मासिक संग्रह: फेब्रुवारी, १९९३

संपादकीय

डॉ. रूपा कुळकर्णी ह्यांच्या धर्मान्तरामुळे श्रीमती दुर्गा भागवत ह्यांनी आमचे वर्गणीदार न राहण्याचे ठरविले आणि त्यांनी तसे आम्हाला कळविले. त्या निमित्ताने लिहिलेल्या आमच्या संपादकीयामध्ये (नोव्हें.-डिसें.९२) आमची जी इहवादविषयक भूमिका व्यक्त झाली आहे तिच्याबद्दल अधिक खुलासा मागणारी वा मतभेद व्यक्त करणारी जी पत्रे आली त्यांपैकी डॉ. आ.ह. साळुखे व श्रीमती सुनीता देशपांडे ह्यांची वेगळी नोंद घेऊ. त्या पत्रांतील काही मुद्दे अन्तर्मुख करणारे आहेत.
डॉ. आ. ह. साळुखे ह्यांच्या पत्रातील मुद्द्यांबद्दल पहिल्याने लिहितो. ते म्हणतात “डॉ. कुळकर्णी ह्यांना राजीनामा देण्यास सुचविणे अनुचित होते, ह्याची जाणीव आपणास झाली आहे ही गोष्ट समाधानाची असली, तरी आधी तसे सुचविल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणे, हे आपले कर्तव्य ठरते.”

पुढे वाचा

चर्चा – पण पूर्वग्रह पुराव्यांपेक्षा प्रबळ होऊ नयेत

प्रा. शेषराव मोरे यांनी वाचकांचा त्यांच्याविषयी गैरसमज होऊ नये म्हणून केलेला खुलासा माझे आक्षेपच अधिक बळकट करणारा आहे. माझ्या परीक्षणाचा एकूण रोख जाणीवपूर्वक लक्षात न घेता त्यांनी आत्मसमर्थनार्थ बरीच मखलाशी केली आहे. जाणीवपूर्वक हा शब्द मी मूळ परीक्षणातही मुद्दाम दुहेरी अवतरणचिन्हांत टाकला होता। (आजचा सुधारक – १९९२ पृ. २७६). फडके-पळशीकरादी टीकाकार फक्त सावरकरांची बदनामी करण्यासाठीच किंवा त्यांच्यावर खोटीनाटी टीका करण्यासाठीच लिहितात अशा आशयाची डझनोगणती वाक्ये प्रा. मोरे यांच्या ग्रंथात आहेत. माझा प्रश्न एवढाच की या संशोधकांचे हे हेतू’ एवढ्या ठाम शब्दांत मांडण्याजोगे कोणते पुरावे लेखकापाशी आहेत?

पुढे वाचा

चर्चा -आरोपाची आक्षेपार्हता पुराव्यांवर असते!

ग्रंथावरील परीक्षणात्मक टीकालेख वाचला. (आजचा सुधारक, नोव्हें. डिसे.९२) या ग्रंथाबद्दलचा त्यांचा अभिप्राय जाणून घेण्यास आम्ही अगोदरच उत्सुक असल्यामुळे त्यांच्या या परीक्षणाने आम्हाला साहजिकच आनंद झाला.
परीक्षणकर्त्याने आपल्या ग्रंथाचे कौतुक करावे अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे. आमच्यापुरते बोलायचे तर आमच्या ग्रंथावर टीकाकारांनी कठोर टीका करावी असे आम्हाला वाटत असते. ‘सावरकरांचा बुद्धिवाद : एक चिकित्सक अभ्यास’ या आपल्या १९८८ साली प्रसिद्ध झालेल्या ग्रंथावर अशी कठोर टीका कुणीही केली नाही याचे आम्हाला दुःखच वाटत आले आहे. मोघम कौतुकापेक्षा कठोर टीका विचारप्रवर्तक व म्हणूनच उपयुक्त असते.

पुढे वाचा

वृद्धांसाठी निवडीचा हक्क

मराठीतील सन्मानाने मरण्याचा हक्क’, ‘इच्छामरण’, ‘स्वेच्छामरण’ आणि इंग्रजीतील Euthanasia या शब्दांनी या विषयाचा उल्लेख करण्यात येतो. त्यामुळे या विषयाचा फक्त मरणाशीच संबंध आहे असा गैरसमज होतो. हा प्रश्न मरणाशी नव्हे तर जगण्याशी म्हणजे जीवनाच्या गुणवत्तेशी अधिक निगडित आहे. म्हणून निवडीचा हक्क (जगणे आणि मरणे यांपैकी कशाचीही निवड करण्याचा माणसाचा हक्क) हे शब्द या विषयाचा निर्देश करण्यासाठी मी अधिक पसंत करतो. माणसाला जगण्याचा हक्क आपल्या देशाच्या घटनेने दिला आहे, पण जीवनाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने जर आपण विचार करू लागलो तर आपल्या हे सहज लक्षात येते की हा जगण्याचा हक्क केवळ कागदावरच आणि वरपांगी आहे.

पुढे वाचा

प्रा. काशीकरांना उत्तर

माझ्या ‘धारणात् धर्म इत्याहुः’ या लेखावरील प्रा. काशीकरांची प्रतिक्रिया वर दिली आहे. ती वाचून माझ्या लेखातील एकाही प्रतिपादनाचे खंडन झाले असे मला वाटत नाही. उलट त्यांनी दिलेला म.म. पां.वा. काणे यांचा हवाला माझ्याच म्हणण्याला पोषक ठरणारआहे.
मी माझ्या लेखात असे प्रतिपादले आहे की गेल्या दीडशे वर्षांहून अधिक काळ ‘धर्म आणि ‘religion’ हे शब्द परस्परांचे पर्याय म्हणून रूढ आहेत. हे माझे म्हणणे प्रा. काशीकरांना मान्यच आहे. परंतु त्यांचे म्हणणे असे आहे की जर धर्माची मूळ संकल्पना religion च्या संकल्पनेहून वेगळी आहे असे कोणाच्या लक्षात आले तर त्याने तसे म्हणू नये काय?

पुढे वाचा

चर्चा – ‘धारणात् धर्म इत्याहुः।’ – दुसरी बाजू

‘आजचा सुधारक’च्या नोव्हें-डिसें. ९२ च्या अंकात ‘धारणात् धर्म इत्याहुः ।’ ह्या शीर्षकाखाली प्रा. मा.गो. वैद्य यांच्या पुस्तकातील ‘धर्म’ कल्पनेला विरोध करणारा प्रा. दि.य. देशपांडे यांचा लेख आला आहे. प्रा. वैद्य धर्म म्हणजे religion नव्हे असे म्हणतात, तर प्रा. देशपांडे यांचा आग्रहअसा की गेली दीडशे वर्षे धर्म म्हणजे religion हेच समीकरण अस्तित्वात आहे.
इंग्रजी भाषेत ‘धर्म’ शब्दाला पर्यायी शब्द नसल्यामुळे त्याकरिता जवळचा असा इंग्रजी religion हा शब्द रूढ झाला आहे हे खरे आहे. परंतु धर्म शब्दातील संकल्पना religion च्या संकल्पनेहून वेगळी आहे हे जर कोणाच्या लक्षात आले तर त्याने तसे म्हणू नये काय?

पुढे वाचा

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग २)

वाक्यांविषयीची वाक्ये
गेल्या अंकात प्रसिद्ध झालेला या लेखमालेचा पहिला पाठ ज्यांनी वाचला असेल अशा वाचकांपैकी अनेक वाचकांचे त्याने समाधान होणार नाही. ते म्हणतील : ‘तत्त्वज्ञान म्हणून तुम्ही दुसरेच काहीतरी आमच्या गळी उतरवीत आहात. आम्हाला तत्त्वज्ञानाची फारशी माहिती नसेल, पण आम्हाला इतके नक्की माहीत आहे की तुम्ही सांगता ते तत्त्वज्ञान नव्हे. तत्त्वज्ञान म्हणजे दृश्य जगाच्या मागे किंवा पलीकडे असणारे अदृश्य किंवा अतींद्रिय सत् त्याचे ज्ञान असे आम्ही ऐकले आहे. तसेच आम्ही हेही ऐकले आहे की तत्त्वज्ञान म्हणजे ज्याला अध्यात्म म्हणतात तेः म्हणजे आपल्या आत्म्याच्या खच्या स्वरूपाविषयीचे ज्ञान.

पुढे वाचा

अपत्यांनी मातापितरांचे कृतज्ञ राहावे?

पुष्कळ अविचारी आईबापे आपणास प्रतिपाल न करण्याइतकी संताने अस्तित्वात आणतात आणि उपजल्यापासून मरे तोपर्यंत त्यांचे जीवित शुद्ध दुःखभार करून ठेवतात ……अशा आईवापांच्या अंतःकरणात खरे अपत्यवात्सल्य असते तर त्यांनी असली संतती जगात आणलीच नसती. कित्येक लोक असे म्हणतात की मुले होणे ही काही कोणाच्या हातची गोष्ट नाही. नसेल बापडी! पण आम्हांस येवढे ठाऊक आहे की जरी प्रत्येक लग्न अपत्यावह होतेच असे नाही, तरी लग्नावाचून, म्हणजे स्त्रीपुरुषांच्या संयोगावाचून अपत्योत्पत्ती होते असे नाही. पावसाप्रमाणे मुले आकाशातून पडत असती….तर आईबापांचे निःसीम आणि निर्व्याज प्रेम आणि त्याबद्दल मुलांची कृतज्ञता यांचे खरे महत्त्व कोणाच्याही मनात बरोबर उतरले असते.

पुढे वाचा