बर्बादीचा माहामार्ग

{प्रस्तुत फोटो हे आभासी तथा इंन्स्टाग्राम/गुगलवरून घेतलेले नसून आमच्या शेत-शिवारातले जिवंत फोटो आहेत.}

स्वातंत्र्याच्या पाऊणशे वर्षांनंतरही…
वावरात हातभर लांबीच्या बंडीभर काकड्या,
नारळाएवढाले सीताफळं निरानाम सडू घातलेले.
पान्यामुळं बाबडलेला मुंग, वांझोटा भुईमुंग,
काळंवडलेल्या तीळाची मती गुंग
घरी आनाचं कसं एकाएकी गर्भपात झालेलं सुयाबीन ?

सडत पडलेल्या काकड्या
रानडुकरांनी खाऊन बरबाद केलेला भुईमुंग

वावराजौळचे असे  दूरदूर चिखलप्रेस समृद्ध हायवे
ऐन हंगामावर अभाळाले हैजा झालेला
रस्त्यानं आपलाच जीव आपल्याले भारी
कुठून इथं जल्म घेतला इच्यामारी !

शेतातले चिखलसमृद्ध हाय-वे

खालून चिक्कट चिखलगाळ
अन् वरतून ओरबाडणाऱ्या चिल्हाट्या-बोराट्या!
चालता चालताच जातेत सरनावर तुऱ्हाट्या.

पायतळी चिखल आणि डोक्याला ओरबाडणाऱ्या चिल्हाट्या-बोराट्या

बैलबंड्या फसतेत,
वाटसरू घसरून मोडतेत
कोनाचा हेंगडते पाय
कुठं नुसतीच रुतून बसते पान्हावली गाय
अवंदा दुरूस्तीसाठी कास्तकारांजवळ  नाई दमडं
ज्याच्याजौळ लुगडं, थेच पडलं उघडं !!

चिखलगाळ पांदणरस्ते

अशातच आलं ई पीक पाहनीचं फर्मान
पटवारी परेशान अन् चळलेला किसान
म्हने, आता याच्यापुढं डिजिटल ई सातबारा
फुसक्या स्लो सर्व्हरच्या ढुंगनातून वारा !

तुमाले लखलाभ स्मार्ट सिटीतले आरसेमहाल
इथं कुत्रेबी खाईनात आमचे हाल !

…एखांद्यातरी डिजिटल इंडियातल्या
बगळासफेद लोकउपाद्यानं
(लोकप्रतिनिधी नाहीच राह्यला ना भौ, कोनी)
आमच्या वावरात येऊन दाखवाव्  नंगेपाव !!!
योग्य थे बक्षीस देऊ !!
मनान् तं सत्कारबी करू !!

संपर्क: 09049641474
मु.पो.कचारी सावंगा, ता.काटोल, जि.नागपूर..441103

अभिप्राय 4

  • the poem and the pictures…. great…disturbing. Truth always bites..

  • “डिजिटल इंडिया” मधील बगळासफेद बडबड्या लोकउपाध्याना चांगलीच चपराक हाणली आहे. आशा करू या, ही खदखद त्यांच्यापर्यंत पोहचेल अशी.

  • शेतापर्यंत पोहचायला शेतकऱ्याला रस्ता नाही आणि शहरात जिकडे तिकडे सिमेंट रस्ते. खूपच विदारक वास्तव आहे. अनंत भाऊ शेतीत तुम्ही करत असलेल्या कष्टाला माझा सलाम

  • अनंतराव आपण मांडलेली शेतकय्रांची व्यथा सत्यच आहे. पण आपण वयाने खूप लहान आसणार. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथम सत्तेवर आलेला काँग्रेस पक्ष स्वतःला शेतकऱ्यांचा कैवारी म्हणवत असतो. त्यांची निवडणूक निशाणी बैलजोडी होती. पण त्यांनी शेतकऱ्यांना नागवून स्वतःच्या तुमड्या भरल्या. सहकार चळवळीचा स्वाहाकार केला. सिंचनामध्ये भ्रष्टाचार. सहकारी साखर कारखान्याच्या सहाय्याने स्वतः साखर सम्राट होऊन सत्तेवर आले, व भागधारक शेतकऱ्यांना गरीबीत ठेवले. सत्तर वर्षांनंतर सत्तेवर आलेला भाजप काही सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करत असताना जनतेने युतीला निर्विवाद बहूमत दिले असताना खूर्ची साठी मराठी माणसाच्या कैवाय्राने प्रचार सभेत ज्यांना शिव्या दिल्या त्यांच्या मांडीला मांडी लाऊन बसला. अतीव्रुष्टीने शेतीचे नुकसान झाले. पण या सरकारला त्याचे सोयरसुतक नाही. खरोखरच शेतकऱ्यांच्या नांवाने सत्तेत आलेल्यानी स्वतःचीच धन करण्यात स्वारस्य दाखवले. आता पुढील निवडणूकीत या सत्ताधाय्रांना त्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.