मासिक संग्रह: जानेवारी, २००४

लेखक परिचय

1. माधव गाडगीळ: तीस वर्ष इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर, येथे संशोधन व अध्यापन. यापैकी तीन वर्ष सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेसचे प्रमुख. ‘पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर’ व इतर अनेक सरकारी, गैरसरकारी प्रकल्पांद्वारे सतत संशोधन. हार्वर्ड, स्टॅन्फर्ड व बर्कली येथे व्हिजिटिंग प्रोफेसर, पद्मश्री व अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार व सन्मान.
[190 शोधनिबंध, (रामचंद्र गुहांसोबत) ‘धिस फिशर्ड लँड’ व ‘इकॉलजी अँड इक्विटी, राव यांसोबत’ ‘नर्चरिंग बायोडायव्हर्सिटी,’ व ‘डायव्हर्सिटी : द कॉर्नरस्टोन ऑफ लाईफ’ आणि ‘इकॉलॉजिकल जर्नल’ ”]
2. हेमचंद्र प्रधान : प्राध्यापक व डीन, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, T.I.F.R.

पुढे वाचा

विज्ञानाचे सामाजिक व्यवहारातील स्थान आणि वैज्ञानिकांचे सामाजिक उत्तरदायित्व

विज्ञानाचे समाजव्यवहारातील स्थान काळानुसार बदलत गेलेले आहे, आणि त्याला अनुरूप असा बदल वैज्ञानिकांच्या सामाजिक स्थानात व वर्तणुकीतही झाला आहे.
आधुनिक विज्ञानाने सतराव्या-अठराव्या शतकात युरोपात मूळ धरले आणि युरोपीय व्यापारी, मिशनरी व वसाहतवादी यांच्या बरोबर हे विज्ञानही जगभर फैलावले. आज आपण विसावे शतक हे विज्ञानाचे शतक होते असे छातीठोकपणे सांगू शकतो. परंतु एकोणिसाव्या शतकापर्यंत विज्ञानाचे समाजव्यवहारातील स्थान तसे काठावरचे आणि तात्त्विक व सांस्कृतिक-शैक्षणिक पातळीपुरते मर्यादितच आढळून येते. साहित्यिक, कवी, संगीतकार, चित्रकार, शिल्पकार यांच्याच पंक्तीत वैज्ञानिकांचेही स्थान होते असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

पुढे वाचा

विसावे शतक: विज्ञानाचा दुतोंडीपणा

विज्ञान हा कधीच मूल्य-विरहित उद्योग नव्हता. आणि विज्ञानाच्या दुतोंडीपणाची व दुधारीपणाची वस्तुस्थिती अत्यंत नियमितपणे विसाव्या शतकात प्रकट झालेली आहे. ‘रसायनशास्त्राद्वारे अधिक सुखकर जीवन’ ही घोषणा रंगविली जाण्यापूर्वीच पहिल्या महायुद्धाच्या आघाडीवर क्लोरीन वायूच्या ढगांनी मृत्यूचे थैमान घातले होते. त्यानंतर दुसरे महायुद्ध व शीतयुद्ध यांनी अणुविभाजन व अणुसम्मीलन यात दडलेल्या भयावह शक्तीचे दर्शन घडविले आणि एका नवीन प्रकारच्या प्रलयंकारी भीतीला जन्म दिला. त्यानंतर रेचल कार्सन आल्या. मानवनिर्मित रसायने विस्तृत प्रमाणावर परिसरात विखुरली गेल्याने जागतिक पातळीवरील पर्यावरणाला निर्माण झालेल्या धोक्याकडे त्यांनी जगाचे लक्ष वेधले.

पुढे वाचा

स्त्रीवैज्ञानिक आणि त्यांच्या संशोधनाचे सामाजिक आयाम

स्त्रीवैज्ञानिकांचा विचार करताना मी पाच आधुनिक स्त्री वैज्ञानिकांचा परिचय येथे करून देणार आहे. या पाच जणींनी तत्कालीन स्वीकृत सिद्धान्तांना छेद देणारे संशोधन केले. त्याचबरोबर त्यांच्या संशोधनातून प्रचलित, स्वीकृत सामाजिक व्यवहारांमध्ये आणि व्यवस्थांमध्ये ज्या मोठ्या उणिवा त्यांना आढळल्या त्यांच्यावर त्यांनी कठोर टीका केली. परिणामी या वैज्ञानिक संशोधनाचे सामाजिक मोल समाजाला मान्य करावे लागले. प्रचलित व्यवस्थांमध्ये सकारात्मक बदल करावयाला त्यांच्या मौलिक संशोधनाचा हातभार लागला. या पाच जणींच्या संशोधनाला असलेली सामाजिक जाणिवेची झालर त्यांच्या वैज्ञानिक मोठेपणाला शोभा देणारी आहे.
स्त्री-वैज्ञानिक आणि त्यांच्या संशोधनाचे विषय
ज्या पाच स्त्रियांचा विचार येथे केला आहे त्यांच्या संशोधनाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

पुढे वाचा

आजचे विज्ञान आणि अध्यात्म

रस्तोरस्ती कानाला मोबाईल फोन लावून चालणारी सुशिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत माणसे पाहिली म्हणजे जाणवते, विज्ञानाची किती झपाट्याने घोडदौड चालू आहे! परवा आमचा एक तरुण भाचा लग्न ठरल्याचे सांगत आला, आणि खिशातला फोन काढून, ‘बोला ना तिच्याशी’ असे म्हणत, बटने वगैरे न दाबता, नुसते ‘नीलिमा’ अशी हाक मारून आपल्या भावी बायकोला आमची ओळख करून देऊ लागला, तेव्हा अवाक् झालो! ‘माझ्या हाकेला हा फोन ओ देतो, दुसऱ्या कुणी अशीच हाक मारली तर देणार नाही’ अशी आणखी माहिती त्याने पुरविल्यावर आम्ही पुन्हा अवाक् झालो. पण हे अत्युच्चशिक्षित प्रेमविद्ध वधूवर लग्न ठरवताना दूरच्या एका सिद्ध पुरुषाकडे मोठ्या श्रद्धेने जाऊन त्याचा आशीर्वादच नव्हे, तर संमती घेऊन आल्याचे लगेच समजले, तेव्हा मात्र तिसऱ्यांदा अवाक् होण्याची आमची पाळी होती.

पुढे वाचा

मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव

‘ज्याने विश्वाचा मनुष्यास सुखद होणारा हा चांगला भाग निर्मिला तो देव; मनुष्यास दुःख देणारा तो दुसरा वाईट भाग निर्मिला तो राक्षस. मनुष्याच्याच लांबीरुंदीचा गज घेऊन विश्वाची उपयुक्तता, बरेवाईटपणा मोजला असता ह्या मोजणीचा हा निकाल फारसा चुकत आहे असे काही म्हणता येणार नाही. विश्वाची उपयुक्तता आपल्या मापानेच मनुष्याने अशी मापावी हेही अपरिहार्यच होते.’ (पृ.1)
विश्वाचा देव
‘जर ह्या विश्वातील यच्चयावत् वस्तुजाताच्या मुळाशी त्यांना धारण करणारी, चालन करणारी, किंवा जिच्या क्रमविकासाचे ते परिणाम होत आले आहेत अशी जी शक्ती आहे तिला देव म्हणावयाचे असेल तर त्या देवाने हे सारे विश्व मनुष्यास त्याचा मध्यबिंदू कल्पून केवळ मनुष्याच्या सुखसोयीसाठीच निर्मिले ही भावना अगदी भाबडी, खुळी आणि खोटी आहे असे मानल्यावाचून वरील विसंगतीचा उलगडा होऊच शकत नाही (पृ.7)
ती विश्वाची आद्यशक्ती ज्या काही ठराविक नियमांनी वर्तते आहे ते तिचे नियम समजतील ते समजून घेऊन, त्यातल्या त्यात आपल्या मनुष्यजातीच्या हिताला नि सुखाला पोषक होईल तसा त्याचा साधेल तितका उपयोग करून घेणे इतकेच मनुष्याच्या हातात आहे.

पुढे वाचा

संख्याशास्त्र —- भरवसा बेभरवशाचा

या लेखात आधुनिक विद्याशाखांपैकी एका नव्या आणि तुलनेने बाल्यावस्थेतील विषयाची तोंडओळख करून द्यायची आहे. प्रथम या विद्याशाखेचे स्वरूप थोडक्यात सांगून मग त्याच्या उपयोगाची काही उदाहरणे दिली आहेत.
आधुनिक संख्याशास्त्र हे पा चात्त्य जगात सुमारे शंभर वर्षांपूर्वी उदयाला आले कोणत्याही विज्ञानशाखेचा अभ्यासविषय म्हणजे सभोवतालचे जग त्यातील घडा-मोडीचे निरीक्षण करून त्यांच्यासंबंधी सूत्ररूपात नियम, सिद्धान्त वगैरे सांगणे, हेच विज्ञानाचे ध्येय-निरीक्षण व नोंद हा पहिला टप्पा अशा आकडेवारीला सुद्धा ‘statistics’ म्हटले जाते पण माहितीची जंत्री म्हणजे विज्ञान नव्हे. तिच्यातील समाईक सूत्र हाच विज्ञानाचा गाभा.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, ह्या विषयांमध्ये नियमांची निश्चिती असते.

पुढे वाचा

गणिताचे समाजातील स्थान आणि कार्य

कार्ल फ्रेडरिक गाऊसने ‘गणित ही विज्ञानशाखांची सम्राज्ञी आहे’ असे म्हटले होते.
यथा शिखा मयूराणां नागानां मणयो यथा
तथा वेदाङ्गशास्त्राणां गणितं मूर्धनि स्थितम् या प्राचीन संस्कृत श्लोकातही हीच भावना व्यक्त होते. गाऊस जगातील आतापर्यंतच्या सर्वश्रेष्ठ गणितज्ञांतील एक आणि वरील श्लोकाचा रचनाकारही बहुधा गणितीच असणार. त्यामुळे त्यांची गणितासंबंधीची ही धारणा इतरांपेक्षा भिन्न असू शकेल. गणिती आपल्या अभ्यास क्षेत्राबद्दल असा दावा का करतात याची थोडी बहुत कल्पना वाचकाला माझ्या या लेखामुळे यावी अशी मला आशा आहे.
‘गणित म्हणजे काय?’ या प्रश्नाचे उत्तर अर्थातच खूप कठिण आहे.

पुढे वाचा

आत्मा हवा का?

वासांसि जीर्णानि यथा विहाय…..
हे खूप लहानपणी कानावर आले. माणसाला आत्मा असतो. तो अमर असतो. शरीर मेले तरी तो मरत नाही. पहिली वस्त्रे काढून नवी घालावीत तसे आत्मा नवीन शरीर धारण करतो. या जन्मी केलेल्या कर्मांप्रमाणे पुढचा जन्म कुणाचा येणार ते ठरते. असे ऐकले अगदी पहिल्यापासून.
या सगळ्या कल्पना, खऱ्या असोत वा नसोत, त्यांचे मूळ काय असेल? माणसाला आत्मा असतो असे प्रथम कुणाला तरी का वाटले असेल? मूळ शोधणे तसे जवळपास अशक्यच आहे. पण या ना त्या स्वरूपात माणसाला आत्मा असतो असे जगातले सर्व समाज मानत आले आहेत.

पुढे वाचा

भौतिकशास्त्रातील अनिश्चितता तत्त्व

विषय परिचय:
पुंज सिद्धान्त (quantum theory) हा आधुनिक भौतिकशास्त्राचा पाया आहे. अनिश्चितता तत्त्व हे या सिद्धान्ताचे सारतत्त्व. ह्या तत्त्वामुळे भौतिकशास्त्राच्या विचारसरणीत कायमचे परिवर्तन घडून आले. त्याचा प्रभाव भौतिकशास्त्राच्या पलीकडे तत्त्वज्ञानात, समाजशास्त्रात आणि अन्य क्षेत्रांतही दिसून येतो. या तत्त्वाचा आणि त्याच्या प्रभावाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न. भाग 1
‘अनिश्चितता’ आणि ‘भौतिकशास्त्र’ कधी एकमेकांच्या जवळ येतील यावर अगदी सव्वाशे वर्षांपूर्वी कोणीही विश्वास ठेवला नसता. एकूणच निसर्गविषयक शास्त्रांमध्ये नियमबद्धता असते ही त्याकाळची सार्वत्रिक समजूत आजही बऱ्याच अंशी टिकून आहे. सतराव्या शतकामध्ये न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त मांडला गेला.

पुढे वाचा