संपादकीय रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

“कोणत्याही संकल्पनेचे महत्त्व जर तिच्याद्वारे प्रेरित वैचारिक परिवर्तनाने मोजण्याचे ठरविले, तर नैसर्गिक निवडीद्वारा उत्क्रांती ही निर्विवादपणे मानवी इतिहासातील सर्वांत महत्त्वपूर्ण संकल्पना ठरेल.”

चार्ल्स डार्विनच्या जन्माला यंदा दोनशे वर्षे पूर्ण झाली. त्याच्या ऑरिजिन ऑफ स्पीशीज ह्या ग्रंथाच्या प्रकाशनालाही दीडशे वर्षे लोटली. पण ह्या ग्रंथामुळे उडालेली खळबळ अजूनही विरली नाही. मानवी बुद्धिमत्तेच्या विविध अंगांना कवेत घेणारा, दैवकशास्त्रापासून वैद्यकशास्त्रापर्यंत अनेक क्षेत्रांत मूलभूत वैचारिक परिवर्तन घडविणारा व एकाच वेळी अनेक नव्या विद्याशाखांना जन्म देणारा असा ग्रंथ मानवी इतिहासात अभूतपूर्वच म्हणायला हवा. त्याहून महत्त्वाची बाब ही की ह्या ग्रंथाने मानवी स्वभाव, प्रेरणा, विचारपद्धती व वर्तन यांच्याविषयी फेरमांडणी करतानाच काही असे प्रश्न उपस्थित केले, ज्यांची चर्चा गेली दीडशे वर्षे सुरू आहे व यापुढेही राहील.

मार्क्सवाद, नवभांडवलवाद, सुप्रजननशास्त्र (Eugenics) नववसाहतवाद, पर्यावरणवाद, यासारख्या परस्परविरोधी विचारसरणीही वेगवेगळ्या कालखंडात डार्विनवादाशी नाते सांगतात (व त्याद्वारे आपला वैज्ञानिक आधार मजबूत असल्याचा दावा करतात). ह्या एका बाबीवरूनदेखील डार्विनच्या कामगिरीचा आवाका व व्यामिश्रता (तसेच वादग्रस्तताही) स्पष्ट व्हायला हरकत नाही.

आजचा सुधारक च्या ह्या डार्विन विशेषांका च्या निमित्ताने आम्ही डार्विनने मांडलेल्या संकल्पनांचा फेरआढावा घेण्याचे ठरविले आहे. त्यासोबतच आजच्या, पोलादाच्या भट्टीसारख्या झपाट्याने बदलणाऱ्या तप्त प्रवाही दुनियेत, ह्या संकल्पनांची प्रस्तुतता व भूमिका तपासावी, हेदेखील आमचे उद्दिष्ट आहे. डार्विनने लावलेल्या उत्क्रांतिवादाच्या रोपट्याचे आता विराट वटवृक्षात रूपांतर झाले आहे. डॉकिन्स, गूल्ड, मायर, मेनार्ड-स्मिथ, विल्सन अशा कितीतरी पूरक-विरोधी, शाखा-उपशाखा, पारंब्या-उपवृक्ष असा पसारा वाढला आहे. भाषाशास्त्र, वैद्यक, मानसशास्त्र, पर्यावरणशास्त्र, अनुवंशशास्त्र, जेनोमिक्स, मेंदुविज्ञान, समाजशास्त्र, अशा कित्येक विद्याशाखांमधून उत्क्रांतिवादाचा विकास व विस्तार झाला आहे. त्याविषयीचे हजारो पानांचे साहित्य इंग्रजी व अन्य भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्या सर्वांची मायमराठीतून छोटेखानी १२० पानांत ओळख करून देणे म्हणजे ‘गागर में सागर’ भरणेच म्हणायला हवे. शिवाय ह्या अंकाच्या संपादकांपैकी कोणीही उत्क्रांतिशास्त्राचे रीतसर शिक्षण घेतलेले नाही, किंवा ह्या क्षेत्रातील व्यासंगही आमच्या गाठीशी नाही. बहुधा आमच्या अज्ञानापोटीच आम्ही हे धाडस करायला धजावलो असण्याची शक्यता आहे.

एखाद्या समाजाची मानवी स्वभावाविषयी काय धारणा आहे, ह्या निकषावर त्या समाजाच्या संस्था, कायदेकानू, संस्कृती आकार घेतात. ह्या प्रमेयाचा व्यत्यासही तितकाच खरा आहे. ईश्वराने आपल्या प्रतिमेनुसार मानवाला घडविले, की माणसाला इतर प्राण्यांप्रमाणेच, जीवशास्त्रीय व पर्यावरणीय घटकांनी उत्क्रांतीच्या रेट्यानुसार घडविले ? समाजाची जशी धारणा असेल, त्यानुसार त्याच्या परंपरा, मूल्ये, सामाजिक संस्था आकार घेतील हे स्पष्ट आहे. माणसाला निवडीचे, स्वतःमध्ये व परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्याचे कितपत स्वातंत्र्य आहे, हाही असाच कळीचा मुद्दा आहे. हा छर्शीश-पीश वाद शास्त्रज्ञांच्या व विचारवंतांच्या अनेक पिढ्यांनी हिरिरीने लढवला. विशेषत: मार्क्सवाद व स्त्रीवादाच्या पुरस्कर्त्यांनी डार्विनवाद, विशेषतः सामाजिक डार्विनवाद हा जैसे-थेवादाचा पुरस्कार करतो, नवा माणूस घडविण्याच्या माणसाच्या क्षमतेला प्रश्नांकित करतो, म्हणून त्यावर टीका केली. ह्या अंकात चार लेखक ह्या सूत्राचा मागोवा घेत आहेत. सारे ठरीव ? का सारे घडीव ? ह्या लेखाद्वारे डॉ. अजय ब्रह्मनाळकर “संस्कृती? की प्रकृती?’ ह्या वादाच्या दोन्ही बाजू उलगडून अखेर हा वाद फिजूल आहे; संस्कृतीतून फुलणारी प्रकृती असेच या जोडीचे नाते आहे या निष्कर्षावर पोहचतात. हेच सूत्र पुढे चालवीत राजीव साने नर व मादी यातील जनुकीय ‘हितसंबंध’ तपासताना दिसतात. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत प्राण्यांमधील पितृराज्य, प्रियाराधन व पिलांच्या संगोपनातील नरमादीचा कमीअधिक सहभाग ह्या साऱ्या बाबी त्यांच्या जनुकीय हितसंबंधांच्या आधारावर कश्या घडतात हे त्यांनी सप्रमाण मांडले आहे. त्यांनी वर्णिलेल्या सद्गृहस्थ-निवड धोरण, नरोत्तम-निवड धोरण व सटकणारे-अडकणारे जोडीदार ह्या संकल्पना वाचकांना मनोरंजक वाटतील. काहींना त्या मानवी संबंधांना लावण्याचा मोह होईल. अशा वाचकांनी ह्या लेखाच्या सुरुवातीचा “ही मांडणी प्राकृतिकतेची पूर्वपीठिका एवढ्या मर्यादित अर्थाने घ्यावी” हा वैधानिक इशारा गंभीरपणे घेण्याची गरज आहे.

मार्क्सवाद व स्त्रीवाद ही विसाव्या शतकातील महत्त्वाची तत्त्वज्ञाने होत. जग बदलण्याचा, ते अधिक मानवी करण्याचा विचारच नव्हे, तर कृती करण्याची प्रेरणा त्यांतून कोट्यवधींना मिळाली. ह्या दोन्ही विचारसरणींचे डार्विनशी, डार्विनवादाशी असणारे नाते बरेच व्यामिश्र व अस्पष्ट आहे. ह्या अंकात ह्या नात्याचे कंगोरे तपासण्याचे दोन महत्त्वपूर्ण प्रयत्न वाचकांपुढे ठेवत आहोत. डॉ. संदीप पेंडसे यांनी अतिशय सावधपणे व नम्रपणे मार्क्सवाद व उत्क्रांतिवाद यातील परस्पर-संबंध उलगडून दाखविला आहे. मार्क्सला उत्क्रांतिवादात स्वतःच्या इहवादी व द्वंद्वात्मक मांडणीची निसर्ग-विज्ञानातील समर्थने आढळली, असे ते नमूद करतात. परंतु ह्या दोन्ही विचारसरणीच्या दृष्टिकोणातील मूलभूत फरकांमुळे हे दोन्ही प्रवाह समांतर राहिले. उजव्या मंडळींनी उत्क्रांतिवादाचा विपर्यास सामाजिक उत्क्रांतिवाद व सुप्रजननशास्त्रा त केला. परंतु अनेक मार्क्सवाद्यांनी डार्विनच्या विचाराशी अतूट नाते जोडण्याचा प्रयत्न केला, याचीही ते नोंद घेतात. एका विशिष्ट कालखंडात एक क्रांतिकारी विचार पुढे आणणारा, इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा–एवढे व एवढेच महत्त्व ते डार्विनच्या मांडणीला देतात.

ह्याउलट स्त्रीवादाचे डार्विनशी असणारे नाते सुरुवातीपासूनच संवादापेक्षा वादाचे राहिले आहे. पूर्वी नमूद केल्याप्रमाणे जोपासितता की सहजातता (नर्चर ऑर नेचर) वादामध्ये डार्विन सहजाततेची बाजू घेतो व स्त्रीवाद जोपासिततेची पाठराखण करतो, ही धारणा ह्यामागे होती. पुरुषसत्तेच्या समर्थकांनी आपल्या बाजूने दिलेले उत्क्रांतिवादाचे (चुकीचे) दाखले हेही स्त्रीवाद विरुद्ध उत्क्रांतिवाद द्वंद्वामागील एक कारण असावे. पण “उत्क्रांतिवाद हा स्त्रीवादाहून वेगळा, महत्त्वाचा विचार आहे’ एवढ्यावर न थांबता ह्या दोन भिन्न विचारसरणींमधील संश्लेषणाचा एक प्रयत्न आम्ही या अंकात सादर केला आहे. एलिझाबेथ ग्रॉझ (Elizabeth Grosz) ह्या स्त्रीवादी विचारिकेच्या लेखाचा अनुवाद डार्विन व स्त्रीवाद : संवादी शक्यता वाचकांना एक वेगळा दृष्टिकोण देईल, अशी आम्हाला आशा आहे.

अर्थात् उत्क्रांतिवादाचे परिणाम व त्याचे इतर विचारांशी असणारे नाते समजण्यासाठी मुळात डार्विनने काय मांडले व त्यामुळे एवढी खळबळ का उडाली हे समजून घ्यावे लागेल. जयप्रकाश म्हात्रे यांचा लेख वाचकांची ही उत्सुकता नक्कीच भागवेल. डार्विनने ज्ञान प्रवाही केले, दैवी शक्तीचे साह्य न घेता निसर्गाचे आकलन शक्य आहे हे सिद्ध केले. एका अर्थाने कोपर्निकसची क्रांती पूर्णत्वास नेली, हे त्यांचे मत त्यांच्या विज्ञानवादी/इहवादी दृष्टिकोणाची साक्ष देते. पण त्यांनादेखील डार्विनचे काम अलौकिक वाटते. असो.

आ.सु. स्वतः विवेकवादाचे पुरस्कर्ते असले तरीही (किंबहुना म्हणूनच) विविध विचारांच्या वादसंवादाचे व्यासपीठ ही आपली भूमिका ह्या नियकालिकाने जाणीवपूर्वक जोपासली आहे. डार्विनने तत्कालीन (विशेषतः ज्यू-ख्रिश्चन) धर्मश्रद्धांना तडाखा दिला असला, तरी आज जगात सर्व प्रकारच्या धर्मश्रद्धा (तसेच अंधश्रद्धा) व डार्विनवाद यांचे शांततापूर्ण सहजीवन दृष्टीस पडते. डार्विनविषयी बहुतेक लेखन पाश्चात्त्य लेखकांनी, पाश्चात्त्य मनोभूमिकेतून केलेले आहे. डार्विनचा भारतीय विचारपरंपरेवर काही परिणाम झाला का, असल्यास/नसल्यास त्याची कारणे कोणती, धर्म/अध्यात्म यांच्या क्षेत्रात डार्विनच्या मांडणीमुळे कोणते प्रश्न निर्माण झाले हे तपासून पाहणे आम्हाला महत्त्वाचे वाटले. डॉ. नंगँदय्या, डॉ. प्रसन्न दाभोळकर व राजेश कस्तुरिरंगन यांचे ह्या विषयावरील लेख हे ह्या अंकाचे खास वैशिष्ट्यच म्हणायला हवे.

डार्विनमुळे भारतीय विचारपद्धतीत उत्पात घडले नाहीत, किंबहुना भारतीयांसाठी तो आणखी एक क्रांतिकारी शास्त्रज्ञ एवढाच राहिला, असे कस्तुरिरंगन मांडतात. परंतु डार्विनने ख्रिश्चन धर्ममतांना व आत्ममग्न पाश्चात्त्यांच्या अहंकाराला जो तडाखा दिला, त्यामुळेच भारतीय विचारांचे स्वागत करण्याची मनोभूमी पश्चिमेत तयार झाली. भारतीय (आशियाई) देश हे युरोपियन धर्मांच्या तुलनेत अधिक शास्त्रशुद्ध व पर्यावरणस्नेही आहेत हे बिंबवणेही त्यामुळे अधिक सुलभ झाले. एका अर्थाने हा उत्क्रांतिवादाचा भारताला झालेला आनुषंगिक लाभ आहे, हे त्यांचे निरीक्षण महत्त्वाचे ठरेल.

नंजुदय्या ह्यांनी जीव आणि जाणीव ह्या महत्त्वपूर्ण निबंधाद्वारे एका अवघड व कळीच्या मुद्द्याला हात घातला आहे. ज्या सजीवांमध्ये मज्जासंस्था विकसित झाली असते, त्यांच्यात जाणीव निर्माण होते. जाणीव ही माहिती संपादित व संस्कारित करण्याशी संबंधित स्थिती आहे. ही माहिती बहुधा बाह्य जगाकडून प्राप्त होते, पण उत्क्रांतीच्या प्रगल्भ टप्प्यावरील सजीवांमध्ये ती स्व निर्मित असू शकते असे त्यांचे प्रतिपादन आहे. थोडक्यात, त्यांनी जाणीव ह्या संकल्पनेला चैतन्यवादाच्या परिघाबाहेर आणून वैज्ञानिक दृष्टिकोणातून तिचा धांडोळा घेतला आहे. वैचारिक आळसापोटी जाणिवेसारख्या संकल्पनांना गूढवादात न ढकलता वैज्ञानिक, विशेषतः उत्क्रांतिशास्त्राच्या परिप्रेक्ष्यातून अभ्यासाद्वारे त्यांची उकल करणे शक्य आहे, असा त्यांचा विश्वास आहे.

ह्या उलट प्रसन्न दाभोळकर ह्या मानसशास्त्रज्ञाने “मी आधुनिक विज्ञान मानतो, तसेच ब्रहाही. माझ्या ह्या दोन्ही भूमिका परस्पर-विसंगत नाहीत’ अशी भूमिका घेतली आहे. ह्या दोन्ही विभिन्न स्तरांचे संतुलन सांभाळीत त्यांनी उत्क्रांतिवाद, जाणीव व ब्रह्म यांच्या परस्परसंबंधांचा शोध त्यांच्या लेखाद्वारे घेतला आहे.

डार्विनच्या विचारांचा प्रभाव तात्त्विक खंडनमंडनाच्या पलिकडे आपल्या वास्तविक जीवनावरही पडला आहे. भारतीय संदर्भातील आजचे कळीचे प्रश्न म्हणजे जातिव्यवस्था व शेतीवरील अरिष्ट. ह्या अंकात ह्या दोन्ही मुद्द्यांचा परामर्श उत्क्रांतिवादाच्या संदर्भात घेण्यात आला आहे. देवेन्द्र इंगळे यांनी जेनोम प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेला लेख अनेकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. जेनोम प्रकल्पाच्या निष्कर्षांचा चुकीचा अर्थ लावून त्याद्वारे उच्चवर्णीय ते उपरे ह्या सिद्धान्ताला शास्त्रीय मुलामा चढविणाऱ्या तथाकथित पुरोगामी विचारवंतांचा त्यांनी केलेला प्रतिवाद धाडसी आहेच, तसेच महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या परंपरेला पुढे नेणाराही आहे. त्यासोबतच शेषराव मोरे ह्या ज्येष्ठ विचारवंतांचा पांडुरंगशास्त्री आठवलेंच्या मांडणीतील सुप्रजननशास्त्राचे समर्थन उघडे करणारा लेख मराठी बौद्धिक जगतात खळबळ माजवू शकतो. मुळात, जातिव्यवस्थेचे समर्थक व तात्त्विक विरोधक, कोणीही आपल्या विचारांच्या समर्थनार्थ वैज्ञानिक संशोधनाचा विपर्यास वा विकृतीकरण करू नये, ही विवेकवादी भूमिका कोणालाही अमान्य होण्याचे कारण नाही.

तारक काटे ह्या शेतीतज्ज्ञ पर्यावरणशास्त्रज्ञाचा लेख भारतीय शेतीचा नैसर्गिक शेतीपासून जीएम बियाणांपर्यंतच्या हायटेक प्रवासाचे वर्णन करतो. जनुकीय अभियांत्रिकीच्या नावाखाली केली जाणारी तथाकथित वैज्ञानिक शेती ही मूलतः डार्विनच्या मांडणीच्या विरोधातील, निसर्गातील विविधता नष्ट करून नैसर्गिक निवडीद्वारे उत्क्रांतीला कमी वाव देणारी, म्हणूनच निसर्गविरोधी व उत्क्रांतिविरोधी आहे ही त्यांची मांडणी मोलाची आहे. शेतीवरील अरिष्ट व पर्यावरणीय संकट यांची सांगड घालण्याचा त्यांचा प्रयत्न वाचकांच्या बुद्धीला नक्कीच चालना देईल.

व्यक्तीव्यक्तींतील फरक हा आंतरवंशीय फरकांपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे व मानवजातीतील जीनदत्त फरकांपैकी ८५% फरक एकाच समूहांतर्गत आढळतात, तर विविध वंशातील जीन्सचा फरक केवळ ७% इतकाच आहे ही लेवाँटिन यांच्या लेखातील निरीक्षणे मानव तेवढा एक ह्या धारणेमागील जीवशास्त्रीय आधाराची पुष्टी करतात. जीवशास्त्रीय नियतिवादी धारणा बकवास असून तिचा डार्विनप्रणित उत्क्रांतिवादाशी संबंध नाही, हे त्यांचे स्पष्ट मत अनेकांना दिलासा देणारे वाटेल. आनंद जोशींनी घडविलेली मेंदुविज्ञानाच्या बगीच्या तील सहल आमच्या वाचकांना मनोरंजक, तसेच उद्बोधक वाटेल. मन ही सुटी बाब नसून मेंदूच्या व्यवहाराचाच तो एक भाग आहे व आपल्या विभिन्न संवेदना व भावना यांचा अर्थ मेंदूच्या पेशींतील जोडण्या व त्यातील परिवहन यांच्या आधारे लावता येऊ शकतो, ही त्यांची मांडणी अनेकांना अभिनव वाटेल. त्यासोबतच स्टीव्हन पिंकरच्या लेखातील “जग निरंतरपणे हिंसेकडून अहिंसेकडे प्रवास करते आहे” ह्या आशावादाशी आपण पूर्णपणे सहमत झालो नाही, तरी आजच्या निराशाजनक वातावरणात त्यामुळे एक दिलासा आपल्याला नक्कीच मिळू शकतो. पुढच्या सहस्रकातील मानव आपल्याहून फारसे वेगळे नसतील व तेही नातेसंबंधांच्या जाळ्यात व “मी कोण? कशासाठी जन्मलो?’ ह्या तत्त्वचिंतनात रमणारे असतील, हा त्यांचा निष्कर्षही विज्ञान-काल्पनिकांमधील चित्रणाला धक्का देणारा ठरेल. त्याशिवाय विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रसिद्ध गेम थिअरीचा परिचय, विद्यागौरी खरेंच्या लेखातून प्रकट होणारी चार्ल्स डार्विन ह्या सश्रद्ध वैज्ञानिकाची घालमेल वगैरे वाचकांना मननीय वाटेल.

अर्थात् ह्या अंकात समाविष्ट झालेल्या घागरी बाहेर अथांग ज्ञानाचा सागर आहे, याची आम्हाला जाणीव आहे. ह्या अंकात यायला हवे होते, अशा विषयांची यादीही मोठी आहे. पृष्ठसंख्येची मर्यादा, त्याचप्रमाणे विविध ज्ञानशाखांमधील संशोधनाचे सार सोप्या मराठीत मांडू शकणाऱ्या लेखकांची कमतरता, ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. तरीही, ह्या अंकाच्या निमित्ताने आम्ही काही नव्या दमाचे लेखक आ.सु.च्या वाचकांसमोर सादर करू शकलो, याचा आनंद आहे. ह्या अंकामुळे वाचकांच्या ज्ञानात भर पडेल, त्यांची ज्ञानाची भूक वाढेल, त्यांच्या काही प्रश्नांना उत्तरे मिळतील, तर अनेक नवे प्रश्न त्यांना पडतील. त्यातून स्व-अध्ययनाची त्यांची प्रेरणाही तीव्र होईल. अशी आम्ही अपेक्षा करतो. आपल्या आसपासचे विषण्ण करणारे वैचारिक दारिद्र्य व मरगळ घालविण्यासाठी आपण किमान एवढेतरी करू शकतो. “”Man is programmed to be self programmable” हे डार्विनवादाचे सार आपल्याला नवे काही घडविण्यासाठी प्रेरक ठरेल का? आपल्या प्रतिसादाची आम्हाला आस लागलेली आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.