विषय «उवाच»

इस्लामी कल्पना

इस्लामी संस्कृतीच्या क्षेत्रातही अशीच ईश्वरनिष्ठ आणि कालचक्र निष्ठ इतिहासमीमांसा आढळते. तथापि इस्लामी विचार मुख्यतः किंवा जवळजवळ सर्वस्वीच सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी ईश्वराच्या अल्लाच्या अनुरोधानेच मांडलेला आहे. चौदाव्या शतकातील इब्न खाल्दुनने निरनिराळ्या राज्ये नि सत्ता ह्यांचे उदय, वृद्धी व अस्त ह्यासंबंधी काही ठोकळ नियम सांगितले. पण तोही कुराणप्रणीत अल्लाच्या सामर्थ्याविषयी शंका उपस्थित करू शकत नव्हता. हा एक लहानसा प्रयत्न सोडला, तर कुराण व इतर प्राचीन इस्लामी साहित्य ह्यांतून प्रसंगवशात जे इतिहासभाष्य आलेले दिसते ते सगळे ईश्वरी इच्छेच्या पायावर आधारलेले आहे. मानवी जीवनात, समाजांच्या, राष्ट्रांच्या जीवनात बदल घडतात, स्थित्यंतरे होतात.

पुढे वाचा

ग्रीक आणि रोमन कल्पना

प्राचीन ग्रीक लोकांनी विश्वाविषयी आणि मानवी जीवनाविषयी अनेक अंगानी व अनेक दृष्टींनी विचार केला. अनेक ज्ञानशाखांच्या क्षेत्रांत ग्रीकांचे विचार तर्कशुद्ध, मूलभूत आणि पुरोगामी असे होते. रोमन लोक हे ग्रीकांइतके ज्ञानपिपासू नव्हते. ते अधिक व्यवहारी होते, तथापि रोममध्येही अनेक वचारवंतांनी ग्रीकांचे विविधा विचार आत्मसात करून पुढे त्यांचा विस्तार केलेला आढळून येतो.

ज्यू आणि ख्रिस्ती कल्पना

पॅलेस्टाइनमधील ज्यू विचारवंत, नंतरच्या काळातील ख्रिस्तप्रणीत धर्म आणि तज्जन्य विवेचन ह्यातून आलेले इतिहासविषयक सिद्धान्तसुद्धा असेच ईश्वरी सूत्राच्या कल्पनेवर आधारलेले आहेत. ज्यू तत्त्वज्ञांच्या मते मानवाचा आणि मानवाच्या इतिहासाचा परमेश्वर हा जनकच आहे. माणसाच्या इतिहासातील सर्व चढउतार, यशापयश हे ईश्वरी हस्तक्षेपानेच होत असतात. म्हणून त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. त्या आज्ञा प्रत्यक्षात माणसांना कधी धर्मगुरूंमार्फत किंवा उपदेशकांमार्फत समजतील, तर कधी राज्यकर्त्यांमार्फत. धर्मोपदेशक आणि राजे हे दोघेही ईश्वरांचे अधिकृत प्रतिनिधीच आहेच. पुष्कळदा दुष्काळ, युद्ध वगैरे ज्या आपत्ती येतात त्यांत ईश्वराचा हेतू माणसांना धडे शिकविण्याचा असतो.

पुढे वाचा

प्राचीन भारतीय कल्पना

प्राचीन भारतीयांनी इतिहासलेखन असे फारसे केलेच नाही. तथापि इतिहासाविषयी, कालप्रवाहाविषयी, स्थित्यंतरे आणि त्यामागील सूत्रे ह्या अनुरोधाने पुष्कळ विवेचन ऋग्वेदकालापासून पुढे कित्येक शतके केलेले दिसते. इतर प्राचीन संस्कृतींप्रमाणे भारतातही दैवी शक्तीवर विश्वास होताच. निसर्गात बदल घडविणाऱ्या देवता मानवी जीवनाच्याही नियंत्रक होत्या. तेव्हा कर्ताकरविता परमेश्वर, माणसे म्हणजे त्याच्या हातातील बाहुली ही कल्पना आलीच. आपण काहीतरी करतो आणि त्यामुळे काहीतरी घडते असे माणसांना उगीच, अज्ञानामुळे वाटत असते. वस्तुतः परमेश्वरच सर्व करवितो. परमेश्वर हे जे करतो, ते अज्ञ मानवांना धडे शिकवण्याच्या हेतूने असेल; ते त्याच्या वैश्विक योजनेचा केवळ एक लहानसा भाग असेल किंवा त्या सगळ्या नुसत्या त्याच्या लीला असतील- काहीही असेल परंतु सर्व गोष्टींमागे परमेश्वरी सूत्र असते हा विचार प्राचीन भारतीय साहित्यात अनेक ठिकाणी, अनेक प्रकारे व्यक्त झालेला दिसतो.

पुढे वाचा

भान

निदान लोकशाही- अंतर्गत चालणाऱ्या राजकारणाला तरी आपल्या मर्यादांचे भान असणे व त्याने त्यांचे उल्लंघन न करणे आवश्यक आहे. नाहीतर जेथे अप्रमाणिकपणा, भ्रष्टाचार, सामान्यांची फसवणूक, व्यक्तिगत सत्ता व लाभ ह्यांसाठी चालणारा नागडा संघर्ष आहे, तेथे काहीच शक्य नाही ना समाजवाद, ना बहुजनहितवाद, ना सरकार, ना सार्वजनिक व्यवस्था, ना न्याय, ना स्वातंत्र्य, ना राष्ट्रीय एकता.
थोडक्यात म्हणजे अशा परिस्थितीत देशच अस्तित्वात राहू शकत नाही.
जयप्रकाश नारायण
( एव्हरीमॅन नियतकालिकातील लेखामधून)

स्त्री आणि समर्पण

आजपर्यंत स्त्रीने समर्पण पुरुषाच्या निष्ठेसाठी केले आहे हेच दिसते. मग ती रामाची सीता असो, हरिश्चंद्राची तारामती असो, की गांधींची कस्तुरबा असो. ह्यांच्यापैकी कुणाचेही जीवन स्वायत्त नव्हते. स्त्रीच्या आदर्शासाठी प्राण देणारा पुरुष जर निघाला असता कुणी, तर तो स्त्रैण मानला गेला असता. समाजामध्ये त्याला प्रतिष्ठा मिळाली नसती. आपल्या समाजाने स्त्री निष्ठेला लंपटता मानले आणि पुरुष निष्ठेला पातिव्रत्य. ही दोन अलग-अलग मूल्ये समाजामध्ये प्रचलित झाली आहेत.

दादा धर्माधिकारी स्त्री-पुरुष सहजीवन या पुस्तकातून

प्रेम आणि द्वेष

कोणाही व्यक्तीच्या कातडीचा रंग, पार्श्वभूमी, किंवा तिच्या धर्मावरून तिचा द्वेष करीत कोणी जन्माला येत नाही द्वेष करायला शिकवावे लागते, आणि जर माणसांना द्वेष करायला शिकवता येत असेल, तर त्यांना प्रेम करायलाही शिकवता येऊ शकेल, कारण द्वेष करण्यापेक्षा प्रेम करणे माणसाच्या हृदयाला अधिक सहजसाध्य आहे.
— नेल्सन मंडेला

नवसंस्कृती व नवा मानव

आपणास एक नवी संस्कृती निर्माण करावयाची आहे याची जाणीव आम्ही सतत ठेविली पाहिजे. तीनशे वर्षांपूर्वी युरोपखंड आधुनिक युगात आले, भौतिकविद्येत त्यांनी आघाडी मारली. भौतिक सत्याचे संशोधन करीत असताना आप्तवाक्य व शब्दप्रामाण्य यांच्यापुढे जाऊन बुद्धिवाद आणि आत्मप्रामाण्य यांचा आधार घेतला. बुद्धिवादातून बुद्धिस्वातंत्र्य जन्मास आले आणि या बुद्धिस्वातंत्र्यासाठीच व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार प्रथम करण्यात आला. त्यांच्या संरक्षणासाठी राज्यक्रांत्या कराव्या लागल्या व तशा त्या ब्रिटिश, अमेरिकन व फ्रेंच लोकांनी केल्याही. पण त्या क्रांत्या केल्यानंतर व्यक्तिस्वातंत्र्य आर्थिक व्यवहारात प्रभावी बनले. सत्यसंशोधन आणि समाजसेवा ही व्रते घेणाऱ्यांसाठी ते जितके हितावह होते तितकेच ते आर्थिक व्यवहारांत अनर्थावह ठरले आहे.

पुढे वाचा

जात-पात


जातिसंस्थेला व स्पृश्यास्पृश्यतेला खऱ्या अर्थाने मूठमाती द्यावयाची असेल तर शूद्र-अतिशूद्र ह्यांच्याकडे परंपरेने आलेल्या कष्टकरी व्यवसायांना व श्रमनिष्ठ जीवनाला प्रतिष्ठा व सन्माननीय उत्पन्न मिळवून देणे अगत्याचे आहे. प्रत्येकाला उच्चशिक्षित पांढरपेशा जीवनशैलीत प्रवेश मिळाला तर जन्माधिष्ठित जातपात कदाचित उखडली जाईल, पण शूद्र, अतिशूद्र नव्या स्वरूपात कायमच राहतील. तसेच बहीण-भावंडवृत्ती जर जीवनाची बैठक नसली, तर शोषण, अन्याय, दडपणूक ह्यांना कधीच आळा घालता येणार नाही.

मुक्त मनाचा माणूस

मुक्त मनाचा माणूस
(एखाद्या) माणसाच्या मनातील स्वातंत्र्याची ज्योत विझलेली नाही, याचा पुरावा काय? मुक्त मनाचा माणूस असे आपल्याला कोणाविषयी म्हणता येईल? आपल्या जागृत सदसद्विवेकबुद्धीद्वारे ज्याला आपले हक्क, जबाबदाऱ्या व कर्तव्य यांचे भान असते, त्याला मी मुक्त म्हणतो. जो परिस्थितीचा गुलाम न बनता, तिला बदलवून आपल्याला अनुकूल करून घेण्यासाठी तत्पर व कार्यरत असतो, त्याला मी मुक्त मानतो. जो निरर्थक रूढी, परंपरा व उत्सवांचा, अंधश्रद्धांचा गुलाम नाही, ज्याच्या मनात विवेकाची ज्योत तेवते आहे. त्याला मी मुक्त मानतो. ज्याने आपले इच्छास्वातंत्र्य गहाण ठेवले नाही; आपली बुद्धिमत्ता वस्वतंत्र विचारबुद्धी यांचा त्याग केला नाही, इतरांच्या शिकवणुकीनुसार जो आंधळेपणाने वागत नाही, वैधता व उपयुक्तता तपासल्याशिवाय व विश्लेषणाशिवाय जो कोणतीही गोष्ट आंधळेपणाने स्वीकारत नाही, आपल्या हकांच्या रक्षणासाठी जो सदैव सज्ज असतो, लोकनिंदा व अन्याय्य टीका यांची जो पत्रास बाळगत नाही, आपण इतरांच्या हातातील बाहुले बनू नये यासाठी आवश्यक विवेक व स्वाभिमान ज्याच्यापाशी आहे, त्यालाच मी मुक्त मानव मानतो.

पुढे वाचा