ग्रामीण विकासासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक आहे, अशी कलबाग सरांची श्रद्धा होती. आपल्या कामाचा वेग, उत्पादकता व कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञान आपल्याला मदत करू शकते. म्हणून विज्ञान आश्रमात तंत्रज्ञानावर भर आहे.
कुठले तंत्रज्ञान कुठल्या भागात आणि कशासाठी सोयीचे आहे, हे पडताळून बघावे लागते. ते तंत्रज्ञान कोणत्या परिस्थितीत स्वीकारले जाईल ते तपासून बघावे लागते. हे तपासून बघण्याचे काम शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पामार्फत करता यावे असा आमचा प्रयत्न असतो. प्रदर्शनामध्ये त्यांना जे प्रकल्प करायचे असतात, त्यासाठी हेच प्रयोग देता येतात. गावातले विकासाचे जे प्रश्न आहेत, त्यांना उत्तरे शोधण्यासाठी काही तंत्रे वापरून बघितली जातात.