मासिक संग्रह: मार्च, १९९९

संपादकीय

अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गरज
महाराष्ट्राचे परात्पर शासनप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांनी फेब्रुवारी महिनासुद्धा गाजविला. “आधी २५ लाख रुपये परत करा आणि मग अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गमजा करा” अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी अ. भा. मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षांना उद्देशून केले हा सारा वृतान्त आमच्या वाचकांना माहीत आहेच. प्रश्न केवळ कोण काय बोलले ह्याचा नाही – प्रश्न अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आहे.
ज्यावेळी एखाद्या राजाचे राज्य असे, त्याच्या पदरी असणा-या पंडितांना तो पोसत असे, तेव्हा त्या पंडितांना त्याची भाटगिरी केल्यावाचून गत्यंतर नसे. बलाढ्य, लहरी व उद्दाम अशा नरेशाकडून त्यांचे कधी अपमान झाल्यास ‘अर्थस्य पुरुषो दासः’ असे म्हणून ते स्वतःचे सांत्वन करीत.

पुढे वाचा

संग्राह्य पुस्तके

संग्राह्य पुस्तके
संपादक, आजचा सुधारक
खालील दोन पुस्तके संग्रही असावयास हवीत. .
(१) राजेश्वर दयाळ A Life of Our Times प्रकाशक – Orient Longmans
(२) अनिल अवचट – अमेरिका, प्रकाशक – कोठावळे
तसेच खालील दोन लेख वाचकांनी जरूर संग्रही ठेवावेत. दहा रु. पाठविल्यास मी त्या लेखाच्या झेरॉक्स पाठवीन.
(१) शिवाजीच्या स्वराज्य-चळवळीमागील ऐतिहासिक प्रेरणा धार्मिक होत्या काय? लेखक – वा. द. दिवेकर – नवभारत – एप्रिल १९८६.
(२)न झालेल्या (तळपद्यांच्या) विमानोड्डाणाची सुरस विद्वत्-कथा लेखक श्री. गो.ग. जोशी – लोकसत्ता – ता. १८-६-१९७८.

पुढे वाचा

स्फुट लेख – धर्मान्तर आणि राष्ट्रनिष्ठा

चालू महिन्यात जिची दखल घ्यावयालाच पाहिजे अशी जी एक घटना आहे ती ओरिसातल्या एका मिशनन्याच्या क्रूर हत्येची. दोन निरागस, ‘मासूम बच्च्यांसोबत केलेल्या एका शुद्धाशयाच्या निघृण वधाची. हा वध कोणी आणि कशासाठी केला हे नक्की माहीत नसले तरी तो धर्मज्वरातून झाला असण्याची शक्यता आहे.
धर्म एकीकडे मानवाची श्रेष्ठ कर्तव्ये कोणती हे सांगणारा असला तरी दुसरीकडे त्याचाच उपयोग पापभीरूंकडून अमानुष कृत्ये घडवून घेण्यासाठी करता येतो; एकदा का धर्मज्वर चढला, माणूस धर्ममदाने उन्मत्त झाला, की त्यांच्या भरात त्याची नृशंस कृत्यांची लाज नाहीशी होते हे धर्माचार्यांना चांगले माहीत आहे आणि धर्माचा तसा उपयोग करून घेण्यात त्यांना संकोच वाटत नाही.

पुढे वाचा

उदारीकरणात रुतलेली प्रसारमाध्यमे

भारताने आर्थिक उदारीकरणाचे धोरण ९१ साली स्वीकारल्यानंतरच्या अवस्थेबद्दल मी बोलणार आहे. गेले दोन महिने माझे फिरणे जरा कमी करून मी घरी घालवले. ह्या दोन महिन्यांत मी दोन गोष्टी केल्या. एक–टीव्हीवरचे काही कार्यक्रम पाहिले, दुसरे – माझ्याकडे असलेल्या ३०-४० मासिकांची मुखपृष्ठे फाडली व अवती-भोवती पसरून ठेवली. जेणेकरून मला या मासिकांतून कोणकोणते विषय मांडले आहेत ते पाहता येईल. मला असे आढळले की टीव्ही व मासिके ह्यांमधून मुख्यतः दोन विषयासंबंधीचे कार्यक्रम सातत्याने मांडले जात होते. विषय होता – भारतातील मोठ्या शहरांमध्ये वजन कमी करण्याच्या क्लिनिक्समध्ये झपाट्याने झालेल्या वाढीसंबंधी.

पुढे वाचा

चर्चा -श्री. महाजन ह्यांच्या लेखाच्या निमित्ताने

(१)’सत्य’ स्थलकालनिरपेक्ष असते काय?
माणसांना विज्ञानाच्या अभ्यासातून जाणवणारे सत्याचे स्वरूप बदलत जाणारे आहे. पण ह्यावरून खुद्द ‘सत्य’ बदलत जाणारे आहे किंवा नाही यावर काहीच प्रकाश पडत नाही. अखेर माणसे त्यांना जाणवणारी सत्ये सांगतात, ती केवळ वेगवेगळ्या रूपकांच्याद्वारे — models किंवा allegories च्या माध्यमातून. अशी रूपके बदलतात, असे विज्ञानाच्या इतिहासातून दिसते.
विज्ञानातील रूपके मान्य होण्यासाठी त्या रूपकांनी काही क्षेत्रांतल्या काही घटनांचा सुसंगत अर्थ लावायला हवा. जर या रूपकांच्या वापराने काही भाकिते वर्तवता आली, तर उत्तमच. श्री. महाजन अशा तीन रूपकांची उदाहरणे तपासतात (न्यूटनीय भौतिकी, सापेक्षतावाद आणि पुंजवाद).

पुढे वाचा

महागाई का होते?

आजचा सुधारक मध्ये अलीकडे सामाजिक विषयांवर लेख प्रसिद्ध होऊ लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे. सामान्य जनतेला दैनंदिन जीवनात जे चावते, पोळते त्यास वाचा फोडून त्यावर नागरिकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे व अंततः समाजाचे प्रबोधन करणे हे पुरोगामी विचारसरणीचे ध्येय साध्य होण्यास त्यामुळे साहाय्य होते हे निश्चित. अलीकडे महिलांना नोकरी करण्यास भाग पाडण्यास महागाई कारणीभूत आहे असे सुचविण्यात आले. परंतु महागाई का होते हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे. ह्यासंबंधी माझ्या अभ्यासातून व चिंतनातून मला जे जाणवते ते मी आ.सु. च्या वाचकांसमोर मांडू इच्छिते.

पुढे वाचा

समाजवाद, बाजारपेठा आणि लोकशाही

गेले काही दिवस समाजवादी तत्त्वांची पिछेहाट वेगाने होत आहे आणि भांडवलशाहीचे नव्याने कौतुक होत आहे. हे कौतुक बाजारपेठांवर आधारित असलेल्या अर्थव्यवस्थांच्या देदीप्यमान यशामुळे होत आहेच पण समाजवादी देशांच्या पिछेहाटीमुळेही होत आहे. सोव्हिएट रशियां, पूर्व युरोपीय देश आणि चीन ह्यांसारख्या देशांमध्ये पारंपरिक समाजवादी पद्धतींपासून अलग होण्याची प्रक्रिया जोरात सुरू झाली आहे. समाजवादी तत्त्वांची छाननी, अंतर्गत टीका ह्यामुळे हे बदल घडून येत आहेत, ते बाहेरून लादलेले नाहीत. समाजवादी दृष्टिकोनातून विचार केला तर खरी चिंता करण्यासारखी बाब ही आहे की केवळ संघटनेच्या व्यवहारातच नव्हे तर तात्त्विक चर्चेतही समाजवादी संकल्पनांना पराभव पत्करावा लागत आहे.

पुढे वाचा

पुरोहितब्राह्मणांना अनुकूल अशी समाजव्यवस्था

कलियुग म्हणजे मानवी अधःपाताची शेवटची पायरी असा प्रचार करण्यात पुराणांचा हेतु स्पष्टच आहे. पुरोहित ब्राह्मणांना अनुकूल असलेली समाजव्यवस्था सुवर्णयुगाची असे निश्चित झाले म्हणजे त्यात प्रत्यक्षात दिसून येणारी सर्व स्थित्यंतरे कलियुगातील अवनतिसूचक आहेत असे ओघानेच ठरते. विशेषतः जैन, बौद्ध वगैरे पाखंडांनी नवे आचारविचार, नव्या ईर्षा समाजात उत्पन्न केल्या. त्यांचा निराळा निषेध करण्याचे प्रयोजनच उरत नाही. ज्या पातकांच्या भारामुळे पृथ्वी कलियुगात दबून जाते ती पातके व्यासाची भविष्यवाणी म्हणून पुराणांत वर्णिलेली आहेत. त्या पातकांचे निरीक्षण केले म्हणजे पुरोहितवर्गास विशेष भय कसले वाटत होते ते स्पष्ट होते.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

घटस्फोटितांच्या कुंडल्यांमध्ये साम्य नाही
श्री. संपादक, आजचा सुधारक
आजचा सुधारक (जानेवारी १९९९) पान ३१६. माधव रिसबुडांचे पत्र : ‘फलज्योतिषाला वैज्ञानिक आधार नाहीच.
वरील पत्र वाचून मला माझा ह्या क्षेत्रातील अनुभव येथे नोंदवावासा वाटला. १९९० च्या सुमारास कै. वि.म. दांडेकर ह्यांच्या सांगण्यावरून घटस्फोट घेतलेल्या ३०० युगुलांची जन्मतारीख आणि जन्मवेळ (मी व वि.म. दांडेकरांनी) जमा केली. संगणकाच्या साहाय्याने त्यांच्या ३०० पत्रिका करणे सोपे गेले. जवळजवळ आठ सेकंदाला एक ह्या वेगाने जन्मतारीख व जन्मवेळ ह्यांच्या सहाय्याने ज्यांना कुंडल्या म्हणतात त्या तयार करून आम्ही एका समंजस वाटणाच्या ज्योतिष्यापुढे टाकल्या.

पुढे वाचा