जातीचे त्याज्य स्वरूप

सर्व समाज परप्रज्ञ व रूढिबद्ध बनल्यामुळे फार दिवसांच्या वहिवाटीने जातीजातींच्या गैरसोयी व दोष सर्वांच्या अंगवळणी पडत जाऊन त्यांचे त्याज्य स्वरूप कोणालाही दिसेनासे झाले आहे. रुपयाला दोन मणांची धारण होती अशा काळांत जन्मास आलेल्या तेहतीस कोटी देव-देवतांचे सण-उत्सव व कुलधर्म आणि अठरा पगड स्वधर्मी व परधर्मी भिक्षुकांचे हक्क सध्यांच्या काळीं चालविण्यांत आपण विनाकारण खोरीस येतों, आणि ऋण करून सण केल्याने पुण्य लाभत नाही, असे कोणाही हिंदूला वाटेनासे झाले आहे. जातिधर्म, कुलधर्म ह्यांनी निर्माण केलेल्या व अजूनही निर्माण करीत असलेल्या प्रतिषेधांनी तर एकंदर हिंदू समाजाला भंडावून सोडले आहे. त्यामुळे अनेक अडचणी सोसाव्या लागतात, आद्याची* तोंडबंदी होते, आणि ढोंगीपणा व लपंडाव वाढतात, हे . बहुजनसमाजाच्या मनांत सुद्धा येत नाही. महारमांगाखेरीज कोणत्याही जातीने वड, पिंपळ जाळता कामा नये, त्यामुळे वसवा* एकाला व सरपण दुस-याला अशी स्थिति होऊन महार, मांग, मुसलमान ह्यांना फुकटफाकट सरपण मिळते. ब्राह्मणाने स्नेह विकू नये ह्या आडकाठीमुळे घरीं खिल्लार असले तरी हा कोरडा राहतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.