मासिक संग्रह: जून, २००१

माणसांचे रूपांतर भराभर पाळीव प्राण्यांत होत आहे .

[साहित्य संमेलनातील सरकारी हस्तक्षेपाच्या निषेधार्थ १९८१ मध्ये मुंबईत स्वतंत्र साहित्य संमेलन भरविण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना मालतीबाई बेडेकर यांनी मांडलेले विचार आज दोन दशकांनंतरही तितकेच लागू आहेत.]
“हे संमेलन पर्यायी आहे की समांतर आहे, या वादात मी गुंतत नाही. जन्माला येणाऱ्या मुलालासुद्धा आपले खरे नाव लाभायला बारा दिवस लागतात. हे संमेलन मोकळेपणाने पहिले पाऊल टाकू पाहत आहे, एवढे खरे. हे एकच पाऊल असेल, ते लहानसेही असेल, पण एक चिनी म्हण आहे: प्रवास एक मैलाचा असो, नाही तर हजार मैलांचा असो, प्रवासाची सुरवात ही अशी पहिल्या पावलानेच होते.

पुढे वाचा

पत्रसंवाद

प्रियदर्शन पंडित, किल्ला रोड, महाल, नागपूर — ४४० ००२
मे महिन्याच्या आ.सु. मध्ये खादीवर स्फुट आले आहे. मी स्वतः पूर्ण खादी वापरणारा आहे. मी रोज सूत काततो. माझे वडील तर साध्या टकळीवर सूत कातीत. तेही पूर्ण खादी वापरीत. तेव्हा खादी हा माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा भाग आहे. म्हणून हा लेखनाचा प्रपंच करीत आहे.
माझ्या या लिखाणात माझे अनुभव आणि माझी काही वैयक्तिक माहिती येईल तरी तिला अहंमन्यता असे समजू नये ही विनंती, कारण आपल्या एकूण व्यवहारात आपण स्वतःसंबंधी उल्लेख टाळतो त्याचप्रमाणे व्यक्तींची नावे येऊ देत नाही.

पुढे वाचा

किडनी मिळेल का हो बाजारी?

एखाद्या व्यक्तीने पैशासाठी किडनीची विक्री केली अन्य एका व्यक्तीने स्वतःसाठी किंवा मुलीसाठी किडनी खरेदी केली, किंवा अन्य एका व्यक्तीने या व्यवहारात दलाल म्हणून काम केले, किंवा एका सर्जनने विकलेली किडनी काढण्याचे व विकत घेतलेली किडनी बसवण्याचे काम केले, असे ऐकल्यावर सर्व साधारण नागरिकाला सात्विक/नैतिक संताप येतो. हा संताप नुसताच अनाठायी नाही तर अन्यायकारक ही आहे असे मला म्हणावयाचे आहे.

श्रीमंत व्यक्ती आपला जीव वाचण्यासाठी आपल्या संपत्तीचा वापर करून किडनी विकत घेत असते. हा संपत्तीचा गैर किंवा अनावश्यक, दिखाऊ वापर म्हणता येणार नाही.

पुढे वाचा

“शास्त्र” म्हणे!

[“वैज्ञानिकांनी संस्कृत शिकायलाच हवे : जोशी’ ह्या मथळ्याने दिलीप पाडगावकरांनी घेतलेली मुरली मनोहर जोशींची मुलाखत टाईम्स ऑफ इंडियाच्या १५ एप्रिल २००१ च्या पहिल्या पानावर प्रकाशित झाली. तिचे हे भाषांतर.]
इतर कोणत्याही भाजप नेत्यापेक्षा मुरली मनोहर जोशींवर सेक्युलर विचारवंत खार खाऊन असतात. धोतर, उपरणे, गंध, शेंडी, सगळेच त्यांना चिरडीस आणते. जोशींचा देशाच्या शिक्षणव्यवस्थेवर आणि संशोधनसंस्थांवर भगवा कार्यक्रम लादण्यातला निर्धार तर त्यांना सर्वांत जास्त खुपतो. मुमजो प्रचारक किंवा पोथीचे भाष्यकार म्हणून बोलत नाहीत, तर विचारवंत आणि त्यातही वैज्ञानिक या नात्याने बोलतात. डावे आणि उदारमतवादी विचारवंत जे संकल्पनांचे क्षेत्र आपली मिरास असल्याचे मानतात, त्यातच मुमजोंना स्वतःचे कुरुक्षेत्र दिसते.

पुढे वाचा

‘हरीभरी’च्या निमित्ताने

माझ्या मित्रमैत्रिणींनी शिफारस केली म्हणून ‘हरीभरी’ पाहायला गेले. शाम बेनेगल दिग्दर्शक, शबाना आझमी, रजित कपूर, नंदिता दास आदी कसलेले कलाकार वाचल्यावर ‘हरीभरी’ नक्कीच आपल्याला आवडेल असा असणार असे वाटले. शाम बेनेगल कोणती तरी सामाजिक समस्या घेऊन येणार व त्याला आशादायी असे उत्तर सुचविणार ह्याची अपेक्षा होती. (‘अंकुर’मधील लहान मुलाने काचेवर दगड फेकून व्यवस्थेला आपला नोंदवलेला निषेध आठवा.) अन् झालेही तसेच!

प्रश्न जरी केवळ मुस्लिम स्त्रियांपुरताच मर्यादित ठेवला असला तरी ‘शितावरून भाताची परीक्षा’ या न्यायाने त्या समस्येचे सामान्यीकरण करायला हरकत नाही, तेही तेवढेच सत्य ठरेल.

पुढे वाचा

स्त्री-सुधारणेच्या वारशाचे–विस्मरण झालेला महाराष्ट्र

देशातील सर्वांत प्रगत आणि कायदा व सुव्यवस्थेबाबतीत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात गेल्या सहस्रकाच्या अखेरच्या वर्षात राज्यातील स्त्रियांची अवस्था फार शोचनीय असल्याचे आढळते. मुंबई महानगराला मागे टाकून नागपूर व अमरावती जिल्हे स्त्रियांवरील अत्याचारांबाबतीत पुढे आहेत. पुणे, नांदेड, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातही या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (सी. आय. डी.) नुकतीच ही आकडे-वारी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार गेल्या पाच वर्षांत महिलांसंबंधी गुन्ह्यांची संख्या सुमारे तीन हजारांनी घटली. परंतु मुळातच हे प्रमाण भयावह आहे. यावर्षी दाखल झालेल्या १३,५८२ प्रकरणात प्रमुख गुन्ह्यांची संख्या पुढीलप्रमाणे —-
दर आठवड्याला सुमारे २५ बलात्कार म्हणजे वर्षात १३०८ बलात्कारांना स्त्रियांना सामोरे जावे लागले.

पुढे वाचा

गृहिणी —- प्रवास चालू (दांपत्यजीवन)

“कुटुंबकेंद्रित समाज आणि स्त्रीकेंद्रितकुटुंब’ या विषयाचा मी मागोवा घेण्याचा प्रयत्न करतोय. मी काही तात्त्विक चर्चा करायला बसलेलो नाही तर या विषयात निरनिराळ्या ठिकाणाहून आत शिरण्याचा प्रयत्न करतो आहे. एक गृहिणी म्हणून तिच्या विविध प्रकारच्या कामांचा अगदी थोडक्यात मी आढावा मांडला होता. तेथे गृहिणी ही ‘कर्ती’ होती. विचार आला की या कर्तीचे पुढे होते काय?
खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. माझे दोन मित्र गप्पा मारत होते. एक म्हणाला —-अरे, वैजू म्हणते आहे, आठपंधरा दिवस माहेरी जाते. तिच्या आईला जरा बरं नाहीयं वाटतं.

पुढे वाचा

विवेकवादावरील आव्हानांस उत्तर

प्राध्यापक रेगे यांचे तत्त्वज्ञान या ग्रथांतील डॉ. सुनीति देव यांच्या ‘विवेकवाद आणि त्याच्यापुढील आव्हाने’ या लेखाला प्रा. रेग्यांनी दीर्घ उत्तर दिले आहे. त्यांच्या सर्वच लिखाणाप्रमाणे हे उत्तरही गंभीर विचाराने परिप्लुत आणि अतिशय व्यवस्थित झाले आहे. त्यातील काही युक्तिवादांना उत्तरे देण्याचा हा प्रयत्न.
१. आरंभी प्रा. रेगे यांनी देवांच्या लेखातील ढोबळ चुका म्हणून दोन गोष्टींचा उल्लेख केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे विज्ञानाच्या औपन्यासिक-निगामी रीतीत (hypothetico-deduction method) एक अवैध अंश आहे ही. विज्ञानाची रीत औपन्यासिक-निगामी आहे हे खरेच आहे; पण तिच्यातील अवैध अंशामुळे तिचे निष्कर्ष सिद्ध होत नाहीत असे रेगे म्हणतात.

पुढे वाचा

आबा

. . . ती तरुण मुले वेडावली होती. ती कोणत्याही सार्वजनिक नळावर पाणी पीत हुंदडत होती. मार खात होती. स्पृश्य जगाच्या कपाळावरील आठ्यांकडे उपहासाने पाहात होती. कोणत्याही देवळात शिरत होती, आणि डोक्यावर घाव घेत होती. देवाच्या मायेची पाखर घेऊन, बेडरपणे स्पृश्य जगाच्या नरड्याशी झोंबू पाहणाऱ्या रागीट नजरांशी नजर भिडवीत होती. पण अखेरीस त्या देवदर्शनाने त्यांची पोटे भरली नाहीत. त्या स्पृश्यांच्या नळावर पाणी पिऊन त्यांचे समाधान झाले नाही. मग ती समाधानासाठी माणसांकडे पाहू लागली. त्यांना तीनच माणसे माहीत होती. गांधीबाबा, दादा आणि आबा.

पुढे वाचा