व लाल शाम शाहा, बाबा आमटे, आदि मान्यवर करीत होते. मोहनभाई त्या आंदोलनात सक्रिय झाले. वडसा देसाईगंज येथे बांधकाम व लाकूड कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कामगारांचे संघटन उभे केले. नुकत्याच झालेल्या रोजगार हमी कायद्याचा सखोल अभ्यास करून त्यातून कष्टकऱ्यांना ‘आपण आपला मार्ग शोधू या’ म्हणत, हक्क म्हणून रोजगार प्राप्त करण्याचा मार्ग दाखवला. ह्याच काळात गांधी-विनोबांच्या चिंतनाचा अभ्यास करत असतांना, ‘ग्रामस्वराज्य’ ह्या संकल्पनेने प्रभावित होऊन, विनोबांच्या सर्वायतनप्रमाणे खरोखरच सर्वसहमतीने निर्णय घेणारे कुठले गाव आहे का? याचा शोध घेत असतांना, गडचिरोलीतील त्यांनी अभ्यास केलेल्या बावीस गावांपैकी त्यांना मेंढा (लेखा) हे गाव सापडले. मग त्यांनी ह्याच गावाच्या सहाय्याने गेली चाळीस वर्षे ग्रामस्वराज्याचे अनेक प्रयोग केले.

मेंढा हे गाव शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या असलेले, तीनशे चारशे लोकसंख्येचे लहानसे गाव. ह्या गावात त्यांच्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे प्रत्येक निर्णय सर्वसहमतीने घेतला जात असे. अर्थात ‘सर्व’ म्हणजे ‘सर्व पुरुष’. बाहेरच्या जगाशी विशेष संबंध नसल्याने, ते लोक शहरी माणसांना घाबरत असत. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, पँटवाला पहिला की ते जंगलात पळून जात. कारण शहरी माणूस म्हणजे त्यांच्या लेखी वनविभागाचे अधिकारी अथवा पोलीस. ह्या विभागांतील कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे मेंढावासियांमध्ये त्यांच्याविषयी दहशत निर्माण झाली असावी. त्यामुळे मोहनभाईंना सर्वप्रथम आपले वेगळेपण पटवून देण्यासाठीदेखील प्रचंड मेहनत घ्यावी लागली, संयम बाळगावा लागला. पण एकदा मेंढावासियांचा विश्वास जिंकल्यावर ते त्यांच्यातलेच होऊन गेले. मोहनभाई त्यांची भाषा शिकले, कारण आजही मेंढ्यातील बहुसंख्य लोकांची सहज संवादाची भाषा ‘गोंडी’च आहे. त्या गावात ते सहकुटुंब वस्तीला गेले. हे सर्व केल्यावरही ते त्यांचे ‘नेते’ न होता ‘सहभागी मित्र’ झाले.

सर्वसहमतीला खरी सर्वसहमती करण्याकरिता निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या अभ्यासातून गावकऱ्यांना पटवून दिले. आणि मेंढ्यात पहिली खरी सर्वसहमती दारूच्या नियंत्रणासंदर्भात झाली. ग्रामसभेत येण्यासाठी महिलांची अटच तशी होती.

‘दिल्ली मुंबई मावा राज, मावा नाटे मावा राज’ (‘दिल्ली मुंबईत आमचं सरकार, आमच्या गावात आमचे सरकार’) ह्या नाऱ्यातील त्रुटी, दूर भामरागड भागातील एका अशिक्षित आदिवासीने लक्षात आणून दिली. त्याच्या सुचनेनुसार मेंढावासियांनी अभ्यास केला आणि ‘दिल्ली मुंबई मावा सरकार, मावा नाटे माटे सरकार’ म्हणजे ‘दिल्ली मुंबईत आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार’ असा सुधारित नारा दिला. ‘आम्हीच सरकार’ अशी केवळ घोषणा देऊन ते थांबले नाहीत, तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करून सर्वसहमतीने निर्णय घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी एक द्विस्तरीय पद्धत विकसित केली. ती म्हणजे अभ्यासमंडळ आणि ग्रामसभा. अभ्यासात ज्यांना रस आहे, अशा स्त्रीपुरुषांनी गावासमोर येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचा सखोल अभ्यास करायचा, ज्याला ते प्रश्नाचा ‘कीस पाडणे’ म्हणतात, आणि ग्रामसभेत त्यावर सर्वसहमतीने निर्णय घ्यायचा. अभ्यासमंडळातील उपस्थिती ऐच्छिक तर ग्रामसभेतील उपस्थिती सर्व प्रौढ व्यक्तींना आवश्यक. अभ्यासमंडळात बाहेरील व्यक्तींनाही सहभागी होता येते. तर ग्रामसभेत केवळ गावातील मतदारच सहभागी होऊ शकतात. या प्रारूपाच्या आधारे गेल्या चाळीस वर्षांत मेंढ्याने अनेक लढे दिले आणि यशस्वी केले. अगदी प्रचंड शक्तिशाली अशा पेपर मिलला शासनाने दिलेली बांबूची लीज रद्द करवण्यापासून, तर कायद्याने वनहक्क प्राप्त झाल्यावरही वनउपजविक्री करतांना ग्राहकाला द्यावयाचा परिवहन परवाना देण्याच्या हक्कापर्यंत प्रत्येक लढा ह्याच प्रारूपामुळे त्यांना जिंकता आला. ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ हे तपासून पाहण्यासाठी प्रसंगी आमच्या जंगलातील सागवानाचे लाकूड तोडण्याचा अधिकार आम्हाला आहे; हे सिद्ध करण्यासाठी दिलेली ‘गोटूलची लढाई’ किंवा चोरून लपून भरवला जाणारा कोंबडा बाजार (कोंबड्यांच्या झुंजी) ‘ग्राम स्वराज्याचा कोंबडा बाजार’ नावाने महामार्गावर भरवून ठाणेदाराच्या हस्ते त्याचं उदघाटन करवण्यापर्यंत त्यांनी अनेक प्रयोग केले. अशाप्रकारे मोहनभाईंनी ‘सर्वसहमती ही संकल्पना स्वप्नाळू (utopian) आहे.’ असं म्हणवून हिणवणाऱ्या लोकांना आपल्या कृतीतून चोख उत्तर दिले. मेंढ्याच्या रूपात याचि देही याचि डोळा, ग्रामस्वराज्याचे दर्शन घडवले. मार्क्सचे तत्त्वज्ञान जमिनीवर उतरवण्याचे श्रेय जसे लेनिनचे, तसेच गांधी, विनोबांच्या विचारातले ग्रामस्वराज्य वास्तवात उतरवण्याचे श्रेय मोहनभाईंना जाते. आज मेंढ्याचे प्रतिनिधी म्हणून देवाजी तोफा सर्वांना माहीत असले तरी, मेंढ्यात अनेक देवाजी आहेत, जे त्यांच्या ग्रामस्वराज्याविषयी अधिकारवाणीने बोलू शकतात, फक्त भाषा ही त्यांची अडचण असल्यामुळे ते बाहेरच्या जगाला कळत नाही. ग्रामसभेमध्ये ते सर्व त्यावर गोंडीत भरपूर बोलत असतात. खास म्हणजे अगदी शहरांमध्ये आरक्षणातून नगराध्यक्ष वगैरे झालेल्या महिलांचे कारभार त्यांचे नवरेच सांभाळत असलेले आपण बघत असतांना, मेंढ्यातील तथाकथित अशिक्षित, अल्पशिक्षित महिला मात्र आपले विषय ग्रामसभेत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडतांना दिसतात.

ह्या सर्व प्रवासात मोहनभाई कधीही भाऊ, दादा, साहेब यांपैकी काहीच झाले नाहीत. ते मेंढावासियांकरिता त्यांचा ‘मोहन’च राहिले. मेंढ्याच्या बाहेर लोक त्यांना मोहनभाऊ किंवा मोहनभाई म्हणून ओळखत असले, तरी मेंढ्यात मात्र ते ‘मोहन’च आहेत. आपल्या विचारांशी एकनिष्ठ राहण्याचे मोहनभाईंचे व्रत इतके कडक होते की त्याआड काहीही आले, तरी ते आपल्या तत्त्वापासून कधीही ढळले नाहीत. त्यांच्या ह्या प्रवासात अनेक राजकीय, आर्थिक दडपणे आली; पण त्यांनी प्रत्येकाचा निडरपणे सामना केला. कधीही कोणावरही चिडले नाहीत, की कधी मोठ्या आवाजात बोललेसुद्धा नाहीत. शाब्दिक हिंसादेखील त्यांच्याकरिता वर्ज्य होती. मेंढा गावाच्या एकूणच लढ्यावर २०१२ मध्ये मी आणि आमचे नाटककार, कवी मित्र श्रीपाद प्रभाकर जोशी ह्यांनी ‘मावा नाटे माटे सरकार’ हे नाटक लिहिले आणि राज्यनाट्यस्पर्धेत त्याचा प्रयोगही केला. त्या नाटकात ‘गोटूलची लढाई’ दाखवतांना आम्ही गाववासियांना पोलिसांशी प्रतिकार करतांना दाखवले. मोहनभाईंनी त्यावर आक्षेप घेतला. नाटकात नाट्यमयता आणण्यासाठी ते आवश्यक आहे, हे पटवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण ‘मेंढ्यांच्या कुठल्याही लढ्यात हिंसा झाली नाही, तुम्हाला ती दाखवता येणार नाही.’ अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. आणि आम्हाला तो प्रसंग बदलावा लागला. नाटक, सिनेमासारख्या प्रसिद्धी माध्यमातून बायोपिक बनत असतांना, अच्छे अच्छे आपल्याच आयुष्यातील प्रसंगांची तोडमरोड होऊ देतांना आपण पाहतो, मोहनभाई त्याला अपवाद होते.

मेंढा हीच मोहनभाईंची कर्मभूमी असली तरी, आयुष्यभर मेंढा ह्या एकाच गावात त्यांनी प्रयोग केले असे नाही. २००२ मध्ये ‘जैवविविधता कायदा’ आल्यावर त्यातून ग्रामसभांना बळ मिळू शकते, हे लक्षात आल्यावर मोहनभाईंनी एक पत्रक काढून चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना ह्या कायद्याचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. त्याला मेंढा, मार्दा, शंकरपूर आणि पाचगाव या चार ग्रामपंचायतीनी प्रतिसाद दिला. त्यांच्या संयुक्त अभ्यासगटातून ह्या कायद्याचा सातत्याने अभ्यास करत असतांनाच २००६ साली ‘वनहक्क कायदा’ आला. तेंव्हा त्याचाही संयुक्त अभ्यास होऊ लागला. ह्या अभ्यासाच्या परिणामी मेंढा आणि मार्दा ही गडचिरोली जिल्ह्यातील दोन गावे ह्या कायद्यांतर्गत सामुहिक वनहक्क प्राप्त करून घेणारी देशातील पहिली गावे ठरली. पाचगाव हे सामूहिक वनहक्क प्राप्त करणारे चंद्रपूर जिल्ह्यातील पाहिले गाव ठरले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो गावांना आज सामूहिक वनहक्क प्राप्त झालेला आहे. केवळ ग्रामीण भागापुरता विचार न करता मोहनभाईंनी चंद्रपूर शहरातही एक अभ्यासगट उभा केला. त्यात माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री श्री. शांताराम पोटदुखेंपासून ते अगदी तरुण विद्यार्थ्यांपर्यंत विविध स्तरातील विविध विचारांचे लोक सहभागी होते. याच अभ्यासगटासोबत त्यांनी ‘नगर राज बिल’ आल्यानंतर शहरांतून मोहल्लासभा कश्या उभ्या करता येतील, ह्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांचे विचार मेंढा गाव आणि देशभरात त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या रूपात अजरामर आहेत.

मोबाईल- ९४२१७१८४८५
ईमेल- kishorejamdar@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.