विषय «इतर»

राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनांचे भवितव्य (१)

गेलनर ह्यांनी राष्ट्रवाद हा औद्योगिकीकरणाच्या आणि भांडवलशाहीच्या आवश्यकतेतून जन्मल्याचे मांडले आहे. त्यामुळे राष्ट्रवाद ही आधुनिक संकल्पना आहे व तिचा जन्म औद्योगिकीकरणापासून झाला असा त्यांचा सिद्धान्त त्यांनी Nations & Nationalism ह्या १९८४ साली प्रसिद्ध झालेल्या प्रबंधात मांडला आहे. औद्योगिकीकरणाची परमसीमा गाठली आणि भांडवलशाही पूर्णपणे विकसित झाली तर राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनावर काय परिणाम होतील हा त्यावेळी त्यांच्यापुढे संभाव्य (हायपोथेटिकल) प्रश्न होता.१ पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीने आज जग अशा एका टप्प्यावर आहे की त्यांचा संभाव्य प्रश्न आज खराच आपल्यापुढे उभा आहे. राष्ट्राचे सार्वभौमत्त्व आणि राष्ट्राच्या सीमा हे दोन आधुनिक राष्ट्राचे निकष मानले जातात.

पुढे वाचा

रोजगार हमी योजना: महाराष्ट्रातील अनुभव

लोकसभेने भारताकरिता रोजगार हमी योजनेचा कायदा करू घातला व भारतातील सर्व गरजूंना रोजगाराची हमी देण्याचे ठरविले. त्यासाठी मोठीच रक्कम मंजूर झाल्याचे समाधान लाभले. परंतु याच सुमारास सोलापूर जिल्ह्यात ९.१ कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आल्याने भारताची हजारो कोटींची रक्कम अशीच उधळली जाण्याची कोणालाही भीती वाटल्याशिवाय राहिली नाही व आज गेल्या तीस वर्षे महाराष्ट्रात चालू असलेल्या रोहयो कडे इतर राज्यांना धडे देण्याची कितपत कुवत आहे याकडे लक्ष वेधले गेले.
महाराष्ट्रात रोहयो १ मे १९७२ सालीच राबविण्याचे ठरले होते. राज्यात जलसिंचन विशेष मर्यादित असल्याने शेतीचा विकास होत नव्हताच.

पुढे वाचा

विवेकवाद-भाग १०ः (प्रथम प्रकाशन मार्च१९९१ अंक १.१२, लेखक : दि. य. देशपांडे)

श्रद्धेचे दोन प्रकार विधानांवरील आणि मूल्यांवरील
‘श्रद्धा’ किंवा ‘विश्वास’ हा शब्द दोन वेगळ्या अर्थांनी वापरण्यात येतो. एका अर्थी श्रद्धा म्हणजे एखादे विधान सत्य आहे असा दृढविश्वास, तर दुसऱ्या अर्थी श्रद्धा म्हणजे एखाद्या मूल्यावरील निष्ठा. ह्या दुसऱ्या अर्थी ‘श्रद्धा’ या शब्दाऐवजी ‘निष्ठा’ हा शब्द वापरणे श्रेयस्कर आहे, कारण तो व्यर्थी नसल्यामुळे त्याच्याविषयी गैरसमज होण्याची भीती नाही. अमुक गोष्ट मूल्य आहे म्हणजे ती स्वार्थ १. वांछनीय आहे अशी दृढनिष्ठा. याच्या उलट पहिल्या प्रकारची श्रद्धा म्हणजे एखादे विधान सत्य आहे अशी पक्की खात्री. या विश्वासाला ‘श्रद्धा’ म्हणण्याचे कारण असे की त्याला पुराव्याचा आधार नसतो.

पुढे वाचा

आइनस्टाईन: उत्कट साहसवीर

‘ते आमचे प्राध्यापक आइनस्टाइन’ टॅक्सीचालकाने ममत्वपूर्ण अभिमानाने सांगितले. उर्मटपणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या अमेरिकन टॅक्सीचालकांच्या जातीत हे दुर्मिळच होते. डिसेंबर १९४८ मधील एका मरगळलेल्या दुपारी प्रिन्स्टनमधील पदपथावरून उत्साहाने चालत असेल्या व्यक्तीकडे त्याचा रोख होता. आता पांढरी आणि विरळ झालेली ती सुप्रसिद्ध केसांची आयाळ त्या हवेतही हॅटखाली झाकलेली नव्हती. अंगावर शर्ट-आणि-टायऐवजी खलाशी वापरतात तशी विणलेली जर्सी होती, आणि बूट मोज्यांशिवायच घातलेले होते.

ज्याच्या सिद्धांतांनी चेष्टा आणि टिंगलटवाळीपासून ते परमोच्च स्तुतीपर्यंत सर्वप्रकारच्या प्रतिक्रिया ओढवून घेतल्या होत्या त्या माणसाचे कधीही न विसरण्याजोगे पहिले दर्शन हे असे होते.

पुढे वाचा

वास्तव म्हणजे हेच – चेतापेशींचे व्यवहार

[कॅलिफोर्निया विद्यापीठ (सॅन दिएगो) येथील मेंदू व बोधन (लेसपळींळेप) संशोधन केंद्रा चे संचालक डॉ. व्ही. एस. रामचंद्रन यांची इंडियन एक्सप्रेस चे मुख्य संपादक शेखर गुप्ता यांनी १८ सप्टें. २००५ रोजी एनडीटीव्ही २४ ७ या वाहिनीच्या वॉक द टॉक कार्यक्रमात मुलाखत घेतली. तिचा काही भाग २० सप्टें. ०५ च्या इंडियन एक्सप्रेस मध्ये प्रकाशित झाला. त्याचे हे भाषांतर.]
शेखर गुप्ताः मला मज्जाशास्त्राची (neuroscience) काहीच माहिती नाही….
रामचंद्रनः ते नवे आणि झपाट्याने वाढणारे शास्त्र आहे. गेल्या दहापंधरा वर्षांत कल्पना व प्रयोग यांचा त्या क्षेत्रात स्फोटच झाला आहे.

पुढे वाचा

पॉपरचे ‘विश्व-तीन’

विज्ञानाच्या ज्ञान कमावण्याच्या पद्धतीचे पारंपरिक वर्णन पॉपरने बदलले. निरीक्षणे व प्रयोग, त्यातून विगमनाने सामान्य सूत्र ठरवणे, तपासाला योग्य असे “उमेदवार’ तत्त्व मांडणे, ते प्रयोगांनी सिद्ध करायचा प्रयत्न करणे, त्यातून सिद्धता असिद्धता ठरवणे, या प्रक्रियेतून ज्ञान मिळते; अशी विज्ञानाबद्दलची पारंपरिक मांडणी होती. पॉपरने त्याऐवजी सुचवलेल्या शोधपद्धतीची रूपरेषा अशी १) उद्भवलेला प्रश्न २) नव्याने तत्त्वातून सुचवलेले उत्तर ३) नव्या तत्त्वातून निगामी पद्धतीने काढली गेलेली प्रयोगांमधून तपासता येतील अशी उत्तरे किंवा विधाने, ४) निरीक्षणे, प्रयोग वा इतर पद्धतींनी या विधानांचा खरेखोटेपणा तपासणे एका अर्थी हा नवे तत्त्व खोटे पाडायचाच प्रयत्न.

पुढे वाचा

अळीमिळी गुपचिळी

भारतात लोक कामव्यवहाराबद्दल बोलतच नाहीत. पाश्चात्त्य दृष्टिकोनात भारतीय उपखंड हे चित्रविचित्र इंद्रियानुभव घेणाऱ्यांचे आगर भासू शकते. त्या भागाच्या इतिहासात कामसूत्रही आहे, आणि आजचे पॉप स्टार्स ज्याचा उदोउदो करतात ते तांत्रिक व्यवहारही आहेत. भारतीयांना मात्र भारत हा पाश्चात्त्यांच्या लघळपणाविरुद्धच्या आणि चावट साहित्याविरुद्धच्या लढाईतील किल्ल्यासारखा वाटतो. हे बदलते आहे. चित्रपटातली चुंबने आणि कॉस्मॉपॉलिटन सारखी सचित्र मासिके आता भारतातही मान्य झाली आहेत. मध्ये दिल्लीत दोन समलिंगी स्त्रियांचा विवाहही झाला. पण पारंपरिक स्थितिवादी मूल्ये आजही जास्त प्रबळ आहेत. सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच वर्षी समलिंगी व्यवहारांवरील बंदी अधोरेखित केली, आणि आजही भद्रकुटुंबातील भारतीय स्त्री मिनिस्कर्ट किंवा बिकिनी पेहरत नाही.

पुढे वाचा

अमेरिकन आरक्षण!

भारतीय लोक परदेशांत इतके यशस्वी कसे झाले? विशेषतः अमेरिकन संघराज्यात? इन्फोसिस, विप्रो आणि तसल्यांना येवढे महत्त्व कसे मिळाले ? ‘ग’, गुणवत्तेचा, हा उत्तराचा एक भाग झाला. पण सोबतच तो अनुल्लेखित ‘आ’, आरक्षणाचा, हाही भाग आहे हो आरक्षणाची अमेरिकन आवृत्ती! ऐकताना विचित्र वाटेल, पण अमेरिकेतल्या १९५०-७० या दशकांमधल्या नागरी हक्क चळवळीतच (Civil Rights Movement) भारतीयांच्या यशाची मुळे आहेत.
शतकानुशतके गुलामगिरी आणि पिळवणूक अमेरिकन काळ्यांनी भोगली, भारतातल्या अनुसूचित जातीजमातींसारखेच ते. त्यांनी त्याविरुद्ध लढा दिला, कधी प्राणाचे मोलही दिले. यातून १९६४ चा नागरी हक्क कायदा घडला.

पुढे वाचा

स्त्री-पुरुष भेद

स्त्री-पुरुष समतेसाठी काय-काय करावे लागेल याची यादी अनेक विचारवंत-तत्त्वज्ञांनी केली आहे. त्यासाठी जोरदार प्रयत्नही सुरू आहेत. स्त्री-पुरुष समतेसाठी मांडण्यात येणाऱ्या मुद्द्यांच्या आड स्त्री आणि पुरुष यांची भिन्न मानसिकता येते काय, याचे उत्तर होय असे आहे. ते एक मानसशास्त्रीय कटु सत्य आहे.
स्त्री आणि पुरुष यांची मानसिकता ही आपल्या पूर्वजांकडून उत्क्रांत होत आलेली एक साखळी आहे. जेव्हा ते जोडीदार शोधतात तेव्हा दोघांच्या आवडी-निवडीची मानसिकता कमालीची भिन्न आढळते. ज्या काही समान आवडी-निवडी आहेत; उदा. सहकार्य करण्याची वृत्ती, विश्वासूपणा, प्रामाणिकपणा, ह्या दोघांनाही हव्या असतात; परस्परावलंबन आणि बुद्धिमत्ता दोघांत समान असते ; दोघांनाही ‘धोका दिला जाणे’ आवडत नाही.

पुढे वाचा

आरसा

टीव्ही हे माध्यम आज पत्रकारितेच्या अर्थाची व्याख्या बदलत आहे. तटस्थ विश्लेषण, समतोल, सत्याबद्दल पावित्र्याची भावना, हे सारे मागे पडत आहे. बातम्या रंजक करून प्रेक्षकांना सतत उत्तेजित करणे, हा नवा गुरुमंत्र आहे. आज टीव्ही हे साठमारीचे रक्तरंजित मैदान झाले आहे मग ते झी-न्यूज ने गुडियाबद्दल सहानुभूती जागवणे असो की बिशन बेदीच्या स्टार न्यूज वरील कार्यक्रमाची आज किस की मौत आई है शैली असो. पत्रकारिता, वार्ताहरांचे काम आणि अभिव्यक्तीची इतर माध्यमे यांच्यातल्या सीमा पुसल्या जात आहेत. सत्य आणि कल्पित यांच्यात फरक उरलेला नाही मध्ये अमिताभ आणि अभिषेक यांनी त्यांच्या बंटी और बबली रूपात टीव्हीवर बातम्या दिल्या.

पुढे वाचा