विषय «उवाच»

जात-पात


जातिसंस्थेला व स्पृश्यास्पृश्यतेला खऱ्या अर्थाने मूठमाती द्यावयाची असेल तर शूद्र-अतिशूद्र ह्यांच्याकडे परंपरेने आलेल्या कष्टकरी व्यवसायांना व श्रमनिष्ठ जीवनाला प्रतिष्ठा व सन्माननीय उत्पन्न मिळवून देणे अगत्याचे आहे. प्रत्येकाला उच्चशिक्षित पांढरपेशा जीवनशैलीत प्रवेश मिळाला तर जन्माधिष्ठित जातपात कदाचित उखडली जाईल, पण शूद्र, अतिशूद्र नव्या स्वरूपात कायमच राहतील. तसेच बहीण-भावंडवृत्ती जर जीवनाची बैठक नसली, तर शोषण, अन्याय, दडपणूक ह्यांना कधीच आळा घालता येणार नाही.

मुक्त मनाचा माणूस

मुक्त मनाचा माणूस
(एखाद्या) माणसाच्या मनातील स्वातंत्र्याची ज्योत विझलेली नाही, याचा पुरावा काय? मुक्त मनाचा माणूस असे आपल्याला कोणाविषयी म्हणता येईल? आपल्या जागृत सदसद्विवेकबुद्धीद्वारे ज्याला आपले हक्क, जबाबदाऱ्या व कर्तव्य यांचे भान असते, त्याला मी मुक्त म्हणतो. जो परिस्थितीचा गुलाम न बनता, तिला बदलवून आपल्याला अनुकूल करून घेण्यासाठी तत्पर व कार्यरत असतो, त्याला मी मुक्त मानतो. जो निरर्थक रूढी, परंपरा व उत्सवांचा, अंधश्रद्धांचा गुलाम नाही, ज्याच्या मनात विवेकाची ज्योत तेवते आहे. त्याला मी मुक्त मानतो. ज्याने आपले इच्छास्वातंत्र्य गहाण ठेवले नाही; आपली बुद्धिमत्ता वस्वतंत्र विचारबुद्धी यांचा त्याग केला नाही, इतरांच्या शिकवणुकीनुसार जो आंधळेपणाने वागत नाही, वैधता व उपयुक्तता तपासल्याशिवाय व विश्लेषणाशिवाय जो कोणतीही गोष्ट आंधळेपणाने स्वीकारत नाही, आपल्या हकांच्या रक्षणासाठी जो सदैव सज्ज असतो, लोकनिंदा व अन्याय्य टीका यांची जो पत्रास बाळगत नाही, आपण इतरांच्या हातातील बाहुले बनू नये यासाठी आवश्यक विवेक व स्वाभिमान ज्याच्यापाशी आहे, त्यालाच मी मुक्त मानव मानतो.

पुढे वाचा

विनाशाची क्षमता

आजच्या जीवशास्त्र्यांपैकी एक मोठा माणूस अटै मायर, याने काही वर्षांपूर्वी एक मत व्यक्त केले. तो पृथ्वी सोडून इतरत्र कुठे बुद्धिमान जीव सापडू शकतील का, यावर बोलत होता. त्याला असे जीव सापडण्याची शक्यता अगदी कमी आहे असे वाटत होते. उच्च बुद्धिमत्ता म्हणजे माणूसप्राण्यांत दिसते तश्या रचनेची बुद्धिमत्ता जीवांना कितपत परिस्थितीशी अनुरूप करते, यावर मायरचा युक्तिवाद बेतलेला होता. मायरच्या अंदाजात पृथ्वीवर सजीव रचना अवतरल्यापासून आजवर सुमारे पन्नास अब्ज जीवजाती उत्पन्न झाल्या आहेत; ज्यांपैकी एकाच जीवजातीपाशी संस्कृती घडवण्याला उपयुक्त अशी बुद्धिमत्ता आहे. या जीवजातीला ही बुद्धिमत्ता सुमारे एक लाख वर्षांपूर्वी प्राप्त झाली.

पुढे वाचा

लोई ओबामा

काही आफ्रिकन देश दुर्मिळ धातूंची खनिजे इतर सर्व जगाला पुरवतात. आजचे प्रगत तंत्रज्ञान या धातूंशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे त्या धातूंच्या खनिजांना भरपूर मागणी असते. उदाहरणार्थ, पूर्व काँगो (पूर्वश्रमीचा झाईर) या देशात कथील, टंगस्टन आणि टैंटलम हे धात सापडतात, आणि हे तीन्ही धात मोबाईल फोन्स बनवण्याला आवश्यक असतात.

काही आफ्रिकन देशांत मध्यवर्ती सत्ता कमकुवत आहे, आणि वॉरलॉ ऊर्फ बाहुबली प्रत्यक्षात सत्ता गाजवतात. या सत्ता गाजवण्यात भाडोत्री सैनिक, आंतर जमातीय हेवेदावे, तस्करी, अशी अनेक अंगे असतात. अशा बाहुबलींचे पैशाचे स्रोत आटवण्याच्या हेतूने अमेरिकन काँग्रेसने (लोकसभेला समांतर, विधानसभा) डॉड-फ्रैंक वॉल स्ट्रीट सुधार कायदा (2010) मध्ये एक कलम घातले, की कोणत्याही अमेरिकन कंपनीने परदेशांतून माल विकत घेताना त्या खरेदीपासून स्थानिक बाहुबलीना मदत मिळू नये यासाठी काय खबरदारी घेतली ते सांगावे.

पुढे वाचा

लोकाभिमुख प्रगती

निसर्गाचे मनापासून रक्षण केले आहे लोकांनी. अमेरिकेत, युरोपात, जपानात पर्यावरणाच्या रक्षणाची पावले उचलली गेली, ती सारी लोकांच्या पुढाकारातून. ह्या पर्यावरणाच्या प्रेमातून जगभर दुसरीही एक चळवळ सुरू झाली. माहिती हक्काची. वेगवेगळ्या देशांत गेल्या काही दशकात माहिती हक्काचे कायदे पारित करून घेण्यात पर्यावरणवाद्यांनीच मुख्य भूमिका बजावलेली आहे.
ही माहिती हक्काची चळवळ लोकशाहीच्या पुढच्या टप्प्यातल्या प्रगतीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.ही वाटचाल चालू आहे प्रातिनिधिक लोकशाहीकडून प्रत्यक्ष लोकशाहीच्या दिशेने. पुण्यात लोकमान्य टिळक गरजले होते; “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.’ हे लोकांचे स्वतःचे राज्य म्हणजे काही लोकप्रतिनिधींची मनमानी नाही.

पुढे वाचा

अंधश्रद्धा विशेषांक – श्रद्धेची तपासणी

परंपरा आणि परिवर्तन यांची सहृदय चिकित्सा मी आयुष्यभर करत आलो आहे. मी सश्रद्ध माणूस आहे. पण रूढ कर्मकांडांपलिकडे जाण्याचा आणि ‘कर्माचे डोळे चोख हो आवे’ या ज्ञानदेवांच्या इशाऱ्याला सजगपणे स्वीकारत पुढे जाण्याचा प्रयत्न मी आयुष्यभर करत आलो आहे. श्रद्धेची तपासणी करण्याची वेळ आली तेव्हा ती करायला मी कधी कचरलो नाही आणि सांप्रदायिक श्रद्धांनी घातलेल्या मर्यादा ओलांडून, संशोधनाने समोर ठेवलेल्या सत्याकडे जाताना मी कधी पाऊल मागे घेतले नाही.
[ रा.चिं. ढेरे यांनी पुण्यभूषण पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणातून]

ब्ल्यू-प्रिण्टचे ‘टायमिंग’

तोडफोड, दमबाजी, घोषणाबाजी याच्यापलीकडे जाऊन स्थानिकांच्या हिताचे विवेकी राजकारण करणाऱ्यांची या राज्यात गरज आहे. परंतु भावनिक हिंदोळ्यावर बसून स्वतःचे झोके आभाळात घेऊन जायचे आणि तेथून हात उंचावून भक्तांना दर्शन द्यायचे, याच पद्धतीने अस्मितेचे राजकारण सुरू आहे. राज्याच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिण्ट’ राज्यावर आल्यानंतर बनविता येत नाही, ती ‘ब्ल्यू प्रिण्ट’ दाखवून राज्यावर यावे लागते. परंतु सत्ताधारी आणि विरोधक दोघांचेही राजकारण केवळ ‘प्रिण्ट’च्या दिशेने जाणारे आहे. “प्रिण्ट’चा शुद्ध मराठी अर्थ ‘छापणे’ असा होतो आणि ‘छापणे’चा अर्थ काय होतो हे मराठी माणसाला वेगळे सांगण्याची गरज नाही.

पुढे वाचा

दुष्टाव्याचे मूळ

दोन देशांमधील सशस्त्र संघर्षाकडे आपण भीतीने, घृणेने पाहतो. पण आर्थिक संघर्ष युद्धांपेक्षा कमी भीतिदायक किंवा घृणास्पद नसतात. युद्ध हे शल्यक्रियेसारखे असते, तर आर्थिक संघर्ष प्रदीर्घ छळासारखे असतात. त्यांचे दुष्परिणाम युद्धांबद्दलच्या साहित्यातील वर्णनांइतकेच भयंकर असतात. आपण आर्थिक संघर्षांना महत्त्व देत नाही, कारण आपल्याला त्यांच्या घातक परिणामांची सवय असते. युद्धविरोधी चळवळी योग्यच आहेत. मी त्यांना सुयश चिंततो. पण मला एक सुप्त, कुरतडणारी धास्ती वाटत राहाते, की ती चळवळ विफल होईल, कारण ती मानवी हाव, हव्यास, या दुष्टाव्याच्या मुळांना स्पर्श करणार नाही. [नॉन-व्हायलन्स ङ्कवद ग्रेटेस्ट फोर्स या महात्मा गांधींच्या पुस्तकातील हा उतारा नाओमी क्लाईन (द शॉक डॉक्ट्रिन, पेंग्विन, २००७) उद्धृत करते.]

पुढे वाचा

पर्यायांचा ‘निष्फळ’ शोध

जर भांडवलवादाला व्यवहार्य पर्याय असता, तर आजचे संकट जास्त गंभीर होणे शक्य होते. असे म्हणता येईल, की १९३०-४० मधील स्थिती यामुळेच महामंदी ठरली. सोविएत यूनियन तेव्हा अ-भांडवलवादी पद्धतीने औद्योगिकीकरण करत होती, राज्य-समाजवादी अर्थव्यवस्थेने. भांडवलवादी औद्योगिक देशांत सबळ समाजवादी चळवळी होत्या, आणि त्या व्यवस्थाबदल करू पाहत होत्या. १९८० तील राज्य-समाजवादी व्यवस्थांच्या पतनाने आणि समाजवादी चळवळी क्षीण होण्याने ते पर्याय आज शिल्लक नाहीत.
जगभरात भांडवलवादच प्रभावी असल्याने त्या व्यवस्थेला पर्याय शोधणे निष्फळ आहे. पर्यावरणी आपत्ती वगळता कोणतेही अंतिम संकट’ दृष्टिपथात किंवा कल्पनेतही नाही.

पुढे वाचा

अमेरिकेच्या स्वातंत्र्याचे अमेरिकन काळ्या लोकांना काय महत्त्व ?

अमेरिकन गुलामांना तुमच्या चार जुलैचे काय महत्त्व? हा दिवस घोर अन्याय व क्रूरतेची त्यांना आठवण करून देणारा आहे. त्याच्यासाठी तुमचा उत्सव-समारंभ सर्व ढोंग आहे. त्याला तुमचा स्वातंत्र्याचा गर्व, राष्ट्रीयत्वाची थोरवी, तुमचा हर्षोल्हासाने भरलेला आवाज हे सर्व हृदयशून्य आणि पोकळ वाटते. तुमचा स्वातंत्र्य आणि समतेबद्दलचा नारा, तुमच्या धर्मग्रंथातील वचने व ईश्वराचे आभार मानणे हे सर्व त्याला केवळ पोकळ गर्जना, बनवेगिरी, कपट, पूज्यभावाचा अभाव व दांभिकपणाचे लक्षण वाटते. केलेल्या गुन्ह्यावर पांघरूण घालणे, हे असंस्कृत, राष्ट्राला काळिमा लावणारे कृत्य आहे.

फ्रेडरिक डग्लस, पूर्वीचा गुलाम, १८५२ [अमेरिकेतील गोया लोकांना ४ जुलै १७७६ ला स्वातंत्र्य मिळाले, परंतु गुलामगिरी नष्ट व्हायला १८६२ साल उजाडावे लागले.]

पुढे वाचा