माझ्यासारख्या १९७० च्या दशकात जन्मलेल्या अनेक लोकांसाठी आजच्या तंत्रज्ञानाची झेप भंजाळून टाकणारी आहे. १९८५ च्या काळात दुसऱ्या गावातल्या नातेवाईकांना फोन करण्यासाठी सार्वजनिक टेलिफोन कार्यालयात रांगेत एक-दोन तास उभे राहून वाट बघावी लागायची. आता आपण आपल्या हातातल्या वैयक्तिक फोनवरून जगात कुठेही क्षणात फोन लावू शकतो आणि त्या व्यक्तीला प्रत्यक्ष बघू शकतो, बोलू शकतो, तसेच एकाच वेळी अनेक लोक एकत्र गप्पा मारू शकतात.
हे फक्त एक क्षेत्र आहे. आपल्या जगण्यातल्या प्रत्येकच क्षेत्रात कल्पनातीत बदल झाले आहेत. आमच्या पिढीचेच लोक काय पण आजच्या पिढीचे लोकही या बदलाच्या प्रपाताला सामोरे जाताना गडबडून जात आहेत.