स्वच्छतेची घडी

दक्षिण भारतातील एक साधासा मुलगा. शाळा सोडलेला. त्याने ग्रामीण महिलांसाठी पाळीच्या दिवसांतील स्वच्छता व आरोग्य ह्यासाठी चांगला प्रयत्न केला. अरुणाचलम मुरुगनंतम् ह्यांनी पाळीची घडी (सॅनिटरी पॅड) तयार करण्याचे यंत्र बनविले, त्याची गोष्ट.

सन 1998 मध्ये त्यांचे नवीन नवीन लग्न झाले होते, तेव्हाची गोष्ट.त्यांची पत्नी शांती त्यांच्यापासून काहीतरी लपवीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या कसल्यातरी चिंध्या होत्या. ती त्यांना घाणेरडा फडका म्हणत होती. पाळीसाठी बाजारू पॅड का वापरीत नाहीस असे विचारल्यावर ती म्हणाली, मी जर ते वापरले तर आपल्याला घरात दूध आणता येणार नाही. आपल्या वधूला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी स्वतःच ते खरेदी करून आणले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की 10 ग्रॅम कापसाची म्हणजेच त्या वेळी 10 पैसे किंमतीची असलेली ती वस्तू चक्क चार रुपयांना विकली जात होती. मग त्यांनी स्वतःच स्वस्तात पॅड तयार करण्याचे ठरविले. त्यांनी तसे एक तयार करून शांतीला दिलेही, परंतु फीडबॅकसाठी प्रत्येक वेळी एक एक महिना थांबणे शक्य नसल्यामुळे त्यांना आणखी काही महिलांवर प्रयोग चालू ठेवायचा होता. परंतु गावात किंवा आसपास कुणी महिला ते वापरतच नाहीत असे त्यांना आढळून आले. भारत सरकारने 2011 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार देशातील केवळ 12 टक्के महिला सॅनिटरी पॅड्स् वापरतात. बाकी बायका पाने, रेती, भुसा वगैरे काहीही वापरतात आणि फडकी वापरणाऱ्या सुद्धा ते धुवून उन्हात वाळत घालण्याचा संकोच करीत असल्यामुळे अनेक प्रकारच्या पुनरुत्पादनाशी निगडित अनेक व्याधींना बळी पडतात. सत्तर टक्के महिलांचे असे रोग व बाळंतपणातील आईचे मृत्यू हे अशाच कारणांनी झालेले असतात. एका स्थानिक महाविद्यालयातील तरुण विद्यार्थिनींना त्यांनी प्रयोगात सामील होऊन फीडबॅक देण्याचे आवाहन केले. पण त्यांनीही तो प्रामाणिकपणे व नियमितपणे दिला नाही. शेवटी हा प्रयोग आपण स्वतःचं करून पहायचा असे त्याने ठरविले. अरुणाचलमने एका फूटबॉलच्या ब्लॅडरचे गर्भाशय बनविले. त्यामध्ये बकऱ्याचे रक्त भरले. त्यासाठी आपल्या एका खाटीक मित्राची मदत घेतली. बोकडाच्या रक्तात ब्लड बँकेतून आणलेले थोडे मानवी रक्त मिसळले. त्याने ते ताबडतोब गोठणार नाही असे त्याला वाटले होते. मात्र त्याला दुर्गंध येतच होता. फूटबॉल बरोबर घेऊन, त्यातून सतत. रक्त बाहेर खेचत राहून, आपण बनवलेले सॅनिटरी पॅड त्याचे योग्य रीतीने अवशोषण करते काय हे तो पाहत असे. चालता-फिरताना ह्याचा काय परिणाम काय होईल हे आजमावण्यासाठी तो फूटबॉल घेऊन चालत, धावत व सायकलवरून जात असे. हा प्रकार पाहून लोकांना वाटले, तो भ्रमिष्ट झाला आहे. गावातील लोक त्याला टाळू लागले. मित्रमंडळ तोंड फिरवून निघून जाई. जिच्यासाठी एवढा सगळा उपद्व्याप केला होता, ती पत्नीदेखील लग्नानंतर दीड वर्षांनी त्याला सोडून निघून गेली.

त्यानंतर त्याच्या डोक्यात आणखी एक भन्नाट कल्पना आली. ती अशी की आपण वापरलेल्या घडीचे निरीक्षण व अभ्यास करावा. पण एवढ्या अंधश्रद्धाळू समाजात, जेथे एखाद्या व्यक्तीचा केस जरी घेतला तरी जादूटोणा करीत असल्याची शंका घेतली जाते, तेथे हे काम करणे महाकठीण होतेच, पण त्याने हार मानली नाही. त्याच्या आईलाही हे अती वाटू लागले. एक दिवस आपले सामानाचे गाठोडे उचलून ती घरातून चालती झाली. त्यामुळे अरुणाचलमला एकाकीपण आलेच, शिवाय व्यावहारिक पातळीवरही ते निभावणे कठीण झाले. त्याला आपला स्वयंपाक स्वतः करून खाण्याची वेळ आली.

ह्याच्याही पुढे जाऊन, अरुणाचलमला सैतानाने झपाटले असल्याबद्दल साऱ्या गावकऱ्यांची हळूहळू खात्री पटली. त्यांनी त्याला साखळदंडाने झाडाला उलटा टांगून भगताकडून त्याला सीधा’ करण्याचा चंग बांधला. गाव सोडण्याचे कबूल करून त्यानेह्यातून आपली कशीबशी सुटका करून घेतली. आपल्या कामाची त्याला खूपच मोठी किंमत मोजावी लागली होती. त्याही परिस्थितीत त्याने आपले काम थांबवले नाही. त्याच्यासाठी सगळ्यात मोठे रहस्य हे होते की बाजारू पॅड कशाचे बनविले जातात. ह्याचे एका प्रयोगशाळेने त्याचे विश्लेषण करून दिलेले उत्तर होते कापूस. पण कापसापासून त्याने स्वतः तयार केलेले पॅड्स चालले नाहीत. ह्यापुढचा मार्गच खुंटला होता. कोणती कंपनी त्याला आपले उत्पादन कशापासून बनविले आहे ते खरेखरे सांगणार होती? मुरुगनंतमने एका प्रोफेसरच्या मदतीने उत्पादक कंपनीला पत्र पाठविले, ज्या मदतीची परतफेड त्याने त्या प्रोफेसरकडे घरकाम करून केली. तसेच त्याने टेलिफोन कॉल्सवर 7000 रुपये खर्च केले. उत्पादकांकडून माहिती मिळविण्याचे त्याने परोपरीने प्रयत्न केले. एकदा कसला तरी चोथा (सेल्युलोज) त्याला साहित्य म्हणून प्राप्त झाले. पण त्याचे तुकडे करून ते पिंजून त्यापासून पॅड तयार करण्यासाठी खूपच जास्त खर्च येणार होता. त्यामुळे पुन्हा स्वतःचे नवीन डिझाइन शोधण्यास सुरुवात करावी लागली.

साडेचार वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला कमी खर्चात घडी तयार करण्यात यश मिळाले. त्यामध्ये चार साध्या प्रक्रियांचा समावेश होता. प्रथम, दळण्याच्या जात्यासारखे एक साधेसे यंत्र सेल्युलोजचे तुकडे करून ते पिंजून देते. दुसरे यंत्र त्या साहित्यापासून चौकोनी बारीक वड्या बनविते. ह्या वड्या न विणलेल्या कापडात गुंडाळून अतिनील किरणांचा झोत देऊन संसर्गरहित केल्या जातात. ही संपूर्ण प्रक्रिया केवळ एका तासात शिकता येते.

मुरुगनंतमचा उद्देश केवळ अधिकाधिक महिलांना ही घडी वापरण्यास उद्युक्त करणे एवढाच नव्हता, तर त्याला ग्रामीण महिलांना रोजगारही मिळवून द्यायचा होता. कारण वडिलांच्या मृत्यूनंतर गरिबी व उपासमारीचे चटके लहानपणीच त्याने भोगले होते. वयाच्या चौदाव्या वर्षी त्याला कुंटुंब पोसण्यासाठी शाळा सोडावी लागली होती.

मुरुगनंतमने आपली यंत्रे त्यांना फारसे शिष्ट, नागर रूप न देता अगदी साधीसुधी, काहीशी ओबडधोबडच ठेवली आहेत. तेथील अल्पशिक्षित महिलांना ती चालवता, सांभाळता यावीत हाही त्यामागचा एक उद्देश आहे. ती यंत्रे जेव्हा त्याने आयआयटी मद्रासमध्ये नेली तेव्हा तेथील लोकांना ती बहुदेशी कंपन्यांशी स्पर्धा कशी करू शकणार अशी शंका वाटली. पण अरुणाचलमला आत्मविश्वास होता. त्याने आपल्या वडिलांना गावात 446 पूर्णपणे विजेवर चालणारे माग असतानाही एका साध्या लाकडी हातमागावर बसून आपला व कुटुंबाचा निर्वाह करताना पाहले होते. दुसरे म्हणजे त्याचा उद्देश स्पर्धा करण्याचा नसून नवीन बाजारपेठ उभारण्याचा होता. तर शेवटी एकदा आयआयटीने आपल्यातर्फे हे यंत्र राष्ट्रीय नवशोध पुरस्कारासाठी पाठविले. आश्चर्य म्हणजे 943 प्रवेशिकांमध्ये त्याला प्रथम क्रमांक मिळाला. भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. लहानपणी शाळा सोडलेल्या एका मुलासाठी हे फार मोठे यश होते. मग आणखी एक चमत्कार घडला. संकटे जशी एकटी येत नाहीत, तशा चांगल्या घटनाही. साडेपाच वर्षांनी त्याला एक फोन आला. आठवतेय का मी तुला ? पलीकडून एका स्त्रीचा स्वर विचारत होता. अशा रीतीने पत्नी शांतीचे अरुणाचलमच्या आयुष्यात पुनरागमन झाले. त्यापाठोपाठ आईचे, आणि मग इतर गावकऱ्यांचे.

नाव, कीर्ती मिळाली तरी अरुणाचलम पैशाच्या बाबतीत उदासीनच होता. माझ्याऐवजी एखादा एमबीए हे काम करण्यास पुढे सरसावला असता, तर त्याने प्रथम ह्यातून आपल्याला आर्थिक लाभ किती होईल ह्याचेच गणित मांडले असते. पण मी लहानपणापासून गरिबी अनुभवलेला माणूस आहे आणि मला हेही माहीत आहे की गरिबीपेक्षा अज्ञान हे जास्त घातक आहे. मोठ्या उद्योगधंद्यांपेक्षा छोटेछोटे उद्योगधंदे हे समाजासाठी जास्त हितकारक असतात हे सांगण्यासाठी तो फार चांगली उपमा देतो. तो म्हणतो, की मोठा उद्योग हा डासाप्रमाणे दुसऱ्याचे रक्त शोषून घेणारा असतो, तर छोटा उद्योग फुलाला धक्काही न लावता अलगद त्यातील मकरंद उचलून घेणाऱ्या फुलपाखरासारखा.

अरुणाचलमने महत्प्रयासाने बिमारु (बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेश) च्या अविकसित राज्यांमध्ये दीड वर्षांत 250 यंत्रे बसवली. ह्या सर्व राज्यांमध्ये अज्ञानी जनता बरीच जास्त असून पाळीच्या काळात बाई दूषित, अस्पृश्य असल्याचे मानले जाते. तिला त्या दिवसांत पाणीही भरायला बंदी असते. गडीमाणसे तर दूरवर पाणी आणायला जातच नाहीत. मग सगळ्यांचे हाल होतात. करणार काय ! बाजारू पॅडबद्दल त्यांच्या मनात अंधश्रद्धाही खूप आहेत. त्याचा वापर केल्याने आपण आंधळे होतो, वगैरे. पण आता हळूहळू त्याचा स्वीकार वाढत चाललाय. एखाद्या बाईशी पुरुषाला नुसते बोलायचे असले, तरी तिच्या नवऱ्याची परवानगी लागते. अशाही परिस्थितीत अरुणाचलमने 23 राज्यांत 1300 खेड्यांमध्ये यंत्रे बसवली आहेत. एक यंत्र 75,000 रुपयांना पडते. प्रत्येक यंत्र तीन हजार स्त्रियांना पॅड वापरण्यास उद्युक्त करते आणि दहा जणींना रोजगार देते. अरुणाचलमने आता शाळेत जाणाऱ्या मुलींनाही, त्यांनी स्त्रिया बनण्याची वाट न पाहता, त्यांना लागणाऱ्या पॅड बनवण्याचे शिक्षण देण्यास, म्हणजेच त्यांना सक्षम करण्यास सुरुवात केली आहेत.

बराच मोठा पल्ला गाठल्यावर अरुणाचलम आता आपल्या कुटुंबासोबत एका छोट्याशा फ्लॅटमध्ये राहतो आहे. पण धनवान न होण्याबाबत मात्र तो तितकाच ठाम आहे. मी पैसे कमावले नाहीत म्हणूनच आनंद कमावू शकलो असे त्याचे म्हणणे आहे. सुदैवाने आपण सुशिक्षितही नाही, त्यामुळे भविष्याची चिंता आपल्याला भेडसावत नसल्याचे तो सांगतो. ह्या म्हणण्याशी शांतीही सहमत आहे. त्याने जर आपले शिक्षण पूर्ण केले असते, तर तो तशा इतर अनेकांप्रमाणे कोणाकडे तरी चाकरी करत बसला असता. स्वतःचा धंदा सुरू करण्याची हिंमत त्याच्याकडे आलीच नसती.

ती म्हणते. गावातल्या पोरींना जेव्हा नहाण येते, तेव्हा त्या विवाहास योग्य झाल्याचे जाहीर करण्याकरता इतर स्त्रियांना बोलावून तो प्रसंग साजरा केला जातो. अशा वेळी शांती तेथे हे पॅड भेट म्हणून देते. जमलेल्या मुलींना ते कसे वापरायचे ह्याची माहितीही देते. ह्या कामाची सवय झाल्यामुळे शांतीला आता त्याची लाज वाटत नाही… तशीच तिथल्या इतर बायकांनाही… कधीकधी तर त्या त्यासंबंधातील इतर अडचणी विचारायलाही तिच्याकडे येतात.

अरुणाचलम म्हणतो तिने ह्या संबंधात उत्तम काम केले आहे. हे काम सुरू केल्यानंतरचा सर्वात आनंदाचा क्षण कोणता ? राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्याचा का? असे विचारल्यावर अरुणाचलम म्हणतो, नाही. हिमालयाच्या पायथ्याशी उत्तराखंडच्या एका खेड्यामध्ये हे यंत्र बसवण्यात आले तो क्षण त्याच्या दृष्टीने सगळ्यात आनंदाचा आहे. कारण तेथील गरीब महिलांना ते आर्थिक स्वावलंबन मिळवून देणार आहे. (अरुणाचलम मुरुगनंतम ह्यांनी बीबीसी वर्ल्डवरून आउटलुक ला दिलेल्या मुलाखतीतून संपादित, अनुवादित, साभार.)

देवतोत्पत्ति अनादि कालापासून मनुष्यमात्रा अशा प्रकारच्या ईशशक्तींचे यथार्थ ज्ञान आहे, असें जें अनेक श्रद्धाळूचे फार व आग्रहाचे म्हणणे आहे ते साधार नाही. मनुष्यांनी निरनिराळ्या स्थितींत अनेक प्रकारच्या देवतांवर भरवसा ठेविला आहे, आणि सर्वज्ञ व सर्वशक्तिमान् परमेश्वराची जी कल्पना त्यांनी केली आहे, ती अखेरची आहे. ही कल्पना त्यांच्या पराक्रमी पुरुषापासून करतां आली. या पराक्रमी पुरुषाकडून करतां आली. या पराक्रमी पुरुषांत पूर्वकाली राजेलोक विशेष असत. रानटी लोकांचें धुरीणस्व किंवा नृपतित्व ज्याच्या अंगी असाधारण धैर्य, निश्चय, चातुर्य व कष्टालुत्व असतें. त्यासच प्राप्तं होऊ शकतें. यामुळें व एकदां राज्यपद प्राप्त होऊन बरीच सत्ता हातीं आल्यामुळे, अशा स्थितींतला राजा इतरांपेक्षा हर एक गुणांनी फारच मोठा दिसूं लागतों. असें होऊन एकदां एका एका पक्षास प्रतिष्ठां मिरमिवण्याची, आणि दुसऱ्या पक्षास लीनतेनें वागण्याची खोड लागली म्हणजे पहिला पक्ष कोणत्या गुणांस हक्क सांगेल, व दुसरा कोणत्या प्रकारच्या दास्याचरणास तयार होईल, हे सांगता येणार नाहीं. अज्ञान, अविचारी व भेकड लोकांनी राजास मातापितरांहून अधिक मान द्यावा यांत काहींच नवल नाही. आजमितीस युरोपांतील सुधारलेल्या कांही देशांत असा प्रकार घडत आहे. राजास मातापिताइतका इतका मान देणे हे अज्ञान लोकांच्या राजनिष्ठेचे अगदी पहिलें कलम होय! यापुढे त्यांची मजल फार जाते. अज्ञान लोक आणि स्वार्थसाधु स्तुतिपाठक राजासारखा अद्वितीय व्यक्तीची स्तुति करू लागले म्हणजे कोठपर्यंत जातील, हें सहसा सांगता येणार नाहीं. हे लो राजास देवाचा अंश, देवाचा मुलगा, देवाचा लाडका आप्त, देवाचा पिता आणि साक्षात् देव करून टाकतात!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.