हवामानबदलाबाबत आपण काय करावे, हा नैतिक प्रश्न आहे. विज्ञान, त्यात अर्थशास्त्रही आले, हे आपल्याला हवामानबदलाची कारणे आणि परिणाम सांगू शकेल. आपण काय केल्याने काय होईल, हेही विज्ञान सांगू शकेल. पण काय करणे इष्ट आहे, हा मात्र नीतीच्या क्षेत्रातला प्रश्न आहे.
अशा प्रश्नांच्या विचारी उत्तरांत वेगवेगळ्या मानवसमूहांच्या इच्छा-आकांक्षांमधल्या संघर्षांचा विचार करावा लागतो. जर हवामानबदलाबाबत काही करायचे असेल तर आजच्या माणसांपैकी काहींना (विशेषतः सुबत्ता भोगणाऱ्यांना) त्यांच्यामुळे होणारी हरितगृहवायूंची (यापुढे GHG उर्फ ग्रीनहाऊस गॅसेस) उत्सर्जने कमी करावी लागतील नाहीतर भावी पिढ्यांना सध्यापेक्षा गरम जगात भकास जिणे जगावे लागेल.