विज्ञान आश्रमाची कथा – लेखांक २

आघाडीचा अभ्यासक्रम मूलभूत ग्रामीण तंत्रज्ञानाची पदविका (DBRT)

‘ग्रामीण तंत्रज्ञान पदविका’ हा विज्ञान आश्रमाने विकसित केलेला मुख्य अभ्यासक्रम आहे. मागच्या अंकात म्हटल्याप्रमाणे निसर्ग हाच अभ्यासक्रम मानून सोईसाठी या अभ्यासक्रमाचे – अभियांत्रिकी, ऊर्जा-पर्यावरण, शेती डु पशुपालन आणि गृह आरोग्य हे चार विभाग केले आहेत. ज्यांना कोणाला हे तंत्रज्ञान शिकायचे आहे, त्यांना थोडे फार गणित आणि लिहिणे-वाचणे येते ना, म्हणजे सर्वसाधारणपणे आठवीपर्यंतचे शिक्षण आहे ना, वय चौदा वर्षांपुढे आहे ना, त्यांना एकट्याने घराबाहेर वर्षभर राहता येईल ना याची खात्री केली जाते. बाकी हिंदी – मराठीचे व्यवहारापुरते ज्ञान असले की मार्काची काही अट नसते. सध्या या अभ्यासक्रमात सर्व प्रकारची मुले शिकत आहेत. उदा. कमकुवत आर्थिक गटातली, अतिरिक्त ऊर्जा दाखवणारी, कमी -जास्त मार्क मिळवणारी, काही वेगळे करण्याची इच्छा असलेली. प्रथम येईल त्याला प्रवेश या तत्त्वाने येथे प्रवेश दिला जातो. आमच्या अपेक्षा स्पष्ट असतात. स्वतः हाताने काम करायची तयारी हवी, पुढे व्यवसाय करायची इच्छा हवी आणि पाबळसारख्या ठिकाणी राहण्याची तयारी हवी.
आश्रमात कमीतकमी सोयीमध्ये सगळ्यांना राहावे लागते.
उद्योजक म्हणून मुलांची मनोवृत्ती घडायला यामुळे सुरुवात होते. उद्योजकाला शनिवार – रविवार सुट्टी किंवा पाच दिवसाचा आठवडा नसतो. त्याला पूर्ण वेळ उद्योगाचा विचार करावा लागतो. पूर्ण क्षमतेने काम करावे लागते. शारीरिक क्षमताही लागते. या सगळ्याचा विचार करून आम्हाला वर्षभरात ही तयारी करून घ्यायची असते. काम करणे म्हणजेच शिकणे.
या वर्षभरात विद्यार्थी प्रत्येक विभागात ३ महिने काम करतात. काम करतच मुले शिकतात. प्रत्येक विभाग गावातील लोकांना काही ना काही सेवा देत असतो, त्यात मुले सहभागी होतात. किंवा आश्रमाच्या गरजा लक्षात घेऊन काही कामे आयोजिली जातात. आश्रमात उपलब्ध साहित्यापैकी काही वापरता येईल का त्याचा अंदाज घेतला. बांबू आहेत का, भंगारात काही उपयुक्त आहे का इ. हे सर्व करताना मुलांचे अभ्यासक्रमातील अनेक धडेही शिकून झाले. उदा. आरेखन, साहित्य निवड, साहित्याचे गुणधर्म, योग्य पर्याय निवडणे, अंदाजपत्रक करणे, वर्कशॉपमधील कामे. या प्रत्येक गोष्टींचे प्रशिक्षण हे पॉवर पॉईंटवर दिले गेले. या कामात अभ्यासक्रमातील अनेक प्रात्यक्षिके होऊन गेली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांना कामे एकमेकांत वाटून घ्यावी लागली. त्यासाठी एकमेकांतील पूरक क्षमता बघाव्या लागल्या. नोंदी, निरीक्षणे, विश्लेषण.
गेल्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे जनावरांना चारा – पाणी विकत आणून घालावे लागत होते. दूध कमी मिळत होते. सरकारी छावणी पण जवळ नव्हती.त्यामुळे गायी पाळणे आतबट्ट्याचे झाले. आता काय करावे याचा विचार करताना मागच्या नोंदींचा अभ्यास करायला मुलांना सांगितले. आपल्याला गाईंना किती चारा द्यावा लागतो, दुध किती येते, आधीच्या सर्व नोंदींचे विश्लेषण करून त्यातून असा मार्ग निघाला- सध्या गाभण असलेली गाय चार महिने दूध कमी देणार आहे; तिला ओळखीच्या, पाणी असलेल्या शेतकऱ्याकडे वर्षभरापुरते सांभाळायला दिले तर आपला खर्च कमी होईल, गाईकडे चांगले लक्ष देता येईल. गाभण गाईला होणारे वासरू शेतकऱ्याला दिले तर दोघांनाही फायदा होईल. धंद्याचे अर्थशास्त्र असे प्रत्यक्ष अनुभवातून शिकवावे लागते. पशुपालनामध्ये गुरांची निगा राखणे, शेण काढणे, चारा घालणे हे तर मुले शिकतातच. पण हा व्यवहार फायद्याचा व्हायला हवा; ते ठरवायचे तर सर्व चारा – पाणी – दुधाच्या नोंदी हव्यात हेही मुले शिकतात. आश्रमाच्या व्यवस्थेत नोंदी ठेवण्याला फार महत्त्व आहे. हवामान, बी – बियाणे, उत्पन्न, पाणी किती वापरले, साधने कोणती वापरली, पंप किती वेळ लावला, वीज किती लागली याही सर्व नोंदी सतत केल्या जातात. नोंद ठेवणे ही स्वतंत्र जबाबदारी आळीपाळीने मुलांना दिली जाते. त्यावरून उत्पादकता – फायदा – तोटा हे ठरवले जाते. तोटा भरून काढायचा विचार करणे हेदेखील शिक्षण यात होते. सर्व मुले हे पाहत – शिकत असतात. त्या विचारात सहभागी असतात.
अशाच प्रकारे बायो – गॅसचे उत्पादन किती होते, वीज किती वापरली जाते, कमी जास्त कधी – कशामुळे होते याच्याही नोंदी विद्यार्थ्यांना ठेवाव्या लागतात. जनावरांनाही मोजून खायला घालणे अपेक्षित असते. आपण प्रत्येक गोष्टीचे मापन, निरीक्षण, अनु नि करत राहिलो की विज्ञान आपल्या आयुष्याचा भाग होऊ शकते. वेगवेगळ्या प्रकल्पांतून हे आपोआप साध्य होते. कृती म्हणजे काम नव्हे.
मागील वर्षी विद्यार्थ्यांनी पिकवलेल्या भाजीचा स्टॉल लावला होता. त्याच्या अहवालात तिथले अनुभव त्यांनी नोंदवले होते – जागा चांगली नव्हती, ऊन लागले, वगैरे. पुढच्या बॅचच्या मुलांना या नोंदी वाचून बाजारातील विक्रेत्याना स्टॉल लावताना येणाऱ्या अडचणी लक्षात आल्या. मग त्यावर उपाय शोधून काढण्यासाठी मुलांनी सर्व्ह केला. त्यात दिसले की तीन प्रकारचे विक्रेते आहेत. पहिले ठोकमाल विकणारे, हे आठवड्यात फक्त एकदाच बाजाराच्या दिवशी येतात. दुसरे किरकोळ विक्रेते. हे बाहेरून आणलेला माल आठवडाभर विकतात. तिसरे फक्त आपल्याच शेतातला माल पथारी पसरून विकतात. तिघांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्यांचा अभ्यास करून वर्कशॉपच्या मुलांनी तीन स्टॉल तयार केले. गावात जाऊन त्याचे प्रदर्शन केले तेव्हा त्यातले दोन विकलेही गेले. आपण तयार केलेला स्टॉल विकला जाईपर्यंत मुलांचे चांगले शिक्षण झाले. एक कार्यक्रम तर झालाच, अभ्यासक्रम पूर्ण झालाच, शिवाय एक दृष्टीही मिळाली. समाजात उपयुक्त असणारे काम करण्याची दृष्टी मिळाली.
कृती ‘आणि उत्पादक काम’ यातला हा फरक आहे. धातूच्या दोन सळ्या जोडल्या, तरी वेल्डिंग शिकता येते. पण खुर्ची तयार करणे’ हे त्याहन चांगले शिक्षण ठरते, हे ‘उत्पादक काम’ झाले कारण त्याचा उपयोग असतो. शेतीत वेगवेगळे प्रयोग म्ले करून पाहतात. सेंद्रिय खते घालून, मल्चिंग करून, पाटाचे पाणी देऊन वगैरे. इथे सगळे पर्याय अभ्यास करायला दिले जातात. त्यांच्या चांगल्या वाईट बाजू समोर मांडल्या जातात. शिक्षण म्हणजे उपलब्ध पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडता येणे. त्यामुळे कुठल्याही विशिष्ट पद्धतीचा प्रचार व आग्रह आम्ही करत नाही. मात्र सर्व तंत्रज्ञानांचा अभ्यास करायला शिकवणे हे आमचे काम असे आम्ही मानतो.
व्यवहार-शिक्षण.
इथे वेगवेगळ्या कॉलेजांधून विद्यार्थी प्रकल्प करायला येतात. अभियांत्रिकी,व्यवस्थापन, डिझाईन स्कूल वगैरे. त्यांच्याकडे काही कौशल्ये असतात आणि डीबीआरटीच्या मुलांकडे वेगळी कौशल्ये असतात. ह्या सगळ्यांनी मिळून एकत्रित काम करायचे असते. एकमेकांकडून काहीतरी शिकायचे असते. भाषा, सहजीवन इत्यादी. आम्ही इथे फक्त टीम बनवण्याचे काम करतो. त्यात काही कमतरता नाही ना, वातावरण शिक्षणासाठी पूरक आहे ना, प्रत्येक कामासाठी आवश्यक कौशल्ये तेथे आहेत ना, याकडे लक्ष देतो.
डीबीआरटीची मुले वर्षभरात चार विभागांत चार प्रकल्प करतात. त्यातून त्यांना किमान रु. १५००/- कमवायचे असतात. इथे मुलांना काही बाजारभावाने कामाचे पैसे मिळत नाहीत. रोज रु. ४०/ मिळतात. एक तर ती शिकत असतात, त्यांना वेळ जास्त लागतो, कधी काही तूटफूट होते.. ही काही त्यांची मजुरी नसते. आश्रमातली कोणतीही एक जबाबदारी घेऊन मुले पैसे मिळवू शकतात. उदाहरणार्थ, रोज सकाळी उजाडले की सर्व दिवे बंद करायचे आणि अंधार झाला की चालू करायचे. दिव्यांची दुरुस्ती आवश्यक तिथे करवून घ्यायची. या ठेक्याचे त्यांना १००-१५० रु. मिळू शकतात. मात्र सुट्टी घेतली, तर ही जबाबदारी दुरायावर देऊन त्यांना जावे लागते. बदली माणूरा नसेल तेव्हा सुट्टी घेता येत नाही. काम झाल्यावर बिल तयार करायचे, ते काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र घ्यायचे मगच पैसे गिळतात.
कोणतीही गोष्ट शिकून सेवा दिली की पैसे मिळणार – हा संदेश त्यात असतो. असेच दुपारी सर्वांना चहा पुरवण्याचा ठेका, सकाळी अंघोळीला गरम पाणी पुरवण्याचा ठेकादेखील मुलांना घेता येतो. त्यासाठी लाकूड जाळून पाणी गरम करणारा बंब पेटवता यावा लागतो. सर्व कर्मचारी आश्रमातच राहत असल्याने संध्याकाळीही सगळे सोबत असतात. दिवसभराचे सगळे काम संपल्यावर संध्याकाळी सगळेजण एकत्र येऊन पंधरा मिनिटे ध्यान करतो. (इथे सर्वांना विपश्यना शिकवली जाते.) नंतर कोणताही चालू विषय चर्चेला घेतला जातो. त्याला काही बंधन नसते. राजकारण, समाजकारण, प्रेम प्रकरणे. कधी दोन गट पाडून, दोन्ही बाजूंनी हिरिरीने मांडणी केली जाते. शिक्षक समारोप करतात. शिक्षक मुलांच्या जगाशी संपर्क ठेवून असतातच, त्यांना आवडणारे चित्रपट, गाणी सगळ्याशीच. कधी सगळे मिळून गाणी म्हणतात, कधी वाचन होते. एखादा माहितीपट, नेटवरून एखादी चित्रफीत पाहणे, त्यावर बोलणे असे जेवणाच्या वेळेपर्यंत चालते. नंतर मुले त्यांचा त्यांचा अभ्यास करतात. डीबीआरटी (Diploma in Basic Rural Technology): उद्यासाठी दरवर्षी जुलैपासून ४५ मुले आणि मध्येध्ये येणारी १५ अशी ६० मुले डीबीआरटी पूर्ण करतात. शिवाय ३-३ महिन्यांचे अभ्यासक्रम निवडून तेवढाच पूर्ण करणारी काही असतात. (फक्त पोल्ट्री किंवा फक्त डेअरी असे.) एकूण दरवर्षी २०० मुले शिकून जातात. सुरुवातीला हा अभ्यासक्रम ‘ग्रामीण तंत्रज्ञान’ म्हणून शिकवला जाई. जेव्हा हा प्रयोग पूर्ण होऊन स्थिर झाला, जे सांगायचे होते, ते तपासून, पडताळणी करून पक्के झाले तेव्हा ते इतरांना सांगण्याची तयारी पूर्ण झाली. त्यानंतर, १९९९साली छखजड (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग) यांच्याकडून ह्या अभ्यासक्रमाला मान्यता प्राप्त झाली आणि त्याचे नाव डीबीआरटी झाले. आता महाराष्ट्रात आश्रमाशिवाय चिखलगाव, साळुब्रे आणि केम अशा तीन ठिकाणी हा अभ्यासक्रम चालवला जातो. त्यांच्यासाठी साधन केंद्र म्हणून तसेच त्यांच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण केंद्र म्हणून विज्ञान आश्रम काम करतो. या अभ्यासक्रमासाठी छखजड ने इंग्रजी पुस्तके तयार केली आहेत, सध्या हिंदी तयार होत आहेत. महाराष्ट्राबाहेर उत्तर प्रदेश व कर्नाटकात एकेका ठिकाणी डीबीआरटी शिकवला जातो. आश्रमाने आणखी एक गोष्ट केलेली होती, या शिक्षणात पहिल्यापासून मुलींसाठी राखीव जागा ठेवून सोय केलेली होती. पण ज्या ग्रामीण वर्गाला डोळ्यापुढे ठेवले आहे, त्या वर्गातून उद्योजक होण्यासाठी म्हणून मुलींना पाठवले जात नाही. मुली उद्योजक व्हाव्यात, स्वतंत्र व्हाव्यात, पायावर उभ्या रहाव्यात अशी समाजाची दृष्टी अजूनही दिसत नाही.
विज्ञान आश्रम, एस. ६८, जे.पी.नाईक सेंटर फॉर एज्युकेशन, एकलव्य पॉलिटेक्निकमागे, कोथरूड डेपो, पुणे ४११०३८.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.