इकोलॉजिकल सोसायटी, पुणे आणि आजचा सुधारक ह्यांनी एकत्रितपणे साकारलेला शाश्वत भविष्याविषयीचा विशेषांक जुलै महिन्यात प्रकाशित झाला. त्यावेळी मनोगतात म्हटल्याप्रमाणे भविष्याच्या शाश्वततेविषयी सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही दावा करीत नाही. उलट, त्याविषयी अधिक व्यापक आणि सखोल संवाद सुरू करण्याचा हा एक प्रयत्न आहे. घोषणांपलीकडे जाऊन, आपल्या जीवनशैलीचा, विकासाच्या संकल्पनांचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता अधोरेखित करतात.
ह्या विशेषांकातील लेखांवर अभिप्राय म्हणून एक-दोन स्वतंत्र लेख आले. शाश्वत भविष्याविषयक प्रत्यक्ष काम करणाऱ्यांचे ते अनुभवकथन असल्याने ते पाठोपाठच प्रकाशित व्हावेत असे आवर्जून वाटले. काही विषय सुटून गेले अशी रुखरुख वाटत असतानाच त्या विषयांवर काम करणाऱ्या तज्ज्ञांचे लेख आले आणि ती उणीवही पूर्ण झाली.
वाचकांनी आपल्या अन्नाकडे, पाण्याकडे, ऊर्जेकडे, कचऱ्याकडे, परिसराकडे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे निसर्गाशी असलेल्या स्वतःच्या नात्याकडे नव्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली, तर ह्या प्रयत्नाचे सार्थक होईल, असे मागील मनोगतात आम्ही म्हटले होते. तीच ह्यावेळीही अपेक्षा!!