विवेकवादाच्या चळवळीत शासन आणि न्यायव्यवस्था ह्यांचा काय सहभाग असतो, समाजसुधारक आणि सामाजिक संस्था ह्यांना काय तडजोडी करायला लागतात आणि विरोधकांची त्यामध्ये काय भूमिका असते असा सर्व अंगाने अंनिसच्या कायदाविषयक चळवळीचा अभ्यास केला तर ते उद्बोधक ठरेल.
अंनिस १९९० पासून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा म्हणून प्रयत्नशील आहे. ह्यात शासनाची चालढकल अशी राहिली. एका राजवटीत १९९५ मध्ये कायद्याचे अशासकीय विधेयक विधानपरिषदेत प्रचंड बहुमताने मंजूर झाले परंतु कायद्याची प्रक्रिया पूर्ण केली गेली नाही. नंतर दुसरी राजवट आली. त्यांनी १५ ऑगस्ट २००३ ला ‘जादूटोणाविरोधी कायदा करणारे भारतातील पहिले राज्य’ अशी जाहिरात करून स्वतःचीच पाठ थोपटून घेतली.