नागरीकरणामुळे जैविक वैविध्यावर होणारे आघात आणि ते रोखण्यासाठी आवश्यक असणारे संवर्धन धोरण
५. जैवविविधता जपणाऱ्या ‘नव्या’ नगरांचे नियोजन:
५.१. वस्ती, खेडे, गाव, नगर, महानगर, मोठे नागरी प्रदेश अशी मानवी वस्त्यांची एक श्रेणी असते. कधीकधी एखाद्या ठिकाणी अचानकपणे नवे नगर वसविण्याचे ठरते. त्यामागे काही सामाजिक-राजकीय कारणे असतात. वेगाने नगरनिर्माण करण्याच्या धडपडीमध्ये नियोजन करायला पुरेसा वेळही दिला जात नाही. साध्या नागरी सेवांचा विचार पुरेशा प्रमाणात होत नाही तेथे पर्यावरणाचा विचार तर दूरच राहतो. असे असले तरी स्थानिक जैवविविधता नष्ट होणे हे अपरिहार्यच असते असे मात्र नाही.