मासिक संग्रह: फेब्रुवारी, १९९६

पत्रव्यवहार

संपादक,
आजचा सुधारक नागपूर
श्री. दिवाकर मोहनी यांनी “कुटुंब’ या शीर्षकाच्या ३ लेखांमध्ये प्रामुख्याने समाजातील कुटुंबरचनेच्या उणीवांचा ऊहापोह करून, कौटुंबिक स्वार्थामुळे समाजाचे अहित होते असा सिद्धांत मांडला आहे, व तो मांडण्यापूर्वी त्यांनी बराच सूक्ष्म मूलभूत मानवीय धारणांचा विचार केल्याचे स्पष्ट जाणवते. कुटुंबाची संकल्पना व कुटुंबातील व्यक्तींच्या स्वार्थावरच कुटुंबाची प्रगती व उत्थान अवलंबून असते या हल्लीच्या सर्वमान्य विचारसरणीमुळे समाजाच्या समस्या अधिक बिकट होतात व त्यांचा अंत होण्याचा सुतराम
संभव नाही असे ते सुचवितात.
या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी सामाजिक रचनेत-विशेषतः समाजाच्या कुटुंबाधारित विभागात – आमूलाग्र बदल केल्याखेरीज तरणोपाय नाही असा त्यांना विश्वास आहे.

पुढे वाचा

मानवसमाजातील संस्था आणि पद्धती

जॉर्ज पी. मॅडक (Murdoch) या अमेरिकन मानववंशशास्त्रज्ञाने १९४५ साली सर्व मानवी समाजांमध्ये निरपवादपणे सापडणाच्या काही संस्था व पद्धतींची यादी बनवली. ही यादी आमच्या वाचकांपुढे चर्चेसाठी मांडत आहोत.“मराठीकरणावरही” चर्चा व्हावी.
(१) वयानुसार गट पाडणे (Age Grading), (२) शारीरिक क्षमतेच्या क्रीडास्पर्धा (AthleticSports, (३) साज-शृंगार (Bodily Adornment), (४) पंचांग (Calender), (५) शुचितेचे शिक्षण (Cleanliness Training), (६) समूहांतर्गत विरचन (Community Organization), (७) पाकशास्त्र (Cooking), (८) श्रम-सहकार (Cooperative Labour), (९) विश्वरूपशास्त्र (Cosmology), (१०) प्रियाराधन (Courtship)
(११) नृत्य(Dancing), (१२) सुशोभन-कला (Decorative Art), (१३) रमलभविष्यकथन (Divination), (१४) श्रम-विभाजन (Division of Labour), (१५) स्वप्नार्थशास्त्र (Dream-Interpretation), (१६) शिक्षण (Education), (१७) परलोकविज्ञा (Eschatology), (१८) नीतिशास्त्र (Ethics), (१९) वंश वनस्पतीशास्त्र (Ethnobotany), (२०) शिष्टाचार (Enquette)
(२१) श्रद्धेने (मंत्राने) रोग निवारण (Faith-healing), (२२) कौटुंबिक मेजवान्या (Family Feasting) (२३) होम-हवन (Fire-making), (२४) कथा कहाण्या (Folklore), (२५) भक्ष्याभक्ष्यविचार (Food Taboos), (२६) मृत्यूत्तरक्रिया (Funeral Rites), (२७) खेळ (Gamcs), (२८) सूचक (सार्थ) हातवारे (Gestures), (२९) आहेर करणे, (Gift-giving), (३०) शासन (Government)
(३१) अभिवादन (Greetings), (३२) केशभूषा (Hair-styles), (३३) आदरातिथ्य (Hospitality), (३४) वास्तुशास्त्र (Housing), (३५) आरोग्यशास्त्र (Hygiene), (३६) जवळच्या नातलगांमधील लैंगिक व्यवहारावरील निर्बध (Incest Taboos), (३७) वारसाहक्क (Inheritance Rules), (३८) थट्टामस्करी (Joking), (३९) गोत्रविचार (KinGroups), (४०) नातेवाचक शब्द (Kinship Nomenclature), (४१) भाषा (Language), (४२) कायदे (Law), (४३) शकुन-अंधश्रद्धा (Luck Superstitions), (४४) यातु, जादू (Magic), (४५) विवाह (Marriage), (४६) भोजनमुहूर्तविचार (Mealtimes), (४७) वैद्यक (Medicine), (४८) प्रसूतिशास्त्र (Obstetrics), (४९)दंडविधान (Penal Sanctions), (५०) व्यक्तिगत नांवे (Personal Names) (५१) लोकसंख्या-धोरणे (Population Policy), (५२) नवजात संगोपन (Postnatal Care), (५३) गर्भारपणातील “पथ्ये” (Pregnancy Usages),(५४) मालमत्तेचे हक्क (Property Rights), (५५) अतिनैसर्गिक शक्तींची “शांत” (Propitiation of Supernatural Beings), (५६) कौमार्यव्यवहार (Puberty Customs), (५७) धार्मिक कर्मकांडे (Religious Ritual), (५८) निवास-नियम (Residence Rules), (५९) लैंगिक निबंध (Sexual Restrictions), (६०) आत्म्याची संकल्पना (Soul Concept), (६१) सामाजिक श्रेणी-विभाजन (Status differentiation), (६२) शल्यवैद्यक (Surgery), (६३) हत्यारे बनवणे (Tool – making), (६४) व्यापार (Trade), (६५) पाहुणेपण (Visiting), (६६)विणकाम (Weaving), (६७) हवामान नियंत्रण (यज्ञ?)

पुढे वाचा

मिथ्ये आणि वास्तव

(१) ज्ञानदेव – ‘म्हैशा मुखीं वेद बोलविले’
जगातील पुराणकथातील, संतचरित्रातील कथानायकांच्या जीवनात अलौकिक वाटणाच्या घटनांची रेलचेल असते. मानवी स्वरूपातील व्यक्ती अतिमानवी स्वरूपात प्रक्षेपित केल्या जातात. काही कथानायक निसर्गशक्तींच्या मानवीकरणातून (athropomorphism) जन्माला आले असतात. त्यांच्या जीवनातील अलौकिकत्व नैसर्गिक शक्तीचे कार्य म्हणून स्पष्ट करता येते. जसे ‘अग्नी हा देवांचा पुरोहित आहे असे ज्यावेळी सांगितले जाते त्यावेळी अग्नीतून निर्माण होणारा धूर यज्ञात अर्पण केलेल्या आहुतींना इष्ट देवतेकडे नेतो असा त्यातून बोध होतो. ऐतिहासिक व्यक्तीदेखील अतिमानवी स्वरूपाच्या अचाट कृत्यांच्या वलयात गुरफटून टाकल्या जातात. त्यांच्या चरित्रांतही मिथ्या भासणाच्या अनेक घटना गुंफल्या असतात.

पुढे वाचा

लैंगिक स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे

स्त्रियांची लैंगिक मुक्ती व स्वैराचार यातला फरक भारतीयांना व आशियामधल्या बहुतेक स्त्रीपुरुषांना समजणे कठीण जाते याचा प्रत्यय परत श्री गलांडे यांच्या (नोव्हें. ९५) पत्रातून आला. म्हणून परत लैंगिक मुक्ती व स्वैराचार ह्यांच्या (माझ्या) व्याख्या लिहिते.
लैंगिक स्वातंत्र्य अथवा मुक्ती असणे म्हणजे शरीरसंबंधास हो किंवा नाही म्हणण्याची संपूर्ण समाजमान्य मुक्तता.
स्वैराचार म्हणजे असंख्य मित्रमैत्रिणींशी अल्पपरिचयात शरीरसंबंध, मजा म्हणून one night stand व वेश्यागमन.
स्त्रियांची अत्यंत हानी त्यांच्या लैंगिक पावित्र्याला अवास्तव दिलेल्या महत्त्वामुळे झालेली आहे. म्हणून मला स्त्रियांची लैंगिक मुक्ती हवी आहे.
भारतात स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य किंवा मुक्ती असती तर एका धोब्याच्या वक्तव्यामुळे श्रीरामांनी सीतामाईचा त्याग केला नसता, द्रौपदीला भोगदासी करण्याची दुर्योधनाला हिंमत झाली नसती, सोळासहस्र नारींशी लग्न करण्याची श्रीकृष्णाला जरूरी पडली नसती, (बलात्कार झाले असते पण त्यामुळे बायका अपवित्र मानल्या गेल्या नसत्या.)

पुढे वाचा

अंतर्ज्ञान : एक अहवाल

काही व्यक्तींना दिव्यदृष्टी प्राप्त झालेली असते, तिच्या योगाने त्यांना अतींद्रिय मार्गाने ज्ञान मिळू शकते अशी अनेक लोकांची पक्की धारणा असते. या समजुतीत कितीतथ्य आहे याबद्दल एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. (त्याचा गोषवारा ११ डिसेंबर १९९५ च्या टाइम या नियतकालिकात आला आहे). या विषयामध्ये संशोधन करून त्याविषयी शहानिशा करण्यासाठी अमेरिकेमध्ये एक प्रकल्प राबविला. अमेरिकेजवळ द्रव्याची विपुलता आहे तेव्हा या संशोधनासाठी द्रव्याचा अपुरेपणा त्यांना जाणवत नाही. अतींद्रिय सामर्थ्याद्वारे दूरच्या घटनांविषयी ज्ञान होऊ शकते याचा छडा लावण्यासाठी १९७२ ते १९७७ या काळामध्ये ७.५ लक्ष डॉलर्स खर्च झाले.

पुढे वाचा

ज्ञानप्रसारक डॉ. केतकर

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांना आपण ज्ञानकोशकार म्हणतो. ते स्वतःही हे बिरुद मोठ्या आवडीने मिरवीत. पण केतकरांनी केवळ ज्ञानसंग्रह केला नाही. ज्ञानाचा विस्तार केला. प्रसार केला. तरी त्यांना ज्ञानकोशकार ही पदवी भूषणास्पद आहेच. कारण त्यांच्या आधी मराठीत कोणीही हा गड सर करू शकले नव्हते. हे काम त्यांनी ज्या अवधीत पूर्ण केले तो एकै विक्रम आहे. राजाश्रय नसताना कल्पकतेने लोकाश्रय मिळवून त्यांनी हा वाङ्मयव्यवहार तडीस नेला. अशी तडफ त्यांच्याआधी कोणी दाखविली नव्हती आणि नंतरही दाखविली नाही. बारा वर्षांत ज्ञानकोश हातावेगळा केला. तो आता शेवटास जाणार हे दिसू । लागताच कादंबरीलेखनास त्यांनी हात घातला.

पुढे वाचा

आगरकर-वाङ्मयातील एक कूटस्थळ

आगरकरांचे लेखन म्हणजे प्रसादगुणाचा नमुना. त्यात ओजही अर्थात् भरपूर आहे, परंतु त्याचे त्यांच्या प्रसादगुणावर आक्रमण होत नाही. त्यांना काय म्हणायचे आहे याविषयी वाचकांची बुद्धि द्विधा होईल असे स्थळ शोधूनही सापडायचे नाही, इतके त्यांचे लेखन पारदर्शक आणि सुबोध आहे. त्यांची विवेचनपद्धतीही अशीच सुसंगत आणि तर्कशुद्ध. ज्याचे पूर्वग्रह फार पक्के नाहीत अशा कोणालाही सामान्यपणे पटेल अशीच ती असते. पण त्यांच्या वाङ्मयात एक स्थळ असे आहे की ते वरील दोन्ही नियमांना अपवाद आहे. हे स्थळ म्हणजे ‘देवतोत्पत्तीविषयी शेवटचे चार शब्द या लेखाचा शेवट. (आगरकर वाङ्मय, संपादक नातू देशपांडे, खंड २, पृष्ठे २०६—७).

पुढे वाचा

सर्व हितांची रक्षक लोकशाही

जिची मासिस्ट मंडळी केवळ औपचारिक स्वातंत्र्य म्हणून हेटाळणी करतात ती – म्हणजे लोकशाही – वस्तुतः सर्व हितांचा आधार आहे. हे केवळ औपचारिक स्वातंत्र्य म्हणजे जनतेचा आपल्या शासनकर्त्यांची परीक्षा करून त्यांना अधिकारावरून दूर करण्याचा हक्क. राजकीय शक्तींच्या दुरुपयोगापासून आपले रक्षण करण्याचा तो एकमेव ज्ञात उपाय आहे. ते शासितांकडून शास्त्यांचे नियंत्रण आहे.आणि राजकीय शक्ती आर्थिक शक्तींचे नियंत्रण करू शकत असल्यामुळे, राजकीय लोकशाही ही आर्थिक शक्तींवर नियंत्रण ठेवण्याचाही एकमेव उपाय आहे. लोकशाही नियंत्रण जर नसेल तर शासनसंस्थेने आपली राजकीय आणि आर्थिक शक्ती नागरिकांच्या स्वातंत्र्याच्या रक्षणाहून अतिशय भिन्न अशा हेतूंकरिता का वापरू नये याचे कसलेही कारण राहणार नाही.’

पुढे वाचा