मासिक संग्रह: ऑक्टोबर , २०१३

आधुनिक अंधश्रद्धा

प्रत्येक समाज वा संस्कृती कित्येक पिढ्यांपासून आलेल्या रूढी परंपरांचे शक्य तितके पालन करण्याच्या प्रयत्नात असतो. अशा रूढी परंपरामध्ये श्रद्धा – अंधश्रद्धांचा वाटा फार मोठ्या प्रमाणात असतो. काही वेळा त्यांच्यातील फोलपणा स्पष्टपणे दिसत असूनसुद्धा, ‘त्यामुळे काही नुकसान तर होत नाही ना’ असे म्हणत त्या पाळल्या जातात. मांजर आडवे गेल्यास एक क्षण थांबून पुढे गेल्यामुळे अपशकुनाचा परिणाम होणार नाही याची खात्री असते. मानसिकता तशीच ठेवून सामान्यपणे त्या त्या काळातील जीवनशैलीप्रमाणे शकुन-अपशकुनांचे आयकॉन्स बदलतात. बैलगाड्यांची पूजा करणारे आता मोटार गाड्यांची पूजा करतात. परंतु पूजा करण्याची मानसिकता नष्ट झाली नाही.

पुढे वाचा

अध्यादेश निघाला-आता अंमलबजावणी

करणी, भानामती, जरण-मरण, मंत्र-जंत्र, सैतान, भुताळी, चेटुक, गंडा-दोरा असे शब्द वापरत नवीन वटहुकुम महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अध्यादेश, २०१३ या नावाने २६ ऑगस्ट रोजी निघाला. भोंदूबाबा प्रकरण : पोलिसांचा पुढाकार, अंनिसकडून स्वागत. जादूटोणाविरोधी अध्यादेशाचा पहिला गुन्हा दाखल. (लोकमत ५ सप्टेंबर २०१३) या भोंदूबाबाने जाहिरात देऊन एड्स, मधुह, कॅन्सर सारखे दुर्धर आजार बरे करण्याचा दावा केला होता. ही नांदेडमधील घटना पोलिसांच्या पुढाकारातून पुढे आली हे विशेष दिलासा देणारे आहे.

पुढे वाचा

गाळलेल्या कलमांविषयी

महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचेसमूळ उच्चाटन करण्याबाबत अध्यादेश, २०१३ अशा लांबलचक नावाने हा अध्यादेश काढून तो लागू करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर या विद्वान, सुसंस्कृत आणि मृदु स्वभावी सामाजिक कार्यकर्त्यास शेवटी आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले आणि नंतरच शासनाला हा अध्यादेश लागू करण्याची सुबुद्धी झाली.
वास्तविक अंधश्रद्धा निर्मूलन अधिनियम, जादूटोणा विरोधी अधिनियम किंवा दुष्ट प्रथा, जादूटोणा आणि अघोरी विद्या प्रतिबंधक अधिनियम अशा विविध नावाने यापूर्वी वर्णन केल्या गेलेल्या आणि शेवटी वर सांगितल्याप्रमाणे लांबलचक नावाने निघालेल्या या कायद्याची गर्भधारणा १९९० साली झाली.

पुढे वाचा

संपादकीय विवेकवाद व्यापक करू या!

संपादकीय विवेकवाद व्यापक करू या!
रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला एक महिना उलटून गेला. अद्याप त्यांच्या खुन्याबद्दल कोणताही महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हातात लागलेला नाही. ‘पोलिस तपास जोरात सुरू आहे’ ह्यापलीकडे शासन काहीही बोलायला तयार नाही. आतापर्यन्तच्या पोलिस तपासाचा निष्कर्ष – दाभोलकरांचा खून सुपारी देऊन करण्यात आला-एव्हढाच आहे. हे सांगायला पोलिस कशाला हवेत ? दाभोलकरांचे विरोधक स्वतः हातात पिस्तुल घेऊन त्यांचा भर रस्त्यात खून करणार नाहीत, तर कोणा गुंडाकरवी तसे घडवून आणतील हे येथील सर्वसामान्य माणसालाही कळते. एकूण दाभोलकरांचा खुनी सापडणार नाही ; सापडलाच तर त्यामागील मेंदू (व अर्थातच उद्देश) कधीच समोर येणार नाही अशा निष्कर्षाला येणे चुकीचे ठरणार नाही.

पुढे वाचा