‘औद्योगिक क्रांती’ ही प्रक्रिया युरोपात सुरू झाली. अनेक वर्षे मुरत असलेले, पिकत असलेले घटक एकत्र होऊ लागले, आणि पारंपरिक शेती-बलुतेदारी जीवनशैलीने जगणाऱ्यांचे समाजातील प्रमाण कमी होऊ लागले. मुख्य फरक होता ऊर्जेच्या स्रोतांत. तोवर शेती व तिच्याशी संबंधित उद्योगांमध्ये मुख्यतः माणसे आणि जनावरे यांच्या स्नायूंची ऊर्जा वापरली जात असे. नव्या जीवनशैलीत इंधनाची ऊर्जा वापरून यंत्रे काम करू लागली. तोवर हस्तकौशल्य महत्वाचे असे, तर आता त्याची जागा यंत्रासोबत करायच्या श्रमांनी घेतली. अनेक हस्तकुशल कारागीर बेकार झाले, आणि इतर अनेक कौशल्ये आवश्यक असणारे पेशे घडले.
स्त्री भ्रूणहत्याः कोल्हापुरातले वास्तव (भाग १)
[अमृता वाळिंबे यांनी मालतीबाई बेडेकर अभ्यासवृत्ती २००५-२००६ वापरून केलेले संशोधन आम्हाला प्राप्त झाले. त्याचा जुजबी संक्षेप करून आम्ही काही भागांमध्ये ते संशोधन प्रकाशित करीत आहोत. या प्रकारचे संशोधन महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांकरिता व्हायला हवे.]
कोल्हापूर. अनेक अर्थांनी समृद्ध म्हणवला जाणारा महाराष्ट्रातला एक जिल्हा. सहकारी चळवळींचा भक्कम पाया, त्यातून आलेली आर्थिक सुबत्ता, लघुउद्योगाचे पसरलेले जाळे, शिक्षणासारख्या सामाजिक सोयी-सुविधा, आणि या साऱ्याच्या मुळाशी असलेला शाहू महाराजांपासून चालत आलेला सत्यशोधकी-पुरोगामी विचारांचा वारसा; अशी भरभक्कम पार्श्वभूमी या कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेली आहे. पण इथल्या समृद्धीपल्याडचे भीषण वास्तवही आता समोर येऊ लागले आहे; ते स्त्रीभ्रूणहत्येच्या रूपाने.
अराजक म्हणजे काय?
ऐतिहासिक दृष्टीने पाहता अराजकवाद (Anarchism) ही सध्याच्या समाजव्यवस्थेवर टीका करणारी, तिला ‘हवासा’ पर्याय सुचवणारी आणि इथपासून तिथपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवणारी विचारप्रणाली आहे. अविचारी बंडे अराजकवादी नसतात. आजच्या ऐहिक शासनाला तात्त्विक किंवा धार्मिक भूमिकेतून नाकारणेही अराजकवादी नाही. गूढवादी व स्टोइक (mystics & stoics) यांना अराजक नको असते तर इतर कोणते तरी राज्य हवे असते. अराजकवाद मात्र इतिहासात नेहेमीच केवळ माणूस आणि समाज या संबंधांवर रोखलेला आहे. त्याचा हेतू नेहेमीच सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा असतो. तो नेहेमीच सध्याच्या सामाजिक रचनेला दुष्ट मानतो. हे मानणे माणसांच्या स्वभावाच्या व्यक्तिवादी आकलनातूनही येत असेल, पण अराजकवादाच्या पद्धती मात्र नेहेमीच सामाजिक बंडखोरी करण्याच्या असतात, मग त्या हिंसेचा आधार घेवोत वा न घेवोत.
पत्रसंवाद
आसु च्या नोव्हें.०६ च्या पत्रसंवादातील प्रदीप पाटील यांचे पत्रातील शेवटच्या परिच्छेदांत माझ्या नावाचा उल्लेख व उल्लेखाचे कारण वाचून मी आश्चर्यचकित झालो. प्रदीप पाटील लिहितात की “डॉ.देशकर यांना धर्म म्हणजे नीती या अर्थाने त्यांचे विवेचन अभिप्रेत असेल तर मी (प्रदीप पाटील) आस मध्ये पूर्वीच लिहिले आहे. आणि धर्माविषयी आस ने दि.य.देशपांडेंचे अनेक लेख छापले आहेत तीच माझी भूमिका आहे.” माझी प्रदीप पाटलांच्या मेंदूतील देव’ ह्या मूळ (जुलै ०६) लेखावर प्रतिक्रिया ऑक्टो.०६ च्या पत्रसंवादात प्रसिद्ध झाली होती. त्यात कुठेही मी नीती हा शब्द वापरला नव्हता.
संपादकीय ‘आजचा सुधारक
मनुष्याची एक पूर्णावस्था असते आणि ती घडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कृती म्हणजेच सुधारणा, ही आगरकरांच्या कामांमागील मुख्य संकल्पना. ही मुक्ती, मोक्ष, अशी पूर्णावस्था नसून पूर्णपणे ऐहिक आणि सामाजिक संदर्भापुरतीच आहे. या पूर्णावस्थेकडे जाणाऱ्या वाटेवर कोणत्या देशातले लोक कुठपर्यंत पोचले आहेत, ते आगरकर तपासतात. आज आपण जगाकडे मुख्यतः इंग्रजी भाषेच्या चष्म्यातून पाहतो. आगरकरांच्याही काळी हीच स्थिती होती, आणि त्यातही मुख्यतः इंग्लंड देशाकडेच जास्त लक्ष दिले जाई. आगरकर त्यांना जास्त प्रगत वाटलेल्या देशांच्या वाटचालीबाबत एक छोटीशी यादी देतात “अनेक देशांतील उद्योगी पुरुषांनी अहर्निश परिश्रम करून पदार्थधर्माचे केवढे ज्ञान संपादिले आहे, विपद्विनाशक व सुखकारक किती साधने शोधून काढिली आहेत, व राज्य, धर्म नीति वगैरे विषयांतील विचार किती प्रगल्भ झाले आहेत.
पत्रसंवाद
अंक १७.७ मधील मॅक्स प्लँकचा (भाषांतरित) आपल्या अस्तित्वाचे गूढ रहस्य शीर्षक असणारा लेख प्रकाशित झाला आहे. असला लेख आजचा सुधारक सारख्या विवेकवादाला समर्पित मासिकात का छापला जावा हे मला पडलेले गूढ आहे. कदाचित संपादकांची ही मनीषा असेल की बुद्धिवाद्यांना विरोधी पक्ष माहीत असावा. आरंभीच मला एक गोष्ट म्हणायची आहे ती ही की कोणी एक व्यक्ती एखाद्या क्षेत्रात अधिकारी जरी असेल तरी जीवनाच्या अन्य क्षेत्रात तिचे म्हणणे तितकेच अधिकारी असते असे नसते. उदा. लता मंगेशकर आर्थिक किंवा कृषिक्षेत्रात अधिकारी नाहीत. त्याचप्रमाणे मॅक्स प्लँक हे भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात अधिकारी वैज्ञानक आहेत म्हणून आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांच्या मतांना तितकेच महत्त्व दिले जावे असे मला वाटत नाही.
गावगाडा २००६ (भाग ३)
दुष्काळी भाग, निरीक्षणे व चिंतन
खेड्यात राहणारी, विशेषतः दुष्काळी भागातील माणसे सभोवतालच्या परिस्थितीमुळे रुक्ष झालेली असतात असे आपल्याला अनेक गोष्टींतून प्रत्ययास येते. म्हणजे जेवण करणे, हा एक आवश्यक नैसर्गिक उपचार असतो. बाकी काही नाही. ज्यांना त्या क्रियेला ‘उदरभरण’ म्हणणेसुद्धा रुचत नाही त्यांना हे ऐकून आश्चर्य वाटेल. बऱ्याच वेळा खेडूत बंधू ‘तुकडा खाणे’ किंवा ‘तुकडा मोडणे’ म्हणतात; म्हणजे “चला पाव्हणं तुकडा खायला”, किंवा “झाला का तुकडा खाऊन ?” वगैरे.
दुष्काळी परिस्थिती व नदीकाठच्या काळ्या रानाची परिस्थिती खूप वेगळी असते. काळ्या जमिनीतील शेतकऱ्याला शेतीची खूप कमी काळजी असते असे म्हणतात.
प्रा. दि. य. देशपाण्डे यांचे मराठीतील तत्त्वचिंतन
[प्रस्तुत निबंध महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या दापोली अधिवेशनात (ऑक्टो.२००६) वाचण्यात आला आहे.]
प्रा. दि. य. देशपांडे तत्त्वज्ञानाचे अध्यापक होते आणि आजन्म तत्त्वज्ञानाचेच निष्ठावंत अभ्यासक होते. त्यांची व्यक्तिगत अल्पशी ओळख अशीः
सुमारे साठ वर्षांपूर्वी, १९४० साली नागपूर विद्यापीठातून ते एम्.ए. झाले. पुढील दोन वर्षे १९४१ ते ४३ अमळनेर येथील Indian Institute of Philosophy येथे त्यांनी रिसर्च फेलो म्हणून काम केले. नंतर १९४४ पासून १९७५ पर्यंत एकतीस वर्षे तर्कशास्त्र व तत्त्वज्ञानाचे अध्यापन केले. यांतले पहिले वर्ष सांगलीला विलिंग्डन महाविद्यालयात. नंतर मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील सरकारी महाविद्यालयांत जबलपूर, नागपूर, अमरावती इ.
अध्यात्मवादी टिळक व भौतिकवादी आगरकर
[एक ऑगस्ट ही लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. १८५६ मध्ये जन्मलेल्या दोन माणसांच्या विचारांचा ठसा महाराष्ट्राच्या पुढच्या सबंध सामाजिक इतिहासावर उमटलेला आहे. ज्या दोन भिन्न दिशांना समाजाला घेऊन जाण्याचा प्रयत्न या समाजातल्या शक्ती करत आल्या आहेत व आजही करत आहेत, त्या दिशा या दोघांच्या विचारांत सूचित झालेल्या होत्या. आणि या दोन दिशांमागे होती दोन जीवनविषयक तत्त्वज्ञाने : अध्यात्मवाद आणि भौतिकवाद. आजसुद्धा सामाजिक विचार, सौंदर्यशास्त्र इ. सर्व आघाड्यांवर भौतिकवादाला अध्यात्मवादाविरुद्धची लढाई नेटाने लढवावी लागत आहे, लागणार आहे. त्या दृष्टीने हा लेख मननीय ठरावा. नवभारत च्या ऑगस्ट १९५६ च्या अंकावरून काहीसा संक्षिप्त करून तो तात्पर्य च्या १९८२ च्या अंकात प्रसिद्ध केला होता.
सुधारक काढण्याचा हेतु
पर्वत, नद्या, सरोवरें, झाडे, पाणी, राने, समुद्रकिनारे, हवा, खाणी, फुले व जनावरें ज्यांत स्पष्टपणे दाखविली आहेत असा एक, व ज्यांत पारधी व पारधीची हत्यारे, शेतकरी व शेतकीची अवजारे, बाजार व त्यांतील कोट्यवधि कृत्रिम जिन्नस, न्यायसभा व त्यांत येणारे शेंकडों लोक, राजसभा व त्यांत बसणारे-उठणारे सचिव, मंत्री वगैरे प्रमुख पुरुष, भव्य मंदिरे व उत्तम देवालये, बागा व शेतें, झोपड्या व गोठे, अनेक पदवीचे व अनेक धंदे करणारे पुरुष व स्त्रिया आणि त्यांची अर्भकें, ही ज्यांत व्यवस्थित रीतीनें काढिली आहेत असा एक, मिळून प्रत्येक खंडांतील ठळक देशाचे दोन दोन चित्रपट तयार करवून ते पुढे ठेवले, आणि त्यांकडे निःपक्षपातबुद्धीने काही वेळ पहात बसले, तर विचारी पुरुषांच्या मनावर काय परिणाम होतील बरें ?