आजचा सुधारक ची पहिली दोन वर्षे (एप्रिल ‘९० ते मार्च ‘९२) पानांचे क्रमांक दर महिन्यात नव्याने सुरू केले जात. एखाद्या महिन्यात एक ते बत्तीस क्रमांक दिले, की पुढील महिना परत एक पासून सुरू केला जाई. नंतर असा विचार आला, की लेखांवरील चर्चा, पत्रे, प्रतिक्रिया, असे करत एखाद्या विषयावरील सर्वांचे सर्व मुद्दे समजून घेण्यामुळे मासिक खरे तर मालिकाबद्ध पुस्तकासारखे रूप घेते. त्यामुळे एकेक वर्ष तरी पानांचे क्रमांक सलग द्यावेत. एप्रिल ‘९२च्या अंकापासून आजवर ही पद्धत सुरू आहे. त्यावेळी मी आसु चा वाचकही नव्हतो, पण दि.य.देशपांडे,
विषय «इतर»
हिंसेचा इतिहास
मांजर-दहन हा सोळाव्या शतकातील पॅरीसमधील मनोरंजनाचा लोकप्रिय कार्यक्रम होता. ह्या ‘खेळा’त मांजराला एका दोरीला टांगून हळूहळू खाली आगीत सोडण्यात येई. नॉर्मन डेव्हीज या इतिहासतज्ज्ञाच्या मते “मांजर जसजसे होरपळत, भाजत, जळत जाऊन अखेरीस काळे ठिक्कर पडे, तसे प्रेक्षक (ज्यात राजाराण्यांचा समावेश असे) खदाखदा हसत किंचाळ्या मारत.” परपीडनानंदाचे असे बीभत्स प्रदर्शन आजच्या काळात अतयं वाटते. माणसाच्या संवेदनशीलतेतील हा बदल, गेल्या काही शतकात हिंसेत झालेली घट, हा मानवी इतिहासातील सर्वांत महत्त्वाचा, पण दुर्लक्षित प्रवाह आहे.
हिटलर, स्टॅलिन व माओनंतरच्या शतकात व इराकच्या जखमा ओल्या असताना हिंसा उतरणीला लागल्याचा दावा करणे हा क्रूर विनोद किंवा अश्लील बाब वाटू शकते.
खेळ मांडियेला
खेळकरपणा अपरिपक्वतेचा निदर्शक आहे. इतर प्राणिमात्रांच्या तुलनेत मानवजातीच्या उत्क्रांतीत परिपक्वपणा उशीराने येणे ही एक महत्त्वाची बाब आहे. थोडक्यात म्हणजे मानव हा एक अपरिपक्व कपी (immature ape) आहे. प्रौढत्वाला पोचायला माणसाला जितका वेळ लागतो तेवढा इतर कोणत्याच कपीला लागत नाही. या विस्तारित बालपणातच आपण शिकतो आणि खेळतो. इतर कपींच्या एकूण आयुर्मर्यादेइतका वेळ आपण खेळत असतो.
इतर सस्तन प्राणी आणि पक्षीही खेळतात. वासरे, शिंगरे, शेरडे कानात वारा भरून नाचतात. कुत्री, मांजरे व त्यांचे नातलग यांची पिल्ले खोटीखोटी भांडणे करत खेळतात. अनेक प्राण्यांना माणसाळवायला एखादा सवंगडी, सोबती पुरवून खेळू देणे महत्त्वाचे असते.
पुस्तक परिचय- वेताळाच्या आरोग्यकथा
रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी लिहिलेले हे एक वेगळ्या प्रकारचे पुस्तक. “बंडखोरी करणाऱ्या व नवनिर्मितीच्या मुळाशी असणाऱ्या प्रश्न विचारण्याच्या व उपस्थित करण्याच्या प्रवृत्तीस’ ही अर्पण पत्रिकाही कुतूहल वाढवणारी आहे.
औषधशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण मिळवून मुंबईला एस्.एन्.डी.टी. विद्यापीठात २० वर्षे प्राध्यापिकी केलेल्या या लेखक महोदयांनी महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांनाही वाचा फोडली. स्त्री भ्रूणहत्येचे महाराष्ट्रातील वाढते प्रमाण, सोबतच औषधनिर्मिती व विक्रीचा बाजार, त्यात होत जाणारी रुग्णांची फसवणूक, जाणीवपूर्वक किंवा अजाणता डॉक्टर मंडळी यात का सामील होतात ; या सर्व प्रश्नांना उत्तरे शोधायचा प्रयत्न करतानाच त्यावर काही उपाय करता येतील का, हा महत्त्वाचा प्रश्न ते आपल्यासमोर मांडतात.
कामाला लागा, तत्त्वचर्चा पुरे!
[अमर्त्य सेन यांचे द आयडिया ऑफ जस्टिस हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. त्यानिमित्ताने लेखकाने दिलेली एक मुलाखत इंडियन एक्स्प्रेस ने (८ ऑगस्ट ‘०९) प्रकाशित केली. त्यातील काही अंश असा -] प्रश्नकर्ता : हे पुस्तक आणि धोरणनिश्चिती यांतील संबंधाबद्दल तुम्ही म्हणालात की हा अभियंत्यांचा संदर्भग्रंथ (Engineer’s Handbook) नाही. सेन : तुम्हाला पूल कसा बांधावा हे या पुस्तकात सापडणार नाही – जमीन कशी, सामान कुठून आणायचे – नाही. तुम्हाला पूल किती रुंद असावा यावर कसा विचार करावा, ते इथे सापडेल; वाहतूक कश्या प्रकारची असेल ते हे सांगेल.
डार्विन आणि स्त्रीवादः संवादी शक्यता
निसर्गाविषयी भूमिका घेण्याबद्दल स्त्रीवाद्यांमध्ये बहुतांशी प्रतिकूलता आढळते. निसर्ग म्हणजे निष्क्रिय, अपरिवर्तनीय, ज्याविरुद्ध लढावे लागेल असा अडथळा – असेच चित्रण स्त्रीवादी साहित्यात दिसते. स्त्रीवादी राजकारणाचा रोखही बढेशी असाच राहिला आहे. अर्थात् मानवी किंवा सामाजिक जीवनाच्या जीवशास्त्रीय विश्लेषणाबद्दल स्त्रीवाद्यांना वाटणाऱ्या शंका अप्रस्तुत नाहीत. कारण शास्त्रज्ञांनी जीवशास्त्रीय अध्ययनांमध्ये शरीर, शारीरिक क्रिया-प्रक्रिया यांच्याविषयी मांडलेली गृहीतके, त्यांसाठी वापरलेली तंत्रे व निकष यांमध्ये अनेकदा पूर्वग्रहदूषित व अवैज्ञानिक बाबी आढळतात. विशेषतः उजवी मंडळी आपल्या मतांच्या पुरस्कारासाठी ज्या प्रकारचे विश्लेषण/अध्ययन वापरतात, त्याच्याबद्दल तर स्त्रीवाद्यांचे आक्षेप हमखास लागू पडतात. परंतु, सरतेशेवटी आपण सर्वच निसर्गाचा, जीवशास्त्राचा एक भाग असल्यामुळे निसर्ग किंवा जीवशास्त्रालाच नाकारणे कितपत योग्य ठरेल ?
संपादकीय रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
“कोणत्याही संकल्पनेचे महत्त्व जर तिच्याद्वारे प्रेरित वैचारिक परिवर्तनाने मोजण्याचे ठरविले, तर नैसर्गिक निवडीद्वारा उत्क्रांती ही निर्विवादपणे मानवी इतिहासातील सर्वांत महत्त्वपूर्ण संकल्पना ठरेल.”
चार्ल्स डार्विनच्या जन्माला यंदा दोनशे वर्षे पूर्ण झाली. त्याच्या ऑरिजिन ऑफ स्पीशीज ह्या ग्रंथाच्या प्रकाशनालाही दीडशे वर्षे लोटली. पण ह्या ग्रंथामुळे उडालेली खळबळ अजूनही विरली नाही. मानवी बुद्धिमत्तेच्या विविध अंगांना कवेत घेणारा, दैवकशास्त्रापासून वैद्यकशास्त्रापर्यंत अनेक क्षेत्रांत मूलभूत वैचारिक परिवर्तन घडविणारा व एकाच वेळी अनेक नव्या विद्याशाखांना जन्म देणारा असा ग्रंथ मानवी इतिहासात अभूतपूर्वच म्हणायला हवा. त्याहून महत्त्वाची बाब ही की ह्या ग्रंथाने मानवी स्वभाव, प्रेरणा, विचारपद्धती व वर्तन यांच्याविषयी फेरमांडणी करतानाच काही असे प्रश्न उपस्थित केले, ज्यांची चर्चा गेली दीडशे वर्षे सुरू आहे व यापुढेही राहील.
तीन टिपणे
शॉर्ट में निपटाओ! डार्विनच्या उत्क्रांतीच्या तत्त्वाचे एक त्रोटक वर्णन पाहा एखादी सजीव रचना टिकून राहते, कारण ती तिच्या परिस्थितीशी अनुरूप असते. ती परिस्थितीशी अनुरूप असण्याचा पुरावा हा, की ती टिकून राहते.
वरच्या परिच्छेदातले वर्णन हे वर्तुळाकार युक्तिवादाचे (circular argument) उदाहरण आहे. ते तर्कदुष्ट आहे. मुख्य म्हणजे वेगवेगळ्या जीवजाती कशा घडल्या यावर ते काहीही प्रकाश टाकत नाही. पण थोडक्यात उत्क्रांती म्हणजे अशा प्रस्तावनेसकट ते बरेचदा पुढे केले जाते. कार्ल पॉपर हा विज्ञानामागचे तत्त्वज्ञान तपासणारा खंदा तत्त्वज्ञही एका यासारख्या युक्तिवादाने चकून म्हणाला, की डार्विनचे नैसर्गिक निवडीचे तत्त्व हा एक आधिभौतिक संशोधन प्रकल्प (a metaphysical research program) आहे.
उत्क्रांतिवाद, जाणीव आणि ब्रह्म
प्रथम काही गोष्टी स्पष्ट करणे योग्य ठरेल.
1. उत्क्रांतिवाद आणि ब्रह्माबाबतचा विचार (आणि अनुभव?) या दोहोंतही मी तज्ज्ञ नाही.
2. मी उत्क्रांतिवाद मानतो, किंबहुना सर्वच आधुनिक विज्ञाने मानतो.
3. एका वेगळ्या पातळीवर मी अद्वैत तत्त्वज्ञानही मानतो. हे मानणे श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांना अनुसरून आहे. म्हणजे त्यात सगुण ब्रह्माला व ईश्वरालाही स्थान आहे. अनेक मार्गांनी आपल्याला ब्रह्माचा व ईश्वराचा साक्षात् अनुभव घेता येतो.
4. अद्वैताचे हे रूप आणि उत्क्रांतिवाद यांचा परस्परसंबंध हाच खरा या लेखाचा विषय असायला हवा. परंतु हे विवेचन एका लेखात होणार नाही व मी ते करू शकणार नाही..
वेध डार्विनच्या उत्क्रांतिवादाचा
सुमारे पंचवीस वर्षांच्या सृष्टिनिरीक्षण व संशोधनानंतर सजीवांच्या उत्क्रांतीचा जो सिद्धान्त चार्ल्स रॉबर्ट डार्विन (१२ फेब्रुवारी १८०९ ते १९ एप्रिल १८८२) यांनी साकार केला, त्याची मांडणी त्यांनी अशी केली – सजीवांमध्ये प्रजोत्पादनाची प्रचंड क्षमता असते. त्यामुळे सजीवांची बेसुमार निर्मिती होते. सजीवांच्या प्रचंड संख्येच्या मानाने अन्न व निवाऱ्याच्या सुविधा कमी असल्याने त्यांच्यात जगण्यासाठी व तगण्यासाठी धडपड सुरू होते (struggle for existence). या धडपडीतूनच जीवघेणी स्पर्धा (competition) सुरू होते. स्पर्धेत तगून राहण्यासाठी परिस्थित्यनुरूप सजीवांच्या गुणांत बदल घडून येतात. बदललेल्या सुयोग्य गुणांची निसर्ग निवड करतो (natural selection).