विषय «संपादकीय»

मनोगत

‘सुधारक’च्या कोरोना विशेषांकातील लेखांवर अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यांपैकी काही नवे मुद्दे, प्रश्न व विचार व्यक्त करणार्‍या प्रतिक्रिया संबंधित लेखांच्या खाली प्रकाशित केल्या आहेतच.

ह्या विशेषांकात इतर लेखांव्यतिरिक्त ‘सुधारक’च्या ऑक्टोबर २०१९ च्या अंकात प्रकाशित झालेल्या डॉ. सुभाष आठले ह्यांच्या ‘मेकॉले, जी एम फूड्स आणि कॅन्सर एक्सप्रेस’ ह्या  लेखावरील प्राची माहूरकर ह्यांची प्रतिक्रिया प्रकाशित केली. त्यावरही अनेकांचे अभिप्राय आले. त्यांपैकी निवडक लेखाखाली प्रकाशित केले आहेतच.

‘सुधारक’च्या कोरोना विशेषांकात डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांच्या “या मार्गानेच जाऊया” या लेखाच्या पुन:प्रसिद्धीनिमित्ताने अंबुजा साळगांवकर आणि परीक्षित शेवडे ह्यांनी आपली प्रतिक्रिया पाठवली.

पुढे वाचा

कोरोना विशेषांक

एरवी तीन महिन्यांतून एकदा प्रकाशित होणार्‍या सुधारकसाठी कोरोनाचे वादळ घोंगावत असताना विराम घेणे न मानवणारेच होते. परिणामी सुधारकचा हा कोरोना विशेषांक.

ह्या अंकात इतरत्र प्रसिद्ध झालेले वाचनीय, अभ्यासपूर्ण तसेच काही नवे विचार पोहोचवणारे निवडक लेख प्रकाशित करतो आहोत. सोबतच काही लिंक्सही जोडल्या आहेत. चांगले लेख वाचकांपर्यंत पोहोचावेत एवढीच इच्छा.

आम्ही फक्त वाहक आहोत.

रेखाटन : हेमंत अभ्यंकर

पहिल्या अंकातील संपादकीयातून

आगरकरांनी 100 वर्षांपूर्वी जे कार्य करावयास आरंभ केला ते दुर्दैवाने अजून मोठ्या अंशाने अजून अपूर्ण राहिले आहे. त्यांनी महाराष्ट्रात विवेकवादी सर्वांगीण सुधारणावादाची मुहूर्तमेढ रोवली, पण ते गेल्यानंतर लवकरच महाराष्ट्राची स्थिती जवळपास पूर्वीसारखी झाली. आज शंभर वर्षांनंतर ती तशीच आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. अंधश्रद्धा, जादूटोणा, मंत्रतंत्र, बुवाबाजी इ. गोष्टी पूर्वीइतक्याच जोमाने सुरू आहेत. भ्रमाने आपल्या सामाजिक जीवनात घातलेला धुडगूस अधिक तीव्रपणे चालू आहे. कुंभमेळे, गंगास्नान, यज्ञयाग हे सर्व जातिभेद पूर्वीइतकाच तळ ठोकून आहेत आणि राजकारणात निवडणुकांच्या निमित्ताने त्याला उघड आवाहन केले जात आहे.

पुढे वाचा

संपादकीय संवाद : ग्यानबाचा विवेकवाद

प्रिय वाचक, स.न.वि.वि.
विवेकवाद ह्या नावाचे एक पुस्तकच प्रा. दि.य.देशपांडे ह्यांनी लिहिलेले आहे. प्रा. दि.य.देशपांडे आजचा सुधारक ह्या आपल्या मासिकाचे संस्थापक संपादक होते. आ.सु.त सुरुवातीपासून विवेकवाद म्हणजे काय, ती कोणती विचारसरणी, ह्याचे विवेचन करणारे शक्यतो सुबोध व सविस्तर लेख त्यांनी लिहिले. अशा वीस-बावीस लेखांचा तो संग्रह आहे. असे जरी असले तरी अधून मधून आमचे वाचक, क्वचित् लेखकही हा प्रश्न विचारत असतातच. कधी कधी तुम्ही समजता तो विवेकवादच नाही असे उद्गारही कोणी काढतात. ‘‘तुमच्या विवेकवादात भलेही ते बसत असेल, हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा भाग आहे.म्हणूनही

पुढे वाचा

संपादकीय

‘आजचा सुधारक’चा ‘विचारभिन्नता विशेषांक’ वाचकांसमोर ठेवताना आम्हांला आनंद होतो आहे. तात्त्विक दृष्टिकोनापासून ते रोजच्या जगण्यापर्यंत आपल्याला विचारभिन्नतेला सामोरं जावंच लागतं. या भिन्नतेला बरोबर घेऊनच आपण आपल्या जगण्याची चौकट आखत असतो. विशेषतः राजकीय-सामाजिक संदर्भात प्रामुख्याने भारतीय समाजाचा विचार करत असताना आज जे चित्र समोर दिसत आहे त्यावर साधक-बाधक चर्चा करण्यासाठी एक विशेषांक काढावा अशी कल्पना पुढे आली आणि सगळ्यांनीच ती उचलून धरली.

माणूस आणि सृष्टी हे नातं जसं द्वंद्वात्मक आहे, तसंच माणूस आणि माणूस हेही नातं द्वंद्वात्मक आहे. माणसाची वाटचाल एकरेषीय नाही आणि त्यामुळे त्याच्या विचारांची वाटचालही एकरेषीय नाही.

पुढे वाचा

संपादकीय

सर्व श्रद्धा, विचार, गृहीतके वारंवार तर्काच्या व वास्तवाच्या कसोटीवर घासून पाहणे हा विवेकवादाचा गाभा आहे. आपल्या काळात लोकप्रिय असणाऱ्या व आपल्याला प्रिय असणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या श्रद्धा, विचार, गृहीतके ह्यांचा त्यात समावेश होतो. ‘आजचा सुधारक’च्या माध्यमातून ते घडावे असा छोटासा प्रयत्न आम्ही करीत आहोत. गेल्या काही अंकातून आमच्या वाचकांना त्याची चुणूक दिसली असावी. ती प्रक्रिया ह्या अंकातून आम्ही पुढे नेत आहोत.
विवेकवादाची लढाई निरीश्वरवादाच्या छोट्या रिंगणातून बाहेर काढून प्रत्येक धर्मात गेल्या अनेक शतकांपासून सुरू असणाऱ्या पुराणमतवादी विरुद्ध सुधारणावादी ह्या संघर्षाशी तिला जोडावे, असा प्रयत्न ‘धर्म: परंपराआणि परिवर्तन’ ह्या लेखमालेतून आम्ही करीत आहोत.

पुढे वाचा

संपादकीय

दिवस चर्चांचे आहेत. शेकडो माध्यमांतून हजारो विषयांवर चर्चा झडत आहेत व लाखो लोक त्यांत हिरीरीने भाग घेतानाही दिसत आहेत. पण त्यातील बहुतेक चर्चा त्याच त्या रिंगणात अडकल्याचे आपल्याला जाणवते. दुष्काळासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर बोलतानाही मुळात अवर्षण आणि दुष्काळ यांचा संबंध, माती व पाण्याचे नियोजन, समाजातील विविध घटकांचे परस्परसहकार्य व समन्वयन, पीकपद्धतीत बदल अशा महत्त्वाच्या मुद्द्यांकडे चर्चा सरकत नाही. लातूरला पाण्याची ट्रेन नेली जाते ह्याचे माध्यमांतून प्रचंड कौतुक केले जाते. पण अशी ट्रेन आपण किती ठिकाणी नेऊ शकतो, किती काळ असे पाणी पुरवू शकतो, कानाकोपऱ्यांत विखुरलेल्या खेड्यापाड्यांत पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठीच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था कशी करायची ह्या प्रश्नांची चर्चा घडतच नाही.

पुढे वाचा

संपादकीय

आज देशभरात सर्वच प्रश्नांवर ध्रुवीकरणाची भूमिका घेतली जाते आहे असे आपल्याला दिसते. तुम्ही एकतर देशप्रेमी आहात किंवा देशद्रोही (देशप्रेमाची व्याख्या आम्ही करू ती!) त्याविरोधात जे आवाज उठत आहेत तेही बव्हंशी प्रतिक्रियेच्या स्वरूपाचे आहेत, किंवा तेही वेगळ्या अर्थाने ध्रुवीकरणाचीच कास धरणारे आहेत. त्यामुळे भारतात एकतर हिंदुराष्ट्राचे समर्थक आहेत किंवा आंबेडकरवाद व मार्क्सवादाच्या समन्वयाचे समर्थक, असे चित्र माध्यमांतून उभे केले जात आहे. मुळात ह्या दोन्ही विचारधारांच्या मध्ये भलाथोरला वैचारिक पैस आहे व भारतातील बहुसंख्य जनता त्या जागेवर उभी आहे. भारतातील आजच्या वैचारिक संघर्षात ह्या ‘सुटलेल्या’ मधल्या जागेला योग्य स्थान मिळावे, असा आमचा प्रयत्न राहील.

पुढे वाचा

संपादकीय

आपल्या सभोवताली विलक्षण वेगाने इतक्या काही घटना घडत आहेत की सुजाण व संवेदनशील माणसाला हतबुद्ध होण्याशिवाय पर्यायच उरू नये. रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडू लागतात न लागतात, तेव्हढ्यात जे एन यु घडते. तेथील एका छोट्या घटनेचे निमित्त करून देशातील ह्या अग्रगण्य शिक्षणसंस्थेला देशद्रोह्यांचा अड्डा म्हणून बदनाम करण्यात येते. तेथे नेमके काय घडले हे चित्र स्पष्ट होईपर्यंत आता अलिगढ मुस्लीम विद्यापीठाची पाळी आलेली दिसते. एकूण देशप्रेमाचे हाकारे देत जे कोणी आपल्याला कोणत्याही कारणाने विरोध करतील त्या सर्वांविरुद्ध रान पेटवत देशद्रोही म्हणून त्यांची शिकार करायची हाच उद्देश असावा अशी शंका येते.

पुढे वाचा

संपादकीय

धर्म आणि विवेकवाद ह्यातील नाते हा बहुधा ह्या शतकातील कळीचा मुद्दा असणार आहे. भारतातच नव्हे तर जगभरात धार्मिक मूलतत्त्ववाद दहशत-वादाच्यारूपाने डोके वर काढताना दिसत आहे. झेंड्यांच्या ह्या लढाईत कोणत्याही धर्माचेप्राणतत्त्वअसणारी मूल्ये मात्र सर्रास पायदळी तुडवली जाताना दिसतात. भारतात दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी ह्यांच्या झालेल्या हत्या, बांगलादेशमध्ये निरीश्वरवादी ब्लॉग लेखकांचे नेमाने पडणारे खून, मध्यपूर्वेत आयसीसने घातलेले थैमान व अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनीइस्लामच्यानावानेतोडलेले तारे ह्या सर्व बाबी पराकोटीच्या धार्मिक असहिष्णुतेच्या निदर्शक आहेत. दुर्दैवाने‘रंगांधळ्या’ मंडळीना फक्त अन्य धर्माच्या व्यक्तींनी घातलेला हैदोस तेव्हढा दिसतो व ‘आम्ही आहोतच सहिष्णु, ह्याहून मऊपणे वागलो तर ‘ते’ आमच्या डोक्यावर बसतील’ असे युक्तिवाद मांडताना त्यांची सदसद्विवेकबुद्धी आड येत नाही, हे चित्रही सर्वत्र दिसते आहे.

पुढे वाचा