विषय «जात-धर्म»

आमच्या देशाची स्थिती

असा सार्वत्रिक समज आहे की, आपल्या देशातल्या ब्राह्मणांनी अन्य जातीयांना शिक्षणापासून वंचित ठेवले. आणि हे कार्य त्यांनी हेतुपुरस्सर केले ते अशासाठी, की त्यांना (ब्राह्मणांना) समाजातील विषमता कायम ठेवायची होती, आणि त्यायोगे त्यांना अन्य जातीयांचे शोषण करायचे होते. उच्चवर्णीयांवरचा हा आरोप कितपत खरा आहे, हे तटस्थपणे तपासण्यासाठी आपल्याला आपल्या देशाची तत्कालीन स्थिती समजून घ्यावी लागेल व अंदाजे दोनशे वर्षे मागे जावे लागेल. इंग्रजांचे राज्य भारतात येण्यापूर्वीची समाजस्थिती आपल्याला तपासावी लागेल. प्रतिपादनाच्या सोयीसाठी काही जुन्या, स्त्री-शूद्र अशा संज्ञांचा वापर करण्याची देखील गरज पडेल.

पुढे वाचा

सूफी परंपरा

वर्तमान काळात धार्मिक समूहभानाचा उपयोग राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी केला जात आहे. मग मुद्दा दहशतवादी हिंसेचा असो वा संकीर्ण राष्ट्रवादाचा, जगाच्या सर्व भागांमध्ये धर्माच्या मुखवट्यांआडून राजकारण केले जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत धर्माला राजकारणापासून वेगळे करण्याच्या, ठेवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला जात होता. पण आता अगदी उलट झाले आहे. धर्म आणि राजकारणाची सरमिसळ वाढतच गेली. या संदर्भात दक्षिण आशियात फार गंभीर स्थिती आहे. एप्रिल 2015 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांनी अजमेरच्या गरीब नवाझ ख्वाजा मोइनुद्दिन चिश्तीच्या दर्ग्यावर ठेवण्यासाठी चादर पाठविली. गेल्या 22 एप्रिलच्या वर्तमानपत्रांतील वृत्तानुसार सोनिया गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदींनीही दर्ग्यावर चादर चढविली आहे.

पुढे वाचा

आंबेडकर नावाची एवढी भीती का?

आयआयटी मद्रासमधील ‘आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल’ला केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याकडून मिळालेल्या पत्रानंतर ‘आयआयटी-मद्रास’ने तडकाफडकी त्याची मान्यता काढून घेतली. शैक्षणिक आणि वैचारिक चळवळ चालवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासगटावर केंद्रसरकारने हस्तक्षेप करून अशा प्रकारची बंदी आणणं, हे सकस लोकशाहीचे संकेत नाहीत. आंबेडकरांच्या नावाने समरसतेचा घाट घालणाऱ्या सरकारची दुटप्पी भूमिकाच यातून उघड होत आहे.
आंबेडकर आणि पेरियार ही दोन नावं भारतीय जातसंस्थेच्या उच्चाटन चळवळीतील मोठी नावं. या देशातील व्यवस्थेने पावलोपावली नाकारल्यानंतरही त्या देशाला जगातील सर्वात मोठी लोकशाही बनवणारी राज्यघटना प्रदान करणारे बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतका द्रष्टा माणूस अन्य कोणी नाही.

पुढे वाचा

धर्म समाजस्थैर्यासाठीच आहे

”परधर्माच्या लोकांनी आमच्या धर्माच्या लोकांस आपल्या धर्मात घेतले म्हणजे आमच्या धर्मगुरूंची छाती दु:खाने फाटून जाते! लोकांनी धर्मातर करू नये म्हणून ते गीतेतील तत्त्वज्ञान दाखवतील, वेदांतील सुरस काव्य पुढे करतील, उपनिषदांतील गहन विषय सांगतील, पण धर्माच्या नावाखाली धर्माचाच घात करणाऱ्यांची कानउघाडणी त्यांच्या हातून होणार नाही. असे तर हे धर्ममरतड! असे तर हे धर्मगुरू! आणि असे तर हे शंकराचार्य! बसल्या बसल्या नाटकाप्रमाणे वेदांचे भाषांतर केल्याने धर्माची सुधारणा होणार नाही. गावोगाव पालखीत मिरविल्याने धर्माची ग्लानी जाणार नाही. गीतेवर कितीही लंबी प्रवचने झोडल्याने धर्म जागा होणार नाही.

पुढे वाचा

आपली बाजू नेमकी कोणती?

मुंबईच्या स्वामीनारायण मंदिरातील कार्यक्रमामध्ये एका महिला पत्रकाराला रीतिरिवाजांचा दाखला देत पहिल्या रांगेमधून उठायला सांगितल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली. त्यामुळे धर्माच्या नावावर चालणारी स्त्री-पुरुष असमानता आणि भारतीय राज्यघटनेने दिलेले स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकले. खरे तर ह्या संघर्षाचा आपल्या देशात मोठाच इतिहास आहे. अगदी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान असताना इंदिरा गांधींनादेखील जगन्नाथ पुरीच्या मंदिरामध्ये अशाच प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. वर्तमानाचा कानोसा घ्यायचा झाला तर स्त्री-पुरुष समतेच्या बाबतीत इतर क्षेत्रांमध्ये आपण प्रगती केलेली असली तरी भारतात अजून अशी असंख्य मंदिरे आहेत की जिथे महिलांना गाभाऱ्यात प्रवेश नाही.

पुढे वाचा

जातीय अत्याचारः प्रतिबंध आणि निर्मूलन

हा विषय केवळ बौद्धिक चर्चेचा किंवा सैद्धांतिक मांडणीचा नाही. तर तो जातीय अत्याचाराच्या मूळ कारणांचा आणि निमित्त कारणांचा शोध घेऊन त्या दोन्ही कारणांचे निर्मूलन तात्त्विक आणि थेट वर्तनव्यवहार करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नाशी निगडित आहे. जातीय अत्याचार निर्मूलनाची जाती निर्मूलन ही पूर्व अट आहे. महाराष्ट्रामध्ये जातीय अत्याचार दिवसेंदिवस केवळ वाढताहेत नव्हे, तर त्याची भीषणता आणि क्रूरताही वाढत चालली आहे. प्रशासनाची तांत्रिकतेच्या नावाखाली चाललेली निष्क्रियता, लोक प्रतिनिधींची आणि इतर समूहांची उदासीनता, स्थानिक राजकीय किंवा अराजकीय नेत्यांचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे गुन्हेगारांच्या बचावासाठी होत असलेला हस्तक्षेप, चळवळी/आंदोलनाप्रति समाज-शासनस्तरावरील अस्वस्थ करणारा बेदखलपणा, यामुळे जातीय अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांचं वाढत चाललेलं बळ.

पुढे वाचा

दलित स्त्रियांची आत्मकथने : एक ऐतिहासिक दस्तऐवज

व्यक्ती आणि समष्टी यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्यांवरती समष्टीच्या अंतरंगातून प्रकाशकिरण टाकून, तिचे चिकित्सक समीक्षण करणारी आणि त्याचवेळी व्यक्तीच्या खासगी आयुष्याच्या व `स्व’रूपाच्या जडणघडणीचे आकलन इतरेजनांसमोर सार्वजनिक रीतीने मांडणारी कृती म्हणजे आत्मकथन होय. अशी कृती एकाच वेळी व्यक्ती आणि समष्टीच्या जडणघडणीत सातत्याने कार्यरत असणाऱ्या, बहुविध आणि परस्परावलंबी प्रियांशी स्वत:च्या समूहाला आणि त्याचबरोबर वाचकालाही, जोडून घेत असते. एका दृष्टीने आत्मचरित्रे म्हणजे इतिहासाच्या विस्तीर्ण अवकाशातील एका विशिष्ट भूप्रदेशाचा स्थलकाल – संस्कृतीविशिष्ट असा जिवंत नकाशा उलगडणारे पथदीपच आहेत असे मानले पहिजे.

व्यक्तीव्यक्तींनी मिळून समाज बनतो असे वरकरणी जरी वाटत असले तरी ते खरे नाही.

पुढे वाचा

कुठे नेऊन ठेवला विवेक तुमचा?

आजच्या अनिश्चिततेच्या सामाजिक, आर्थिक परिस्थिती सामान्य माणसाला असुरक्षित वाटते आहे. त्यामुळे त्याच्यात दैववादीपणा वाढत चालला आहे. आपले कोण? परके कोण? याबाबत संभ्रम वाढत चालला आहे. त्या भीतीतून सामान्य माणूस स्वतःभोवती वेगवेगळी कुंपणे तयार करायला लागला आहे. मग ती धार्मिक, जातिय, प्रादेशिक, भाषिक, आर्थिक कोणती का असेना. भीतीमुळे जे जुने, ओळखीचे आहे तेच धरून बसण्याची भावना व कृती नैसर्गिकच असते.

हे सांगायचे कारण की, नेमकी हीच अवस्था पुरोगामी, सामाजिक, विवेकी चळवळीतील लोकांची झालेली दिसत आहे. तोही अस्वस्थ होत आहे. ज्या कुंपणांमुळे माणूस माणसापासून दूर होत चालला आहे ती कुंपणे तितक्याच वेगाने तोडण्याचा प्रयत्न करत आहे.

पुढे वाचा

`हैदर’ आणि `डॉ. प्रकाश बाबा आमटे’

सुप्रसिध्द दिग्दर्शक विशाल भारव्दाज यांचा `हैदर’ आणि `समृद्धी’ पोरे यांचा `डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हे चित्रपट आपल्या समाजापुढील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पुढे आणतात. जरी या चित्रपटांचा हेतू वेगळा असला तरी या चित्रपटांतून या विषयांची मांडणी अतिशय समर्थपणे पुढे येते. एक विषय काश्मीरमधील दहशतवादाचा, जो हैदरमध्ये हाताळला आहे. तर दुसरा नक्षलवादाचा, जो डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात हाताळला आहे. वर म्हटल्याप्रमाणे हे विषय या चित्रपटांचे मूळ विषय नाहीत. पण चित्रपटाच्या मुख्य विषयांच्या अनुषंगाने हे विषय अपरिहार्यपणे या चित्रपटात दाखल झाले आहेत आणि या प्रश्नांमुळेच या चित्रपटांना गांभीर्य आणि खोली प्राप्त झालेली आहे.

पुढे वाचा

स्वच्छता अभियान: गांधी, मोदी आणि लेनिन

जातिव्यवस्थेने व्यवसाय स्वातंत्र्य नाकारून प्रत्येक व्यवसायासाठी एक स्वतंत्र जात निर्माण केली. जिने जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्या जातीला ठरवून दिलेलेच काम केले पाहिजे असा दंडक घातला गेला. या व्यवस्थेनुसार सर्वात घाणेरडे काम, म्हणजे साफसफाईचे काम आणि तिन्ही वरच्या वर्णाच्या लोकांची सेवा करण्याचे काम शूद्र समजल्या जाणाऱ्या जातींवर सोपवण्यात आले. अशा प्रकारे स्वच्छतेची जबाबदारी अतिशूद्रांवर ज्यांना आपण अस्पृश्य जाती म्हणतो त्यांच्यावर सोपवून सगळ्या वरच्या जातींचा समाज निर्धास्त झाला. त्यामुळे `स्वच्छता’ हे आपले काम नाही. थे अमुक, अमुक जातींचे आहे ही मानसिकता आजतागायत रूजली गेली आहे.

पुढे वाचा