तत्त्वज्ञान का शिकले पाहिजे?
तत्त्वज्ञान का शिकले पाहिजे? या प्रश्नाला सामान्यपणे पुढील उत्तर दिले जाईल. ‘तत्त्वज्ञान शिकण्याची काहीच आवश्यकता नाही. तत्त्वज्ञान म्हणजे घटपटाची निरर्थक झटापट करणारा उद्योग. रिकामटेकड्या लोकांनी वेळ घालविण्याकरिता निर्माण केलेला एक खेळ. त्याचा जीवनात कसलाही उपयोग नाही. जीवनाच्या कोणत्याही समस्येशी त्याचा कोणताही संबंध नाही. ज्याला हिंदीत ‘बाल की खाल निकालना’, म्हणजे केसाची साल काढणे, म्हणतात, ते करणारा व्यवसाय. केस ही मुळात किती बारीक वस्तु, तिची साल काढल्यावर शिल्लक काय उरणार? म्हणजे जिथे कसलाही भेद नाही तिथे भेद उकरून काढणारा हा विषय आहे.’