शोधः सर्वत्र सारखाच

तस्लिमा नासरीनमुळे या कादंबरिकेकडे आपले लक्ष जाते, अपेक्षाभंग मात्र होत नाही. जेमतेम सत्याऐंशी पानांचा विस्तार, तोही प्रकाशकांनी बळेबळे वाढवलेला, पण विचारांचा ऐवज लहान नाही. किंबहुना तेच या कादंबरिकेचे बलस्थान.
तस्लिमा ‘लज्जा’मुळे प्रकाशझोतात आली. पण ‘शोध’ ही तिच्याही आधी सहा महिने प्रकाशित झालेली. ‘फिटुं फाट’ हे या ‘शोध’चे भाषांतर. बंगालीत ‘शोध’ चा अर्थ संस्कृत ‘प्रतिशोध’ला जवळचा. ‘बदला’ – ‘सूड’, ‘परतफेड’ असा काहीसा. अशोक शहाण्यांनी अनुवादात बोलभाषेचा सहजपणा राखायचा बुद्ध्या प्रयत्न केलेला आहे. तो नावात आला.
ऑगस्ट ९२ मध्ये ‘शोध’ आली. जुलै ९३ मध्ये ‘लज्जा’वर बंदी येईपर्यंत ‘शोध’च्या पाच आवृत्त्या निघाल्या होत्या. हे भाषांतर ढाक्याच्या ‘अनन्या’ प्रकाशनाच्या आठव्या आवृत्तीवरून केलेले आहे. तिचे हे स्वागत बंगाली वाचकांच्या प्रबुद्धतेचे द्योतक आहे.
ही गोष्ट नवरा-बायकोतली आहे. बंगाली अन् त्यातून मुसलमान कुटुंबातली असूनही ती तेवढीच राहत नाही. मध्यमवर्गातल्या कोणाही जोडप्याची ती असू शकते. पारंपरिक विचारांच्या विळख्यात अडकलेल्या पुरुषप्रधान समाजात आपल्या अवतीभोवती ती घडू शकते.
हरून एक पस्तीस वर्षांचा स्त्रीसुख चाखलेला तरुण झुमूर या चोवीस वर्षांच्या अनाघ्रात पुष्पाला खुडतो. फसवत नाही, लग्न करतो. तिच्या आग्रहामुळे लौकर करतो. पण दीड महिन्यात ती गरोदर कशी राहिली या शंकेने, निर्दयपणे तिचा गर्भ पाडतो. नीट चौकशी करत नाही. झुमूरची बाजू ऐकायची गरजच काय ? ती शीलाला जपणारी अन् शरीरखेळ न खेळलेली आहे याची खात्री करून घेऊनच त्याने ती निवडलेली. तरी पहिल्या रात्री चादरीवर रक्ताचे डाग कसे नाहीत याचे त्याला आश्चर्य वाटलेले. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून कामावर निघणारा तो एक यशस्वी उद्योजक, ‘आता फुकट-फाकट घरी कशाला राह, लग्न तर होऊन गेलंय’ असा हिशेब करणारा. ‘हाताशी असणं म्हणजे काही माणूस मनाशी असणं नाही’ हा धडा माहीत नसलेला बिझिनेसमन.
झुमूरला फक्त शरीर आहे. ते परपुरुषापासून शुद्ध राखले पाहिजे. लग्नाआधीचा गर्भ पाडला अन् आता एकटीला बाहेर जाता येणार नाही याची खबरदारी घेतलेली. एम्.एस्सी. झालेली आहे म्हणून काय झाले? अडीच हजार फुटांचा फ्लॅट आहे. आईवडील, बहीण-भावांनी भरलेले एकत्र कुटुंब आहे. झुमूरने त्यांची सेवा करावी. त्यांच्यात रमावे. तिला काय करायची नोकरी? असे विचार. वर्ष झाले तरी घरी पाळणा हलण्याचे चिह्न का नाही हा वडीलधाऱ्यांना पडणारा पश्न. ‘पोरगं आण लवकर, पोरगं आण. आई होणं हेच स्त्रीजन्माचं सार्थक आहे.’
सक्तीच्या अॅबॉर्शननंतर डॉक्टरांनी सांगितले होते, पंधरा दिवस पतिसंग चालणार नाही. हरूनने मात्र चौथ्या दिवसापास्नंच संग मिळवलाय. झुमूरचा मूक संताप, उपरोधह्न ‘चारित्र्यानं संपन्न असलेल्या नवऱ्याला संभोगाला विरोध करायची हिंमत व्यभिचार करणाऱ्या कुणा बाईत काय असणार ?’ प्रेमलग्न करून आलेली झुमूर, वर्षाभरात तिला वाटू लागले, ‘मी म्हणजे हरूनच्या शरीरसुखाकरता ठेवलेला दोन पायांचा एक प्राणी आहे. सकाळी-दुपारी-रात्री पोटात काहीतरी ढकलून मला जिवंत राहावे लागते, कारण रात्री तो मला भोगणार असतो. तिच्या मनात येते. अॅबॉर्शननंतर मला नवऱ्याबरोबर सर्वोच्च उन्मीलन सुख किंवा ऑरगॅझम कधीच मिळालेला नाही. हरून अधनंमधनं विचारतो, ‘झालं का?’ मी म्हणते,
‘हो’…! का होत नाही ? आधी तर व्हायचं…. काही शारीरिक त्रुटी तयार झालीय अॅबॉर्शनपास्न का मानसिक पांगळेपण ? मन आता पूर्वीसारखे प्रेम करत नाही हरूनवर. खूप आतमध्ये गुपचूप त्या भयंकर निष्ठुर माणसाबद्दल तिला घृणा वाटते.’ (पृ.४३)
तिच्याच इमारतीत खालच्या मजल्यावर सेवती ही डॉक्टर राहायला आलेली. नवरा अन् झुमूरच्याच वयाचा चित्रकार दीर. त्याला पाहुन बेचैन झालेल्या झुमूरला वाटते, की हे प्रेम की ‘बेड्या घातलेल्या पायांचा नियम, पिंजऱ्याबाहेर जाण्यासाठी उतावीळ ?… की एकाकडनं आघात झाल्यावर दुसऱ्याकडे ओढ, काहीसा आसरा शोधणे ?’
ती ओळख करून घेते. वाढवते. चाकोरीबाहेरचे त्याचे मन तिला मोहवते. डोळ्यांतली तहान तिला लुभावते. सेवती, तिचा हा दीर अफझल यांची सोबत मिळाल्यापासून झुमूरला ‘माझ्या संसाराचा पिंजरा मला जगाएवढा अफाट पसरलेला’वाटायला लागतो.
तिला बरे वाटत होते. ती विचार करते ‘मी जुन्या वळणाच्या घरातली मुलगी आहे. त्याहूनही जुन्या वळणाच्या घरची सून आहे. माझे मलाच समजेना की चांगला धडधाकट, कमावता नवरा असूनसुद्धा दुसऱ्या पुरुषाच्या स्पर्शाने आपल्याला आनंद कसा होतोय ?’ एवढ्या काळचे सगळे संस्कार कुठे गेले ? (पृष्ठ ५९)…. अफझलनं थोडं थोडं करत माझं सगळंच घेऊन टाकलंय. मीसुद्धा शरीर भरून त्याचा स्वीकार केला.’ (पृष्ठ ६०)… ‘मी ठरवून टाकलंय… अफझलच्या वीर्यानं आपण वीर्यवान व्हायचं.’ (पृष्ठ ६२) ‘ही जाणीव पापाची आहे असं मला एकदासुद्धा वाटलेलं नाही. उलट वाटतं, हरूनचं जे देणं आहे तेच आपण त्याला परत करतोय. याचं नाव प्रतारणा नाही, व्यभिचार नाही. केवळ कर्जाची परतफेड आहे ही.’ (पृष्ठ ६२) ‘शोध’. “फिर्टेफाट’.
आता गरोदर राहिलेल्या झुमूरची पत घरात एकदम वाढते. तिला कळून चुकते, ‘ही आपल्या पोटातल्या मुलासाठी…. संसारात बाईमाणसाला काहीच किंमत नाही,’ (पृष्ठ ६८) झुमूरचे ध्येयवादी बाबा म्हणायचे, ‘आयुष्यात येणारी नाना प्रकारची वादळं सहन करायची ताकद आपल्यात अससायला हवी. माणसाचे सामाजिक संबंध हेच त्याचं अंतिम ध्येय असणं काही बरोबर नाही. जो संबंध माणसाचे जन्मसिद्ध अधिकार छिनून घेतो, तो संबंध कधीच कल्याणकारी होत नाही.’ (पृष्ठ ७१)
आता स्थिती पालटली. झुमूरच्या मनात येतं, ‘लग्नानंतर याच्या किंचितशा दयेसाठी, किंवा करुणेसाठी आपण आशेनं व्याकुळ व्हायचो. पण आता कशाची जरूर आहे? प्रेम वेळच्या वेळी नाही मिळालं तर अवेळी त्याचीसुद्धा चव कडवट होऊन जाते. बाळंतपणाच्या वेळी हरूनचा व्याकुळलेपणा पाहून तिला हसू येतं. कुणाकरता तुला एवढा घोर लागून राह्यलाय ? कुणाकरता? ते तर काही तुझं मूल नाही. तुझ्या मुलाचा तू स्वतःच खून केलायस. नि ज्याच्यावरच्या एवढ्या प्रेमापोटी तू बेचैन होऊन जातोयस, तो एका कणानंसुद्धा तुझा नाही.’ (पृष्ठ ७५) दैवदुर्विलास हा, की मुलगा झाल्यावर सगळीजणं म्हणाली, हरून पण म्हणाला, मुलगा दिसायला हरूनसारखा झाला. मुलाचं नाव अर्थात् वडलांच्या नावाशी मिळतं जुळतं ठेवलं गेलं. एवढ्या काळानंतर ‘आपण याच्या कुटुंबाचे एक सभासद बनलो. या मुलाकरवी’ याची जाणीव झुमूरला झाली.
हरूनशी प्रतारणा केल्याबद्दल माफी मागण्याचा, पश्चात्ताप करण्याचा प्रश्नच नव्हता. ‘त्या गुन्ह्याची सजा तर त्यानं देऊनच टाकलीय. एका गुन्ह्यासाठी दोनदा सजा मी का भोगावी?’ असा झुमूरचा सवाल आणि हरूनचे काय ? त्याच्या ओठींच्या स्मितात बापपणाचा अभिमान झळकत असतो.
असे हे तस्लिमाचे कथाकाव्य आहे. आशयघन, अल्पाक्षरी निर्मिती. स्त्रीपुरुषसंबंध, लग्न, पितृत्व, पुरुषप्रधान समाजातली विवाहसंस्था, स्त्रीची जागा यांवर मार्मिक भाष्य आहे. जागोजागी थबकून, अंतर्मुख होऊन तुम्ही विचारात पडता : खरंच, किती खरं आहे हे! १६, शांतिविहार, सिव्हिल लाईन, नागपूर ४४०००१. (फोन : ०७१२-२५२३०१०)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.