विषय «लैंगिकता»

विवाहयोग्य वय- वास्तव व प्रचार

मुलींच्या विवाहाचे योग्य वय १८ च्या वर व मुलांचे २१ च्या वर असा दूरदर्शनवर अनेक वर्षांपासून प्रचार करण्यात येत आहे. या वयांच्या आधी विवाह करणे हा कायद्याप्रमाणे गुन्हादेखील आहे. १८ वर्षांच्या खाली मूल झाल्याने स्त्रीच्या व अपत्यांच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो हा या कायद्याच्या समर्थनासाठी मुख्य मुद्दा मांडण्यात येतो.

दोन तोटकी विधाने
आश्चर्याची गोष्ट अशी की वरील ठाम विधाने कशाच्या आधारावर केली आहेत हे कधीच सांगण्यात येत नाही. दूरदर्शनाकडे याबद्दल चौकशी करणारे एक पत्र पाठविले पण त्याचे उत्तर मिळाले नाही. तेव्हा मी स्वतःच या विषयीचे वाङ्मय धुंडाळले.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ८)

लैंगिक ज्ञानावर प्रतिषेध [taboo]
(पूर्वार्ध)
नवीन लैंगिक नीतीची रचना करताना विचारायचा पहिला प्रश्न: ‘लैंगिक संबंधांचे नियमन कसे करावे?’ ही नाही. तो ‘पुरुष, स्त्रिया आणि मुले यांना लैंगिक विषयासंबंधी कृत्रिम अज्ञानात ठेवणे इष्ट आहे काय?’ हा आहे. या प्रश्नाला पहिले स्थान देण्याचे माझे कारण असे आहे की, मी या प्रकरणात दाखविण्याचा यत्न करणार असल्याप्रमाणे, लैंगिक विषयातील अज्ञान हे कोणत्याही व्यक्तीला अतिशय हानिकारक आहे. आणि म्हणून असे अज्ञान टिकवून ठेवणे ज्या व्यवस्थेत अवश्य असेल ती इष्ट असू शकत नाही. मी असे म्हणेन की लैंगिक नीती अशी असावी की ती सु–टाक्षित लोकांना इष्ट वाटावी, आणि तिचे आकर्षण अज्ञानावर अवलंबित नसावे.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ७)

स्त्रीमुक्ती
लैंगिक नीती सध्या संक्रमणावस्थेत आहे याची मुख्यतः दोन कारणे आहेत. पहिले, संततिप्रतिबंधाच्या साधनांचा शोध, आणि दुसरे, स्त्रियांची मुक्ती. यांपैकी पहिल्या कारणाचा विचार मी नंतर करणार आहे; दुसरा या प्रकरणाचा विषय आहे.

स्त्रियांची मुक्ती हा लोकशाही चळवळीचा भाग आहे. तिचा जन्म फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात झाला. आपण वर पाहिल्याप्रमाणे या राज्यक्रांतीत वारसाहक्कविषयी कायद्यात कन्यांना अनुकूल असा बदल करण्यात आला. ज्या कल्पनांमुळे फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि फ्रेंच राज्यक्रांतीमुळे ज्यांचा विकास झाला अशा कल्पनांतून मेरी वॉलस्टोनक्राफ्टचे ‘स्त्रियांच्या हक्कांचे समर्थन’ (१७९२) हे पुस्तक निर्माण झाले होते.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ६)

कल्पनात्म प्रेम (Romantic Love)
ख्रिस्ती धर्म आणि बर्बर टोळ्या यांच्या विजयानंतर म्हणजे रोमन नागरणाच्या (civilization) पराजयानंतर स्त्री आणि पुरुष यांचे संबंध कित्येक शतकांत गेले नव्हते अशा पशुतेच्या पातळीवर गेले. प्राचीन जग दुराचारी होते, पण ते पाशवी नव्हते. तमोयुगांत धर्म आणि बर्बरता यांनी संगनमत करून जीवनाच्या लैंगिक अंगाचा अधःपात घडवून आणला, विवाहात पत्नीला कसलेच हक्क नव्हते; आणि विवाहाबाहेर सर्वच लैंगिक संबंध पापमय असल्यामुळे अनागरित (uncivilized) पुरुषाच्या स्वाभाविक पशुत्वाला वेसण घालण्याचे कारणच उरले नाही. मध्ययुगात दुराचार सर्व दूर पसरले होते, आणि ते किळसवाणे होते.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ५)

ख्रिस्ती नीती
‘विवाहाची मुळे कुटुंबात रुजलेली आहेत, कुटुंबाची विवाहात नाहीत’ असे वेस्टरमार्क म्हणतो. हे मत ख्रिस्तपूर्व काळात उघडे सत्य म्हणून स्वीकारले गेले असते; परंतु ख्रिस्ती धर्माच्या आगमनानंतर ते एक महत्त्वाचे विधान झाले असृन त्याचे प्रतिपादन त्यावर जोर देऊन करावे लागते. ख्रिस्ती धमनि, आणि विशेषतः सेंट पॉलने, विवाहाविषयी एक अगदी नवीन कल्पना मांडली: ती अशी की विवाह प्राधान्याने अपत्योत्पादनाकरिता नसून तो अविवाहितांमधील लैंगिक संबंधाच्या (fornication) पापाचे निवारण करण्यासाठी आहे.
सेंट पॉलची विवाहविषयक मते कॉरिंथमधील रहिवाश्यांना त्याने लिहिलेल्या पहिल्या पत्रात पूर्ण स्पष्टपणे व्यक्त झाली आहेत.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ४)

लिंगपूजा, तापसवाद आणि पाप
जेव्हा पितृत्वाचा शोध लागला त्या क्षणापासून धर्माला लैंगिक व्यवहारात मोठा रस उत्पन्न झाला. हे अपेक्षितच होते; कारण जे जे गूढ आहे आणि महत्त्वाचे आहे अशा सर्व गोष्टींत धर्म रस घेतो. कृषीवलावस्था आणि मेंढपाळ अवस्था यांच्या आरंभीच्या काळात राहणाऱ्या मनुष्यांच्या दृष्टीने सुपीकपणा, मग तो जमिनीचा असो, गुराढोरांचा असो, किंवा स्त्रियांचा असो, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. शेती नेहमीच पिकत नसे, आणि तसेच मैथुनातून अपत्यजन्मही नेहमी होत नसे. म्हणून धर्म आणि जादू (अभिचार) यांना इष्टफलप्राप्तीसाठी आवाहन केले जाई. सहानुभवात्मक अभिचाराच्या (sympathetic magic) तत्कालीन समजुतीनुसार लोक असे मानीत की मानवांतील बहुप्रसवत्व वाढले की जमिनीचेही वाढेल; आणि तसेच मानवांतील बहुप्रसवत्वाची आदिम समाजात मोठी मागणी असल्यामुळे तिच्याही वृद्ध्यर्थ विविध धार्मिक आणि अभिचारात्मक कर्मकांड सुरू झाले.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ३)

पितृसत्ताक व्यवस्था
पितृत्व या शरीरशास्त्रीय गोष्टीची ओळख पटल्याबरोबर पितृत्वाच्या भावनेत एक नवीन घटक प्रविष्ट झाला आणि त्यामुळे जवळजवळ सगळीकडे पितृसत्ताक समाजांची निर्मिती घडून आली. अपत्य हे आपले ‘बीज’ आहे हे ओळखल्याबरोबर पित्याच्या अपत्यविषयक भावकंदाला (sentiment) दोन गोष्टींमुळे नवे बळ लाभते – अधिकाराची आवड आणि मृत्यूनंतर जीवनाची इच्छा. आपल्या वंशजांचे पराक्रम हे एका अर्थाने आपलेच पराक्रम आहेत आणि त्यांचे जीवन आपल्याच जीवनाचा विस्तार आहे; व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षेचा तिच्या मृत्यूबरोबरच अंत होत नाही आणि वंशजांच्या चरित्रांतून तिचा हवा तितका विस्तार होऊ शकतो या कल्पना स्वाभाविक होत्या.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग २)

मातृवंशीय समाज
वैवाहिक रूढींमध्ये नेहमीच तीन घटकांचे मिश्रण आढळते: (१) साहजिक किंवा सहजात किंवा राजप्रवृत्तिमय (instinctive), (२) आर्थिक, आणि (३) धार्मिक. हे घटक स्पष्टपणे वेगळे दाखविता येतात असे मला म्हणायचे नाही; जसे ते अन्य क्षेत्रात वेगळे दाखविता येत नाहीत, तसेच ते येथेही येत नाहीत. दुकाने रविवारी बंद असतात याचे मूळ धार्मिक आहे. पण आज ही गोष्ट आर्थिक झाली आहे; आणि अंगिक बाबीतील कायदे आणि रूढी यांचीही गोष्ट अशीच आहे. धार्मिक मूळ असलेली रूढी जर उपयुक्त असेल तर तिचा धार्मिक आधार कमकुवत झाल्यावरही ती पुष्कळदा टिकून राहते.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग १)

बर्ट्रांड रसेल (१८७२ ते १९७०) हे विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ होते असे सामान्यपणे मानले जाते. तत्त्वज्ञानाखेरीज सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक इत्यादि विषयांवरही त्यांनी विपुल लेखन केले. त्यांचे लिखाण नेहमीच अतिशय मूलगामी, सडेतोड, निर्भय आणि विचारप्रवर्तक असे. त्यांचा Marriage and Morals (१९२९) हा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध असून तो अत्यंत प्रभावीही ठरला आहे. त्यात रसेल यांनी आपल्या प्रचलित वैवाहिक नीतीची मूलग्राही चर्चा केली असून विवेकवादी वैवाहिक नीती काय असावी याचे दिग्दर्शन केले आहे. प्राध्यापक म. गं. नातूंनी या ग्रंथाचा अनुवाद करावयास घेतला होता.

पुढे वाचा